शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

 

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर

२१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन



शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे असून मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची थीम सेव सॉईल, सेव वॉटर, सीक्यूर टूमारो ( Save Soil, Save Water, Secure Tomorrow) अशी असून पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी कमाल ३ किलोमीटर (महा वॉकेथॉन) चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे.  शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात  १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान "जलसंधारण सप्ताह" आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान "जलसंधारण अभियान" आयोजित करण्यात येत आहे. तर २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे आयोजन करुन जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी

राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी हे असणार आहेत. या कार्यक्रमासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सर्व मंत्री, सर्व राज्यमंत्री, राज्यसभा/ लोकसभा/ विधानपरिषद/ विधानसभा सदस्य, सर्व जिल्हापरिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष, सर्व मा. महापौर / उपमहापौर, सर्व नगराध्यक्ष/उपनगराध्यक्ष, सर्व जिल्हापरिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत सदस्य, सर्व महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, सर्व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठीत व्यक्ती / डॉक्टर / कलाकार/ उद्योजक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब सदस्य, लायन्स क्लब सदस्य, रनिंग क्लब सदस्य, सायकलिंग क्लब सदस्य, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार कंपन्या, विविध क्रीडा संघटना, गुड मॉर्निंग ग्रुप्स, विविध व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था, महिला, राज्याचे नागरिक यांना सहभागी करण्यात येणार आहे.

महा वॉकेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तर प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

 

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन 

स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा

·    १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह रील्स स्पर्धेचे आयोजन

 मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन ‘रील्स स्पर्धेचे ‘आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इनस्टाग्राम (Instagram) च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या रील स्पर्धेत राज्यातील युवक - युवतींनी उत्सफूर्त सहभागी घ्यावा, असे आवाहन  करण्यात येतआहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

रील स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आली असून  या स्पर्धेचा पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे असा ठेवण्यात आला आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी. व्हिडीओ/ रिलच्या सुरुवातीला व्हिडीओ / रिलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद सहभागी स्पर्धकांनी करणे आवश्यक आहे. स्पर्धाकांने Reel स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. स्पर्धकांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहील. यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil Save Water वापरणे अनिवार्य राहणार आहे.

रिल्स बनवण्यासाठी विषय

माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य असे रील्स बनवण्यासाठी विषय देण्यात आले आहेत.

रील्स करीता गुणांकन पद्धती पुढील प्रमाणे असणार आहे. विषय व संदेश - ३० गुण, कल्पकता -२५ गुण, प्रभावी सामाजिक संदेश - २० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता - १५ गुण, Instagram Engagement - १० गुण असे एकूण - १०० गुण असणार आहेत.  केवळ Likes किंवा Followers वर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media Engagement या दोन्हींचा समतोल ठेवण्यात येणार आहे. गुणांकानुसार विजेत्याची निवड करण्यात येईल.

विजेत्यांना बक्षीस

राज्यासाठी एकच अधिकृत हॅशटॅग #SaveSoilSaveWater वापरण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रिल्स आणि राज्यभरातून १० हजार रिल्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत डिजिटल स्वरूपात मृद व जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. रिल स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात प्रथम पुरस्कार २५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार १५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार १० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष युवा मृद-जलदूत म्हणून गौरविण्यात येणार आहे

"एक Reel... मातीसाठी !, एक Reel... पाण्यासाठी !, एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी !" हा रिल्स प्रचारासाठी मुख्य संदेश आहे.

0000

  





📍 विधानभवन, पुणे
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विधानभवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. त्यानंतर राज्यपालांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, बापूसाहेब पठारे, महापौर मंजुषा नागपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, विभागीय आयुक्त शीतल तेली -उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्यासह सैन्यदलातील अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
#IndependenceDay See less
See less





 दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा मंत्रालयात ध्वजारोहण समारंभ
मुंबई, दि. १५ : विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. महाराष्ट्राचा विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, क्रांतिकारक तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मंत्रालय येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, याप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर ८.८ टक्के
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या बारा वर्षांत जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होण्याचा टप्पा गाठला असून २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यात देशाला यश आले आहे. विकसित भारत म्हणजे केवळ विकसित अर्थव्यवस्था नव्हे, तर दीन-दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर आणि महिलांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणे होय, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य असून यंदाच्या पहिल्या सहामाहीतील राज्याचा आर्थिक विकासदर जवळपास ८.८ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हा विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असून आतापर्यंत जवळपास १३ जिल्ह्यांनी निर्धारित लक्ष्य पूर्ण केले आहे. गडचिरोली, पालघर, नंदुरबार यांसह राज्यातील प्रत्येक भागात विकास पोहोचविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्तव्यांचे भान ठेवून तिरंगा सदैव उंच ठेवण्याचा संकल्प
संविधानाने नागरिकांना अधिकार दिले आहेत, त्याचबरोबर कर्तव्यांची जाणीवही करून दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी सर्व नागरिकांनी आपल्या कर्तव्यांचे भान ठेवून देशाचा तिरंगा सदैव उंच राहील, असा संकल्प करावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी
शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राबविण्यात येत असून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या दिशेनेही मोठी प्रगती झाली असून सध्या ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. पुढील वर्षभरात १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या मागील पिढ्यांनी दुष्काळ पाहिला; मात्र येणाऱ्या पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये, यासाठी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यातून महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांना शेतकऱ्याचा दर्जा देणारे महाराष्ट्र पहिले राज्य
महिला शेतकरी कायदा तयार करून महिलांना शेतकऱ्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. महिलांसह समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी लक्षित योजना राबवून सर्वांना सोबत घेऊन विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, रोजगाराच्या संधी
महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ‘एज्युसिटी’च्या माध्यमातून परदेशी विद्यापीठांना राज्यात आणले जात आहे. राज्यातील विद्यापीठांचा दर्जा उंचावण्यासोबतच आधुनिक आणि ‘कटिंग-एज’ शिक्षण उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्र देशाचे ‘स्टार्टअप कॅपिटल’ बनले असून राज्यात सर्वाधिक गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूक होत आहे. त्यामुळे युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘देशाच्या प्रगतीत आजही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि भविष्यातही देशाच्या प्रगतीचा सर्वात मोठा वाटेकरी महाराष्ट्र असेल,’ असा विश्वास व्यक्त केला.
ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकारी, सेनादलाचे अधिकारी, निमंत्रित नागरिक यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, राजशिष्टाचार सचिव राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मंत्रालयीन विभागांचे प्रमुख, तिन्ही सेनादलांचे प्रमुख अधिकारी, शासकीय अधिकारी -कर्मचारी आणि निमंत्रित नागरिक उपस्थित होते.
मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, यांच्या प्रतिमांना वंदन करून पुष्पहार अर्पण केले.

 




राज्य माहिती आयोगात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


अमरावती, दि. १५ : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्य माहिती आयोगाच्या अमरावती येथील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. अमरावती येथील राज्य माहिती आयुक्त श्री. रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राज्य माहिती आयोगाचे उपसचिव श्री. देविसिंग डाबेराव, मधुसुदन देशमुख,आशिष मन्वर यांच्यासह आयोगातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालय परिसरात उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग, संघर्ष आणि बलिदान यांचे स्मरण करून देणारा हा दिवस आहे. स्वातंत्र्याबरोबरच देशाची लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी संविधानिक मूल्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

माहितीचा अधिकार हा नागरिकांना शासनाच्या कामकाजाबाबत माहिती मिळवून देणारा तसेच प्रशासनात पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढविणारा महत्त्वपूर्ण कायदा आहे. नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचे संरक्षण आणि लोकाभिमुख प्रशासनाला चालना देण्यामध्ये राज्य माहिती आयोगाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या अनुषंगाने आयोगातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि उत्तरदायी सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशाची एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्ये जपण्यासोबतच आपल्या शासकीय कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करण्याचा संकल्प केला. राष्ट्रप्रेम, संविधानिक मूल्ये आणि देशसेवेची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

#स्वातंत्र्यदिन
#स्वातंत्र्यदिन२०२६
#IndependenceDay2026
#IndependenceDay See less See less









स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

जलसंधारण, शेतकऱ्यांच्या मदतीवर भर - दादाजी भुसे
अमरावती, दि. 15 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३०८ कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. त्यासोबतच जलसंधारणासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे. येत्या काळातही जलसंधारण आणि शेतकऱ्यांना मदतीवर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुसे यांनी, जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी 'जलसंधारण अभियान' राबवले जाणार आहे. तसेच, २१ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 'जलसंधारण दिन' साजरा करण्यात येणार आहे. त्यासोबतच काही भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी, म्हणून कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे.
शिक्षण क्षेत्रातही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे. शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत अनिवार्य करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्रप्रमुख पदांची भरती करण्यात आली आहे, तसेच पवित्र पोर्टलद्वारे ३० हजार शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. २६ जानेवारी रोजी २ कोटी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक कवायतीची 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात पायाभूत सुविधा आणि ग्राम विकासासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रामुख्याने पांदण रस्त्यांसाठी निधी देण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांचे वहीवाटीचे रस्ते उपलब्ध करून होणार आहे. चिखलदरा हे परिपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी निधी देण्यात येत आहे. येथील स्कायवॉकचे वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या विकासात योगदान देणारे अमरावती विमानतळ विस्तारीकरण, नाईट लँडिंग सुविधा आणि पायलट प्रशिक्षण केंद्र उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. तसेच वस्त्रोद्योग विकासासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, पोलिस उपअधिक्षक तयुब युनुस मुजावर, नागरी हक्क संरक्षण च्या पोलिस अधीक्षक अनिता पाटील, पोलिस निरीक्षक अशोक लांडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल काळे, पोलिस हवालदार प्रशांत भटकर, त्र्यंबक मनोहर, राजेश पांडे, प्रभाकर बोदडे, हेड कॉन्स्टेबल निलेश अंबर्ते, दिपमाला साळुंखे, अतुल कडू, प्रदिप बद्रे, मिलींद बेलसरे, हरीना नेत्रदान समितीचे मनोज राठी, राजेंद्र वर्मा, रामप्रकाश मिश्रा, मुकेश लोहिया, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्याबद्दल सारांश सारडा, गार्गी कुऱ्हाडे, दिया पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा, साक्षरतेची शपथ घेण्यात आली. तसेच जलसंधारणाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

  


जिंकूया यशाचे शिखर
बनवूया भारताला आत्मनिर्भर!
८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!