विशेष लेख:
भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा
-
ब्रिजेश
सिंह, प्रधान सचिव तथा महासंचालक, माहिती व
जनसंपर्क महासंचालनालय
भारताला
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच,
१३ नोव्हेंबर १९४७ रोजी
तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथ येथे
गेले. समुद्रकिनारी उभे राहून त्यांनी मंदिराच्या भग्नावशेषांकडे गंभीर नजरेने
पाहिले आणि एक प्रतिज्ञा केली सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची. तो क्षण म्हणजे
भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा पहिला मोठा जागर; आपल्या
सभ्यतेच्या स्वाभिमानाच्या सार्वजनिक पुनर्प्राप्तीचा क्षण होता.
आणि
आता, ११ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी
सोमनाथ अमृत महोत्सवात उपस्थित राहून मंदिराच्या पुनर्स्थापित तेजात सहभाग घेतला, तेव्हा तीच प्रतिज्ञा पुन्हा नव्याने प्रज्वलित
झाल्यासारखी वाटते. विशेष महापूजा, कुंभाभिषेक, ध्वजारोहण आणि लाखो भाविकांची उपस्थिती—हे सर्व मिळून भग्नावस्थेतून पुनर्निर्माणाकडे
आणि पुनरुत्थानाकडे झालेल्या अखंड प्रवासाची घोषणा करतात. सरदार पटेलांच्या
दूरदृष्टीपासून आजच्या आत्मविश्वासपूर्ण भारतापर्यंतचा हा अखंड सांस्कृतिक प्रवाह
आहे. ही परंपरा, कालातीत आणि प्रेरणादायी, प्रत्येक पिढीला आपल्या वारशाचे जतन करण्याचे, ऐक्याचे रक्षण करण्याचे आणि भारताच्या सनातन
आत्म्यावर दृढ श्रद्धा ठेवत समृद्ध, सुसंवादी
आणि अखंड भविष्याकडे वाटचाल करण्याचे आवाहन करते.
अमेरिकन
लेखक मार्क ट्वेन यांनी एकदा म्हटले होते की वाराणसी इतिहास, परंपरा आणि आख्यायिकांपेक्षाही प्राचीन आहे. पण
कदाचित त्यांनी प्रभास पाटण आणि सोमनाथ पाहिले नसावे. भागवत पुराणानुसार, चंद्राला त्याचे सासरे दक्ष यांनी शाप दिला होता.
त्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्राने याच स्थळी भगवान शिवाची आराधना केली आणि
म्हणूनच ‘सोमनाथ—चंद्राचा अधिपती’ हे नाव उदयास आले.
मंदिर
उभे राहण्याच्या खूप आधीपासून प्रभास पाटण हे मानवी वस्तीचे केंद्र होते. इ.स.पू.
३००० पासून येथे शेती आणि पशुपालन करणारी पूर्व-हडप्पा संस्कृती अस्तित्वात होती.
सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतरही येथे जीवन टिकून राहिले. येथे सापडलेली रेड
पॉलिश्ड वेअर मातीची भांडी आणि प्रारंभीच्या लिपींचे पुरावे याची साक्ष देतात.
इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांत हे एक साधे पण महत्वाचे नगर होते.
समुद्रकिनाऱ्यालगत ७ ते १० मीटर खोलीवर सापडलेले दगडी नांगर प्राचीन सागरी
व्यापाराचे साक्षीदार आहेत. हा किनारा केवळ निसर्गरम्य नव्हता, तर व्यापाराचे प्रवेशद्वार होता. येथे वस्ती आणि
पवित्रता एकत्र वाढत गेली.
प्राचीन
ग्रंथांमध्ये प्रभास क्षेत्राला तीर्थ म्हणून संबोधले आहे. महाभारतामध्ये भगवान
कृष्णाच्या देहत्यागाचे स्थळ म्हणून प्रभासाचा उल्लेख आहे. दगडांनी अमरत्वाची भाषा
शिकण्यापूर्वीच हा किनारा सांसारिक आणि आध्यात्मिक जगामधील एक पवित्र संगम होता.
त्याची प्रारंभीची रूपे साधी—लाकूड आणि गवताची—असली, तरी ती
मानवी मनाच्या दैवी शोधाची खूण होती.
इ.स.
६४९ च्या सुमारास वल्लभीच्या मैत्रक राजवटीत पहिले ऐतिहासिकदृष्ट्या प्रमाणित
मंदिर उभे राहिले. पुढे ९व्या–१०व्या शतकात चालुक्य/सोलंकी काळात
सोमनाथ हे काशी आणि उज्जैनच्या बरोबरीचे प्रमुख तीर्थस्थान बनले. पुरातत्त्ववेत्ता
बी. के. थापर यांना १९५०–५१ मधील उत्खननात असलेले गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप यांचा समावेश असलेली भव्य
रचना. पूर्वाभिमुख त्रि-अंग संधार प्रासादाचे अवशेष सापडले. लक्षुलीश मूर्तीच्या
अवशेषांनी त्याची शैव परंपरा सिद्ध केली. विद्वान मंदिराच्या नेमक्या कालखंडावर
मतभेद करतात, परंतु एक गोष्ट निर्विवाद आहे—सोमनाथ त्या काळात अत्यंत वैभवशाली झाले होते आणि
लवकरच त्याची कठोर परीक्षा होणार होती.
ही
परीक्षा अनेक लाटांमध्ये आली. इ.स. ७२५ मध्ये उमय्यद सेनापती जुनैद इब्न अब्द
अल-रहमान अल-मुरीने हल्ला केला,
जो पहिला इस्लामी आक्रमण
मानला जातो. परंतु सर्वात मोठा आघात ८ जानेवारी १०२६ रोजी झाला, जेव्हा गझनीचा महमूद आपल्या पंधराव्या मोहिमेत
सोमनाथावर चालून आला. शिवलिंग फोडण्यात आले, खजिना
लुटण्यात आला. अल बिरुनी यांनी मंदिरातील संपत्तीचे वर्णन केले आहे. सोने, चांदी, मोती, रत्ने आणि गावांच्या महसुलातून जमा झालेली संपदा.
तथापि, पुरातत्त्वीय पुरावे दर्शवतात की मंदिराचे
भग्नावशेष त्वरित एकत्र करून सुरक्षितपणे पुरले गेले. म्हणजेच, श्रद्धा उद्ध्वस्त झाली नव्हती. इ.स. १०३८ मध्ये
गोव्याच्या कदंब राजाने सोमनाथाला भेट दिली, यावरून
पूजा-अर्चा किंवा पुनरुज्जीवनाची भावना त्वरित पुन्हा उभी राहिल्याचे दिसते.
मंदिराचे रूप तुटले, पण संस्कृतीचे चेतन कायम राहिले.
पुढील
काळातही विध्वंस आणि पुनर्निर्माण यांचे चक्र सुरूच राहिले. इ.स. ११६९ मध्ये
सोलंकी राजा कुमारपालाने पाचवे भव्य दगडी मंदिर उभारले. प्रभास पाटण येथील
भद्रकाली मंदिरातील शिलालेखात त्याचा उल्लेख आहे.
त्यानंतर
१२९९ मध्ये अलाउद्दीन खिलजीचा सेनापती उलुघ खानने मंदिर उद्ध्वस्त केले. स्थानिक
रक्षक वाजा मालसुत आणि पदमल यांनी मंदिररक्षण करताना प्राण दिले. पुढे चुडासमा
राजा महिपाल देव यांनी १३०८ मध्ये मंदिराचे पुनर्निर्माण केले आणि त्यांचा पुत्र
खेङ्गाराने शिवलिंगाची पुनःप्रतिष्ठा केली.
यानंतर
झफर खानने १३९५ मध्ये मंदिर उद्ध्वस्त करून तेथे जामा मशिद आणि प्रशासकीय ठाणे
उभारल्याचे उल्लेख आहेत. पुढे महमूद बेगडा, पोर्तुगीज
आक्रमक, आणि नंतर औरंगजेब यांच्या आदेशाने १६६५
आणि १७०६ मध्ये पुन्हा विध्वंस घडवून आणण्यात आला. पुजाऱ्यांची हत्या, मंदिर परिसरातील अपवित्र कृत्ये आणि संपूर्ण रचना
पाडण्याचे प्रयत्न झाले;
परंतु तीर्थक्षेत्र टिकून
राहिले.
जरी
मंदिर वारंवार उद्ध्वस्त झाले,
तरी स्मृती कधीच नष्ट झाली
नाही. इ.स. १७८२–८३ मध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी
आपल्या वैयक्तिक निधीतून सोमनाथाजवळ नवीन दगडी मंदिर उभारले. हे मंदिर १९व्या आणि
२०व्या शतकात सोमनाथच्या श्रद्धेचे केंद्र राहिले.
१८४२
मध्ये ब्रिटिश गव्हर्नर-जनरल लॉर्ड एलेनबरो यांनी अफगाणिस्तानातील महमूद गझनीच्या
कबरीतून चंदनाचे दरवाजे आणले आणि ते सोमनाथचे मूळ दरवाजे असल्याचा खोटा दावा केला.
हा ब्रिटिश सत्तेचा हिंदू समाजाचे समर्थन मिळवण्यासाठी आणि ब्रिटिश राजवटीला वैध
ठरवण्यासाठी राजकीय प्रचार होता. हे दरवाजे नंतर आग्रा किल्ल्यात ठेवण्यात आले.
१९२२
मध्ये के.एम. मुन्शी यांनी सोमनाथचे भग्नावशेष पाहिले. त्यांनी त्या अनुभवाचे
वर्णन “भक्ती आणि लज्जा” असे
केले आणि याच अनुभवातून त्यांच्या मनात मंदिर पुनर्निर्माणाची आजीवन बांधिलकी
निर्माण झाली.
स्वातंत्र्यानंतर
सोमनाथच्या इतिहासाचे अंतिम पर्व सुरू झाले. ऑक्टोबर १९४७ मध्ये जुनागढ भारतात
विलीन झाले आणि हिंदूंना मंदिर दुरुस्तीवरील बंदी हटवण्यात आली. १२–१३ नोव्हेंबर १९४७ रोजी सरदार पटेल, एन. व्ही. गाडगीळ आणि जामसाहेब यांनी
भग्नावशेषांना भेट दिली. तेव्हा पटेलांनी जाहीर केले: “या शुभ नववर्षदिनी आम्ही सोमनाथ मंदिर
पुनर्निर्माणाचा निर्णय घेतला आहे.”
जुनागढ
प्रशासन आणि जामसाहेबांनी तत्काळ देणग्या दिल्या. सुमारे ५,००० एकर जमीन मंदिर, संस्कृत
विद्यापीठ आणि सांस्कृतिक केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आली.
यानंतर
वाद निर्माण झाला. महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार सरकारने थेट निधी न देता
लोकवर्गणीतून मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून
हे राज्यप्राय धार्मिक प्रकल्प न राहता लोकसहभागातून उभे राहिलेले सांस्कृतिक
पुनरुत्थान ठरेल.
दरम्यान, तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी या
प्रकल्पाला ‘हिंदू
पुनरुत्थानवाद’ म्हणून विरोध
केला. परंतु सार्वजनिक देणग्यांमुळे प्रकल्प थांबवता आला नाही.
१५
डिसेंबर १९५० रोजी सरदार पटेल यांचे निधन झाले, तरी
काम सुरूच राहिले. अखेर ११ मे १९५१ रोजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते
प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सोमपुरा शिल्पकारांनी बांधलेल्या मारू-गुर्जर शैलीतील
मंदिरात नवीन ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली. शतकानुशतके कुजबुजत राहिलेली
प्रतिज्ञा अखेर दगडात साकार झाली. नेहरू या समारंभाला उपस्थित नव्हते.
आज
सोमनाथ हे केवळ पर्यटनस्थळ किंवा धार्मिक प्रतीक नाही; ते
दगड आणि गाळात लिहिलेले भारतीय संस्कृतीचा इतिहासग्रंथ आहे. त्याची खरी ओळख अखंड
वैभवात नसून प्रत्येक विध्वंसानंतर पुन्हा उभे राहण्याच्या मानवी निर्णयात आहे.
त्याच्या
पायाभूत थरांमध्ये हडप्पाकालीन वसाहती, प्राचीन
व्यापारी आणि शांतीच्या शोधात आलेले भक्त सामावलेले आहेत. प्रत्येक पुनर्निर्माण—मैत्रक राजे, सोलंकी
सम्राट, मराठा राण्या किंवा नवस्वतंत्र भारत
यांना “ही समाप्ती नाही; आम्ही
पुन्हा उभारू” हा एक जाणीवपूर्वक केलेला उच्चार होता.
सोमनाथ
आपल्याला शिकवते की लवचिकता म्हणजे कधीही न पडणे नव्हे, तर
पडूनही कायमचे न राहणे—पुन्हा पुन्हा उभे राहणे. समुद्रकिनारी
उभे असलेले हे मंदिर केवळ भगवान शिवाचे स्मारक नाही; तर
त्या अदम्य मानवी आत्म्याचे प्रतीक आहे, जो
शतकानुशतके समुद्राच्या काठावर येऊन शांतपणे म्हणत राहतो—
“आम्ही अजूनही येथे आहोत.
आम्ही स्मरण
ठेवतो.
आम्ही पुन्हा
उभारतो.
आम्ही टिकून
राहतो.”
००
#सोमनाथ_स्वाभिमान_पर्व