भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद. ३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार.
विद्यार्थी, उमेदवार, संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार.शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२६
आश्रमशाळांमध्ये ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’
·
१९ ते
२६ सप्टेंबर २०२६ दरम्यान अभियान
· सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ व आरोग्य विभागाच्या सहकार्याने जनजागृती
अमरावती, दि. ११
: आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाच्या
अधिपत्याखालील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा तसेच वसतिगृहांमध्ये १९ ते
२६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांना सर्पदंश प्रतिबंध, सुरक्षित वर्तन, आपत्कालीन
परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना तसेच वेळेत वैद्यकीय उपचार घेण्याबाबत मार्गदर्शन
करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक आदिवासी विकास विभागाचे आयुक्त (प्र.)
गोपीचंद कदम यांनी दिली.
आदिवासी विकास विभागांतर्गत
कार्यरत असलेल्या शाळा व वसतिगृहे प्रामुख्याने डोंगराळ, दुर्गम व वनक्षेत्रालगतच्या भागात आहेत. त्यामुळे
विद्यार्थ्यांचा साप, विंचू
तसेच इतर वन्यजीवांशी संपर्क येण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच सर्पदंशाबाबत
व्यापक जनजागृती करण्यावर अभियानात विशेष भर देण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत शासकीय व
अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य
मॉडेल निवासी शाळा आणि वसतिगृह स्तरावर स्थानिक सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ तसेच आरोग्य व वन विभागाच्या सहकार्याने
किमान एक तासाचे विशेष जनजागृती सत्र आयोजित करण्यात येणार आहे. साप आढळल्यास
सुरक्षित अंतर राखणे, शांतपणे
त्या ठिकाणापासून दूर जाणे, सापाला पकडण्याचा अथवा मारण्याचा प्रयत्न न करणे, सर्पदंश झालेल्या व्यक्तीची हालचाल कमीत कमी ठेवणे
आणि तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
करण्यात येणार आहे. तसेच सर्पदंशासंदर्भातील अंधश्रद्धा व गैरसमज दूर करण्यासाठी
वैज्ञानिक माहिती देण्यात येणार आहे.
विभागाच्या डिजिटल स्टुडिओच्या
माध्यमातूनही सर्पदंश प्रतिबंध, सुरक्षित वर्तन आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद याबाबत तज्ज्ञांची
मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने १८ ऑगस्ट
२०२६ रोजी सर्पदंशाचा अधिसूचित आजार म्हणून समावेश केला आहे. त्यानुसार
सर्पदंशाच्या घटनांची वेळेत नोंद व अहवाल सादर करणे, त्याचे निरीक्षण करणे तसेच Anti-Snake
Venom (ASV) उपलब्धता आणि साठवणूक
केंद्रांची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. या अनुषंगाने संबंधित यंत्रणा सज्ज
ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अभियानाच्या कालावधीत
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा किंवा वसतिगृहाच्या परिसरात
कोणताही जिवंत साप आणून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करू नये, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
आपत्कालीन संपर्क यंत्रणा अद्ययावत करणे
मुख्याध्यापक, अधीक्षक आणि परिचारिका यांनी
जवळच्या आरोग्य संस्थेचे नाव व संपर्क क्रमांक, Anti-Snake
Venom उपलब्ध असलेल्या आरोग्य
संस्थांची माहिती, आपत्कालीन
वाहतूक व्यवस्था व संपर्क क्रमांक तसेच स्थानिक सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक दर
तीन महिन्यांनी अद्ययावत ठेवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अभियानांतर्गत करण्यात आलेल्या
कार्यवाहीचा अहवाल संबंधित स्तरावर सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अभियान महत्त्वपूर्ण
“आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य
व सुरक्षितता ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध
अभियानाच्या माध्यमातून दुर्गम भागातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी व
कर्मचाऱ्यांमध्ये सर्पदंशाबाबत योग्य जनजागृती निर्माण होऊन आपत्कालीन परिस्थितीत
प्राण वाचविण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित
करण्यासाठीही हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल,” असे नाशिक आदिवासी विकास विभागाचे आयुक्त (प्र.) गोपीचंद कदम यांनी सांगितले.
00000
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने हरित आणि शाश्वत विकासाला मोठी गती मिळत आहे.या वर्षाच्या सुरुवातीला पार पडलेल्या इंडिया स्टेट क्लायमेट इन्व्हेस्टमेंट फोरम २०२६ मध्ये राज्यातील स्वच्छ ऊर्जा, हरित उद्योग, कार्बन रिमूव्हल, स्वच्छ इंधन आणि कृषी क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांसाठी अब्जावधी रुपयांच्या गुंतवणूक घोषणा करण्यात आल्या. या गुंतवणुकीमुळे राज्यातील हरित पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा उत्पादन, शाश्वत शेती आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.
विभागीय लोकशाही दिन १५ सप्टेंबर रोजी
१४ सप्टेंबरला सुट्टी असल्याने वेळेत बदल
अमरावती, दि. ११ : शासन
सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन परिपत्रक क्र.प्रसुधा. २०११/
प्र.क्र.१८९/११/१२-अ, दि. २६ सप्टेंबर २०१२ अन्वये दर महिन्याला दुसऱ्या सोमवारी
विभागीय लोकशाही दिन तसेच संदर्भ क्र. २ मधील शासन निर्णयान्वये महिला विभागीय
लोकशाही दिनाचे आयोजन सुध्दा प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात
येते.
तसेच दि. १४ सप्टेंबर,
२०२६ चे दुसऱ्या सोमवारला श्री. गणेश चतुर्थी असल्यामुळे सार्वजनिक सुट्टी आहे.
शासन परिपत्रक दि. २६ सप्टेंबर २०१२ मधील मुद्दा क्र. ५.१ नुसार लोकशाही दिनाचे
दिवशी शासकीय सुट्टी असल्यास, त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस "लोकशाही
दिन" म्हणून पाळण्यात येईल अशी तरतूद आहे.
सबब विभागीय लोकशाही दिन व
महिला लोकशाही दिनाचे आयोजन दि. १४ सप्टेंबर, २०२६ ऐवजी १५ सप्टेंबर, २०२६
(मंगळवार) रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे आवाहन अमरावती विभागचे अपर आयुक्त
संजय जाधव यांनी केले आहे.
00000
15 सप्टेंबर रोजी विभागीय महिला लोकशाही दिन
#amravati
गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६
गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- १० हजारांहून अधिक
विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारले बाप्पा
- पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
निर्मितीचा महाराष्ट्राचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः मूर्ती घडवून दिला पर्यावरण
संवर्धनाचा संदेश
ठाणे, दि.१०
: गणेशमूर्तीच्या भव्यतेपेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्व असून,
गणेशोत्सवासारखा सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने
साजरा करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘पर्यावरणपूरक महा गणेश मूर्ती कार्यशाळा २०२६’ मध्ये ते बोलत होते. या भव्य कार्यशाळेत एकाच वेळी तब्बल १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती करून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये महाराष्ट्राच्या नावावर नवा जागतिक विक्रम नोंदवला.
या ऐतिहासिक सोहळ्याला पर्यावरण व वातावरणीय बदल
मंत्री पंकजा मुंडे, वनमंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रवींद्र फाटक, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, नवी मुंबई
महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ.
श्रीकृष्ण पांचाळ आणि कला संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन इंगळे यांच्यासह अनेक
मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, गणराया ही बुद्धीची देवता असून आपल्या संस्कृतीत पर्यावरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. सृष्टीची निर्मिती करणाऱ्या पंचमहाभूतांचे रक्षण झाले तरच मानवी जीवन सुरक्षित राहू शकते.
मोठ्या गणेशमूर्ती, प्लास्टर
ऑफ पॅरिस आणि कृत्रिम रंगांमुळे जलस्रोतांचे होणारे नुकसान टाळण्याचे आवाहन करताना
ते म्हणाले की, मूर्ती लहान असो वा मोठी, भक्ती सारखीच असते. ईश्वराचा आशीर्वाद हा मूर्तीच्या आकारावर नव्हे,
तर आपण पर्यावरण आणि समाजाची किती निस्वार्थ सेवा करतो यावर ठरतो.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या परीक्षकांनी निकाल जाहीर करताच मुख्यमंत्र्यांनी या यशाचे खरे शिलेदार सहभागी विद्यार्थी असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यावरण विभाग, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि कला संचालनालयाच्या प्रयत्नांची विशेष प्रशंसा केली.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना सांगितले की, शाडू
मातीपासून बाप्पा घडवणाऱ्या या हजारो विद्यार्थ्यांनी स्वतःला ‘वसुंधरा रक्षक’ म्हणून सिद्ध केले आहे. संस्कृती जपत
पर्यावरण रक्षणाचा हा संदेश घराघरात पोहोचविणे हाच या उपक्रमाचा मूळ हेतू आहे.
ढोल-ताशांच्या मंगल गजरात आणि
मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या कार्यशाळेचे
मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री
पंकजा मुंडे यांनी स्वतः शाडू माती हातात घेऊन गणेशमूर्ती साकारली. राज्याच्या
सर्वोच्च नेतृत्वाला आपल्यासोबत मूर्ती घडवताना पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह
शिगेला पोहोचला. आपण स्वतः करू शकतो तर प्रत्येक कुटुंबही पर्यावरणपूरक बाप्पा
साकारू शकते, असा ठाम आणि प्रत्यक्ष कृतीतून दिलेला संदेश या उपक्रमाने
संपूर्ण समाजाला दिला.
शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, कला
क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापक आणि हजारो गणेशभक्तांच्या
साक्षीने हा जागतिक विक्रम आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर अत्यंत दिमाखात संपन्न
झाला.
0000
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (#MSEDCL) अर्थात #महावितरण च्या पुनर्रचनेला राज्य शासनाने यापूर्वीच मंजुरी दिली असून, कंपनीचा आयपीओ (#IPO) आणण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत.
महावितरणचा आयपीओ बाजारात आल्यास देशातील एखाद्या सरकारी वीज वितरण कंपनीकडून आणला जाणारा हा पहिलाच आयपीओ ठरणार आहे, असे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम.एस.ई.बी. होल्डिंग कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सांगितले. यावेळी महावितरणच्या पुनर्रचना, आर्थिक सक्षमीकरण, आयपीओची तयारी, विविध नियुक्त्या आणि भविष्यातील सुधारणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्य सरकारच्या #महापारेषण, #महावितरण व #महाजेनको या तिन्ही वीज कंपन्यांचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण केले जाणार नाही. ‘महावितरण’ला कर्जमुक्त करुन ग्राहकांना अधिक चांगली वीजसेवा उपलब्ध करून देणे हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या, विविध संघटनांकडून वीज क्षेत्रातील विविध सकारात्मक व आवश्यक सूचनांची अंमलबजावणी करून, प्रलंबित प्रश्नांवर कायदेशीर व प्रशासकीय चौकटीत सकारात्मक मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कंत्राटी कामगारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी हरियाणा पॅटर्न अभ्यासासाठी समिती स्थापन केली जाईल. कंत्राटी कामगारांच्या हितासाठी हा निर्णय घेतला जाईल. अनुकंपा तत्वावरील प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढून लवकरच निर्णय घेतला जाईल.महावितरणवर सध्या सुमारे ८० हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याने व्याजाचा मोठा आर्थिक भार कंपनीवर आहे. या कर्जाचे पुनर्गठन करून महावितरणला कर्जमुक्त करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.
राज्याची स्वच्छ ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेच्या वापरात राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. #अणुऊर्जा हा सक्षम आणि महत्त्वाचा पर्याय म्हणून पुढे आला आहे. राज्याची ऊर्जेची गरज पूर्ण करताना ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीमुळे अणुऊर्जेच्या निर्मिती क्षमतेत मोठी वाढ शक्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

