गुरुवार, ५ मार्च, २०२६

राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित ; राज्याचे दरडोई उत्पन्न ३.४७ लाखांवर



‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2025-26’ सादर


 •       देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा


•       देशातील थेट परकीय गुंतवणुकीत ३१ टक्के वाट्यासह राज्य अग्रस्थानी


•       स्टार्टअप्सच्या संख्येतही राज्याचा देशात सर्वाधिक १७ टक्के हिस्सा

          

नवीकरणीय ऊर्जेची क्षमता वाढत असून राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर


•     ६३.८५ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी त्यातून २.५२ कोटींहून अधिक रोजगार निर्माण*


मुंबई, दि. ५ : राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षात ती ७.९ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२५-२६ या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संतुलित वाढ, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणा यामुळे राज्याची आर्थिक स्पर्धात्मकता अधिक बळकट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


  महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२५-२६ अहवाल विधानसभेत वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी तर विधानपरिषदेत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सादर केला.  


  आर्थिक पाहणी अहवालानुसार २०२५-२६  मध्ये राज्याचे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न ५१,००,५९७ कोटी रुपये इतके अपेक्षित आहे, तर वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न २८,८२,६९९ कोटी रुपये इतके राहण्याचा अंदाज आहे. तसेच राज्याचे दरडोई उत्पन्न ३,४७,९०३ रुपये इतके अपेक्षित असून ते अखिल भारताच्या दरडोई उत्पन्नाच्या (२,१९,५७५ रुपये) तुलनेत लक्षणीय अधिक आहे.


देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा


पहिल्या सुधारित अंदाजानुसार २०२४-२५ मध्ये देशाच्या सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १४ टक्के असून तो देशातील सर्वाधिक आहे. राज्यात रस्ते, मेट्रो, बंदरे, विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.


क्षेत्रनिहाय वाढीचा अंदाज


सन २०२५-२६ मध्ये विविध क्षेत्रांत  वाढ  अपेक्षित आहे. यामध्ये  कृषी व संलग्न कार्ये यात ३.४ टक्के वाढ अपेक्षित आहे तर  उद्योग क्षेत्रात  ५.७ टक्के आणि  सेवा क्षेत्रात ९.० टक्के वाढ अपेक्षित असून सेवा क्षेत्रातील वेगवान वाढ राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार देत असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.


चलनवाढ नियंत्रणात


एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत ग्रामीण भागातील सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक ४०१.८ तर नागरी भागातील 376.7 होता. या कालावधीत ग्रामीण भागात २.० टक्के आणि नागरी भागात १.५ टक्के चलनवाढ नोंदविण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दरातील सुधारणांमुळे किमतींवर सकारात्मक परिणाम झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.


सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा विस्तार


डिसेंबर 2025 पर्यंत राज्यात २७०.८४ लाख शिधापत्रिका धारक असून ५१,६३६ रास्त भाव दुकाने कार्यरत आहेत. ‘शिवभोजन’ योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2025 पर्यंत ४.०९ कोटी शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.


सामाजिक क्षेत्र


सामाजिक विकासाच्या दृष्टीनेही राज्याने प्रगती केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नागरी भागात ८.७५ लाख आणि ग्रामीण भागात १६.०५ लाख घरे पूर्ण झाली आहेत. जल जीवन अभियानामुळे ९० टक्क्यांहून अधिक कुटुंबांना नळजोडणी उपलब्ध झाली आहे. राज्यातील ४०,२४७ गावांपैकी ३४,५८४ गावांना स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत ओडीएफ+ घोषित केले आहे. तर नागरी अंतर्गत माहे डिसेंबर २०२५ पर्यंत ४२ शहरे ओडीएफ, ८२ शहरे ओडीएफ+ , २५७ शहरे ओडीएफ++ आणि ३० शहरे वॉटर+ म्हणून घोषित करण्यात आली.


राज्याची महसुली स्थिती


अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन २०२५-२६ मध्ये राज्याची महसुली जमा ५,६०,९६४ कोटी रुपये अपेक्षित आहे. यापैकी ४,७७,४०० कोटी रुपये कर महसूल आणि ३३,०५२ कोटी रुपये करेतर महसूल अपेक्षित आहे.

राज्याने गेल्या दशकात राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या ३ टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न कायम ठेवला आहे. २०२५-२६ मध्ये ती २.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे.


कृषी क्षेत्रातील स्थिती


२०२५ च्या मान्सूनमध्ये राज्यात सरासरीपेक्षा १०९.१ टक्के पाऊस पडला. खरीप हंगामात १५७.२७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. तृणधान्ये, ऊस आणि कापूस उत्पादनात वाढ अपेक्षित असली तरी कडधान्ये आणि तेलबिया उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी  ११६.४० लाख शेतक-यांना ९४.८२ लाख हेक्टर बाधित क्षेत्रासाठी  ९,०२२.३८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. सौर कृषी पंप योजनेंतर्गत माहे डिसेंबर २०२५ अखेर राज्यात ७.३७ लाख सौर पंप बसविण्यात आले आहेत.


उद्योग आणि गुंतवणुकीत आघाडी


‘महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ अंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात आला आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत ६३.८५ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी झाली असून त्यातून २.५२ कोटींहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत.


देशातील थेट परकीय गुंतवणुकीत ३१ टक्के वाट्यासह महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. तसेच स्टार्टअप्सच्या संख्येतही राज्याचा देशात सर्वाधिक १७ टक्के हिस्सा आहे.

ऊर्जा आणि पायाभूत सुविधा

31 मार्च 2025 रोजी राज्यातील वीज निर्मितीची स्थापित क्षमता ४१,०१९ मेगावॅट होती.  नवीकरणीय ऊर्जेची क्षमता वाढत असून राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर  आहे.  सौर ऊर्जेच्या क्षमतेत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे.


         वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी


मार्च 2025 अखेर राज्यातील रस्त्यांची एकूण लांबी ३.४५ लाख किमी झाली आहे. 1 जानेवारी 2026 रोजी राज्यात ५२८ लाख वाहने नोंदणीकृत होती.


मुंबई–नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जून 2025 पासून पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तसेच मुंबई मेट्रो लाईन-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) ऑक्टोबर 2025 पासून पूर्णपणे सुरू झाली असून दररोज सरासरी ७८ हजारांहून अधिक प्रवासी या मार्गाचा वापर करत आहेत.

                

पर्यटन आणि कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ

भारत पर्यटन डेटा कंपेंडियमनुसार 2024 मध्ये परदेशी पर्यटक भेटींमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच डिसेंबर 2025 पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली आहे.

  ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२५-२६’ हे प्रकाशन मराठी व इंग्रजी मध्ये खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


(1) https://mls.org.in

(2) https://www.finance.maharashtra.gov.in

(3)https://www.maharashtra.gov.in

(4) https://mahades.maharashtra.gov.in

                     

 

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026

 

विधान परिषद कामकाज

   

                                                                   दि. 5 मार्च 2026

वृत्त क्र. 70

 

विधानपरिषद लक्षवेधी :

 

जळगाव कृषी विज्ञान केंद्रातील अनियमिततेप्रकरणी सुधारित चौकशीचे निर्देश

 

मुंबईदि. ५ : जळगाव येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत कृषी विज्ञान केंद्रातील अनियमितता व गैरकारभाराबाबत सुधारित चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली.

 

सदस्य किशोर दराडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. त्यास उत्तर देताना मंत्री भरणे बोलत होते.

 

कृषी मंत्री भरणे म्हणाले, कृषी विज्ञान केंद्रातील दोन ट्रॅक्टर स्वतःच्या शेतात वापरणेकार्यालयीन साहित्याची खरेदी स्वतःच्या नावावरील दुकानातून दाखवणे तसेच मास्कआयपॅड आदी वस्तूंची बनावट खरेदी दाखवून आर्थिक लाभ घेतल्याचे समोर आले आहेत. या अनुषंगाने सुधारित चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश विद्यापीठाला देण्यात आले आहेत.

 

तसेचकृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रम समन्वयक यांना तातडीने निलंबित करण्याबाबत विद्यापीठाला सूचना देण्यात आल्या असून सुधारित अहवालानुसार आवश्यक असल्यास पुढील कारवाईसह गुन्हे दाखल केले जातीलअसे कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.

0000

राजू धोत्रे/विसंअ




अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026

विधानसभा कामकाज

   दि. 5 मार्च 2026

वृत्त. क्र. ८३

विधानसभा कामकाज/ लक्षवेधी

 

केज नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेतील निधी गैरव्यवहाराची चौकशी  करुन दोषींवर कारवाई करणार

- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

 

मुंबईदि.५ : केज (जि. बीड) नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निधीपैकी सुमारे ३.६२ कोटी रुपयांच्या गैरवापराची चौकशी करण्यात येणार असून चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल आणि अपहार झालेली रक्कम व्याजासह वसूल केली जाईल. गरज भासल्यास या प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटीनेमण्याचाही विचार केला जाईलअसे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

केज (जि. बीड) नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निधीपैकी सुमारे ३.६२ कोटी रुपयांचा गैरवापर झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. यासंदर्भात लक्षवेधी सूचना आमदार नमिता मुंदडा यांनी मांडली. या चर्चेत सदस्य हरिष पिंपळेसुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.

या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले कीकेजमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३७४ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली होती. केंद्र सरकारचा २ कोटी २४ लाख ४० हजार रुपये आणि राज्य सरकारचा ३ कोटी ६२ लाख रुपये असा एकूण ५ कोटी ८६ लाख ४० हजार रुपयांचा निधी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खात्यात जमा करण्यात आला. योजनेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याचे आदेश असतानाही ग्रामीण बँकेत खाते उघडण्यात आले. त्यातून ११६ लाभार्थ्यांना सुमारे १ कोटी ६७ लाख ७५ हजार रुपये वितरित करण्यात आलेपरंतु उर्वरित सुमारे ४ कोटी २८ लाख २५ हजार रुपये लाभार्थ्यांना न देता इतरत्र वितरित झाल्याचे आढळून आले. या व्यवहारासंबंधी कोणतेही लेखेव्हाउचर्स किंवा स्पष्ट बँक स्टेटमेंट उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

ही बाब निदर्शनास आल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी लेखापालाकडून अहवाल मागवून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला असून जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी समितीही गठीत केली आहे. तसेच या प्रकरणाची विभागीय चौकशी करून आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून तपास करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री मिसाळ यांनी यावेळी नमूद केले.

00000

पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर १७० कोटींच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता · श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा शिखर समिती बैठक



 

 

मुंबईदि. ५ : कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे राज्यातूनच नव्हेतर देशातून मोठ्या संख्येने भाविक घेत असतात. या परिसराचे पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे. या मंदिर परिसराचा विकास हा पर्यावरणीय दृष्टिकोनातून करण्यात यावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकासाचा एकूण आराखडा २५० कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी ८० कोटी रुपयांची कामे सुरू झालेली आहेत. श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसराचा सुधारित १७० कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

 

बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेवन मंत्री गणेश नाईकपर्यटन मंत्री शंभूराज देसाईनगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळआमदार विनय कोरेआमदार राहुल आवाडेमुख्य सचिव राजेश अग्रवालअपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ताअपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगेप्रधान सचिव (ग्रामविकास) एकनाथ डवले आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेज्योतिबा मंदिर डोंगर परिसराचा विकास करताना मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात यावी. आधी लागवड केलेल्या वृक्षांचे जिवंत राहण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. डोंगर परिसरावर घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात यावे. मंदिर परिसरात अनेक भाविक अन्नदान करीत असतात या अन्नदानाकरिता अन्न छत्रालय विकसित करण्यात यावे. येथे जास्तीत जास्त भाविक सामावून घेण्याची क्षमता असावी.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेडोंगर परिसराचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेतायेथे असणाऱ्या वस्तीमधील सांडपाणी व्यवस्थापन करावे. येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता स्वच्छतेबाबत काटेकर नियोजन करण्यात यावे. डोंगर परिसरात असलेल्या वन जमिनीचे नियमानुसार हस्तांतरण करुन मंदिर परिसराचा विकास व्हावायासाठी स्वतंत्र प्राधिकरण बैठकीत सादरीकरण कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

थोडक्यात विकास आराखडा

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा आराखड्यामध्ये श्री ज्योतिबा डोंगरावरील जुन्या पायवाटांचे दुरुस्तीसह रुंदीकरण करण्यात येणार आहे.

तसेच पायवाटांच्या बाजूने विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपणसीसीटीव्ही नियंत्रण कक्षविद्युत नियंत्रण कक्षपोलीस कक्ष व देवस्थान व्यवस्थापन कार्यालययमाईदेवी मंदिर परिसरात भाविकांसाठी सुविधा केंद्रमंदिराचे दक्षिणद्वार प्रवेश मार्गाची दुरुस्तीशाहूकालीन हुजूरवाडा इमारत संवर्धनकुशीरे ते गायमुख तलाव पार्किंगसह पादचारी मार्गाचा विकासपाच मेगावॉट समतेचे वीज उपकेंद्र व सौर ऊर्जा प्रकल्पभाविकांसाठी निवास व्यवस्थाप्राथमिक आरोग्य सुविधा कक्ष व अन्नछत्रवाडी रत्नागिरी गावामधील रहिवासी व भाविकांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था करण्यात येणार आहे.

अमरावतीमध्ये हनुमान गढी धार्मिक पर्यटन केंद्राची उत्कृष्ट निर्मिती करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हनुमान गढी परिसर पर्यटन विकासासाठी १२१ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता नागपूरमधील कल्याणेश्वर मंदिर परिसर विकास कामाचाही आढावा





मुंबई, दि. ५: अमरावती शहरालगत हनुमान गढी परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहे. या प्रस्तावित हनुमान गढी परिसर पर्यटन विकासासाठी १२१ कोटींच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.


अमरावती शहरालगत असलेल्या हनुमान गढी परिसरात पर्यटकांच्या सुविधांची कामे आधी पूर्ण करावी. ही कामे दर्जेदार असावीत. या पर्यटन केंद्राचे मुख्य आकर्षण असलेल्या हनुमान मूर्तीचे काम पूर्ण करावे. संपूर्ण परिसर उत्कृष्ट धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीदरम्यान दिले. 


बैठकीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण दटके, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आदी उपस्थित होते. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हनुमान गढी परिसराचा विकास करताना पर्यटकांसाठी सुविधा कामांना प्राधान्य द्यावे. या विकास आराखड्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावी. हनुमान गढी स्थळाच्या विकासानंतर हे ठिकाण अमरावती शहरालगत पर्यटकांसाठी पर्यटन केंद्राची पर्वणी ठरणार आहे. 


तसेच नागपूर शहरातील महाल परिसरात असलेल्या पुरातन कल्याणेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराचा विकास करताना पार्किंग महत्वाचे ठरणार असून या परिसरात पार्किंगची व्यवस्था उभारण्यात यावी. मोठ्या संख्येने वाहनांची पार्किंग होईल, अशा पद्धतीने करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. 


असा आहे विकास आराखडा


हनुमान गढी परिसर विकास करताना 17 हजार 671 चौरस मीटर क्षेत्रावर विविध विकासकामांचे बांधकाम करण्यात येणार आहे. याठिकाणी अयोध्येतील राम मंदिर यज्ञ मंडपाच्या प्रतिकृतीवर आधारित यज्ञ मंडप, ॲम्फीथिएटर, यज्ञशाळा, फूड मॉल, क्राफ्ट सेंटर , आखाडा,  महाप्रसाद हॉल, बहुउद्देशीय सभागृह, प्रशासकीय इमारत, हनुमान गॅलरी, दिव्यांग स्नेही रस्ता, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरणाची व्यवस्था राहणार आहे. तसेच संपूर्ण परिसरात संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, मुख्य प्रवेशद्वार, हनुमान मूर्तीवर लेझर शो ची व्यवस्था करण्यात येणार आहे.