सोमवार, ६ एप्रिल, २०२६

‘जय महाराष्ट्र’

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांची सिकलसेल ॲनिमिया या विषयावर आधारित विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

ही मुलाखत मंगळवार ७ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर पाहता येणार आहे. निवेदिका उन्नती जगदाळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

‘दिलखुलास’

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांत राज्याच्या क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन लक्षवेध’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाविषयी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे, मुंबई विभागाचे उपसंचालक नवनाथ फरताडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
#दिलखुलास कार्यक्रमातील ही मुलाखत मंगळवार ७ आणि बुधवार ८, एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही ही मुलाखत उपलब्ध राहणार आहे.
#जयमहाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार ८, एप्रिल २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर ही मुलाखत पाहता येणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका हर्षदा कुलकर्णी यांनी केले आहे.




 

विशेष लेख-

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव: 

आरोग्य समृद्ध महाराष्ट्राची लोकचळवळ


          महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला असून या राज्यव्यापी अभियानाला एप्रिलपासून प्रारंभ करण्यात आला आहे.

          सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य रुग्णालय येथे आयोजित ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ विभागीय कार्यशाळेचे सहभागी झाले होते. हे अभियान फक्त सरकारी कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता, लोकसहभागाद्वारे त्यातून एक व्यापक आरोग्य चळवळ उभी राहावी, असा राज्य शासनाचा मानस आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न केले जाणार आहे. या प्रस्तावित योजनेमुळे गावापासून ते राज्यस्तरावरील आरोग्य सेवांचे आणि यंत्रणांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. तसेच या उपक्रमामुळे तळागाळातील लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचणार आहेत.

          ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर, हे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणणे आणि त्यांच्यात आरोग्यदायी जीवनशैली रुजवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये फक्त आजारांवर उपचार करण्यापेक्षा ते होऊ नयेत यासाठी सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पोषण यासारख्या मूलभूत घटकांवरही विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. संसर्गजन्य आजारांसोबतच बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणारे असंसर्गजन्य आजार, माता-बाल आरोग्य आणि मानसिक आरोग्य यासारख्या विषयांनाही या मोहिमेत सामावून घेण्यात आले आहे. या अभियानात ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणा सक्रियपणे सहभागी होणार आहेत. गावागावात स्वच्छतेचा आणि आरोग्याचा जागर करून आरोग्यदायी गाव ही संकल्पना राबवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे.

सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब

          ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरापासून ते ग्रामपंचायत स्तरापर्यंत तीन टप्प्यांवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समिती ही अभियानाच्या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे. तर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखालील कृती समिती प्रत्यक्ष कामाचे नियोजन करणार आहे. त्याचबरोबर गाव पातळीवर आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी विशिष्ट निकष ठरवण्यात आले आहेत. या निकषांच्या आधारे ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून गौरविण्यात येणार आहे. अशा गावांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रकमेचा पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाणार आहे. या संपूर्ण अभियानासाठी राज्य सरकारने ८०.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, गाव, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना कोट्यवधी रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत.

दोन ते पाच कोटींचे पुरस्कार

          राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करीत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या जिल्हा परिषदेला ५ कोटी रुपये, दुसऱ्या क्रमांकाला ३ कोटी रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी २ कोटी रुपये दिले जाणार आहेत. जिल्हा परिषदेनंतर पंचायत समिती स्तरावरही प्रोत्साहनासाठी मोठ्या रक्कमेची तरतूद आहे. ज्यामध्ये पहिल्या क्रमांकाला २ कोटी, दुसऱ्या क्रमांकाला १.५ कोटी रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला १.२५ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

          राज्यस्तरावर सर्वोत्तम ठरणाऱ्या ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांना ७५ लाख रुपयांचा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. उपआरोग्य केंद्रांना पहिल्या क्रमांकासाठी जिल्हा आणि राज्यस्तरासाठी अनुक्रमे ५ लाख आणि २५ लाख रुपये दिले जाणार आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा स्तरावर १० लाख आणि राज्य स्तरावर ५० लाखांचा पुरस्कार दिला जाणार आहे. त्याचबरोबर गावांनाही पहिल्या क्रमांकासाठी जिल्हा, विभाग राज्य स्तरासाठी अनुक्रमे २५ लाख, १ कोटी आणि ५ कोटी रुपयांचे पुरस्कार दिले जाणार आहेत. हे अभियान दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या कालावधीत राबवले जाणार असल्याने, प्रत्येक वर्षी गावांना आपली कामगिरी सुधारण्याची आणि पुरस्कार मिळवण्याची संधी मिळणार आहे.

संकलन-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

 

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

राज्य शासनाच्या २ ते ८ एप्रिल या 'महा-साधना सप्ताह' या उपक्रमात अमरावती विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रियरित्या सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी केले



राज्य शासनाच्या २ ते ८ एप्रिल या 'महा-साधना सप्ताह' या उपक्रमात अमरावती विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रियरित्या सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी केले




.

#sadhanasaptah #missionkarmyogi #IGot

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’ - विभागीय आयुक्त नयना गुंडे

 

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी

अमरावती विभागात महा-साधना सप्ताह’

                                                                - विभागीय आयुक्त नयना गुंडे


 

·         विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी 'iGOT कर्मयोगी' पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 03 : केंद्र शासनाचा क्षमता विकास आयोग (CBC) आणि 'कर्मयोगी भारत' यांच्या संयुक्त विद्यमाने दि.2 ते 8 एप्रिल, 2026 या कालावधीत देशभरात 'साधना सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्यभर ‘महा-साधना सप्ताह’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे ठरवले आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या अंगभूत कर्मक्षमतेचा विकास व्हावा आणि त्यांच्या निरंतर ज्ञानसंवर्धनातून प्रशासकीय कार्यात गुणात्मक वाढ व्हावी, हा या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. यानुषंगाने  विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘महा-साधना सप्ताहात’ सक्रियरित्या सहभाग नोंदवून 'iGOT कर्मयोगी' पोर्टलवर उपलब्ध असलेले विविध अभ्यासक्रम पूर्ण करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

 

या सप्ताहाअंतर्गत अमरावती विभागातील सर्व शासकीय, निमशासकीय विभागांच्या अधिनस्त कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'iGOT कर्मयोगी' पोर्टलवर उपलब्ध असलेले विविध अभ्यासक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे. हे अभ्यासक्रम देशातील नामांकित संस्थांकडून तयार करण्यात आले असून ते विनामूल्य उपलब्ध आहेत. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने 'iGOT कर्मयोगी' पोर्टलवर नोंदणी करुन उपरोक्त कालावधीत (दि.2 ते 8 एप्रिल 2026) किमान 4 तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.

 

या प्रशिक्षणांमुळे प्रशासनात तंत्रज्ञान (Technology), परंपरा (Tradition) आणि दृश्यमान परिणाम (Tangible Outcomes) या त्रिसूत्रीचा प्रभावी अवलंब होईल. प्रत्येक शासकीय विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणांचा विभागीय आुयक्तांनाकडून आढावा घेण्यात येणार आहे. विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या व्यावसायिक क्षमतेचा आणि ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी राज्य शासनाव्दारे आयोजित या 'महा-साधना सप्ताहात' उर्त्स्फुतपणे सहभाग घेऊन प्रशिक्षण पूर्ण करावे, असे  आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे यांनी केले आहे.

 

00000

 

गुरुवार, २ एप्रिल, २०२६

जिल्ह्यात कलम 38 लागू 

अमरावती, दि. 2 : जिल्ह्यात शांतता व सुव्य‍वस्था  अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) विशाल आनंद  यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 38 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

हा प्रतिबंधात्मक आदेश संपूर्ण अमरावती जिल्ह्यात, पोलीस आयुक्तांचे परिक्षेत्र वगळून  कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरिता दि. 2 एप्रिल ते 16 एप्रिल 2026 पर्यंत लागू करण्यात आला आहे.

कोणीही सदर आदेशाचा भंग केल्यास तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 136 अन्वये शिक्षेस पात्र राहील. या कलमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध   कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) यांनी कळविले आहे.

 

00000


 

विशेष लेख-

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी  ते  एप्रिलदरम्यान 

‘महा-साधना सप्ताह’!

 

          भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. देशातील शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविणे, भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि तंत्रज्ञानाची सवय आपल्या कामकाजात करुन त्यांना सक्षम करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.

          केंद्र शासनाने साधना सप्ताह उपक्रम राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्यानंतर आता राज्यातही महा-साधना सप्ताह 2 ते 8 एप्रिल या काळात आयोजित करण्यात आला आहे. टेक लर्निंग वीक अंतर्गत 8 लाख 80 हजारांहून अधिकारी आणि कर्मचारी 7 दिवसांत किमान 4 तासांचे अभ्यासक्रम iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन पूर्ण करणार आहेत. यामुळे जवळपास 35 लाखांहून अधिक वेळ अधिकारी आणि कर्मचारी iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर वेगवेगळे अभ्यासक्रम शिकतील. यामध्ये राज्यातील 36 जिल्हे, 32 विभाग, आणि 6 विभागीय कार्यालये यामध्ये विविध शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महासाधना सप्ताहात सहभाग नोंदविणे गरजेचे असेल.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृध्दीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्टया सक्षम करण्यासाठी

          साधना सप्ताह हा iGOT कर्मयोगी भारत अंतर्गत राबविला जाणारा एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आहे. हा उपक्रम मिशन कर्मयोगी (Mission Karmayogi) चा एक भाग असून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृध्दीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्टया सक्षम करण्यासाठी आयोजित केला जातो. एक आठवडाभर आयोजित केला जाणारा हा उपक्रम पूर्णपणे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आहे. यामध्ये शासनाच्या विविध विभागांतील काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या स्वत:च्या कामाशी संबंधित नवीन कौशल्ये, तंत्रज्ञान आणि कार्यालयीन कामकाज सुकर होण्याच्या पध्दती शिकतात. शासकीय           अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे, डिजिटल गव्हर्नन्स आणि नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, सतत शिक्षण घेत राहणे,वेळ व्यवस्थापन ही सप्ताह आयोजित करण्यामागची मुख्य उद्दिष्टे असल्याने या सप्ताहात प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केले आहे.

          महा-साधना सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे iGOT Karmayogi App द्वारे  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या वेळेनुसार प्रशिक्षण घेता येईल. अधिकारी आणि कर्मचारी आपले काम सांभाळून हे अभ्यासक्रम पूर्ण करणार असल्याने कामकाजावर परिणाम न होता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कौशल्यवृध्दी होण्यास मदत होईल.या अभ्यासक्रमांमुळे प्रत्येकाला स्वत:ची क्षमता ओळखून त्यानुसार कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळते.

महा-साधना सप्ताहामुळे प्रशासनात डिजिटल सक्षमता वाढविण्यास मदत

          बदलत्या काळाशी सुसंगत राहण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. आजच्या शासकीय कामकाजात सुद्धा विविध डिजिटल प्रणाली, ॲप्सचा वापर होत आहे. महा-साधना सप्ताहामुळे प्रशासनात डिजिटल सक्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजात वापर, नागरिक केंद्रित सेवा  आणि पारदर्शकता वाढविण्यास या सप्ताहाची मदत होणार आहे.

          या सप्ताहाच्या अनुषंगाने राज्यातील विविध शासकीय कार्यालये. जिल्हा कार्यालये यामध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन त्यांना नेमून दिलेले अभ्यासक्रम या काळात पूर्ण करणे गरजेचे राहील. पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी किमान 4 तास असणे अनिवार्य आहे. सर्व अभ्यासक्रम 2 ते 8 एप्रिल दरम्यान पूर्ण करणे गरजेचे असून कर्मयोगी भारत पोर्टलवर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी नोंदणी आणि अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव (या विभागाच्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालये) तसेच विभागीय आयुक्त (विभागीय आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये आणि विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हापरिषदा) या सर्वांनी साधना सप्ताहात एकूण 4 तासांचे अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे राहील. विशेष म्हणजे साधना सप्ताह कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या (iGOT) पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे विभागांना महाराष्ट्रात मे महिन्यात होणाऱ्या ‘TECH-वारी 2.0’ मध्ये प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

–वर्षा फडके – आंधळे, 

उपसंचालक (वृत्त)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

 

 

विशेष लेख-

गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग : राज्यात ‘साधना सप्ताह’


 

          लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सर्व सामान्य जनतेला शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांद्वारे सोयी, सुविधा, लाभ आदी पोचविण्यासाठी शासन सक्षमपणे कार्य करते. आणि या व्यवस्थेची भिस्त असणारी प्रशासन व्यवस्था त्यामुळेच सक्षम असावी लागते. प्रशासनात कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करता यावा यासाठी विविध प्रशिक्षणांद्वारे क्षमता विकास करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि-कर्मयोगी भारत  यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘साधना सप्ताह’ आयोजित केला आहे. महाराष्ट्रातही  मंत्रालयीन व राज्यभरातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ‘साधना सप्ताह’ अंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

          आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्व क्षेत्रात होत असलेला वापर पाहता राज्य शासनाचाही तंत्रज्ञानाधारित कार्यक्रमात पुढाकार राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या गतिमान प्रशासनाची घोडदौड सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात १०० दिवसांचा प्रशासकीय सुधारणा कार्यक्रम आणि 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या पाठोपाठ आता केंद्रशासनाचा ‘साधना सप्ताह’ राज्यात राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या मंत्रालयीन सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी तसेच विभागीय आयुक्त कार्यालये आणि विभागांतर्गत येणारे जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषद आदींमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी या सप्ताह अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा यासह प्रशासनातील विविध विभागामध्ये सक्षमपणे कार्य करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या उपयोगाधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांना मे 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘TECH-वारी 2.0’ या कार्यक्रमावेळी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

          ‘कर्मयोगी भारत’ हा केंद्र शासनाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म व अभिनव राष्ट्रीय उपक्रम आहे. तंत्रज्ञान‑आधारित शिक्षणाद्वारे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, कौशल्य आणि शासनक्षमता वाढविण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर विविध प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केंद्र शासनाने ‘साधना सप्ताह’ अंतर्गत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कर्मयोगी प्लॅटफॉर्म वरील तंत्रज्ञानाधारित ५० प्रशिक्षण कार्यक्रमांची यादी तयार केली आहे. या सप्ताह अंतर्गत प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यादीतील एकूण प्रशिक्षण कार्यक्रमांपैकी किमान चार तासांचे प्रशिक्षण करणे अनिवार्य आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये ‘लोकप्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मूळ बाबी : शिकणे, उपयोग आणि नैतिकता’, ‘प्रशासनासाठी जबाबदार एआयचा उपयोग’, ‘सर्वांसाठी युवा ए आय’ असे एकूण 44 मिनिटे ते 46 तास काल मर्यादेचे एकूण  50 प्रशिक्षण कार्यक्रम कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

महासंचालकांच्या पुढाकाराने माहिती व जनसंपर्क विभागातही ‘साधना सप्ताह’

          केंद्र शासनाच्या सूचनानुसार प्रशासकीय क्षमता सुधारण्यासाठी राबविण्यात येत असलेला ‘साधना सप्ताह’ हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात या विभागात राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा माहिती कार्यालये, मुंबई येथील या विभागाचे मुख्यालय तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली आणि पणजी येथील कार्यालयांमधील १००२ अधिकारी-कर्मचारी ‘साधना सप्ताह’ अंतर्गत विविध प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत. महासंचालक ब्रिजेस सिंह यांनी या संदर्भात बैठक घेऊन विभागाला सूचना दिल्या आहेत.

माहिती संचालनालयाच्या नागपूर- अमरावती विभागातही साधना सप्ताहाचा उत्साह

          माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर- अमरावती विभागातही ‘साधना सप्ताह’ अंतर्गत विभागातील एकूण 174 अधिकारी- कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. यापूर्वी विभागातील शिपाई, वाहन चालक या वर्ग ‘ड’ पासून वरिष्ठ वर्ग ‘अ’ पर्यंतच्या सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्मयोगी भारत पोर्टलवरील प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले आहे. यामध्ये विशेषतः अमरावती विभागातील अकोला जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी  390 तास काल मर्यादेचे 294 प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले आहेत. तर नागपूर विभागातून गडचिरोली चे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी 60 तास काल मर्यादेचे एकूण 63 प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले आहे. साधना सप्ताहातही नागपूर अमरावती विभागातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी हिरीरीने भाग घेऊन विहित काल मर्यादेचे प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत आणि या संदर्भातील नियोजन करण्यात आले असल्याचे विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी सांगितले आहे.

          बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रशासनाला गतिमान करण्यासाठी शासन स्तरावर सतत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा या नव्या आव्हानात्मक विषयांचा परिचय होऊन प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अधिक सक्षमपणे व गतिमानतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडता याव्या यासाठी केंद्र शासनाचा ‘साधना सप्ताह’ राज्यभर राबविण्यात येत आहे. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या सप्ताहात सक्रिय भाग घेऊन जनता व शासनाप्रती आपली प्रतिबद्धता दृढ करण्याचे आवाहनही शासनातर्फे करण्यात आले आहे.

-रितेश मोतीरामजी भुयार

माहिती अधिकारी,

माहिती व जनसंपर्क, नागपूर.

०००००००