विशेष लेख :
मुंबई क्लायमेट वीक : हवामान कृतीसाठी भारताचा जागतिक मंच
मुंबईत होणारा भारतातील पहिला क्लायमेट वीक हा हवामान बदलावर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीकडे नेणारा मंच ठरणार आहे. शासन, उद्योग, तज्ज्ञ, युवक आणि नागरिक यांना एकत्र आणत हा उपक्रम ग्लोबल साऊथ देशांसाठी हवामान नेतृत्वाचा नवा नमुना मांडणार आहे.
अन्नसुरक्षा, स्वच्छ ऊर्जा आणि शहरी शाश्वतता या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांवर भर देत नवकल्पना, युवक सहभाग आणि लोकाभिमुख कार्यक्रमांद्वारे हवामान कृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हवामान बदलावर उपाय म्हणजे सामूहिक जबाबदारी आणि तातडीची कृती हा यानिमित्ताने मुंबईतून दिला जाणारा संदेश स्पष्ट आहे....
हवामान बदल ही भविष्यातील किंवा केवळ वैज्ञानिक चर्चेची गोष्ट राहिलेली नाही. पूर, उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, अन्नसुरक्षेची आव्हाने या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होत आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबईत १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणारा मुंबई क्लायमेट वीक (MCW) हा भारतासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथ देशांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
हा केवळ परिषदांचा कार्यक्रम नाही, तर संवादातून प्रत्यक्ष कृतीकडे जाण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे शासन, उद्योग, तज्ज्ञ, युवक आणि सामान्य नागरिक यांना एकाच मंचावर आणणे हे आहे.
प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे मुंबईला भारत तसेच इतर ग्लोबल साऊथमधील शहरांसाठी हवामान उपाययोजनांची प्रयोगशाळा होणार आहे.
हवामान चर्चेपासून प्रत्यक्ष उपायांकडे
मुंबई क्लायमेट वीकचा उद्देश केवळ हवामान बदलावर चर्चा करणे नसून, प्रत्यक्ष अंमलात आणता येतील असे उपाय शोधणे आणि त्यांना गती देणे हा आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे तीन दिवस मुख्य कार्यक्रम होतील, तर मुंबई शहरभर महाविद्यालये, समुदाय केंद्रे आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवले जातील. त्यामध्ये नेतृत्व संवाद, विविध विषयांवरील ट्रॅक्स, MCW इनोव्हेशन चॅलेंज, यूथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज तसेच उपाययोजनांचे प्रदर्शन क्षेत्र आदींचा समावेश असणार आहे.
“हब-अँड-स्पोक” रचना म्हणजे एकाच वेळी धोरणात्मक चर्चा आणि लोकसहभाग दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होणार आहे. हवामान कृती ही केवळ सरकारची जबाबदारी नसून समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे, हा संदेश यातून दिला जाणार आहे.
मुख्य केंद्रातील पहिल्या दिवशी अर्थशॉट प्राईज या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचे विशेष सत्र होणार असून, या सत्रात निसर्ग, अन्न प्रणाली आणि मानव यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. केन्सिंग्टन पॅलेस (यूके) येथील पथकाच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा उपक्रम प्रिन्स विल्यम यांच्या संकल्पनेतून साकारलेला असून, मुंबई क्लायमेट वीकमध्ये तो प्रथमच आणि विशेष स्वरूपात सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमात ग्लोबल साऊथमधील हवामान नवोन्मेषक, प्रत्यक्ष उपाययोजना राबवणारे कार्यकर्ते तसेच भारतातील अग्रगण्य व्यक्ती सहभागी होणार असून, मोठ्या प्रमाणावर जनसहभाग वाढवण्याचा उद्देश आहे. याच कालावधीत विविध महाविद्यालये, वसाहती आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रम होणार असून, त्यात रोड शो, कला व माध्यम उपक्रम तसेच सस्टेनेबिलिटी मेला यांचा समावेश आहे. या उपक्रमांद्वारे हवामान कृती दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
वातावरण हे मुंबई क्लायमेट विकचे नागरिक संवाद व्यासपीठ असून, याद्वारे नागरिकांना त्यांच्या हवामानविषयक मतांची मुक्त आणि अनफिल्टर्ड मांडणी करता येणार आहे. भाषणे, कविता, कथा, गाणी आणि इतर सर्जनशील माध्यमांद्वारे हवामानाशी संबंधित दैनंदिन अनुभव आणि मते मुंबई क्लायमेट वीकच्या केंद्रस्थानी आणल्या जाणार आहेत.
ग्लोबल साऊथचा आवाज
हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम विकसनशील देशांवर होतो, परंतु उपाययोजनांच्या चर्चेत त्यांना कमी महत्त्व मिळते. मुंबई क्लायमेट वीक ग्लोबल साऊथ देशांसाठी एक नेतृत्व मंच उपलब्ध करून देणार आहे. मुंबई क्लायमेट वीक व्यापक भागीदारीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक हा मुख्य भागीदार आहे. डेलॉईट ही धोरणात्मक ज्ञान भागीदार संस्था आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएस) आणि आयआयटी बॉम्बे हे शैक्षणिक भागीदार आहेत.
एव्हरसोर्स कॅपिटल, इंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्ह, शक्ती सस्टेनेबल एनर्जी फाउंडेशन, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) इंडिया, क्लायमेट ग्रुप, सी 40, महिंद्रा ग्रुप, इंडियन मर्चंट्स चेंबर यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग असणार आहे. युनिसेफच्या युवाह (YuWaah!) या उपक्रमाद्वारे युवक सहभाग भागीदार असणार आहे.
या उपक्रमात 30 हून अधिक देशांतील प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संस्था, वित्तीय संघटना आणि उद्योग क्षेत्रातील नेते सहभागी होणार आहेत. बिल गेट्स, हिलरी क्लिंटन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योगपती आणि नेते यांची उपस्थिती या कार्यक्रमाला जागतिक महत्त्व देते.
यातून भारत हवामान विषयक नेतृत्व केवळ धोरण पातळीवर नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
तीन महत्त्वाचे केंद्रबिंदू
मुंबई क्लायमेट वीकची संकल्पना तीन प्रमुख क्षेत्रांवर आधारित आहे:
१. अन्नप्रणाली (Food Systems) - हवामान बदलाचा शेती आणि अन्नसुरक्षेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन टिकाऊ शेती आणि पोषण यावर भर.
२. ऊर्जा संक्रमण (Energy Transition) - पारंपरिक ऊर्जेऐवजी स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेकडे वाटचाल.
३. शहरी शाश्वतता (Urban Resilience) — शहरांना हवामान बदलाच्या परिणामांपासून सुरक्षित आणि सक्षम बनवणे.
हे तीनही घटक भारताच्या विकासाच्या केंद्रस्थानी आहेत, त्यामुळे हा कार्यक्रम केवळ पर्यावरण विषयापुरता मर्यादित राहणार नाही.
नवकल्पना आणि युवकांची भूमिका
मुंबई क्लायमेट वीकमध्ये नवोन्मेष हा केंद्रस्थानी असणार आहे. हवामान समस्यांवर नवे उपाय शोधण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या सहकार्याने ‘इनोव्हेशन चॅलेंज’ आयोजित करण्यात येणार आहे. स्टार्टअप, संशोधक आणि सामाजिक संस्था हे यामध्ये सहभागी होऊन आपले उपाय सादर करणार आहेत.
युवकांसाठी स्वतंत्र हरित नवकल्पना स्पर्धा असेल. युनिसेफच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष चर्चेत आणि उपाययोजनांमध्ये सहभागी केले जाणार आहे. भविष्यातील हवामान नेतृत्व घडवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
विज्ञान, संस्कृती आणि नागरिक सहभाग
मुंबई क्लायमेट वीकमध्ये नवोन्मेष हा केंद्रस्थानी असणार आहे. या सप्ताहात सार्वजनिक व्याख्याने, कला-संस्कृती कार्यक्रम, चित्रपट प्रदर्शन आणि नागरिक कार्यशाळा आयोजित केल्या जातील. हवामान बदल हा केवळ वैज्ञानिक विषय नसून सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नही आहे, हे यातून अधोरेखित होते.
18 फेब्रुवारी रोजी विशेष सत्रात भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा आणि अंतराळवीर शुभांशु शुक्ला (दोघेही अशोक चक्र पुरस्कारप्राप्त) शालेय विद्यार्थ्यांशी तसेच जागतिक नेतृत्वाशी संवाद साधणार असून, अंतराळ संशोधन, विज्ञान आणि हवामान जबाबदारी यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला जाणार आहे.
युनिसेफ (UNICEF) इंडिया आणि यु वाह (YuWaah) यांच्या भागीदारीत युवकांसाठी विशेष उपक्रम राबवले जाणार असून, 16 ते 24 वयोगटातील युवकांचा सहभाग असणार आहे. अन्न प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी लवचिकता या विषयांवरील युवकांच्या नवोन्मेषांचे प्रदर्शन मुंबई क्लायमेट वीकमध्ये करण्यात येणार आहे.
हवामान कृतीचे नवे मॉडेल
मुंबई क्लायमेट वीक ही भारत आणि ग्लोबल साऊथ देशाच्या नेतृत्वाखालील, नागरिक-केंद्रित हवामान कृतीचे नवे मॉडेल ठरणार आहे. मुंबई क्लायमेट वीक हा सार्वजनिक-खासगी-नागरिक भागीदारीवर आधारित उपक्रम आहे. यामधून शहर पातळीवर हवामान उपाययोजना राबविण्याचा भारतीय नमुना साकारणार आहे. जर या मंचातून ठोस भागीदारी, निधी आणि धोरणात्मक निर्णय घडले, तर तो भारत आणि ग्लोबल साऊथ देशांसाठी दिशादर्शक ठरू शकतो.
हवामान बदल हा भविष्यातील नव्हे, तर वर्तमानाचा प्रश्न आहे. मुंबई क्लायमेट वीक हा या वास्तवाला सामोरे जाण्याचा सामूहिक प्रयत्न असून जिथे कल्पना, विज्ञान, उद्योग आणि नागरिक सहभाग एकत्र असेल.
हवामान कृती ही सर्वांची जबाबदारी आहे, आणि बदलाची सुरुवात आजपासूनच करावी लागेल, हा संदेश मुंबई क्लायमेट विकच्या माध्यमातून जगभरात जाईल हे नक्की.
नंदकुमार बलभीम वाघमारे
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई