शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

स्वच्छता ही सेवाकार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्र्यांचे निर्देश

शासकीय अभिलेख तातडीने संगणकीकृत करा
                     - बबनराव लोणीकर
                                                                                               
अमरावती, दि. 29 : संपूर्ण देशभरात स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयातही स्वच्छता असणे अपरिहार्य आहे. त्यामुळे मोठी जागा व्यापणारे शासकीय अभिलेख संगणकीकृत करावे व कार्यालयात सातत्यपूर्ण स्वच्छता निर्माण करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे दिले.
स्वच्छता ही सेवाया कार्यक्रमांतर्गत श्री. लोणीकर यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस आयुक्त कार्यालय व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात जाऊन तेथील रेकॉर्डरुमची व परिसराची पाहणी केली व अधिकारी- कर्मचा-यांशी संवाद साधला. पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले की, परिसरातील स्वच्छतेसोबतच कार्यालयात अनेक वर्षांपासून जतन केलेले अभिलेख व दस्तावेज मोठी जागा व्यापतात. त्यामुळे ते संगणकीकृत करुन कार्यालयांची स्वच्छता करावी.
 श्री. लोणीकर पुढे म्हणाले की, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जुने अभिलेख सुरक्षित ठेवणे आव्हानात्मक असते; पण तंत्रज्ञानाच्या साह्याने हे काम सुलभ झाले आहे. विशिष्ट आज्ञावलींच्या मदतीने सर्व अभिलेख व माहिती सुरक्षित ठेवता येते व त्यातून हवी ती माहिती तातडीने मिळणे शक्य होते. त्यामुळे या अभिलेखांचे संगणकीकरण लवकरात लवकर शासकीय कार्यालयांची स्वच्छ, सुसज्ज करावीत.  शासकीय कार्यालयांत जिल्ह्यातील नागरिकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे स्वच्छता अभियानाचा प्रसार करताना आपले कार्यालयही स्वच्छ असावे, या जाणिवेतून सर्वांनी काम केले पाहिजे.
यावेळी विविध कार्यालयांचे अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.





00000

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

शेती व शेतकऱ्यांच्या समस्या प्राथमिकतेने सोडविणे आवश्यक
-         पालकमंत्री प्रविण पोटे

·        शोभा फडणवीस लिखीत धांडोळा शेतीचा पुस्तकाचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन
अमरावती, दि. 15 : शेती आणि शेतकरी जगले तरच देश जगेल. सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रथम शेतीविषयक समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे. वर्तमानातून भविष्यात पाहतांना शेती व शेतकऱ्यांच्या हिताकडे प्राथमिकतेने पाहणे गरजेचे आहे. धांडोळा शेतीचा या पुस्तकाच्या माध्यमातून श्रीमती शोभा फडणवीस यांनी शेतीच्या समस्यांवर प्रभावी उपाय सूचविले आहेत. हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्यात यशस्वी होईल, असा विश्वास पालकमंत्री प्रविण पोटे यांनी व्यक्त केला. श्रीमती शोभा फडणवीस लिखीत धांडोळा शेतीचा या पुस्तकाच्या विमोचन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. टाऊन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात उपमहापौर संध्या टिकले, खासदार रामदास तडस, आमदार रमेश बुंदिले, ॲड. यशोमती ठाकूर, मनपा स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, वनस्पतीशास्त्रज्ञ केशव ठाकरे, मनपाचे झोन सभापती लविना हर्षे व सुरेखा लुंगारे, शिक्षण सभापती चेतन गावंडे, उपसभापती पद्मजा कौंडण्य उपस्थित होते.
प्रविण पोटे म्हणाले, राज्यात शेती व शेतकऱ्यांच्या असंख्य समस्यांनी उग्र रुप धारण केले आहे. त्याचे परिणाम शेतकरी बांधवांसह समाजातील सर्व घटक भोगत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भविष्यातील शेती नियोजन व परिवर्तनाच्या दिशेने सूचविलेल्या उपाययोजनांचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल. सिंचन, कर्ज, हमी भाव, खत विषयक समस्या यावरील उपायांच्या प्रभावी अंमलबजावणीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
श्रीमती शोभा फडणवीस यांनी धांडोळा शेतीचा या पुस्तकाच्या विषयाबाबत पार्श्वभूमी सांगितली. शेतकरी बांधवांच्या समस्या, त्यांचे उध्वस्त होणारे कुटुंब, आत्महत्या या सोबतच शेतकरी ह्या स्थितीपर्यंत का पोहोचला यावरही चिंतन व उपाय करणे गरजेचे आहे. पंचवार्षिक योजना, शाश्वत शेतीचा विकास, सेंद्रिय खत वापरण्याबाबत मार्गदर्शन या सर्व बाबींवर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे. शासन, प्रशासन व समाजाने या क्षेत्रातील त्रृटी दूर करण्याला प्राथमिकता द्यावी, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी केले. खासदार रामदास तडस व वनस्पतीशास्त्रज्ञ केशव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन क्षिप्रा मानकर यांनी केले. कार्यक्रमाला महिला, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.         

00000

बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते व्हीएमव्ही महाविद्यालयात
फिफा विश्वचषक स्पर्धेच्या रॅलीचे उद्घाटन

महाराष्ट्र मिशन वन मिलीयन
या फुटबॉलच्या अनोखा उपक्रमास अमरावतीत शुभारंभ

अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय ! जयघोषने वातावरण क्रीडामय…

परिसरात जागोजागी फुटबॉल सेल्फी पॉईंट

अमरावती. दि. 12 : जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा ) 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा 6 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर दरम्यान भारतात होत आहे. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडा संस्कृती रुजविण्याचा ड्रीम प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील मुला-मुली मध्ये फुटबॉलची आवड निर्माण करण्यासाठी ‘ महाराष्ट्र मिशन वन मिलीयन ’ हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. या मिशनचा शुभारंभ व्हीएमव्ही महाविद्यालयात आयोजित फिफा विश्वचषक स्पर्धेच्या रॅलीला पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज हिरवी झेंडी दाखवून केला.  
या मिशनसंदर्भात अधिक माहिती देतांना श्री. पोटे म्हणाले, राज्यातील मुला-मुली मध्ये फुटबॉल या खेळासंबंधी आवड निर्माण करण्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी  महाराष्ट्र फुटबॉल मिशन एक मिलीयन अंतर्गत राज्यातील शाळा व महाविद्यालय मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे.  फुटबॉल हा जगातील अतिशय लोकप्रिय खेळ आहे. एकाच दिवशी 10 लाख मुलांनी फुटबॉल खेळावा यासाठी 30 हजार शाळांमध्ये एक लाख फुटबॉलचे वितरण करण्यात येणार आहे. एक मिलीयन पेक्षा जास्त मुले फुटबॉल खेळतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या व्टिटरवरुन व्यक्त केला आहे, असेही पालकमंत्री महोदयांनी सांगितले.
या फुटबॉल रॅलीमध्ये शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञन संस्थेच्या संचालक डॉ. अर्चना नेरकर, प्राध्यापक , क्रीडा शिक्षक, एनसीसीचे प्रशिक्षक व विद्यार्थी तसेच मोठया संख्येने महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारीत व्हावा व सर्व वातावरण क्रीडामय होण्यासाठी महाविद्यालयाव्दारे परिसरात विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट सुरु करण्यात आली आहेत. यावेळी अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय ! या जयघोषने वातावरण क्रीडामय झाले होते.

*******