बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६

 


जागतिक पर्यटन दिनानिमित्त 28 सप्टेंबरला

अकोला येथे कृषी पर्यटनाविषयी कार्यशाळा

- पर्यटन उपसंचालक विजय जाधव

अमरावती, दि. 9  : जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या निमित्ताने सोमवार 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी अकोला येथे कृषी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विभागीय स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक उपसंचालक श्री. विजय जाधव यांनी केले.

अमरावती येथील नियोजन भवनात आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत उमेद अमरावतीचे जिल्हा व्यवस्थापक रोशन उमक, माविमचे पवन देशमुख, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी एस. ए. कादरी, उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर अमरावती विभागातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक, शाश्वत विकास केंद्राचे गणेश चौधरी, वेदनंदीनी कृषी पर्यटन केंद्राचे संचालक प्रकाश पोहरे, महेंद्री कृषी पर्यटन केंद्राचे संचालक विजय श्रीराव, कॅनव्हास फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष शेरेकर, जिल्हा अग्रणी बँकांचे तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील वेदनंदीनी कृषी पर्यटन केंद्राच्या सहकार्याने ही कार्यशाळा पर्यटन संचालनालय आयोजित करीत असून यासाठी

शासनाच्या सर्व संबंधित विभागांनी त्यांच्याकडील नोंदणीकृत संस्था, घटक, शेतकरी तसेच उद्योजक व्यावसायिक यांच्या बरोबरच उद्योग इच्छुकांना या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. आपल्याकडील संस्थांना त्यांच्या उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी या कार्यशाळेनिमित्त दालन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठीही त्यांनी नोंदणी करणे आवश्यक राहील अशी माहिती यावेळी देण्यात आली.

पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्याबरोबरच स्थानिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर यंदाच्या पर्यटन दिनाच्या उपक्रमांमध्ये विशेष भर देण्यात आला आहे. ‘आई’ या योजनेअंतर्गत दुर्गम व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भागातील महिलांना पर्यटन व्यवसायाशी जोडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कृषी पर्यटन केंद्रांच्या माध्यमातून सेंद्रिय शेती, गटशेती आणि कृषी आधारित पर्यटनाला चालना देण्यात येणार असून, ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विक्री व्यवस्थेलाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. ‘महिला शेतकरी वर्ष’ साजरे करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेती व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेतली जाणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला व शेतकऱ्यांची ‘सर्वोत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी’ म्हणून निवड करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला उद्योजकांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून, त्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा आणि माविमच्या माध्यमातून बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू तसेच तृणधान्यांपासून तयार केलेल्या पौष्टिक खाद्यपदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासोबतच बचत गटांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. पर्यटनाचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य आणि पर्यटन जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ व प्रवक्त्यांकडून ‘कृषी पर्यटन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. असेही यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीत जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन, महिला बचत गटांचा सहभाग, कृषी व ग्रामीण पर्यटनाला चालना, स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन तसेच पर्यटन जनजागृती इत्यादी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी शाश्वत विकास केंद्र अमरावती यांच्या वतीने प्रकाशित त्रैमासिक बातमी पत्राच्या पुस्तिकेचे विमोचन पर्यटन उपसंचालक विजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

०००००

#जागतिकपर्यटनदिन

#कृषीपर्यटन

 #अकोला

 #अमरावतीविभाग 

#पर्यटनसंचालनालय 

#महिलासक्षमीकरण 

#सेंद्रियशेती 

#बचतगट

 



मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६

 

राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी अमरावती विभागातून सूचना व अभिप्राय मागविण्याबाबत आवाहन 

विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन 


          अमरावती, दि. 8 : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे.

          या समितीच्या कार्यकक्षेनुसार राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, तज्ज्ञ व इतर संबंधित हितधारकांशी चर्चा करून भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय प्राप्त करून घेतले जाणार आहेत.

          अमरावती विभागातील संबंधित हितधारकांशी चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष व सदस्य गुरुवार, दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 5.30 दरम्यान नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे भेट देणार आहेत.

          या अनुषंगाने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती व उपजिल्हाधिकारी (महसूल) अमरावती यांच्या संयुक्त नियंत्रणाखाली विशेष कक्षामार्फत दि. 14 ते 16 सप्टेंबर या कालावधीत, कार्यालयीन वेळेत सूचना व अभिप्राय स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

          राज्यातील भरती परीक्षा पद्धत अधिक सक्षम, सुरक्षित, पारदर्शक व विश्वासार्ह करण्याच्या दृष्टीने अमरावती विभागातील सर्व संबंधित घटकांनी आपल्या सूचना, शिफारशी, हरकती व निवेदने सादर करून या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त, अमरावती यांनी केले आहे.       

           समितीच्या भेटीसाठी वेळ मागण्यासाठी / समितीपुढे सूचना व अभिप्राय सादर करण्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

          दि. 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान आपले लेखी निवेदन/सूचना/अभिप्राय किंवा भेटीसाठी वेळ मागणारे पत्र खालीलपैकी कोणत्याही प्रकारे सादर करता येईल समितीसमोर चर्चेसाठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या नागरिकांनी खालील नमूद केलेल्या विशेष कक्षामध्ये किंवा ई-मेल पत्त्यावर अर्ज सादर करावा.

अ) प्रत्यक्ष सादर करण्याचे ठिकाण :

          नोडल अधिकारी : निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती. उपजिल्हाधिकारी, (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती. विशेष कक्ष :निवासी उपजिल्हाधिकारी यांची शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती. कालावधी : दि. 14 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर, 2026 कार्यालयीन वेळेत

ब) ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in किंवा

                  rdc.amravati@gmail.com

          ज्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसेल, त्यांनी आपले लेखी अभिप्राय, सूचना, शिफारशी अथवा निवेदने विहित मुदतीत वरील ई-मेलवर पाठवावीत.

       खालील प्रमुख विषयांवर सूचना व अभिप्राय अपेक्षित आहेत

          विद्यमान परीक्षा प्रणालीचा आढावा : राज्य शासनाचे विविध विभाग, प्राधिकरणे तसेच परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या सध्याच्या परीक्षा पद्धती व कार्यपद्धतीबाबत अभिप्राय.

          पारदर्शकता व सुरक्षितता उपाय : परीक्षा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष व उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सर्वंकष उपाययोजनांबाबत सूचना.

          प्रश्नपत्रिका ते निकाल प्रक्रिया : प्रश्नपत्रिका तयार करणे, मॉडरेशन, डिजिटल अथवा मुद्रित वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, प्रतिसाद नोंदणी, मूल्यांकन व निकाल प्रक्रियेतील सुरक्षा उपाय.

          माहिती तंत्रज्ञानाचा वापर : डिजिटल प्रणाली, बायोमॅट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल्स, सीसीटीवी देखरेख व इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.

          गैरप्रकारांना प्रतिबंध : पेपरफुटी, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाय व उत्तरदायित्व निश्चित करण्याबाबत सूचना.

          उत्कृष्ट पद्धतींचा अभ्यास : इतर राज्यातील अथवा देशांतील यशस्वी, आधुनिक व सुरक्षित परीक्षा प्रणालींचा अभ्यास करून त्यातील उपयुक्त पद्धती महाराष्ट्रात लागू करण्याबाबत सूचना.

           परीक्षा केंद्रांसाठी किमान मानके : परीक्षा केंद्रांची निवड, पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, आवश्यक मनुष्यबळ व कार्यसज्जतेबाबत किमान मानके निश्चित करण्याबाबत अभिप्राय.

          संस्थात्मक समन्वय : जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग व परीक्षा घेणाऱ्या संस्था यांच्यामध्ये प्रभावी समन्वयाची चौकट निर्माण करण्याबाबत सूचना.

          तक्रार निवारण प्रणाली : उमेदवारांसाठी जलद, पारदर्शक व प्रभावी तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करून परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ करण्याबाबत सूचना.

          जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावतीमार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय यांचे संकलन करून ते शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येतील. समिती या सर्व सूचनांचा सखोल अभ्यास करून राज्य शासनास भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी आपला सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे.

          राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत अमरावती विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, आपली सूचना - अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह भरती प्रक्रियेसाठीचे महत्त्वपूर्ण पाऊल! आहे असे आवाहन विभागीय आयुक्त, अमरावती यांनी केले आहे.

 

00000

 

१७ सप्टेंबर रोजी भरती परीक्षा सुधारणांसाठी

उच्चस्तरीय टास्क फोर्सचा संवाद

विद्यार्थी,उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद

 

          अमरावती, दि. ८ : भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स येत्या १७ सप्टेंबर रोजी अमरावती येथे येणार आहे. या भेटी दरम्यान टास्क फोर्स् सदस्य हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार आहेत.


            राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. या कार्यक्रमांतर्गत स्टास्क फोर्स १७ सप्टेंबर २०२६ रोजी अमरावती येथे  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संवाद साधणार आहेत. या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. 

amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय पाठवू शकतात.

          टास्क फोर्स येत्या १२ ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्यातील ६ महसुली विभागाला भेट देणार असून  या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.                                                                

0000

#भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR #भरतीपरीक्षा #परीक्षासुधारणा #परीक्षासुरक्षा #पारदर्शकभरती #स्पर्धापरीक्षा #महाराष्ट्रशासन #taskforce


भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद

 

·         सहा विभागांना याच महिन्यात भेटी

·         विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद

 

            मुंबई, दि. ७ : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. 

            या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. 


*टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक*

 

पुणे विभाग  १२ सप्टेंबर २०२६

स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

नागपूर विभाग  १६ सप्टेंबर २०२६

स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर

ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

अमरावती विभाग  १७ सप्टेंबर २०२६

स्थळ : अमरावती

ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

छत्रपती संभाजीनगर विभाग  २१ सप्टेंबर २०२६

स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर

ई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

कोकण विभाग  २९ सप्टेंबर २०२६

स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई

ई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

नाशिक विभाग  ३० सप्टेंबर २०२६

स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक

ई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात. 

            या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील. 

            भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

0000

 


 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी दि. १ सप्टेंबर २०२६ ते दि. १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. यासाठी विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा.


ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रांचा एक संच सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर, नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई – ४०००७१, येथे जमा करावा.

महाविद्यालय स्तरावर या योजनांसाठी पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, तसेच महाविद्यालयांनी याबाबत पात्र विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती देऊन त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

 इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षणासाठी जिल्हानिहाय शासकीय वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ करिता शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.



मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई उपनगर, चौथा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर. सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई – ४०००७१. यांनी केले आहे.

#शासकीयवसतिगृह

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

 

राजधानीत राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 

            नवी दिल्ली, दि. 7 : ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करून महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ रोवणारे अग्रणी योद्धे उमाजी नाईक यांच्या जयंतीदिनी कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. निवासी आयुक्त व सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

 

            यावेळी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक सारिका शेलार, प्रमोद कोलपते यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उमाजी नाईक यांना अभिवादन केले.

 

 यावेळी व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी उमाजी नाईक यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी दिलेला सशस्त्र लढा, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी केलेला संघर्ष तसेच त्यांच्या शौर्याची माहिती दिली.

0000



#mahadgipr See less See less
See less