बुधवार, ४ मार्च, २०२६

#पल्स

 

#पल्स या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर, येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. पल्स २०२६ च्या 'कर्टन रेझर' कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे पार पडला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.
सध्या जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे. आरोग्य क्षेत्रातही दररोज नवनवे तंत्रज्ञान येत आहे. नवनवीन संशोधन, येणारे तंत्रज्ञान, दुर्धर आजारावरील परवडणारे उपचार आणि आजारांना प्रतिबंध या सर्वांचा संगम मुंबईत आयोजित ‘पल्स’ परिषदेत होणार आहे. त्यामुळे निश्चितच आरोग्य क्षेत्रात जगात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार आहे, असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
मानवी आरोग्यासाठी निर्माण होणाऱ्या नवनवीन आव्हानांवर यशस्वी मात करण्यासाठी राज्य शासन कार्यरत आहे. सध्या शासन, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राने सोबत येऊन यावर उपाय काढण्याची आवश्यकता असून खासगी क्षेत्राने संशोधनातून अशा समस्यांवर उपाय काढावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

#कृत्रिमबुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे संपूर्ण आरोग्य क्षेत्राचा कायापालट होत आहे. या तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस आरोग्य क्षेत्रात बदल होत आहेत. परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर पुढील प्रत्येक वर्षी परिषद आयोजित व्हावी. या परिषदेच्या आयोजनातून आरोग्य यंत्रणेला निश्चितच बळकट करण्याचे कार्य होईल, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

मंगळवार, ३ मार्च, २०२६

विशेष लेख त्याग, सेवा आणि समर्पणाचा ३५० वा शहिदी समागम – एक अविस्मरणीय अनुभव

 


विशेष लेख

त्याग, सेवा आणि समर्पणाचा ३५० वा शहिदी समागम – एक अविस्मरणीय अनुभव

 

          बोले सो निहाल, सत श्री अकाल ! या जयघोषाने जेव्हा नवी मुंबईचे आकाश दुमदुमले, तेव्हा तो केवळ एक आवाज नव्हता, तर ती लाखो अंतःकरणातील श्रद्धा आणि कृतज्ञतेची अभिव्यक्ती होती.

          ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुरजींच्या ३५० व्या शहिदी समागमाचे मुख्य राज्य समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडताना, या सोहळ्याचे भव्यत्व आणि त्यामागील आध्यात्मिक शक्ती जवळून अनुभवण्याचे भाग्य मला लाभले. नवी मुंबईच्या पावन भूमीवर पार पडलेला हा सोहळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर ते सत्य, करुणा, धैर्य आणि सहिष्णुतेचे जिवंत दर्शन होते. या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले.

आध्यात्मिकतेचा आणि एकतेचा त्रिवेणी संगम..

          नागपूर, नांदेड आणि आता नवी मुंबई अशा तीन टप्प्यांतून प्रवाहित झालेला हा भक्तिसोहळा २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी परमोच्च शिखरावर पोहोचला. या दोन दिवसांत केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशातून भाविकांचा ओघ नवी मुंबईकडे वळला होता. या समागमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे सर्वसमावेशक स्वरूप. सीख समुदायासोबतच सिकलगर, सिंधी, मोहयाल, लबाणा, बंजारा, वाल्मिकी आणि नामदेव भगत वारकरी संप्रदायातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा केवळ एका धर्माचा सोहळा नव्हता, तर तो मानवतेचा उत्सव होता.

          पहाटेपासूनच वाहे गुरु च्या जपामध्ये भाविक रांगा लावून श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी आसुसलेले दिसत होते. अखंड कीर्तन आणि रसाळ गुरुवाणीने, या समागमातील थोर संत महात्म्यांच्या उपस्थितीने हा संपूर्ण परिसर एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात नेऊन ठेवला होता.

          विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लंगरमध्ये सेवा दिली, जे पाहून उपस्थित भाविक भारावून गेले. याशिवाय ‘जुता घर’ ही संकल्पना देखील तितकीच आध्यात्मिक होती. भाविकांची पादत्राणे सांभाळणे, ही सेवा करून स्वतःचा अहंकार त्यागण्याची आणि नम्रतेची साधना येथे अनेक सेवाभावी संस्थांच्या सदस्यांनी केली.

          कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी महत्त्वाच्या घोषणांनी या सोहळ्याला ऐतिहासिक परिमाण प्राप्त करून दिले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या उपक्रमाचे कौतुक केले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या बलिदानाचा इतिहास आता महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा केली. तसेच, नवी मुंबईत त्यांच्या नावाने एक भव्य रुग्णालय उभारण्याचा निर्णयही जाहीर केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूंच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी राज्यभर ‘डिजिटल रथ’ फिरवण्याचा संकल्प बोलून दाखवला. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही अल्पसंख्याक समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचा विश्वास व्यक्त केला.

नियोजनाचे आव्हान आणि यशस्वी पूर्तता..!

          लाखो भाविकांची उपस्थितीत असलेल्या कार्यक्रमाचे नियोजन करणे हे एक शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. पण गुरुसाहेबांच्या कृपेने आणि प्रशासन, स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने हे शक्य झाले. भाविकांसाठी उभारण्यात आलेला ‘भव्य लंगर’ हा श्रद्धेचा आणि नि:स्वार्थ सेवेचा कळस होता. जाती-पातीचे, उच्च-नीचतेचे सर्व अडसर दूर सारून लाखो लोकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. चहा, अल्पोपहार, ज्यूस आणि विविध माहितीपर स्टॉल्सच्या माध्यमातून प्रत्येकाची काळजी घेतली जात होती.

          कोकण, पुणे आणि नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय, या विभागातील सर्व जिल्हे, सर्व महानगरपालिका, सिडको, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांच्यासह विविध शासकीय विभागांनी या सोहळ्यात घेतलेली भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, रायगड आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, सिडको आणि पनवेल व नवी मुंबई नगरपालिका, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांनी समर्पित भावनेने दिलेल्या सेवेचे कौतुक करावे तितके कमीच आहे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन असो किंवा स्वच्छतेसाठी तैनात केलेले शेकडो कर्मचारी आणि घंटागाड्या; प्रत्येक स्तरावर शिस्त दिसून येत होती. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी २५० ट्रॅफिक वॉर्डन्सनी अहोरात्र कष्ट घेतले, ज्यामुळे कुठेही विस्कळीतपणा जाणवला नाही.

 

तंत्रज्ञान आणि इतिहासाची सांगड

          ऑडिओ-व्हिज्युअल कक्ष या समागमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे अत्याधुनिक ‘ऑडिओ-व्हिज्युअल कक्ष’. श्री गुरु तेग बहादुर साहिबजींनी संस्कृती रक्षणासाठी व अन्याय दूर करण्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक होते. या कक्षात एकावेळी १००० भाविक बसू शकतील, अशी व्यवस्था होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुरुसाहेबांचा जीवनपट जेव्हा पडद्यावर उलगडला, तेव्हा उपस्थित्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. हा इतिहास केवळ पुस्तकात न राहता तो काळजापर्यंत पोहोचवण्याचे काम या उपक्रमाने केले.

 

आरोग्य सेवा: मानवतेची खरी पूजा

          माणुसकीची सेवा हीच खरी ईश्वर सेवा हा संदेश प्रत्यक्षात उतरवताना आम्ही भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. ५० तज्ज्ञ डॉक्टर आणि १०० पॅरामेडिकल स्टाफ अहोरात्र सेवेत होते. विशेष म्हणजे, ६० हून अधिक दात्यांनी रक्तदान करून गुरुसाहेबांच्या बलिदानाच्या स्मृतींना उजाळा दिला. वृद्ध आणि दिव्यांगांसाठी व्हिलचेअर आणि ई-व्हेइकलची सोय करण्यात आली होती. वाढत्या तापमानाचा विचार करून परिसरात ‘मिस्ट वेहिकल्स’ च्या माध्यमातून गारवा राखण्याचा प्रयत्न केला गेला. दंत चिकित्सा, अस्थिरोग, स्त्रीरोग तज्ज्ञांपासून ते कॅन्सर स्क्रिनिंग आणि थॅलेसेमिया प्रबोधनापर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होत्या. ही केवळ वैद्यकीय मदत नव्हती, तर ती भाविकांप्रती असलेली कृतज्ञता होती.

सांस्कृतिक वारसा आणि शौर्याचे प्रदर्शन

          या कार्यक्रमात केवळ धार्मिक विधिच नव्हते, तर शिख धर्माच्या शौर्याचे प्रतीक असलेले ‘गतका’ प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे येत होते. नगर कीर्तन, पुष्पवृष्टी आणि माहितीपटांच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुरजींच्या ‘हिंद दी चादर’ या पदवीची सार्थकता सर्वांना पटवून देण्यात आली. त्यांनी स्वतःचे शीश अर्पण करणे मान्य केले, पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा संदेश आजच्या काळातही तितकाच प्रासंगिक आहे.

एक नवी ऊर्जा आणि दिशा..!

          या समितीचा राज्य समन्वयक म्हणून काम करताना मला जाणवले की, जेव्हा हेतू शुद्ध असतो आणि सोबतीला सेवाभाव असतो, तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. विविध शासकीय विभाग आणि हजारो नि:स्वार्थ स्वयंसेवकांच्या योगदानामुळेच हा ३५० वा शहिदी समागम ऐतिहासिक ठरला. श्री गुरु तेग बहादुरजींनी दिलेला त्याग आणि मानवतेचा संदेश आपल्या मनात कायम राहील. नवी मुंबई आणि राज्यातील इतर भागातून आलेल्या भाविकांनी हे सिद्ध केले की, आजही आपल्या समाजात श्रद्धा, शिस्त आणि एकता टिकून आहे. या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलता आला, याचे मला मनस्वी समाधान आहे.वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह…!

·         रामेश्वर नाईक

(मुख्य राज्य समन्वयक, ‘हिंद दी चादर’ शहिदी समागम-कार्यक्रम)

 

 

         

 

विशेष लेख ‘माझा मराठाचि बोलु कौतुकें’ मराठी भाषा गौरव दिन विशेष लेख

 

विशेष लेख

‘माझा मराठाचि बोलु कौतुकें’

मराठी भाषा गौरव दिन विशेष लेख

          वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन महाराष्ट्रात ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ स्मरणाचा नसून आत्मपरीक्षणाचा आणि आत्मगौरवाचा आहे. माझा मराठाचि बोलु कौतुकें या संतवचनाच्या प्रेरणेने मराठी भाषेच्या ऐतिहासिक परंपरेचा, साहित्यिक वैभवाचा आणि अभिजात स्वरूपाचा सुसंगत आढावा मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर…!!

          मराठी भाषेची मुळे प्राचीन महाराष्ट्री प्राकृतमध्ये आढळतात. सातवाहन कालखंडात प्रतिष्ठान नगरी म्हणजेच आजचे पैठण हे राजकीय व सांस्कृतिक केंद्र होते. त्या काळात महाराष्ट्री प्राकृत ही लोकव्यवहार, प्रशासन आणि साहित्यनिर्मितीची प्रभावी भाषा होती. सातवाहन राजा हाल यांनी संकलित केलेली गाथा सप्तशती ही काव्यरचना या भाषिक परंपरेचा भक्कम पुरावा मानली जाते. सुमारे २७८ कवींच्या आर्या या ग्रंथात समाविष्ट असून, इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.स. दुसरे शतक या कालखंडातील सामाजिक, सांस्कृतिक आणि भावविश्वाचे प्रतिबिंब त्यातून दिसते. प्रेम, निसर्ग, ग्रामजीवन आणि स्त्री-पुरुष संबंधांचे सूक्ष्म दर्शन घडवणारी ही रचना मराठीच्या भावविश्वाची आद्य पायाभरणी ठरते.

          महाराष्ट्री प्राकृत ते अपभ्रंश आणि पुढे प्राचीन मराठी असा भाषिक विकासक्रम दिसतो. शिलालेख, ताम्रपट आणि दानपत्रांतून मराठीच्या आरंभीच्या स्वरूपाचे पुरावे मिळतात. यादवकालीन प्रशासनात मराठीचा वापर वाढला. याच काळात मराठीला लोकभाषेचे बळ लाभले आणि ती ज्ञानप्रसाराचे प्रभावी माध्यम बनली.

          संतपरंपरेत संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला तात्त्विक अधिष्ठान दिले. ‘भावार्थदीपिका’ अर्थात ज्ञानेश्वरी आणि ‘अमृतानुभव’ या ग्रंथांमधून त्यांनी संस्कृतातील तत्त्वज्ञान लोकभाषेत आणले. “माझा मराठाचि बोलु कौतुकें, परि अमृतातेहि पैजा जिंके” या त्यांच्या वचनातून मराठीच्या अभिव्यक्तीशक्तीवरील अढळ विश्वास प्रकट होतो. त्यानंतर संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायातील सर्व संत परंपरेमुळे अभंग-ओव्यांतून मराठीची अध्यात्मिक व सामाजिक परंपरा अधिक व्यापक झाली. भक्ती चळवळीने मराठीला लोकमान्यता, लोकसंवाद आणि लोकशक्तीचे माध्यम बनवले.

          छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात मराठी ही केवळ लोकभाषा न ठेवता ती राज्यकारभाराची भाषा बनवली. त्यातूनच राजव्यवहार कोष, पत्रव्यवहार, आज्ञापत्रे यांमधून मराठीची प्रशासकीय ताकद अधोरेखित झाली. स्वराज्य स्थापनेच्या प्रक्रियेत मराठीने स्वाभिमानाचे रूप धारण केले. पुढे पेशवेकाळात आणि नंतरच्या काळात शिक्षणव्यवस्थेत मराठीला नवीन आव्हाने आणि संधी लाभल्या. मुद्रणयंत्राच्या आगमनाने वृत्तपत्रे, ग्रंथप्रकाशन आणि आधुनिक साहित्यप्रकार विकसित झाले.

          आधुनिक काळात कादंबरी, नाटक, कविता, ललितलेखन, समीक्षा, पत्रकारिता या सर्व क्षेत्रांत मराठीने स्वतंत्र ओळख निर्माण केली.

          वि. वा. शिरवाडकर यांनी “परभाषेच्या कचेरीत आपली भाषा साहेबासारखी वागवा, पण आपल्या घरात ती आईसारखी जपली पाहिजे,” असे सांगत भाषिक स्वाभिमानाची जाणीव करून दिली. साने गुरुजी यांनी मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत तिचे ऋण मान्य करण्याचा संदेश दिला. या विचारांतून मराठी ही केवळ व्यवहाराची नव्हे तर संस्कारांची भाषा आहे, हे स्पष्ट होते.

          केंद्र सरकार कडून मराठी भाषेला प्रदान करण्यात आलेला ‘अभिजात भाषा’ दर्जा हा तिच्या प्राचीन परंपरेचा आणि समृद्ध साहित्यसंपदेचा अधिकृत सन्मान आहे. दोन हजार वर्षांहून अधिक प्राचीन परंपरा, स्वतंत्र साहित्यनिर्मिती, शास्त्रीय ग्रंथसंपदा आणि सततचा भाषिक विकास या सर्व निकषांवर मराठी समर्थपणे उभी आहे. या मान्यतेमुळे संशोधन, शोधनिबंध, विद्यापीठीय अभ्यासक्रम आणि प्राचीन हस्तलिखितांचे जतन यांना नवे बळ मिळणार आहे.

          आजच्या डिजिटल युगात मराठीसमोर नवी आव्हाने उभी आहेत. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणकीय भाषा प्रक्रिया, ई-ग्रंथालये, सामाजिक माध्यमे या सर्व क्षेत्रांत मराठीची उपस्थिती वाढवणे गरजेचे आहे. प्रशासन, विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योगव्यवहार आणि उच्च शिक्षण यांमध्ये मराठीचा सशक्त वापर होणे ही काळाची गरज आहे, त्या दृष्टीने शासनही प्रयत्नशील आहे. तरुण पिढीत वाचनसंस्कृती, लेखनसंवेदना आणि भाषिक अभिमान रुजवणे ही आपली सर्वांची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

          मराठी भाषा गौरव दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून सांस्कृतिक स्व-ओळखीचा उत्सव आहे. मराठी ही महाराष्ट्राच्या अस्मितेचा आधारस्तंभ आहे; तिच्या शब्दांत इतिहासाचा ठसा, संतवाङ्मयाची करुणा, स्वराज्याचा स्वाभिमान आणि आधुनिकतेची झेप सामावलेली आहे.

          माझा मराठाचि बोलु कौतुकें” ही भावना केवळ उच्चारात न राहता कृतीत उतरावी, मराठीचा वापर वाढावा, तिचे संशोधन-संवर्धन व्हावे आणि ती जागतिक पातळीवर अभिमानाने उभी राहावी…हीच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अपेक्षा व्यक्त करू या….!!

युवराज पाटील



जिल्हा माहिती अधिकारी, पुणे

 

सोमवार, २ मार्च, २०२६

मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती शाखेमार्फत करण्यात आले आहे. पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवेत, बहारीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असून, दूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/192792/