शुक्रवार, ५ जून, २०२६









जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ शपथ ;

पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक बांधिलकी आवश्यक

विभागीय आयुक्तांकडून वृक्ष लागवड

 

अमरावती, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत पर्यावरण संवर्धन व हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना पर्यावरण संवर्धना संबंधीची विशेष शपथ दिली. या उपक्रमाद्वारे विभागातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांनी पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारून पृथ्वीच्या रक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.

 

याप्रसंगी विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे तसेच अपर आयुक्त अजय लहाने, संजय जाधव यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करुन अभियानात सर्वांनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.

 

‘माझी वसुंधरा’ शपथेमध्ये पृथ्वी, वायू, जल, ऊर्जा आणि आकाश या पंचमहाभूतांच्या संवर्धनासाठी विविध संकल्पांचा समावेश असून त्यानुसार प्रत्येकाने संकल्प घ्यावा. विशेष प्रसंगी किमान पाच वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे, पर्यावरणपूरक वाहतूक साधनांचा वापर करणे, पाणी व विजेचा काटकसरीने वापर करणे तसेच सेंद्रिय खतांच्या साहाय्याने परसबाग विकसित करून इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करणे, अशा महत्त्वपूर्ण बाबींचा शपथेमध्ये समावेश आहे, त्यानुसार सर्वांनी स्वयंस्फुर्तीने उपरोक्त बाबींचा आपल्या जीवनशैलीत अंगीकार करावा, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.

 

हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे या शपथेमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे.

 

अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमधील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही शपथ घेण्याचे प्रशासनाकडून निर्देश देण्यात आले असून, सर्वांनी ऑनलाईन पोर्टलवर ई-शपथ (E-Pledge) घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

 

‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती वाढून हरित, स्वच्छ आणि शाश्वत भविष्यासाठी समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडण्यास मदत होईल, असा विश्वास श्रीमती गुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

                                                                          00000


 महाराष्ट्र सदन येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण


नवी दिल्ली, दि. 5: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील कस्तुरबा मार्ग स्थित ‘महाराष्ट्र सदन’ येथे आज मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते पर्यावरणपूरक वृक्षारोपण करण्यात आले.


महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलापते, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार यांच्यासह सदनातील इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

#जागतिकपर्यावरणदिन
#पर्यावरणसंवर्धन
#पर्यावरण
#WorldEnvironmentDay2026
#WorldEnvironmentDay
#NowForClimate
#PositiveClimateAction
#SaveEnvironment
#SaveEarth
#GreenFuture
#महाराष्ट्रसदन

गुरुवार, ४ जून, २०२६

 



 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ अभियानाला गती ;

·         लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा निर्धार

 

·         प्रत्येक विभाग व नागरिकांना ई-शपथ घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. ४ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२६ रोजी राज्यभर ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार असून नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाची ई-शपथ घ्यावी व पर्यावरण संवर्धनाचा निर्धार करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

या अंतर्गत विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त तसेच विविध विभागांच्या प्रमुखांना ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत विविध जनजागृती उपक्रम आपापल्या जिल्ह्यात राबविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. वाढते तापमान, पर्यावरणीय बदल आणि नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण लक्षात घेता, पर्यावरण संवर्धनासाठी सर्व स्तरांवर व्यापक जनजागृतीची गरज असल्यामुळे त्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय विभागांनी कार्यवाही करावी, असेही सांगण्यात आले आहे.

‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि ऊर्जा या पंचमहाभूतांच्या संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांकडून करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि विविध शासकीय कार्यालयांमध्ये पर्यावरण संवर्धन विषयक चर्चा, जनजागृती कार्यक्रम आणि शपथविधी आयोजित करण्यात यावेत. नागरिकांनी https://majhivasundhara.in/en या पोर्टलवर जाऊन ई-शपथ घेऊन प्रमाणपत्र प्राप्त करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून भावी पिढ्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि संतुलित पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपली भूमिका पार पाडावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने सर्व संबंधित यंत्रणांना अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

00000

बुधवार, ३ जून, २०२६

 मातोश्री शासकीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू;

·        ६० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

·        इच्छुक विद्यार्थांकडून अर्ज आमंत्रित

 

            अमरावती, दि. ३ : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत संचालित मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, वलगाव रोड, अमरावती येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालयीन व तंत्रशिक्षण विभागासाठी एकूण ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यामध्ये उच्च माध्यमिक विभागासाठी १२, कनिष्ठ महाविद्यालयासाठी १८, महाविद्यालयीन विभागासाठी १८ आणि तंत्रशिक्षण विभागासाठी १२ जागांचा समावेश राहणार, अशी माहिती वसतिगृहाचे गृहप्रमुख अनिल तसरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

            प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २०२५-२६ या आर्थिक वर्षात एक लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. गुणवत्तेनुसार व सामाजिक आरक्षणाच्या निकषांनुसार प्रवेश दिला जाणार असून, प्रवेशित विद्यार्थ्यांना वसतिगृहात मोफत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक व गरजू विद्यार्थ्यांनी वसतिगृह कार्यालयातून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विनामूल्य अर्ज प्राप्त करून आपल्या शाळा अथवा महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून १० दिवसांच्या आत अर्ज सादर करावेत, असे आवाहन श्री तसरे यांनी केले आहे.

०००००

नागरी सेवा परीक्षा २०२७ पूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा जाहीर

सविस्तर माहितीसाठी www.siac.org.in संकेतस्थळ उपलब्ध

            अमरावती, दि. ३ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२७ च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता अमरावती येथील 'भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र' (युपीएससी) यांच्यातर्फे विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरावरून ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या या प्रवेश परीक्षेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्राच्या संचालिका डॉ. प्रतिभा भोरजार यांनी केले आहे.

            प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार, ऑनलाइन अर्ज भरण्याचा कालावधी १ ते १७ जून २०२६ पर्यंत असणार आहे. तसेच परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम मुदत १९ जून २०२६ हा निश्चित करण्यात आला आहे. ही ऑफलाइन प्रवेश परीक्षा १९ जुलै २०२६ (रविवार) रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेतली जाईल. या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना ह्या www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


 आपलं मंत्रालय (मे २०२६) हे मासिक आणि मागील महिन्यांचे अंक तुम्ही पुढील लिंकद्वारे पीडीएफ (PDF) स्वरूपात डाउनलोड करू शकता:

https://dgipr.maharashtra.gov.in/aple-mantralay

#आपलंमंत्रालय

मंत्रिमंडळनिर्णय -02-06-2026



राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ अंतर्गत आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) च्या अर्थसहाय्याने सुमारे ३,५०० किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांच्या कामांसाठी ६,४२९ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेसाठी एआयआयबीकडून सुमारे ५०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे ४,५०० कोटी रुपये) कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध होणार असून, राज्य शासनाकडून ३० टक्के हिस्सा म्हणून सुमारे २१५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे १,९२९ कोटी रुपये) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

#मंत्रिमंडळनिर्णय
राज्यातील रस्ते, पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राज्याच्या ‘एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ या उद्दिष्टाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या प्रकल्पांसाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक (एआयआयबी) आणि न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) यांच्याकडून प्रत्येकी १ अब्ज अमेरिकी डॉलर्सचे अर्थसहाय्य दोन टप्प्यांत घेण्यासही मंजुरी दिली आहे.

#मंत्रिमंडळनिर्णय
मुंबईतील हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी पाच महाविद्यालयांचा घटक म्हणून समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आता या समूह विद्यापीठात प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, कफ परेड, किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय, चर्चगेट आणि श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय,वांद्रे-पश्चिम, ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्लु असोमुल्लु विज्ञान महाविद्यालय, वांद्रे-पश्चिम आणि थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय अशा पाच महाविद्यालयांचा समावेश होणार आहे.

#मंत्रिमंडळनिर्णय
परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे.

या महामंडळांतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविल्या जातात. या महामंडळांसाठी व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक-प्रशासन, सहायक व्यवस्थापक-वित्त व लेखा ही पदे प्रतिनियुक्तीने भरण्यास तर मल्टी टास्किंग स्टाफची सेवा बाह्यस्त्रोतांद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी या तीनही महामंडळांना वार्षिक अंदाजे रु.१.१८ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

#CabinetDecision

सोमवार, १ जून, २०२६

                                           



                                              ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश 

विकसित महाराष्ट्रअंतर्गत एसटीचा 100 टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट 

            मुंबई, दि. 1 : विकसित महाराष्ट्र अंतर्गतपर्यंत एसटी महामंडळामध्ये सन 2029 पर्यंत 50 टक्के, 2035 पर्यंत 80 टक्के; तर 2047 पर्यंत एसटीचा 100 टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत करायचा आहे. या अनुषंगाने बसेससाठी आवश्यक असलेले चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला  गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी   दिले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  वर्षा येथील निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इ-बसेससंदर्भात बैठक झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, अपर मुख्य सचिव संजय सेठी, एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उपसचिव चेतन निकम आदी या बैठकीस उपस्थित होते. 

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पर्यावरणपूरक ई-बसेस ज्या मार्गावर चालवायच्या आहेत, त्या मार्गाचा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने अभ्यास करावा. पुरवठादाराकडून बस प्राप्त होताच त्या बसेसचे पुढील 7 दिवसात निरीक्षण करावे. या बसेसकरिता एक इकोसिस्टिम तयार करावी. ज्या मार्गाने खाजगी बसेस धावतात, त्या मार्गाचाही अभ्यास करून ई-बसेसचा पर्याय तयार ठेवावा. 

            राज्य शासनाच्या विद्यमान ई-वाहन धोरणांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई-बसेसचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1,500 ई-बसेसना बसच्या किमतीच्या 10 टक्के किंवा कमाल 20 लाख रुपये इतके अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने हे धोरण महत्त्वपूर्ण आहे.         महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सध्या जीसीसी मॉडेलवर 5,150 ई-बसचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

००००


                                                                 



विभागीय आयुक्तालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन



             अमरावती, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 

           यावेळी नायब तहसिलदार संजय मुरतकर, नाझर शरद लोणारे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.    



                                                                       00000 

शनिवार, ३० मे, २०२६

 

आचारसंहितेमुळे जून महिन्यातील विभागीय व महिला लोकशाही दिन रद्द

          अमरावती, दि. २९ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ ची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे, आगामी जून २०२६ महिन्यातील 'विभागीय लोकशाही दिन' आणि 'महिला विभागीय लोकशाही दिन' आयोजित करण्यात येणार नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

          सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या शासन परिपत्रकानुसार दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन, तसेच महिला विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. या दिवशी नागरिक व महिला आपल्या तक्रारी व समस्या थेट प्रशासनासमोर मांडतात.

          परंतु, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या १८ मे २०२६ च्या प्रसिद्धीपत्रकानुसार सध्या राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू आहे. शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार, ज्या क्षेत्रांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू असते, त्या ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करता येत नाही.

          या कायदेशीर तरतुदीचा दाखला देत प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जून २०२६ मध्ये अमरावती विभागातील विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन आयोजित करता येणार नाही. तरी सर्वसामान्य नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000