मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

विशेष लेख- मानवता धर्म जोपासणारा बंजारा समाज


 


विशेष लेख-

मानवता धर्म जोपासणारा बंजारा समाज

          भारतीय सामाजिक-आर्थिक इतिहासात बंजारा समाजाचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मध्ययुगीन काळात संपूर्ण भारतभर व्यापार, वाहतूक आणि पुरवठा व्यवस्था सांभाळणारा हा समुदाय केवळ आर्थिकच नव्हे, तर धार्मिक-सांस्कृतिक क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावतो. शीख इतिहासातील लखीशाह (लाखा) बंजारा यांचे योगदान हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते. श्री गुरु तेगबहादुर साहेब जी यांच्या शहीदीनंतर सेवा, तसेच त्या काळातील बंजारा समाजाचे व्यापारी सामर्थ्य, हे दोन्ही घटक शीख-बंजारा संबंधांचे सशक्त द्योतक आहेत.

लखीशाह बंजारा यांचे शीख समाजातील महत्त्व

          इ.स. १६७५ मध्ये मुघल सत्तेने श्री गुरु तेगबहादुर साहेबजी यांचा अनन्वित छळ केला त्यामध्ये ते शहीद झाले. त्या काळात भयावह वातावरण होते; कोणालाही गुरुजींच्या पार्थिवाला स्पर्श करण्याची हिंमत होत नव्हती. अशा वेळी लखीशाह बंजारा, जे एक नामांकित व्यापारी व कारवाँ प्रमुख होते, त्यांनी एकाच वेळी हजारो बैलगाड्या एकत्रित केल्या. आपल्या जीवाची पर्वा न करता गुरुजींचे पवित्र शरीर आपल्या गाडीत लपवून दिल्लीतील रायसीना परिसरात नेले. एकाच वेळी आलेल्या हजारो बैलगाड्या त्यांनी उडालेला धुराळा यामुळे त्यांच्या मनातील पवित्र कार्य कोणाच्या लक्षात आले नाही. नंतर आपल्या घराला आग लावून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले, जेणेकरून मुघल अधिकाऱ्यांना संशय येऊ नये. आजचे गुरुद्वारा रकाब गंज साहिब हे त्याच बलिदानाची साक्ष देणारे पवित्र स्थळ आहे. या ठिकाणी एक भव्य सभागृह आजही त्यांच्या नावाने उभे आहे. या घटनेमुळे लखीशाह बंजारा हे शीख परंपरेत त्याग, निष्ठा आणि मानवतेचे प्रतीक ठरले आहेत.

श्री गुरु तेगबहादूर साहेबजींच्या कार्यात सहभाग

          गुरु तेगबहादूर साहेबजी हे धार्मिक स्वातंत्र्य, मानवाधिकार आणि सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्ते होते. काश्मिरी पंडितांच्या धर्मरक्षणासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली. लखीशाह बंजारा यांनी केलेली सेवा ही गुरुजींच्या मूल्यांचीच पुनरावृत्ती होती.धर्मापलीकडे जाऊन मानवतेसाठी उभे राहणे, ही शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून दिली.म्हणूनच शीख परंपरेत बंजारा समाजाला सेवाभावी सहचर म्हणून सन्मान दिला जातो.

३५० वर्षांपूर्वीचा बंजारा समाजाचे व्यापारी महत्त्व

          मुघल काळात बंजारा समाज हा उपखंडातील सर्वात मोठा स्थलांतरित व्यापारी वर्ग मानला जात असे. धान्य, मीठ, कापड, कच्चा माल आणि लष्करी पुरवठा हे मुख्य व्यवसाय. त्या काळातील असुरक्षितता आणि लुटालुट लक्षात घेऊन या समाजाने समुदायातून व्यापार केला.स्वसंरक्षण आणि त्यासाठी आवश्यक शस्त्रकला यामध्ये हा समाज पारंगत होता. भटकंती संदर्भातील रस्ते, जोखीम आणि प्रसंगी लढण्याचे कसब त्यांना अवगत होते. देशाटन करण्याची कला या समुदायाने विकसित केली होती.मोठ्या बैलगाड्यांच्या तांड्यांद्वारे (कारवाँ) हजारो किलोमीटरचा प्रवास केला जात असे.

          मुघल लष्कराचा अन्नपुरवठा प्रामुख्याने बंजाऱ्यांकडून होत असल्याची नोंद तत्कालीन प्रशासनिक कागदपत्रांत आढळते. दुष्काळी परिस्थितीतही अन्नधान्याची वाहतूक करून त्यांनी राजकारभार स्थिर ठेवला.

तत्कालीन व्यापार व्यवस्था

          बंजारा समाजाची व्यापार व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध होती. प्रत्येक तांड्याला नायक, कारभारी आणि राखणदार असत. मार्ग, पाणवठे, विश्रांतीस्थळे यांची पूर्वनियोजित माहिती त्यांना असे. व्यवहार बहुधा विश्वासावर आधारित, पण ठराविक संकेत आणि मौखिक करारांवर चालत. ही व्यवस्था आजच्या लॉजिस्टिक्स सिस्टीमची आद्य आवृत्ती मानली जाते.त्यांच्या तांड्याची रचना व त्यातून कामाचे वाटप यामुळे अनेक वर्ष हा समुदाय शिस्तबद्ध व्यापारी समुदाय म्हणून सन्मानित केला जातो.या समाजाकडे असणाऱ्या दळणवळण,मनुष्यबळामुळे तत्कालिन राजकीय चौकटीत या समाजाला फार महत्व प्राप्त झाले होते.

हिंदू समाजातील बंजारा समुदायाचे महत्त्व

          बहुसंख्य बंजारा समाज हिंदू परंपरेत मोडतो.सण, उत्सव, चालीरीती आणि त्यांचे वार्षिक नियोजन यामुळे या समाजाच्या मान्यतांना विविध समाजात प्रतिष्ठा प्राप्त होती. स्वतःची भाषा, संगीत, खानपान पद्धती, आयुर्वेद व औषध शास्त्राचे उत्तम जाण यामुळे त्यांना अन्य समाजात प्रतिष्ठा होती.

          त्यांनी देशभरच्या ग्रामीण-शहरी भागांना जोडण्याचे काम केले. स्थानिक बाजारपेठा, मंदिरे, यात्रास्थळे आणि राजकीय केंद्रे यांना आवश्यक वस्तू पुरवून सामाजिक एकात्मता वाढवली. देशभरातील स्वतःच्या समाजातील उत्सव सोबतच अन्य धर्मीयांच्या उत्सवाची माहिती व त्या दृष्टीचे बिनचूक वार्षिक नियोजनामुळे बंजारा समाज हा केवळ व्यापारी नसून, सांस्कृतिक दुवा ठरला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

भाषा, पेहराव आणि अखिल भारतीय सूत्र

          बंजारा समाजाची गोरबोली (लामणी/लभाणी) ही भाषा संपूर्ण भारतात वेगवेगळ्या प्रादेशिक प्रभावांसह आढळते. हा एक अखिल भारतीय भाषिक सूत्र आहे. स्त्रियांचा रंगीबेरंगी पोशाख, भरजरी दागिने, पुरुषांचा साधा पण प्रवाससुलभ पेहराव,हे सर्व त्यांच्या स्थलांतरित जीवनशैलीशी सुसंगत होते. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत या समाजाने आपले वैशिष्ट्य, भाषा, पेहराव,खानपान यामध्ये एकसूत्री पण ठेवले.कोणत्याही ठिकाणच्या बंजारा समाजाच्या भाषा आणि राहणीमान हे एक दुसऱ्यांसोबत कितीही वर्ष विलग राहिले तरी बदलू न देण्याची हजारो वर्ष परंपरा त्यांनी जपली.अनेक धर्माचे अनेक पंथाचे व चालीरितीचे शासन आले तरी त्यांनी आपली संस्कृती जतन केली.त्यामुळे हा समाज सर्वकालीन समाज व्यवस्थेत देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या सन्मानाने आणि लढवय्या बाण्यामुळे तटस्थ आणि वेगळेपण अधोरेखीत करीत गेला.

लाखा बंजारा यांचे व्यापारातील स्थान

          लखीशाह बंजारा हे केवळ धार्मिक सेवक नव्हते; ते त्या काळातील यशस्वी व्यापारी होते. दिल्लीसारख्या राजधानीत त्यांचे निवासस्थान आणि व्यापारी जाळे होते. तीन ते चार शतकांचा व्यापाराचा त्यांचा अनेक पिढयांचा अनुभव होता. आपल्या मेहनतीने, प्रामाणिकपणाने आणि व्यापार पूरक साहित्य – सुविधांनी त्यांनी गौरवशाली परंपरा निर्माण केली होती. स्वतःचा एक समुदाय,व्यापाराचा वकूब,शब्दाला जपण्याची स्थिरता,धर्माचा स्वाभिमान,व्यवहारातील पारदर्शिता, वक्तशीरपणा,आणि लढाऊ वृत्तीमुळे आदर युक्त दहशत या समाजाची तत्कालीन व्यवस्थेत होती. त्यामुळेच गुरुजींच्या पार्थिवाला सुरक्षितपणे हलवणे त्यांना शक्य झाले.

शीख आणि बंजारा समाजाचा संबंध

          लखीशाह बंजारा यांच्या कृतीमुळे शीख-बंजारा संबंध दृढ झाले. पुढील काळात अनेक बंजारा कुटुंबे शीख गुरुद्वारांच्या सेवेत सहभागी झाली. देशभरातील दोन्ही समाजांचा वावर.ठिकठिकाणी व्यापारासाठी व धर्मप्रसारासाठी जाणारे जत्थे व तांडे यातील स्थलांतर हा समान धर्म.विविध वातावरणात अस्तित्व टिकवण्याची परस्पर सांगड. लंगर व्यवस्था, प्रवासातील मदत, आणि आपत्कालीन सेवा या क्षेत्रांत दोन्ही समाजातील साम्य या समुदायाला सहजीवनासाठी उपयुक्त ठरला.त्यामुळे देशात या दोन्ही समुदायाने तत्कालीन व्यवस्थेत समान धर्मीय म्हणून मान्यता प्राप्त केले होती.ही व्यवस्था दोन्ही समुदायांच्या संबंधाला काळाच्या कसोटीवर सिद्ध करणारी ठरली आहे.

श्री गुरु ग्रंथ साहेब ग्रंथामध्ये आदराने उल्लेख

          गुरुजींच्या शहादतीमध्ये या समाजाने दाखवलेल्या अतुलनीय पराक्रमाचा उल्लेख शिखांच्या पवित्र श्री गुरु ग्रंथ साहेब जी ग्रंथात आहे. तथापि, गुरुमुखी या लिपीमध्ये असलेल्या या पवित्र ग्रंथात थेट बंजारा असा उल्लेख क्वचित आढळतो; मात्र सेवा, त्याग, समता आणि मानवता ही मूल्ये बंजारा समाजाच्या जीवनपद्धतीशी सुसंगत आहेत. शीख परंपरेतील सेवाभावात बंजारा समाजाचा आत्मा प्रतिबिंबित झालेला दिसतो. त्यामुळे शेकडो वर्षांपासून परस्परांच्या मान्यतेत व अस्तित्वात दोन्ही समाजाने एकमेकांचा आदर केला आहे.

          लखीशाह बंजारा यांचे बलिदान, बंजारा समाजाचे व्यापारी सामर्थ्य आणि शीख धर्माशी असलेले नाते हे सर्व भारतीय इतिहासातील सामाजिक ऐक्याचे उत्तम उदाहरण आहे. धर्म, जात किंवा व्यवसाय यापलीकडे जाऊन मानवतेसाठी उभे राहणे हीच या परंपरेची खरी देणगी आहे.

·         प्रवीण टाके, उपसंचालक विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

 

विशेष लेख - शिवाजी महाराज जयंतीनिमित्त

 

 


विशेष लेख - शिवाजी महाराज जयंतीनिमित्त

 

जाणता राजा 

 जाणता राजा, रयतेचा राजा म्हणून जगभरात दरारा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेत लोकमान्य टिळक स्वातंत्र्य संग्रामात सहाभागी झाले होते आणि त्यांनी शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु केली.

 छत्रपती शिवाजी महाराज हे असे महापुरुष होऊन गेले की, त्यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही ताजी आहे. आजही आपण त्यांच्या काळासंदर्भात त्यांच्या स्वराज्य निर्मितीचा विचार करायला लागतो तेव्हा त्यांनी किती प्रतिकूल स्थितीत हे सतीचे वाण आपल्या हाती घेतले होते याचा अचंबा वाटतो.

 शिवाजी महाराज ज्या प्रदेशात रहात होते तो प्रदेश आदिलशहाच्या अधिपत्याखाली होता. तेव्हा त्यांच्या विरोधात बंड करणे म्हणजे प्राणाशी गाठच असायची. डोळे फोडणे, मालमत्तेची राखरांगोळी करुन जबर दंड बसवणे, कुटुंबांसह जाळून हत्या करणे, तोफेच्या तोंडी देणे, कडेलोट करणे, हत्तीच्या पायाखाली चिरडून मारणे किंवा घोड्यांच्या पायांना बांधून फरपटत नेणे अशा अमानुष शिक्षा दिल्या जात असत. अशा शिक्षा भोगण्यापेक्षा त्यांच्या पायाशी शरण जाणे परवडेल अशी मानसिकता समाजात होती. पण शिवाजी महाराजांनी अशाही परिस्थितीत परकीयांची राजवट उलथून टाकून स्वत:चे राज्य निर्माण करण्याचा पण केला. हे त्यांचे महान कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असते.

           शिवाजी महाराजांनी एकदा साहस करण्याचा निर्धार केल्यावर कितीही संकटे आली तरीही आपल्या ध्येयापासून विचलित न होण्याचा त्यांचा गुणही असामान्यच होता. राजे निश्चयापासून ढळले असते तर सारे सहकारीही बिथरले असते. म्हणून खंबीरपणे उभे राहून महाराजांनी केवळ अडचणींना तोंडच दिले असे नाही तर त्या अडचणींतून मोठ्या कुशलतेने मार्गही काढले. महाराजांनी आपल्या सवंगड्यात स्वराज्य स्थापनेचा ध्येयवाद इतका पक्का रुजवला होता की, त्या ध्येयवादाच्या मार्गातून त्यांचे सहकारी कधीही ढळले नाहीत. शिवाजी महाराजांचे काही आप्त त्यांच्या विरोधात होते. पण तरीसुद्धा ते डगमगले नाही. स्वराज्यापायी आपल्या संसाराची वाताहत कशाला करुन घ्यायची? असा विपरीत विचार शिवाजी महाराजांनी केला नाही. शिवाजी महाराजांचे आयुष्य संघर्षमय होते. तरी त्यावर पाय रोवून उभे राहत महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. 

शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे होते. शिवाजी महाराज घोड्यांचा वापर निर्णायक प्रसंगी करत असत. शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये घोड्यांचा वापर नेमकेपणाने केला. शिवाजी महाराजांकडे मोती, विश्वास, तुरंगी, इंद्रायणी, गाजर, रणभीर, कृष्णा असे सात घोडे होते. कृष्णा या पांढऱ्या घोड्यावर शिवाजी महाराज राज्यभिषेकानंतर बसले होते. सुरतवर चढाई, आग्राहून सुटका अशा मोहिमांवर त्यांनी विजय मिळवला.

 शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सुमारे ४०० गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते. काही गड त्यांनी स्वत: बांधले, तर काही किल्ले लढाया करुन जिंकले. महाराजांचे गड-किल्ले म्हणजे स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतीकच होते.

आजच्या घडीला शेकडो फूट बोअर करुनही पाणी लागत नाही. परंतु महाराजांच्या ४०० वर्षानंतरही महाराष्ट्रातील कुठल्याही किल्ल्यावर गेलो, तर हजार फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्ल्यावरील टाक्यांमधून स्वच्छ पाणी आढळते. या गड-किल्ल्यांवर कोणतीही पाईपलाईन असल्याचे दिसत नाही.

शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर प्रकारचे हौद बांधले. एक खुले आणि दुसरे भूगर्भात किल्ल्यावरील पाण्याचे हौद वा टाक बांधकामात खडक फोडण्यासाठी दारुगोळा किंवा सुरुंग कधीच वापरले नाहीत. त्याऐवजी नैसर्गिक साधनांचा वापर करुन खडक फोडले. म्हणूनच टाक्यांचा आकार एकदम आयताकृती आहे. याच टाक्यांमधील पाणी संपूर्ण गडावर वापरले जायचे. ते पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी नैसर्गिक तंत्राचा वापर केला जायचा. पाण्याचे टाके ५० ते १५० फुट खडकापर्यंत खोल कोरलेले आहेत. वयाच्या १७ व्या वर्षी शिवरायांनी स्वत: डिझाइन करुन राजगड बांधल्याचे सांगितले जाते.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अष्टप्रधान मंडळाचे महत्त्व अनन्यसाधारण होते. जगाच्या इतिहासात हा एकमेव राजा आहे, ज्याच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तकी नाचली नाही. छत्रपती शिवाजी महाराज अतिशय चारित्र्यसंपन्न होते. महाराजांनी स्वत:साठी मोठे महाल बांधले नाहीत. सत्तेचा वापर स्वत:च्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज नेहमी रयतेचं स्वराज्यअसाच शब्द वापरत.

महाराष्ट्राच्या किनार पट्टीवर 1671 मध्ये मीठ शेती केली जायची. परंतु इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी तेथील शेती मोडीत काढण्यासाठी गोवा प्रांतातून मीठ आणून त्याची स्वस्तात विक्री सुरु केली, हे लक्षात आल्यावर महाराजांनी आयात मिठावर कर लावला, त्यामुळे आयात मीठ महाग झाले व आपल्या शेतकऱ्यांच्या मिठाची मागणी वाढली. रयतेच्या विचारांचे निर्णय म्हणजे जाणता राजा. 

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले हाच केवळ त्यांचा मोठेपणा आहे असे नाही, तर त्यांनी शुन्यातून स्वराज्य निर्माण केले आणि अक्षरश: मुठभर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी इतिहासदत्त कार्य केले. मध्ययुगामध्ये अनेक राजे, महाराजे आणि सुलतान होऊन गेले त्यांच्याशी तुलना केली असता शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्ताराने फारसे मोठे नव्हते. प्रजेला कसलाही त्रास होऊ नये, याबाबत शिवाजी महाराज कमालीचे दक्ष होते.

भूमीवर अधिपत्य गाजवणारे अनेक भूपती या जगती जन्मले आणि मेले, परंतु करोडो ह्दयावर अधिपत्य गाजवणारे एकच शिवछत्रपती अवतरले …!!  छत्रपती शिवाजी महाराज ..

 

           गगन भेदी नजर ज्याची,

                                         पहाड सम विशाल काया !!

           धगधगता सुर्य ही झुकतो

 वंदितो तुला शिवराया !!!

 

             कविता फाले-बोरीकर

 

00000

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६



 

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (RIMC) प्रवेश पात्रता परीक्षा 7 जून रोजी

अर्ज करण्याचे आवाहन ; परीक्षेसाठी मुले व मुली दोघेही पात्र

 

अमरावती, दि. 16 :  महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून येथे इयत्ता आठवीसाठी प्रवेशपात्रता परीक्षा’ दि. 07 जून 2026 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी मुले व मुली प्रविष्ट होऊ शकतात. या परिक्षेसाठी विद्यार्थी, विद्यार्थीनी उमेदवार दि. 01 जानेवारी, 2027 रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7 वी वर्गात शिकत असावा किंवा 7 वी उत्तीर्ण झालेला असावा. या परीक्षेसाठी परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे दि. 05 एप्रिल 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे कार्यालयास सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थीनी/विद्यार्थ्यांचे वय दि. 1 जानेवारी 2027 रोजी  11.1/2 (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी व 13 (तेरा) वर्षापेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी परीक्षेस पात्र समजण्यात येतील. म्हणजेच विद्यार्थ्यांचा जन्म दि. 2 जानेवारी 2014 च्या आधी आणि दि. 1 जुलै 2015 च्या नंतरचा नसावा.  आवेदनपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया परीक्षेचे माहितीपत्रक, आवेदनपत्र व जुन्या प्रश्नपत्रिकांचे संच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून उत्तराखंड पिन कोड 248003 यांचेमार्फत मागवता येणार आहे.

ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) व जुन्या प्रश्नपत्रिकांचा संच मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या www.rime.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सर्वसाधरण व इतर संवर्गाकरिता रु. 600/- व अनुसूचित जाती/जमातीकरीता रु. 555/- पैसे भरून आवेदनपत्र मिळवता येणार आहे.

डिमांड ड्राफ्टद्वारे परीक्षेसाठी आवेदनपत्र मागविण्यासाठी मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता सर्वसाधारण संर्वगातील विद्यार्थी (उमेदवार) करीता रु. 600/- चा डिमांड ड्राफ्ट. व अनुसूचित जाती जमातीकरीता रु. 555/- चा डी.डी  कमांडंट RIMC फंड, ड्रॉवी शाखा, एचडीएफसी बँक, बल्लुपूर चौक, डेहराडून, (बँक कोड 1399), उत्तराखंड यांचे नावाने काढावा. सदर डी. डी. कमांडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, 248 003 या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.

अनुसूचित जाती/जमाती करीता डी. डी. सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत/ छायांकित प्रत पाठविणे बंधनकारक आहे. डी.डी. पाठवितांना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे तो पत्ता पिन कोडसह अचूक नमूद करावा. तसेच पत्ता इंग्रजी कॅपिटल अक्षरातच लिहिलेला अथवा टाईप केलेला असावा त्यानंतर आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती पुस्तिका स्पीड पोस्टाव्दारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होणार आहे.

आवेदनपत्र 2 प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्यासोबत जन्म दाखल्याची छायाप्रत, उमेदवाराचे अधिवास प्रमाणपत्र छायाप्रत, अनुसूचित जाती/जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत, विद्यार्थ्यांचा फोटो, जन्मतारीख व इयत्तेच्या नोंदीसह शाळेच्या बोनाफाईड सर्टिफिकेटची मूळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे. आधारकार्ड छायाप्रत जोडणे बंधनकारक आहे.  विद्यार्थ्यांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, उपरोक्त कागदपत्रांच्या छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) मुख्याध्यापकांमार्फत किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांमार्फत साक्षांकित (Attested) करून आवेदनपत्रासोबत (फॉर्मसोबत) जोडावेत.

आवेदनपत्र परिपूर्णपणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्यमंडळ) भांबुर्डा, आधारकर रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटरच्या मागे, शिवाजीनगर पुणे 411004 या पत्त्यावर दि. 05  एप्रिल 2026 पर्यंत पोहोचतील, अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष येऊन जमा करावीत. परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्यज्ञान या तीन विषयांचे पेपर असतील. हा पेपर रविवार दि. 7 जून 2026 रोजी होणार आहे. लेखी परीक्षेतून मौखिक परीक्षेस पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना  मौखिक परीक्षा दिनांक यथावकाश कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 020-29709617, ई मेल mscepune@gmail.com, संकेतस्थळ www.mscepune.in यावर संपर्क साधावा किंवा संकेतस्थळाला भेट द्यावी, असे परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.                              

 


संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

 

          अमरावती, दि. 15 : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज नायब तहसीलदार शुभांगी चौधरी यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.           

          यावेळी उपस्थित लघुलेखक संतोष चव्हाण, महसूल सहाय्यक शरद लोणारे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनीही संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

00000