सोमवार, १३ जुलै, २०२६

 



राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू ;

३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

        अमरावती दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या ३ जुलैच्या नवीन निर्णयानुसार राज्यात सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. चालू खरीप हंगामामध्ये जर अधिसूचित महसूल मंडळात पिकाचे सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आले, तर शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज लक्षात घेता, शेतकऱ्यांच्या आर्थिक संरक्षणासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असून खरीप हंगाम २०२६ साठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन संचालक (कृषि प्रक्रिया व नियोजन) विनयकुमार आवटे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

          या योजनेंतर्गत खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा अशा एकूण १४ पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा उतरवता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के विमा हप्ता भरावा लागेल. मात्र, कापूस आणि कांदा या नगदी पिकांसाठी हा हप्ता ५ टक्के निश्चित करण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे किमान ०.१० हेक्टर पिकाखालील क्षेत्र असणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेमार्फत सहभागी व्हावे, आणि जर त्यांना सहभागी व्हायचे नसेल तर त्यांनी बँकेला तसे लेखी कळवणे गरजेचे आहे.

          योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे 'ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक' (फार्मर आयडी) असणे अनिवार्य आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद 'डिजिटल क्रॉप सर्वे' अंतर्गत करणे बंधनकारक राहील. डिजिटल क्रॉप सर्वेमधील पीक आणि विमा घेतलेले पीक यामध्ये तफावत आढळल्यास, डिजिटल क्रॉप सर्वेमधील नोंदच अंतिम मानली जाईल आणि तफावत असल्यास विमा अर्ज रद्द केला जाऊ शकतो. योजनेत चुकीच्या मार्गाने अर्ज करून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तीला पुढील पाच वर्षे शासनाच्या कोणत्याही कृषी योजनेचा लाभ मिळणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

          या योजनेत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ३१ जुलै, २०२६ ही अंतिम तारीख आहे. शेतकरी केंद्र शासनाच्या https://pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वतः , बँकेमार्फत किंवा सामूहिक सुविधा केंद्रावर (CSC) जाऊन अर्ज करू शकतात. 'सीएससी' (CSC) चालकाला विमा कंपनीकडून प्रति अर्ज ६० रुपये दिले जात असल्याने, शेतकऱ्यांनी निर्धारित विमा हप्त्याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये. अर्जासोबत जमिनीची कागदपत्रे, पीक लागवड घोषणापत्र, बँक खाते आणि ओळख पडताळणीसाठी आवश्यक माहिती जोडणे आवश्यक आहे.

       या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या विमा कंपन्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये सोलापूर, जळगाव, सातारा, हिंगोली, अकोला, धुळे आणि पुणे या जिल्ह्यांसाठी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी काम पाहणार आहे. परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया आणि कोल्हापूर या जिल्ह्यांची जबाबदारी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे देण्यात आली आहे. वाशिम, बुलडाणा, सांगली आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे, तर लातूर आणि बीड जिल्ह्यांसाठी एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी विमा सेवा पुरवणार आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली या १४ मोठ्या जिल्ह्यांचा कार्यभार इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनीकडे सोपवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या संबंधित कंपनीशी संपर्क साधून विमा प्रक्रियेत सहभागी व्हावे.

          या संदर्भात काही अडचण किंवा तक्रार असल्यास शेतकरी संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जवळची बँक किंवा १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात, अशी माहिती कृषी आयुक्तालयाने प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

 

०००००

 


कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये #कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक 'कामगार हित' जपण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत दिले. केंद्रीय कामगार कायद्यांना सुसंगत राज्याची नियमावली बनविताना राज्याच्या हितासाठी काही सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या करण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

कायद्यातील सुधारणा करण्यात येणारी प्रत्येक बाब तपासून पाहण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कामगार न्यायालयांऐवजी मुख्य न्याय दंडाधिकारी ही तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीच्या अनुषंगाने मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे कामगारांच्या संबंधित असलेल्या प्रलंबित प्रकरणांचा जिल्हानिहाय अहवाल सादर करावा. मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे कामगारांच्या संबंधित प्रकरणांच्या निपटाऱ्याचा दबाव येणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. केंद्राच्या नवीन कामगार कायद्यांमध्ये या बाबीची तपासणी करावी. याबाबत वस्तुस्थितीवर आधारित तरतुदीची पडताळणी करून निर्णय घ्यावा.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायद्यामध्ये सुधारणा करताना बांधकाम क्षेत्राशी संबंधित कामगार सदस्यत्वाचे दुहेरीकरण टाळण्यासाठी बांधकाम कामगार कल्याण मंडळ किंवा माथाडी मंडळांपैकी एका मंडळाच्या सदस्यत्वाची सुनिश्चिती करावी. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्रीय नवीन कामगार कायद्यातील तरतुदीच्या अनुषंगाने प्रत्येक घटकासाठी योजना तयार कराव्यात. त्यामध्ये घरेलू कामगारांचाही समावेश असावा. कामगार कायद्यांमध्ये सुधारणा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
बैठकीस कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, प्रधान सचिव (उद्योग) पी. अनबळगन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड उपस्थित होते.
See less

 


शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचे केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी या अभिनव अभियानामुळे नागरी #पायाभूतसुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर विकास विभागाच्या आढावा बैठकीत व्यक्त केला. यावेळी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करताना महाराष्ट्राने या दृष्टीने पावले टाकली असून यापूर्वी #नाशिक आणि #पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर निधी उभारणी करून पाणी पुरवठा व स्वच्छता यासाठी निधी उभारले आहेत. या महानगरपालिकांच्या निधी उभारणीसाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची (एनएसी) मंजुरी देखील मिळाली आहे तसेच #पिंपरीचिंचवड महानगरपालिका आणि #नागपूर महानगरपालिका येथील काही प्रकल्पांना या पद्धतीने निधी उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानाधारित शहरी योजनांसोबत शहरांच्या संस्थात्मक, आर्थिक व प्रशासकीय मर्यादांमुळे पायाभूत प्रकल्पांच्या अंमलबजावणीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंड महत्त्वपूर्ण ठरेल, यासाठी कर्ज रोखे आणि खासगी सार्वजनिक भागीदारीतून निधी उभारणी करणे शक्य होईल असे नमूद करण्यात आले.
अर्बन चॅलेंज फंडासाठीच्या वित्तीय आकृतीबंधाबाबत चर्चा करण्यात आली. अभियानात ₹९० हजार कोटींचा प्रकल्प निधी प्रस्तावित आहे. महाराष्ट्रासाठी केंद्र शासनाचा ₹११,२०० कोटी, राज्य शासनाचा ₹११,२०० कोटी आणि बाजाराधारित स्रोतांतून ₹२२,४०० कोटी असा एकूण ₹४४,८०० कोटींच्या प्रकल्पांना चालना मिळू शकते, अशी माहिती देण्यात आली.
बैठकीस नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
See less

 



महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (#एसटी) डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा. तसेच, सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची बैठक वर्षा या शासकीय निवासस्थानी झाली.
एसटी महामंडळाच्या जागांची मालकी कायम महामंडळाकडेच राहील, यासाठी ४९ अधिक ४९ वर्षांच्या लीज मॉडेलचा विचार करण्यात येत असून, त्यामुळे जागांचे प्रभावी व्यावसायिक मूल्यवर्धन साधता येईल. तसेच, प्रकल्पांसाठी स्टॅम्प ड्युटी सवलतीसंदर्भातील कायदेशीर बाबींची तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच, प्रवाशांना अधिक सुलभ व अखंडित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी डेपो, मेट्रो आणि अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिक नियोजन करून मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्यावर भर देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, नियोजन विभागाच्या सचिव ए.शैला, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर आदी उपस्थित होते.
#ST
See less

 



विभागीय लोकशाही दिनात बारा प्रकरणांवर सुनावणी

लोकशाही दिनात दाखल प्रकरणांचा तत्काळ निपटारा करा

                          - विभागीय आयुक्त नयना गुंडे

 

अमरावती, दि. 13 : विभागीय लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या प्रकरणांवर विहीत कालमर्यादेत कार्यवाही करुन अंतिम अहवाल सादर करणे तसेच संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करणे आवश्यक आहे. यानुसार प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांच्या संदर्भात प्रत्यक्ष स्थळ पाहणी, चौकशी अहवाल आदींची पडताळणी करुन प्रकरणांचा निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी संबंधित विभागप्रमुखांना आज दिले. लोकशाही दिनात दाखल एकूण 12 प्रकरणांवर चर्चा करुन त्यानुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.

विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात श्रीमती गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे कामकाज आज पार पडले. यावेळी अपर आयुक्त सुरज वाघमारे, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख यांच्यासह महसूल, पोलीस, महापालिका, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी प्रत्यक्षरित्या तर पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.

            यावेळी विभागीय लोकशाही दिनात अमरावती विभागातून दाखल एकूण 12 प्रकरणांवर चर्चा करुन  प्रत्येक तक्रारींच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेण्यात आला. एकूण 12 प्रकरणांपैकी 2 प्रकरणे निकाली काढण्यात आली. 2 प्रकरणे नव्याने दाखल झालीत. 10 प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांनी स्थळ पाहणी, मुद्देनिहाय चौकशी, पडताळणी करुन सुस्पष्ट अंतीम अहवाल तत्काळ सादर करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले. विभागीय महिला लोकशाही दिनांतर्गत एकही प्रकरण दाखल झाली नाही, अशी माहिती महिला व बालविकास विभागाव्दारे देण्यात आली.

यावेळी लोकशाही दिनासाठी अमरावती विभागातून उपस्थित राहिलेल्या तक्रारदारांचे म्हणने ऐकूण घेण्यात आले. मागील लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे नवीन लोकशाही दिनात सुनावणीसाठी येवू नये. न्यायप्रविष्ट किंवा अर्धन्यायिक प्रकरणांसंदर्भात तत्काळ अहवाल सादर करण्यात यावा. लोकशाही दिनासाठी दाखल होणाऱ्या तक्रार अर्जांवर वेळेत कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागाने जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचना श्रीमती गुंडे यांनी यावेळी दिल्यात.

00000

 


'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना'2026 :

  • ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द: पूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली ५० हजार रुपयांची लाभाची मर्यादा आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना आता २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा पूर्ण लाभ मिळेल.
  • नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दिलासा: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये नवीन कर्ज घेऊन ते वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्यात आली आहे.
  • २ लाखांवरील थकबाकीदारांना लाभ: ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना पूर्वी या योजनेतून वंचित राहावे लागत होते. आता नव्या सुधारणेनुसार, कर्ज कितीही असले तरी त्यातील २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासन माफ करणार आहे.
  • व्यापक व्याप्ती आणि पारदर्शकता: राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँका, खासगी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून (DCCB) मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पारदर्शक पद्धतीने लाभार्थ्यांची यादी तयार केली जात आहे.
  • अपेक्षित लाभार्थी आणि निधी: या योजनेद्वारे राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार असून, नवीन सुधारणांमुळे या संख्येत आणखी वाढ होणार आहे.

 

विशेष वृत्त :

अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून ८४.२३ कोटींचा निधी मंजूर

        राज्यातील सहा महसूली विभागांतील ४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत

        अमरावती विभागातील २८ हजार ७५१ शेतकऱ्यांना ६८ कोटींची मदत

अमरावती, दि. ११ : राज्यात एप्रिल आणि मे २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाने या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ८४ कोटी २३ लक्ष ६५ हजार रुपयांच्या निधी वितरणास अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील सहा विभागांतील एकूण ४५ हजार ४२ शेतकऱ्यांना होणार असून, ३८ हजार हेक्टरपेक्षा जास्त बाधित क्षेत्राला यातून दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाने नुकताच (ता.१० जुलै) यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केला आहे.                                                                                                                                                   अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरुपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत देण्यात येते. राज्यात एप्रिल व मे महिन्यात विविध जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंचनामे करुन अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण विभागांच्या विभागीय आयुक्तांनी नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला होता. त्यानुषंगाने मदत निधी शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार ८४ कोटी २३ लक्ष ६५ हजार रुपयांचा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.

थेट बँक खात्यात 'डीबीटी' द्वारे जमा होणार मदत निधी :

                                                                                                                                       शासनाने स्पष्ट केले आहे की, कोणतीही मध्यस्थी किंवा गैरव्यवहार टाळण्यासाठी सर्व बाधित शेतकऱ्यांना ही मदत थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. शेतकऱ्यांना देण्यात येणारा हा मदतीचा निधी बँकांनी त्यांच्या जुन्या कर्ज खात्यात किंवा इतर कोणत्याही वसुलीसाठी वळता करू नये, अशा कडक सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सर्व बँकांना देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

कोणत्या विभागाला किती निधी मिळाला? (विभागीय आकडेवारी                                                                                                                                                                                   शासनाने जाहीर केलेल्या विवरणपत्रानुसार, राज्यातील विविध ६ विभागांना खालीलप्रमाणे निधीचे वाटप करण्यात आले आहे :

अ.क्र.I विभाग I        बाधित शेतकरी संख्या I       एकूण बाधित क्षेत्र (हेक्टर) I मंजूर निधी (रुपये लाखात)

१ अमरावती विभाग

(अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम) I २८,७५१  I ३०,३२५.१०   I  ६,८०९.५५                                                                                                                                                                                                                           २ नागपूर विभाग

(नागपूर, गोंदिया, वर्धा) I      ७,४१३   I     ३,४५०.२५    I        ६०७.६५

३ नाशिक विभाग

(नाशिक, जळगाव, अहिल्यानगर)    I ४,३९९    I   २,३३७.६२    I       ५२४.१२

४ पुणे विभाग

(पुणे, सांगली, कोल्हापूर)   I  ३,२५९   I    १,७६१.११  I  ३७३.२०

५ छत्रपती संभाजीनगर विभाग

(नांदेड, धाराशिव, हिंगोली, लातूर)   I  ५९४   I    ३४४.७५  I    ७६.९९

६ कोकण विभाग

(रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग)      I  ६२६  I   १३९.८७  I    ३२.१४

एकूण   (बाधित शेतकरी संख्या)-४५,०४२  I एकूण बाधित क्षेत्र (हेक्टर)-३८,३५८.७० I


मंजूर निधी (रुपये लाखात) -८,४२३.६५ (८४.२३ कोटी)

पारदर्शकतेसाठी विशेष अटी व शर्ती :

          मदत वाटप प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि एकाच शेतकऱ्याला दुबार मदत मिळू नये (द्विरुक्ती टाळण्यासाठी), याची संपूर्ण जबाबदारी संबंधित तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर सोपवण्यात आली आहे. तसेच, एकदा मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

          हा मदत निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकष आणि दरानुसार मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला या आर्थिक मदतीमुळे पुढील हंगामासाठी निश्चितच मोठा आधार मिळणार आहे.

00000

 कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


* 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने' तून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ

* कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम; गुन्हे सिद्धतेच्या दरात वाढ, सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण

बुलढाणा दि. 12 : राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' ही ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  योजनेमध्ये ५० हजार रुपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे, अशा शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करुन वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्याची घोषणा केली आहे.

त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था, सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रण, अमली पदार्थांविरोधातील कारवाई, पोलीस आधुनिकीकरण, जलसंपदा, कृषी आणि विविध विकासकामांबाबत शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहात दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्रीयीकृत, व्यापारी, खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. पूर्वीच्या योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता. मात्र, नव्या योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असली तरी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी असलेली ५० हजार रुपयांची मर्यादा आणि २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट रद्द करण्यात आली  आहे. या निर्णयामुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी क्षेत्रासाठी राज्य शासन दरवर्षी सुमारे ९५ हजार कोटी रुपयांचा खर्च करीत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांच्या वीजबिलासाठी २५ हजार कोटी रुपये खर्च केले जातात. कापसाची १३६ लाख क्विंटल खरेदी करून १० हजार ८८३ कोटी रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. सोयाबीनचे ६ लाख टन उत्पादन ३ हजार १९८ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले, तर कांदा खरेदीमुळे बाजारभाव स्थिर राहण्यास मदत झाली आहे. ठिबक सिंचनासाठी प्रलंबित २१७ कोटी रुपये लवकरच वितरित करण्यात येतील, तसेच कृषी समृद्धी योजनेतील उर्वरित निधी पुरवणी मागण्यांतून उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात कुठेही नियोजित भारनियमन नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यंदा ३२ हजार मेगावॅटपर्यंतची वीज मागणी पूर्ण करण्यात आली आहे. ७६ टक्के कृषी फिडरवर दिवसा वीजपुरवठा सुरू असून उर्वरित भागातही काम सुरू आहे. स्मार्ट मीटरबाबत प्राप्त झालेल्या बहुतांश तक्रारी तपासणीत चुकीच्या आढळल्या असून वाढीव वीजबिलांचा संबंध स्मार्ट मीटरशी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात वाढ

कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राष्ट्रीय गुन्हेगारी आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा प्रति एक लाख लोकसंख्येमागील गुन्हेगारी दराच्या बाबतीत देशात सातवा क्रमांक आहे. मे २०२५ ते मे २०२६ या कालावधीत दुखापत, जबरी चोरी, घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांत घट झाली असून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. गुन्हे सिद्धतेचा दर ४४.२ टक्क्यांवरून ५२.६ टक्क्यांपर्यंत वाढला असून तो ७० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

नवीन फौजदारी कायद्यांमुळे तपास प्रक्रियेत आमूलाग्र बदल झाल्याचे सांगताना त्यांनी ई-साक्ष, फॉरेन्सिक तपास, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि डिजिटल पुरावा व्यवस्थापनाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू असल्याचे सांगितले. गंभीर गुन्ह्यांतील दोषारोपपत्रे विहित मुदतीत दाखल करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले असून फिर्यादींना मालमत्ता परत मिळण्याचे प्रमाणही वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०२१ ते २०२६ या कालावधीत बेपत्ता झालेल्या ९३ टक्के महिलांचा शोध घेण्यात यश आले आहे. 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत ४३ हजार ५९१ बेपत्ता बालकांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप पोहोचविण्यात आले आहे.

सायबर गुन्ह्यांविरोधातील कारवाईबाबत मुख्यमंत्री फडणवीस फडणवीस म्हणाले, जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत सायबर फसवणुकीतील ४३९ कोटी रुपये गोठविण्यात आले असून निधी गोठविण्याचे प्रमाण ११ टक्क्यांवरून २७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ५० हजार रुपयांपर्यंतच्या फसवणुकीतील रक्कम तातडीने परत करण्याची व्यवस्था करण्यात आली असून हजारो नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे. 'तपास सारथी' ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तपास प्रणाली सीसीटीएनएसशी जोडण्यात आली असून तपास प्रक्रियेला गती मिळाली आहे. एपीके फाइल्स डाउनलोड करताना नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले.

अमली पदार्थांविरोधातील कारवाईत आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटविरोधात कारवाई करुन मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'ब्रोमो-४ मिथाईल प्रोपिओ फेनॉल' या रसायनाचा नियंत्रित पदार्थांच्या यादीत समावेश करण्यात आल्यामुळे अवैध उत्पादनाला आळा बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. 'ड्रग फ्री मुंबई' अभियानांतर्गत चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याचे धोरण स्वीकारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस आधुनिकीकरणासाठी केंद्र शासनाने ७३३ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून अत्याधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन, रडार, स्पीडबोट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्यात येणार आहे. राज्यात ९ हजार ७६२ पोलीस निवासस्थानांची कामे सुरू असून मुंबईत ४० हजार नवीन पोलीस निवासस्थाने उभारण्यात येणार आहेत. तसेच ९३ अत्याधुनिक पोलीस ठाण्यांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांना मालकी हक्काची घरे उपलब्ध करून देण्याबाबत उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार असून ही  समिती ३ महिन्यांत अहवाल सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जलसंपदा व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाग नदी जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जायकामार्फत २,४०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे, सांडपाणी वाहिन्या आणि पंपिंग स्टेशन उभारले जात आहेत. नळगंगा–वैनगंगा नदीजोड प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची अंतिम मान्यता मिळताच याच वर्षी काम सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या विविध प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील विकास, शेतकरी कल्याण, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शासनाची भूमिका कायम राहील.

अधिवेशनाच्या समारोपावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "शेतकरी, वारकरी आणि कष्टकरी हेच महाराष्ट्राचे खरे वैभव आहे. त्यांच्या श्रम, श्रद्धा आणि त्यागातूनच महाराष्ट्राचा विकास घडतो. त्यांच्या आशीर्वादाने राज्याला नवाचार आणि नवा आकार देण्याचे काम शासन करेल.
0000



विशेष वृत्त 


जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी

वाशिम, दि. ११ जुलै (जिमाका): राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' जाहीर केली आहे. या योजनेमुळे वाशिम जिल्ह्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ मधील लाभार्थी शेतकऱ्यांना यापूर्वी असलेली ५० हजारांची कर्जमाफीची मर्यादा रद्द करून आता २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या लाभासाठी २०२६-२७ चा नियम लागू होणार नसल्याने अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि इतर पिकांचे उत्पादन घेणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चिततेमुळे आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून नव्या हंगामासाठी आर्थिक बळ देणारा ठरणार आहे.
कर्जमाफीमुळे पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड सुलभ होण्यास मदत होईल. तसेच बियाणे, खते, कीडनाशके आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक आर्थिक क्षमता निर्माण होईल. त्यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शासनाकडून योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा सविस्तर शासन निर्णय, लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवून आवश्यक तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' ही राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी महत्त्वाकांक्षी योजना ठरणार असून, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला नवसंजीवनी देण्यास ती निश्चितच उपयुक्त ठरेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
000000

शनिवार, ११ जुलै, २०२६

 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’मधील शेतकऱ्यांना 

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्यात येणार होता.




आता त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येईल.

#शेतकरीकर्जमुक्ती
#महाकर्जमुक्ती
#शेतकरी
#महाराष्ट्रशासन
#विधानसभाकामकाज
#पावसाळीअधिवेशन२०२६
#MonsoonSession2026