सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६



 

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (RIMC) प्रवेश पात्रता परीक्षा 7 जून रोजी

अर्ज करण्याचे आवाहन ; परीक्षेसाठी मुले व मुली दोघेही पात्र

 

अमरावती, दि. 16 :  महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून येथे इयत्ता आठवीसाठी प्रवेशपात्रता परीक्षा’ दि. 07 जून 2026 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी मुले व मुली प्रविष्ट होऊ शकतात. या परिक्षेसाठी विद्यार्थी, विद्यार्थीनी उमेदवार दि. 01 जानेवारी, 2027 रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7 वी वर्गात शिकत असावा किंवा 7 वी उत्तीर्ण झालेला असावा. या परीक्षेसाठी परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे दि. 05 एप्रिल 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे कार्यालयास सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थीनी/विद्यार्थ्यांचे वय दि. 1 जानेवारी 2027 रोजी  11.1/2 (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी व 13 (तेरा) वर्षापेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी परीक्षेस पात्र समजण्यात येतील. म्हणजेच विद्यार्थ्यांचा जन्म दि. 2 जानेवारी 2014 च्या आधी आणि दि. 1 जुलै 2015 च्या नंतरचा नसावा.  आवेदनपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया परीक्षेचे माहितीपत्रक, आवेदनपत्र व जुन्या प्रश्नपत्रिकांचे संच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून उत्तराखंड पिन कोड 248003 यांचेमार्फत मागवता येणार आहे.

ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) व जुन्या प्रश्नपत्रिकांचा संच मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या www.rime.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सर्वसाधरण व इतर संवर्गाकरिता रु. 600/- व अनुसूचित जाती/जमातीकरीता रु. 555/- पैसे भरून आवेदनपत्र मिळवता येणार आहे.

डिमांड ड्राफ्टद्वारे परीक्षेसाठी आवेदनपत्र मागविण्यासाठी मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता सर्वसाधारण संर्वगातील विद्यार्थी (उमेदवार) करीता रु. 600/- चा डिमांड ड्राफ्ट. व अनुसूचित जाती जमातीकरीता रु. 555/- चा डी.डी  कमांडंट RIMC फंड, ड्रॉवी शाखा, एचडीएफसी बँक, बल्लुपूर चौक, डेहराडून, (बँक कोड 1399), उत्तराखंड यांचे नावाने काढावा. सदर डी. डी. कमांडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, 248 003 या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.

अनुसूचित जाती/जमाती करीता डी. डी. सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत/ छायांकित प्रत पाठविणे बंधनकारक आहे. डी.डी. पाठवितांना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे तो पत्ता पिन कोडसह अचूक नमूद करावा. तसेच पत्ता इंग्रजी कॅपिटल अक्षरातच लिहिलेला अथवा टाईप केलेला असावा त्यानंतर आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती पुस्तिका स्पीड पोस्टाव्दारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होणार आहे.

आवेदनपत्र 2 प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्यासोबत जन्म दाखल्याची छायाप्रत, उमेदवाराचे अधिवास प्रमाणपत्र छायाप्रत, अनुसूचित जाती/जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत, विद्यार्थ्यांचा फोटो, जन्मतारीख व इयत्तेच्या नोंदीसह शाळेच्या बोनाफाईड सर्टिफिकेटची मूळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे. आधारकार्ड छायाप्रत जोडणे बंधनकारक आहे.  विद्यार्थ्यांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, उपरोक्त कागदपत्रांच्या छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) मुख्याध्यापकांमार्फत किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांमार्फत साक्षांकित (Attested) करून आवेदनपत्रासोबत (फॉर्मसोबत) जोडावेत.

आवेदनपत्र परिपूर्णपणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्यमंडळ) भांबुर्डा, आधारकर रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटरच्या मागे, शिवाजीनगर पुणे 411004 या पत्त्यावर दि. 05  एप्रिल 2026 पर्यंत पोहोचतील, अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष येऊन जमा करावीत. परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्यज्ञान या तीन विषयांचे पेपर असतील. हा पेपर रविवार दि. 7 जून 2026 रोजी होणार आहे. लेखी परीक्षेतून मौखिक परीक्षेस पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना  मौखिक परीक्षा दिनांक यथावकाश कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 020-29709617, ई मेल mscepune@gmail.com, संकेतस्थळ www.mscepune.in यावर संपर्क साधावा किंवा संकेतस्थळाला भेट द्यावी, असे परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.                              

 


संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

 

          अमरावती, दि. 15 : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज नायब तहसीलदार शुभांगी चौधरी यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.           

          यावेळी उपस्थित लघुलेखक संतोष चव्हाण, महसूल सहाय्यक शरद लोणारे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनीही संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

00000

रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६

विशेष लेख-संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त (15 फेब्रुवारी)

 विशेष लेख

जीवन, विचार, सामाजिक परिवर्तन आणि मानवतेचे दीपस्तंभ

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त (15 फेब्रुवारी) विशेष लेख



       भारतीय संत परंपरेत समाज प्रबोधनाचे, नैतिक मूल्यांचे आणि मानवतेचे दीपस्तंभ म्हणून संत सेवालाल महाराजांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. ते बंजारा (लमाण) समाजाचे महान संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनातून सत्य, परिश्रम, प्रामाणिकपणा, समता, करुणा आणि बंधुभाव यांचा संदेश दिला. म्हणूनच संत सेवालाल महाराजांची जयंती हा केवळ उत्सवाचा दिवस नसून, त्यांच्या विचारांचे स्मरण करून ते आचरणात आणण्याचा पवित्र दिवस आहे.

संत सेवालाल महाराजांचे बालपण  व्यक्तिमत्त्व

         संत सेवालाल महाराजांचा जन्म साध्या बंजारा कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांच्यात विलक्षण बुद्धिमत्ता, निरीक्षणशक्ती आणि करुणा दिसून येत होती. समाजातील गरिबी, अज्ञान, अन्याय आणि दुःख पाहून त्यांच्या मनात समाजपरिवर्तनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यांनी सांसारिक लोभ, लालसा आणि स्वार्थापेक्षा समाजहिताला अधिक महत्त्व दिले. साधे राहणीमान, संयमी आचार-विचार आणि उच्च नैतिक मूल्ये हे त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य होते.

सामाजिक परिस्थिती

       संत सेवालाल महाराजांच्या काळात बंजारा समाज अनेक सामाजिक कुप्रथांनी ग्रासलेला होता. व्यसनाधीनता, चोरी, हिंसा, अंधश्रद्धा आणि शिक्षणाचा अभाव यामुळे समाज मागासलेला होता. या परिस्थितीमुळे समाजाच्या प्रगतीला अडथळे निर्माण होत होते. संत सेवालाल महाराजांनी या समस्यांची मूळ ओळखून त्यावर उपाय सुचवले आणि समाजाला योग्य दिशा दिली.

समाजसुधारणेचे कार्य

       संत सेवालाल महाराज हे केवळ उपदेशक नव्हते, तर कृतीशील समाजसुधारक होते. त्यांनी चोरी, व्यसन आणि हिंसा यांसारख्या वाईट प्रवृत्तींना ठाम विरोध केला.

      “परिश्रम हाच खरा धर्म आहे” हा त्यांचा मूलमंत्र होता. त्यांनी प्रत्येकाला कष्ट करून प्रामाणिक जीवन जगण्याचा संदेश दिला. अन्यायाने किंवा फसवणुकीने मिळवलेली संपत्ती त्यांनी नाकारली आणि श्रमातून मिळालेल्या अन्नालाच पवित्र मानले.

धार्मिक  नैतिक विचार

        संत सेवालाल महाराजांचा धर्मविषयक दृष्टिकोन अत्यंत व्यापक होता. धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे, तर सदाचार आहे, हे त्यांनी समाजाला पटवून दिले. सत्य बोलणे, दुसऱ्याच्या हक्कावर गदा न आणणे, गरजूंची मदत करणे, वृद्धांचा सन्मान करणे आणि स्त्री-पुरुष समानता पाळणे, हीच खरी धार्मिकता आहे, असे ते सांगत.

      सर्व धर्मांचा सन्मान करावा, जात-पात, उच्च-नीच भेद न करता मानवतेला सर्वोच्च स्थान द्यावे, हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे.

स्त्रीपुरुष समानता आणि सामाजिक न्याय

       त्या काळात स्त्रियांच्या अधिकारांकडे अपेक्षित तेवढे लक्ष दिले जात नव्हते. संत सेवालाल महाराजांनी स्त्री-पुरुष समानतेचा स्पष्ट पुरस्कार केला. स्त्री ही पुरुषाइतकीच सक्षम आहे, तिचा सन्मान झाला पाहिजे, असा त्यांनी आग्रह धरला. सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमान यांचा संदेश देत त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणला.

निसर्गप्रेम  पर्यावरणविषयक दृष्टी

        संत सेवालाल महाराजांना निसर्गाविषयी अपार प्रेम होते. झाडे, पशुपक्षी आणि पर्यावरण यांचे संरक्षण करणे हे मानवाचे कर्तव्य आहे, असे ते मानत. निसर्गाचा समतोल राखल्यासच मानवाचे जीवन सुखी व समृद्ध होईल, ही त्यांची ठाम धारणा होती. आजच्या पर्यावरणीय संकटांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे विचार अधिकच महत्त्वाचे वाटतात.

सामाजिक सलोखा  बंधुभाव

        समाजात ऐक्य नसेल, तर प्रगती शक्य नाही, हे संत सेवालाल महाराजांनी ओळखले होते. त्यांनी सर्व समाजघटकांमध्ये बंधुभाव वाढवण्याचा प्रयत्न केला. परस्पर सहकार्य, प्रेम आणि विश्वास यांवर समाज उभा राहतो, असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळेच त्यांच्या विचारांमुळे समाजात सलोखा आणि आत्मसन्मान वाढला.

संत सेवालाल महाराजांचा समाजावर प्रभाव

         संत सेवालाल महाराजांच्या विचारांमुळे बंजारा समाजात मोठे परिवर्तन घडून आले. व्यसनमुक्ती, प्रामाणिक श्रम, शिक्षणाची आवड आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्यास त्यांच्या शिकवणीचा मोठा वाटा आहे. त्यांच्या विचारांनी समाजाला आत्मविश्वास दिला आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा दिली.

जयंतीचे महत्त्व आणि आजची उपयुक्तता

         संत सेवालाल महाराजांची जयंती विविध ठिकाणी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी प्रवचने, कीर्तन, सामाजिक प्रबोधन कार्यक्रम, स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण आणि गरजूंसाठी मदतकार्य केले जाते.

         जयंती साजरी करण्याचा खरा अर्थ म्हणजे त्यांच्या विचारांचे आचरण करणे होय. आजच्या स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनात सत्य, परिश्रम आणि मानवतेचा मार्ग दाखवणारे त्यांचे विचार अत्यंत मार्गदर्शक ठरतात.

           संत सेवालाल महाराज हे केवळ एका समाजाचे संत नव्हते, तर संपूर्ण मानवजातीचे मार्गदर्शक होते. त्यांचे जीवन हे सत्य, श्रम, करुणा आणि समतेचा जिवंत आदर्श आहे. आधुनिक युगातही त्यांच्या विचारांची गरज अधिक जाणवते. संत सेवालाल महाराजांचा आदर्श स्वीकारून आपण प्रामाणिक, सदाचारी आणि समाजोपयोगी जीवन जगलो, तरच त्यांच्या जयंतीचे खरे सार्थक होईल.

                                                       ०००

                                                             – रणजित पवार,
                                            उपसंपादकविभागीय माहिती कार्यालयकोल्हापूर

विशेष लेख-हिंद दी चादर : गुरु तेग बहादुर यांचे ३५० वर्षांचे बलिदान पर्व

 


हिंद दी चादर : गुरु तेग बहादुर यांचे ३५० वर्षांचे बलिदान पर्व

         

          भारतीय इतिहासात धर्म, मानवता आणि स्वातंत्र्य या मूल्यांसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या महान विभूतींमध्ये नववे शीख गुरु ‘हिंद- दी -चादर’ गुरु श्री तेग बहादुर साहिब यांचे स्थान मानाचे आहे. त्यांनी केवळ शीख धर्माचेच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीचे रक्षण केले. म्हणूनच इतिहासाने त्यांना “हिंद दी चादर” ही गौरवशाली उपाधी दिली. मानवधर्माच्या अस्मिता, आदर्शाच्या मूलमंत्राला चिरंजीवी करण्यासाठी त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानासाठी जगाने त्यांना शतकानुशतके आठवणीत ठेवले आहे. भारतीय इतिहासात धर्मांतराचा मोठा प्रभाव आहे. मात्र धर्मांतराच्या विरोधात सर्वोच्च बलिदान देत संस्कृती आणि परंपरांना टिकविण्यासाठी विपरीत परिस्थितीत त्यांनी दिलेला संदेश व त्यासाठी केलेले सर्वोच्च बलिदान भारताने आपल्या इतिहासात सुवर्णपान म्हणून जपले आहे. तत्कालीन व्यवस्थेत कितीही दबाव अन्याय, अत्याचार झाला तरी धर्मांतर न करण्याचा संदेश या सर्वोच्च बलिदानाने समाजात रुजवला.

हिंद दी चादर” का म्हणतात?

          मुघल सम्राटाच्या काळात संस्कृती नष्ट करण्यासाठी नागरिकांवर अन्याय होत असे, अशा परिस्थितीत नागरिकांनी श्री गुरू तेग बहादुर यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, प्राणाची आहुती दिली तरी संस्कृती सोडणार नाही. परकीयांच्या शक्तीपुढे गुरू तेग बहादुर कदापि झुकले नाही. या भूमिकेतून त्यांनी संपूर्ण भारतासाठी स्वतःचे जीवन तत्कालीन व्यवस्थेत कवचासारखे पुढे केले. म्हणून ते राष्ट्राचे संरक्षण करते म्हणजेच ‘हिंद- दी- चादर’ झाले.

गुरु तेग बहादुर यांची शहीदी

          इ.स. 1675 मध्ये मुघल सम्राटाने त्यांच्या भूमिकेचा विरोध करत त्यांना दिल्लीला बोलावले. मात्र श्री गुरू तेग बहादुर आपल्या मतावर ठाम राहिले. त्यांना अनेक कठोर छळाला सामोरे जावे लागले. त्यांची साथ देणाऱ्या त्यांच्या तीन शिष्यांना, म्हणजेच भाई मती दास  भाई सती दास  भाई दयाला –यांना अतिशय अमानुषपणे ठार मारण्यात आले.

          अशा अमानुष अत्याचारांनंतरही गुरु तेगबहादुर आपल्या श्रद्धेवर ठाम राहिले. अखेरीस चांदणी चौक, दिल्ली येथे 11 नोव्हेंबर 1675 रोजी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. जगात या बलिदानाला श्रद्धापूर्वक सर्वोच्च बलिदान संबोधले जाते.

बलिदानामागील परिस्थिती

          गुरु तेग बहादुर यांचे बलिदान हे कोणत्याही राजकीय सत्तेसाठी नव्हे, तर धर्मस्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी होते. अधिकृत संदर्भ ग्रंथांमध्ये गुरु तेगबहादुर यांचे बलिदान धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान म्हणून नोंदवले गेले आहे. त्यांच्या बलिदानानंतर त्यांचे अंत्यसंस्कार विविध समुदायातील नागरिकांनी स्वत:चा  जीव संकटात टाकून पूर्ण केले. त्यामुळे शीख समुदायासोबतच शीख, सिकलगीर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव, उदासिन अशा अल्पसंख्याक समुदायाच्या कार्य कर्तृत्वालाही या शहिदी समागमात सन्मानित करण्यात येत आहे.

350 व्या शहीदी समागमाचे आयोजन

          महाराष्ट्र शासनाने गुरु तेग बहादुर साहिब यांचे हे सर्वोच्च बलिदानाला लक्षात घेऊन त्यांच्या 350 व्या शहिदी वर्षाला स्मरून त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शहीदी समागमाचे आयोजन केले आहे.

          इ.स. 2025 हे वर्ष गुरु तेगबहादुर साहिब यांच्या 350 व्या शहीदी समागाम वर्षाचे आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत राज्यस्तरीय “350 वा शहीदी समागम” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

          गुरु तेग बहादुर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे ,धार्मिक सलोखा, संविधानिक मूल्ये व मानवतावाद अधोरेखित करणे,अल्पसंख्यांक समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे. युवा पिढीला बलिदानाची प्रेरणा देणे हा यामागील उद्देश आहे. नागपूर, नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात लाखोने भाविक उपस्थित होते. नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा आहे.

 

शीख व इतर समाजांचे महत्त्व

          या महोत्सवात शीख, सिकलगीर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल या समाजांचा विशेष सहभाग आहे, कारण गुरु तेगबहादुर यांच्या संघर्षात हे समाज ऐतिहासिकदृष्ट्या सहभागी राहिले. धार्मिक सहिष्णुतेचा वारसा जपण्याची परंपरा या समाजांमध्ये आहे. महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक संस्कृतीची विविधता या माध्यमातून अधोरेखित होते. विशेषतः सिकलगीर शीख समाजाचा महाराष्ट्रातील ऐतिहासिक प्रवास या कार्यक्रमातून नव्याने समोर येतो.

          गुरु तेगबहादुर साहिब यांचे बलिदान हे केवळ शीख इतिहासाचे नव्हे, तर संपूर्ण भारतीय संस्कृतीचे वैभव आहे. अन्यायाच्या विरोधात उभे राहून त्यांनी जो आदर्श घालून दिला, तो आजही संविधानिक भारताच्या आत्म्याशी सुसंगत आहे.

          महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेला ३५० वा शहीदी समागम हा इतिहासाची उजळणी करणारा आणि भविष्याला दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. आतापर्यंत नागपूर येथे ७ डिसेंबर २०२५ ला शहीदी समागम झाले २४,२५ जानेवारीला नांदेड येथे शहीदी समागम कार्यक्रम झाला. त्यानंतर नवी मुंबई येथे हा कार्यक्रम २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी होणार आहे. देश विदेशातील शिखधर्मीय तसेच सर्व समुदायाचे नागरिक यामध्ये लोखोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत.

०००

-प्रवीण टाके, उपसंचालक(माहिती)

विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर