मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



                                                                       दि 24 फेब्रुवारी 2026

वृत्त 573

 

शासकीय कामकाजात एआयच्या प्रभावी वापरावर भर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. 24 : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचे आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असून शासनाने   सज्ज आणि सक्षम प्रशासन उभारण्यासाठी शासकीय कामकाजात एआयच्या प्रभावी वापरावर भर देण्यास सुरुवात केली असल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

मुंबई येथे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लिडरशिप फोरम 2026 च्या चर्चासत्रात पत्रकार विष्णु सोम यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी आपले विचार व्यक्त केले.  या चर्चासत्रात  मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या अध्यक्ष सिंधू गंगाधरन आणि पीडब्ल्यूसीचे अध्यक्ष संजीव कृष्णन यांचाही सहभाग होता.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासन यंत्रणेत एआयचा वापर वाढवून  सक्षम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जात आहे.  राज्यातील शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यामध्ये समन्वय वाढवून एआय-सक्षम  मनुष्यबळ तयार करण्यावर शासन काम करत आहे. यासाठी मुंबईत राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. बदलत्या तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या संधींचे स्वरूप बदलत आहे आणि शिक्षण प्रणालीने त्यानुसार करावयाचे बदल यावर विचारमंथन होईल. शासन, शिक्षण संस्था आणि नॅसकॉमसारख्या उद्योग संघटनांनी एकत्रितपणे काम केल्यास एआयक्षेत्रात महाराष्ट्र अधिक वेगाने पुढे जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये भारताचे जागतिक नेतृत्व

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अलीकडेच दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत ब्राझीलच्या मंत्र्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या (DPI) अनुभवाच्या आधारे स्वतःची प्रणाली विकसित करत असल्याचे सांगितले. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या बाबतीत भारत सध्या जागतिक नेतृत्व करत आहे.

 

कृषी क्षेत्रात  अ‍ॅग्रीस्टॅकआणि महाविस्तारया एआयचा वापर

राज्यात नुकत्याच सुरू झालेल्या एआय’ 4ॲग्री समिटचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘ॲग्रीस्टॅकया उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याची जमीनधारणा, पिकांची माहिती आणि इतर तपशील एकत्रित केले जात आहेत. त्याचबरोबर महाविस्तारया एआय अ‍ॅपद्वारे जनरेटिव्ह एआयचा वापर करून प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्याला वैयक्तिक डिजिटल सहाय्यक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या 30 लाख शेतकरी या प्लॅटफॉर्मवर जोडले गेले आहेत. अँग्रीस्टॅकआणि महाविस्तारयांचा संगम शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्च 25 ते 40 टक्क्यांनी कमी करण्यास आणि शेतीतील अनिश्चितता कमी करण्यास नक्की मदत करेल.

 

धोरणनिर्मितीत उद्योगांचा सहभाग

राज्यातील धोरणनिर्मिती आता पॉलिसी-लेड ग्रोथया मंत्रावर आधारित असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. जागतिक क्षमता केंद्र (जीसीसी) धोरण तयार करताना विविध उद्योग संघटनांचा सहभाग घेतला गेला. त्यानुसार पुणे शहर हे जीसीसी या परिसंस्थेत देशात अव्वल ठरल्याचे अहवालात नमूद झाले आहे. तसेच लॉजिस्टिक धोरणही लॉजिस्टिक कौन्सिलच्या सहभागातून तयार करण्यात आले असून ते भविष्योन्मुख असल्याचे त्यांनी सांगितले. पुरवठा साखळी व्यवस्थापनात लॉजिस्टिक्सची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असल्याने या क्षेत्रात एआयचा वापर वाढवण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी नॅसकॉम, सीआयआय (Confederation of Indian Industry) आणि विविध सेक्टर कौन्सिल्ससोबत सहकार्य केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस  यांनी सांगितले. 

एआयम्हणजे संधी

एआयमुळे रोजगार नष्ट होतील, या भीतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संगणक क्रांतीच्या वेळीही अशीच भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र भारताने त्या क्रांतीचा लाभ घेत आयटी क्षेत्रात मोठी झेप घेतली. आता एआयकडे पर्याय म्हणून नव्हे तर प्रगतीची संधी म्हणून पाहिले पाहिजे. रोजगाराचे स्वरूप बदलेल, नव्या संधी निर्माण होतील. आज क्रिएटरहा व्यवसाय अस्तित्वात आला आहे; तो दहा वर्षांपूर्वी कल्पनेतही नव्हता, असे ते म्हणाले. त्याचबरोबर, नव्या पिढीने तंत्रज्ञान आत्मसात केले असून बदल स्वीकारण्याची मानसिकता महत्त्वाची असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ


 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे करणार राष्ट्रीय आरोग्य मेळावा - २०२६ चे उद्घाटन

 


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे करणार राष्ट्रीय आरोग्य मेळावा - २०२६ चे उद्घाटन

          अमरावती दि. 24 : भारत सरकारचे आयुष मंत्रालय, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे चार दिवसांचा "राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026" आयोजित करण्यात आला आहे.

          औषधी वनस्पती लागवड आणि कृषी वनीकरणाद्वारे आयुष औषध प्रणालींबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे , सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करणे आणि शेतकऱ्यांसाठी उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण करणे हे या मेळाव्याचे उद्दिष्ट आहे.

          राष्ट्रीय आरोग्य मेळावा- 2026 चे उद्घाटन बुधवार 25 फेब्रुवारी 2026 रोजी मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभ संत गजानन महाराज संस्थानच्या विसावा मैदानावर होणार आहे. उद्घाटन समारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार व केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि इतर अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

          या संपूर्ण मेळाव्यात नागरिकांना आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा रिग्पा, होमिओपॅथी आणि इतर पारंपारीक आरोग्यसेवा शाखांसह विविध आयुष प्रणालीं मार्फत मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि औषधे घेण्याची संधी मिळेल.

          आयुष क्षेत्रातील उत्कृष्ट उत्पादन पद्धती, गुणवत्ता मानके आणि अलीकडील संशोधन प्रदर्शित करण्यासाठी अनेक प्रतिष्ठित आयुष औषधनिर्माण आणि वेलनेस  कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर दैनंदिन आरोग्य गरजांसाठी औषधी वनस्पती आणि साध्या घरगुती उपचारांचे समर्पित प्रदर्शन देखील या मेळाव्यात भरवले जाणार आहे.      

         बुलढाणा जिल्हा आणि आसपासच्या भागातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत आणि लाभदायी स्रोत म्हणून कृषी वनीकरण आणि औषधी वनस्पतींची लागवड स्वीकारण्यास प्रोत्साहन देणारा एक विशेष उपक्रम यावेळी आयोजित करण्यात आला असून,तो या राष्ट्रीय आरोग्य मेळावा -2026 चे एक प्रमुख आकर्षण आहे. दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3.00 वाजता शेगाव येथील विसावा परिसरात "आयुर्वेदिक शेती, उत्पादन आणि विपणन" या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

          या महामेळाव्यात, शेतकऱ्यांना वनोत्पादनांवर  आधारित आणि औषधी पिकांची लागवड, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन यावर तज्ज्ञांचे  मार्गदर्शन मिळेल जेणेकरून पारंपारिक शेती करणाऱ्यांना आयुर्वेदिक शेतीसह ते करता येईल आणि त्यांच्या  उत्पन्नात भर पडेल.

          केंद्रीय आयुष मंत्री  प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांना आयुर्वेदिक शेती आणि उत्पादन कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि पारंपारिक पिकांसोबत औषधी वनस्पती लागवडीची क्षमता शोधण्याचे आवाहन केले आहे.

          शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचा काही भाग औषधी वनस्पतींसाठी  राखून ठेवल्याने शेतकऱ्यांना शाश्वत आणि लाभदायी उत्पन्न मिळेल, तर नागरिकांना उच्च दर्जाचे नैसर्गिक उपचार पर्याय उपलब्ध होतील आणि आयुष मूल्य साखळी अधिक मजबूत होईल  असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमधील नागरिक, शेतकरी, बचत गट, विद्यार्थी, आरोग्य स्वयंसेवक आणि आयुष भागधारक यांनी शेगावला भेट देऊन राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि या  राष्ट्रीय कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. 

0000

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

विशेष लेख श्री गुरु तेग बहादुर साहेबजी : धर्मस्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे महान गुरु

विशेष लेख

श्री गुरु तेग बहादुर साहेबजी : धर्मस्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे महान गुरु

 

          भारताच्या इतिहासात अनेक संत, महात्मे आणि क्रांतिकारकांनी आपल्या विचारांनी व कार्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यापैकी शीख धर्माचे नववे गुरु गुरु तेग बहादुर यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. म्हणूनच त्यांना हिंद दी चादर  (हिंदुस्थानचे रक्षण करणारी ढाल) असेही संबोधले जाते. त्यांचे जीवनकार्य हे केवळ शीख समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे.

जन्म आणि बालपण

          गुरु तेग बहादुर यांचा जन्म १ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील गुरु हरगोबिंद हे शीख धर्माचे सहावे गुरु होते. बालपणी त्यांचे नाव त्यागमल असे होते. लहान वयातच त्यांनी शौर्य, संयम आणि आध्यात्मिकतेची चिन्हे दाखवली. वडिलांकडून त्यांनी शस्त्रविद्या आणि धर्मज्ञान यांचे शिक्षण घेतले.

          एकदा मुघल सैन्याविरुद्ध झालेल्या युद्धात त्यांनी पराक्रम गाजवला. त्यांच्या शौर्यामुळे त्यांना तेग बहादुर  (तेग म्हणजे तलवार, बहादुर म्हणजे शूर) हे नाव देण्यात आले. पुढे ते याच नावाने ओळखले जाऊ लागले.

आध्यात्मिक साधना आणि समाजकार्य

          गुरु तेग बहादुर यांनी आयुष्यातील अनेक वर्षे ध्यान, साधना आणि समाजसेवेसाठी अर्पण केली. त्यांनी पंजाब, बिहार, आसाम आणि बंगाल अशा विविध प्रदेशांत प्रवास करून लोकांना सत्य, प्रेम आणि सहिष्णुतेचा संदेश दिला. त्यांनी अंधश्रद्धा, अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला.

त्यांच्या शिकवणीत नम्रता, संयम, परोपकार आणि ईश्वरभक्ती यांना विशेष महत्त्व होते. त्यांनी लोकांना सांगितले की खरा धर्म हा मानवतेची सेवा करण्यात आहे. त्यांचे अनेक विचार गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्या रचनांमध्ये वैराग्य, निडरता आणि आत्मबल यांचे सुंदर वर्णन आढळते.

आनंदपूर साहिबची स्थापना

          गुरु तेग बहादुर यांनी पंजाबमध्ये आनंदपूर साहिब या शहराची स्थापना केली. हे ठिकाण पुढे शीख धर्माचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. येथे त्यांनी धर्मप्रसार आणि समाजरचना यांचे कार्य केले. आनंदपूर साहिब आजही शीख समुदायासाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते.

मुघल काळ आणि धार्मिक अत्याचार

          त्या काळात भारतावर मुघलाचे याचे राज्य होते. त्यांच्या कारकीर्दीत धार्मिक असहिष्णुता वाढली होती. जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणण्याचे प्रकार सुरू होते. विशेषतः काश्मीरमधील हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत होते.काश्मिरी पंडितांनी या अन्यायाविरुद्ध मदतीसाठी गुरु तेग बहादुर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी त्यांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. गुरुजींनी स्पष्ट सांगितले की जर त्यांना इस्लाम स्वीकारायला भाग पाडले जात असेल, तर आधी मला धर्मांतर करावे लागेल. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे ते मुघलांच्या रोषाला सामोरे गेले.

 बलिदान

          गुरु तेग बहादुर यांना अटक करून दिल्ली येथे आणण्यात आले. त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव टाकण्यात आला; परंतु त्यांनी धर्मांतरास नकार दिला. शेवटी ११ नोव्हेंबर १६७५ रोजी त्यांची हत्या करण्यात आली.

          त्यांचे बलिदान मानवतेच्या इतिहासातील एक महान घटना मानली जाते. त्यांनी स्वतःच्या धर्मासाठी नव्हे, तर इतरांच्या धर्मस्वातंत्र्यासाठी प्राण दिले. त्यामुळे त्यांना “हिंद की चादर” ही उपाधी मिळाली.

          ज्या ठिकाणी त्यांचे शिर छाटण्यात आले, त्या ठिकाणी आज गुरुद्वारा शीश गंज साहिब उभा आहे. हे स्थान त्यांच्या बलिदानाची साक्ष देत आजही लाखो भाविकांना प्रेरणा देते.

गुरु गोविंदसिंहांवर प्रभाव

          गुरु तेग बहादुर यांचे सुपुत्र गुरु गोविंदसिंह पुढे शीख धर्माचे दहावे गुरु झाले. वडिलांच्या बलिदानाचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला. पुढे त्यांनी खालसा पंथाची स्थापना करून शीख धर्म अधिक संघटित व बळकट केला. गुरु तेग बहादुर यांच्या शिकवणीमुळेच शीख समाजात निडरता आणि त्यागभाव दृढ झाला.

शिकवण आणि विचार

गुरु तेग बहादुर यांच्या शिकवणीचा मुख्य गाभा म्हणजे 

सत्याचा मार्ग कधीही सोडू नका.

अन्यायाविरुद्ध ठाम उभे रहा.

सर्व धर्मांचा आदर करा.

ईश्वरभक्ती आणि मानवसेवा यांचा संगम साधा.

त्यांच्या रचनांमध्ये जीवनाचे क्षणभंगुर स्वरूप आणि आत्मिक शांतीचा संदेश आहे. त्यांनी माणसाला भयमुक्त आणि आत्मनिर्भर बनण्याचा उपदेश केला.

          गुरु तेग बहादुर यांचे जीवन हे त्याग, शौर्य आणि मानवतेचे प्रतीक आहे. त्यांनी धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी स्वतःचा बळी दिला, परंतु आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. त्यांचे कार्य आणि बलिदान भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.

          आजच्या काळातही श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या विचारांची गरज अधिक आहे. धार्मिक सहिष्णुता, परस्पर आदर आणि मानवतेची भावना जपणे हीच त्यांच्या प्रति खरी श्रद्धांजली ठरेल. श्री गुरु तेग बहादुर यांचे जीवन आपल्याला शिकवते की सत्य आणि न्यायासाठी लढताना कितीही संकटे आली तरी धैर्य सोडू नये.

          त्यांचे बलिदान हे केवळ एका धर्माचे नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. म्हणूनच ते भारतीय इतिहासातील एक अजरामर आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून सदैव स्मरणात राहतील.

          श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांचा त्याग, त्यांची अध्यात्मिक साधना आणि समाज कार्य, बलिदान, शिकवण आणि विचार समाजात रुजावेत यासाठी त्यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचे आयोजन प्रथम नागपूरला नंतर नांदेड येथे झाले. आता  दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्चला नवी मुंबई येथील ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर येथे होत आहे. या समागमामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री महोदय, महनिय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. आपणही या शहीदी समागमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

००००

-रणजित पवार,

उपसंपादक,

विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

  

विशेष लेख शीख समाजातील लंगर सेवा : मानवतेचा समतेचा आणि सेवाभावाचा तेजस्वी आदर्श

 




विशेष लेख

शीख समाजातील लंगर सेवा : मानवतेचा समतेचा आणि सेवाभावाचा तेजस्वी आदर्श

 

          भारतीय संस्कृती आणि धर्मपरंपरा विविधतेत एकतेचा संदेश देणारी आहे. या महान परंपरेतील शीख धर्म हा मानवता, समता, सेवा आणि बंधुभाव यांचा संदेश देणारा एक प्रभावी धर्म म्हणून ओळखला जातो. शीख धर्माची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि जागतिक स्तरावर आदर्श ठरलेली परंपरा म्हणजे लंगर सेवा. लंगर सेवा ही केवळ धार्मिक विधी नसून, ती सामाजिक समतेची, परोपकाराची आणि मानवी करुणेची जिवंत परंपरा आहे.

लंगर सेवेचा ऐतिहासिक उद्गम

          लंगर सेवेची संकल्पना शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव जी यांनी 15 व्या शतकात मांडली. त्या काळात भारतीय समाजात जातिभेद आणि सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होती. गुरू नानक देव जी यांनी या अन्यायकारक सामाजिक व्यवस्थेला आव्हान देत सर्व मानव समान असल्याचा संदेश दिला. त्यांनी गुरुद्वारामध्ये सर्वांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था सुरू करून समाजातील भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

          पुढील गुरूंनी लंगर परंपरेला अधिक सुसंगठित आणि व्यापक स्वरूप दिले. विशेषतः गुरू अमरदास जी यांनी ‘पंगत’ आणि ‘संगत’ या संकल्पनांचा प्रचार करून लंगर सेवेचा सामाजिक पाया मजबूत केला. गुरुद्वारामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने गुरूंच्या दर्शनापूर्वी लंगरमध्ये बसून भोजन करावे, असा नियम त्यांनी केला. यामुळे समतेचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजात रुजला.

लंगर सेवेची तत्त्वज्ञानात्मक संकल्पना

          लंगर सेवेचे तत्त्वज्ञान तीन मूलभूत मूल्यांवर आधारीत आहे— समता, सेवा आणि सामूहिकता. शीख धर्मानुसार देव सर्वत्र आहे आणि सर्व मानव देवाचेच अंश आहेत. त्यामुळे मानवांमध्ये भेदभाव करणे म्हणजे देवाच्या इच्छेचा अवमान करणे होय. लंगर सेवेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांतील लोक एकाच पंक्तीत बसून भोजन करतात. राजा असो वा सामान्य नागरिक, श्रीमंत असो वा गरीब, स्त्री असो वा पुरुष—सर्वांसाठी समान आसन आणि समान अन्न दिले जाते.

          लंगरमध्ये सेवा करणे हे शीख धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. अन्न तयार करणे, वाटप करणे, पाणी देणे, भांडी धुणे, स्वच्छता राखणे—हे सर्व कार्य स्वयंसेवक भावनेने केले जाते. या सेवेचे मूळ उद्दिष्ट अहंकाराचा त्याग करून मानवसेवेला सर्वोच्च मानणे हा आहे.

लंगर सेवेची वैशिष्ट्ये आणि कार्यपद्धती

लंगर सेवेची कार्यपद्धती अत्यंत सुव्यवस्थित आणि लोकसहभागावर आधारीत आहे. याची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :

·         मोफत भोजन व्यवस्था: लंगरमध्ये कोणालाही शुल्क न देता अन्न दिले जाते.

·         सर्वधर्मसमभाव: कोणत्याही धर्म, जात, भाषा किंवा देशातील व्यक्तीसाठी लंगर खुले आहे.

·         सामूहिक भोजन पद्धती: सर्वजण जमिनीवर एकाच पंक्तीत बसून भोजन करतात, ज्यामुळे सामाजिक समतेची जाणीव निर्माण होते.

·         स्वयंसेवी सहभाग: लंगर सेवा स्वयंसेवकांच्या सहभागावर चालते. समाजातील प्रत्येक व्यक्ती सेवा देऊ शकतो.

·         साधे आणि सात्त्विक अन्न: लंगरमधील भोजन साधे, पोषणमूल्यपूर्ण आणि सात्त्विक असते.

·         शिस्त आणि स्वच्छता: लंगरमध्ये स्वच्छता, शिस्त आणि सामूहिक सहकार्य यांना विशेष महत्त्व दिले जाते.

लंगर सेवा आणि सामाजिक परिवर्तन

          लंगर सेवा ही केवळ धार्मिक सेवा नसून ती सामाजिक परिवर्तनाची प्रभावी चळवळ आहे. इतिहासात भारतात जातीभेदामुळे समाजात विभाजन होते. लंगरने या विभाजनावर प्रहार करून समानतेचा संदेश दिला. गुरुद्वारामध्ये सर्वजण एकत्र बसून भोजन करतात, त्यामुळे सामाजिक भेदभाव नष्ट होतो आणि बंधुभाव वाढतो.

          लंगर सेवा स्त्री-पुरुष समानतेचेही प्रतीक आहे. स्त्रिया आणि पुरुष समान अधिकाराने सेवा करतात. त्यामुळे लिंगभेदाविरुद्ध सामाजिक संदेश दिला जातो. तसेच लंगर सेवा गरीब, गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी आधारस्तंभ ठरते.

आधुनिक काळातील लंगर सेवेचे जागतिक योगदान

          आज लंगर सेवा केवळ भारतापुरती मर्यादित न राहता जागतिक स्तरावर मानवतेची सेवा करणारी चळवळ बनली आहे. भारतातील अमृतसर येथील हरमंदिर साहिब (स्वर्ण मंदिर) येथे दररोज लाखो भाविक आणि पर्यटकांना लंगर दिला जातो. हे जगातील सर्वात मोठ्या सामूहिक भोजन व्यवस्थांपैकी एक मानले जाते.

          नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप, दुष्काळ, युद्ध किंवा महामारीच्या काळात शीख समाजाने लंगर सेवेच्या माध्यमातून जगभर मानवतेची सेवा केली आहे. कोरोना महामारीच्या काळात भारतासह विविध देशांमध्ये शीख स्वयंसेवकांनी गरजू लोकांना मोफत भोजन पुरवले. ही सेवा मानवतेसाठी प्रेरणादायी ठरली.

लंगर सेवेचा आध्यात्मिक आणि नैतिक संदेश

          लंगर सेवा ही केवळ भौतिक अन्नपुरवठा नसून ती आध्यात्मिक शिक्षणाची प्रक्रिया आहे. सेवा करताना अहंकाराचा त्याग, करुणेची भावना आणि मानवतेचा आदर विकसित होतो. शीख धर्मानुसार सेवा म्हणजेच ईश्वराची पूजा होय. गुरू ग्रंथ साहिबमध्ये सेवेला अत्यंत महत्त्व देण्यात आले असून, सेवेमुळे मानवाला आत्मिक शांती आणि नैतिक उन्नती प्राप्त होते, असा संदेश दिला आहे.

          लंगर सेवा मानवी मूल्ये जपण्याची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करते. प्रत्येक व्यक्ती समाजाचा एक घटक असून समाजसेवेसाठी योगदान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, ही भावना लंगरच्या माध्यमातून रुजवली जाते.

शासकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून लंगर सेवा

          शासकीय दृष्टिकोनातून पाहता लंगर सेवा ही सामाजिक समावेशन, अन्नसुरक्षा आणि समुदाय विकासाची प्रभावी संकल्पना आहे. ही सेवा सामाजिक विषमता कमी करण्यास, गरिबी निवारणास आणि आपत्ती व्यवस्थापनात सहाय्यक ठरते. स्वयंसेवी संस्थांद्वारे आणि धार्मिक संस्थांद्वारे राबवली जाणारी ही सेवा सामाजिक सहभाग आणि लोकसहभागाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

          लंगर सेवा ही लोकशाही मूल्यांशी सुसंगत असून समानता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांना प्रोत्साहन देते. त्यामुळे सार्वजनिक धोरण निर्मितीमध्ये आणि सामाजिक विकास कार्यक्रमांमध्ये लंगर मॉडेलचा अभ्यास प्रेरणादायी ठरू शकतो.

निष्कर्ष

          लंगर सेवा ही शीख धर्माची एक महान देणगी असून ती मानवतेच्या समतेचे, सेवाभावाचे आणि बंधुतेचे प्रतीक आहे. ही सेवा धार्मिक, सामाजिक, नैतिक आणि आध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर मानवाला प्रेरणा देते. आजच्या काळात वाढती विषमता, सामाजिक तणाव आणि मानवी मूल्यांचा ऱ्हास यामुळे लंगर सेवेचा संदेश अधिकच महत्त्वाचा ठरतो.

          सेवा हीच सर्वोच्च पूजा” हा विचार लंगर सेवेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मिळालेला आहे. म्हणूनच लंगर सेवा ही केवळ शीख समाजाची परंपरा नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय आदर्श व्यवस्था आहे.

००००

संजीवनी स.जाधव-पाटील, सहायक संचालक (माहिती)

विभागीय माहित कार्यालय,

कोकण विभाग, नवी मुंबई