शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

 विशेष लेख :

माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा

महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत माती आणि पाणी या दोन नैसर्गिक संसाधनांचे अनन्यसाधारण महत्व आहे. शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा थेट संबंध या दोन्ही घटकांशी आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन आणि पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती व्यापक लोकचळवळ बनणे ही काळाची गरज आहे. याच विचारातून राज्यात यंदा २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस त्यांच्या जलसंधारणविषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरणार आहे.

दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यासमोरील दुष्काळ आणि पाणीटंचाईचे आव्हान केवळ मोठ्या धरणांच्या माध्यमातून सोडविता येणार नाही, हे ओळखले. पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे, तो जमिनीत मुरविणे आणि स्थानिक पातळीवरील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे, या भूमिकेतून त्यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र दिला. पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण, पाझर तलाव, गाव तलाव, नाला बांध, माती बंधारे आणि अन्य छोट्या जलसंधारण संरचनांवर त्यांनी भर दिला. जलसंधारणाला स्वतंत्र प्रशासकीय दिशा देत त्यांनी या विषयाला लोकसहभागाची जोड दिली.

१९९१ ते १९९३ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आजही दिशादर्शक ठरतात. ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती आणि जलसंधारणाची कामे यांची सांगड घालून त्यांनी जलस्रोत निर्मितीला चालना दिली. जलसंधारण हे केवळ अभियांत्रिकीचे काम नसून गावागावातील नागरिकांच्या सहभागातून उभे राहणारे अभियान आहे, ही भूमिका त्यांच्या कार्यातून स्पष्ट झाली. आज जलयुक्त शिवार, भूजल पुनर्भरण, पाणलोट विकास यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसून येते.

            याच योगदानाची दखल घेत दिवंगत सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन १० मे हा २००३ पासून जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जात होता. मात्र, स्मृतिदिनाऐवजी जन्मदिवस अधिक उत्साहपूर्ण आणि लोकसहभागातून साजरा व्हावा, या विचारातून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विभागातील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित घटकांशी चर्चा करून २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यास मान्यता दिल्यानंतर शासनाने त्याबाबतचा निर्णय घेतला. त्यामुळे यापुढे दरवर्षी २१ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्राच्या जलसंधारण चळवळीचा महत्त्वपूर्ण दिवस ठरणार आहे.

                                                       व्यापक जनसहभागाची जोड

यंदाचा जलसंधारण दिन केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता त्याला व्यापक जनसहभागाची जोड देण्यात आली आहे. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था आणि विविध प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या अभियानातील सर्वात आकर्षक उपक्रम म्हणजे ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’. २१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकाच वेळी तीन किलोमीटरची महा वॉकेथॉन आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान दहा हजार नागरिकांच्या सहभागाचे उद्दिष्ट असून, राज्यभरातून तीन लाखांहून अधिक नागरिक प्रत्यक्ष सहभागी होण्याची अपेक्षा आहे. नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी, महिला, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, ‘माय भारत’, क्रीडा संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योग क्षेत्र, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

ही केवळ चालण्याची स्पर्धा नसून जलसंधारणासाठी जनजागृतीची सामूहिक पावले आहेत. वॉकथॉनच्या प्रारंभी सहभागी नागरिकांकडून मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेतली जाणार आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, मातीची धूप रोखणे, पावसाचे पाणी अडविणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करणे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा यंदाच्या अभियानाचा मुख्य संदेश आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेशही या चळवळीला दिशा देणार आहे.

युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी डिजिटल माध्यमांचाही प्रभावी वापर करण्यात येणार आहे. ‘रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ या उपक्रमातून १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींना मृद व जलसंधारणाचा संदेश सर्जनशील पद्धतीने मांडण्याची संधी मिळणार आहे. ३० ते ६० सेकंदांच्या इन्स्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून मातीची धूप, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळी, बंधारे, वृक्षारोपण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांवर संदेश देता येणार आहे. अभिनय, संगीत, विनोद, लघुपट, ॲनिमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन दृश्ये किंवा अन्य नाविन्यपूर्ण माध्यमांचा वापर करून युवकांना आपली कल्पकता सादर करता येणार आहे. #SaveSoilSaveWater हा अधिकृत हॅशटॅग वापरून राज्यभरातून मोठ्या प्रमाणात रिल्स तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

जलसंधारणाचा संस्कार पुढील पिढीवर व्हावा यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्येही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. निबंध, चित्रकला, पोस्टर, वादविवाद स्पर्धा, जलसंधारणाची शपथ, ‘एक शाळा–एक शोषखड्डा’, जलमित्र किंवा जलदूत घोषित करणे अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना जलसंधारणाशी जोडले जाणार आहे. २१ ऑगस्ट रोजी दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या जलसंधारणविषयक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

अभियानाच्या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागात प्रत्यक्ष जलसंधारणाच्या कामांनाही गती दिली जाणार आहे. विविध योजनांतर्गत कामांचे भूमीपूजन, लोकार्पण आणि जलपूजन, शेततळी व जलस्रोतांची पाहणी, अमृत सरोवरांच्या परिसरात वृक्षारोपण, नाला, तलाव, विहीर आणि पाझर तलावांची लोकसहभागातून स्वच्छता अशा उपक्रमांवर भर दिला जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, अमृत सरोवर आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक यांसारख्या उपक्रमांची माहितीही जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

जलसंधारणाच्या कामात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव, लोकसहभागातून श्रमदान, जलस्रोतांचे संवर्धन आणि जनजागृती या माध्यमातून शासन आणि समाज यांच्यातील सहभाग अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर समन्वय साधून कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

            आज हवामान बदल, अनियमित पाऊस, वाढते तापमान, भूजल पातळीतील घट आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे जलसुरक्षेचे आव्हान अधिक गंभीर झाले आहे. अशा परिस्थितीत सुधाकरराव नाईक यांनी दशकांपूर्वी दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश अधिकच महत्त्वाचा ठरतो. जलसंधारणाची कामे किती झाली यापेक्षा ती किती परिणामकारक ठरली, पाणी किती काळ टिकले आणि पुढील पिढीसाठी आपण किती जलसाठा निर्माण केला, हा खरा प्रश्न आहे.

            मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती असून त्यांचे संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.

२१ ऑगस्टचा ‘जलसंधारण दिन’ त्यामुळे केवळ एका महान नेत्याच्या स्मरणाचा दिवस न राहता महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी सामूहिक संकल्पाचा दिवस ठरला पाहिजे. सुधाकरराव नाईक यांना खरी आदरांजली त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात नाही, तर त्यांच्या विचारांना कृतीची जोड देण्यात आहे. प्रत्येक गावात जलस्रोत जपला, प्रत्येक शेतात पाण्याचा थेंब अडविला, प्रत्येक शाळेत जलसंधारणाचा संस्कार रुजविला आणि प्रत्येक नागरिकाने पाण्याची जबाबदारी स्वीकारली, तरच ‘जलसंधारण दिना’चा खरा उद्देश साध्य होईल.

माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर जीवन सुरक्षित राहील आणि लोकसहभाग वाढला तर महाराष्ट्र जलसंपन्न बनेल. चला, सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणाच्या विचारांना कृतीची जोड देऊया—‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा!’‍

-गजानन पाटील,

विभागीय संर्पक अधिकारी,

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई

                                         0000

 

 


मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यव्यापी महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ, युवकांसाठी लघुचित्रफीत स्पर्धा,शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. 'महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर' मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला असून हा क्यूआर कोड स्कॅन करुन नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

 


विशेष लेख

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर

·         २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन

 

शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे असून मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची थीम सेव सॉईल, सेव वॉटर, सेक्युअर टूमारो ( Save Soil, Save Water, Secure Tomorrow) अशी असून पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी कमाल ३ किलोमीटर (महा वॉकेथॉन) चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे.

शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात  १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान "जलसंधारण अभियान" आयोजित करण्यात येत आहे. तर २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे आयोजन करुन जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी हे असणार आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सर्व मंत्री, सर्व राज्यमंत्री, राज्यसभा/ लोकसभा/ विधानपरिषद/ विधानसभा सदस्य, सर्व जिल्हापरिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष, सर्व महापौर / उपमहापौर, सर्व नगराध्यक्ष/उपनगराध्यक्ष, सर्व जिल्हापरिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत सदस्य, सर्व महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, सर्व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठित व्यक्ती / डॉक्टर / कलाकार/ उद्योजक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब सदस्य, लायन्स क्लब सदस्य, रनिंग क्लब सदस्य, सायकलिंग क्लब सदस्य, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार कंपन्या, विविध क्रीडा संघटना, गुड मॉर्निंग ग्रुप्स, विविध व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था, महिला, राज्याचे नागरिक यांना सहभागी करण्यात येणार आहे.

क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी

महा वॉकेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तर प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

जलसंधारण सप्ताह

१५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इनस्टाग्राम (Instagram) च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी "Reel for Soil and Water Conservation" स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. याची थीम  Save Soil, Save Water, Secure Tomorrow अशी असून सोशल मीडियावर #SaveSoil Save Water हे हॅशटॅग वापरण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे एकाच हॅशटॅगखाली विक्रमी संख्येने रील्स तयार होऊन मोठ्या डिजिटल सहभागाची नोंद होणार आहे.

रील स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आली असून  या स्पर्धेचा पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे असा ठेवण्यात आला आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी. व्हिडीओ/ रीलच्या सुरुवातीला व्हिडीओ / रीलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद सहभागी स्पर्धकांनी करणे आवश्यक आहे. स्पर्धाकांने Reel स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. स्पर्धकांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहील. यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil Save Water वापरणे अनिवार्य राहणार आहे.

स्पर्धेसाठी मान्यता दिलेला एक अधिकृत QR Code तयार करण्यात येईल. QR Scan केल्यानंतर नोंदणी Reel Link Submit जिल्हा निवड Verification सहभाग प्रमाणपत्र अशी सोपी प्रक्रिया असणार आहे. Instagram हॅशटॅगबरोबर स्वतंत्र डिजिटल नोंदणी केल्यामुळे शासनाकडे प्रत्येक सहभागीची अधिकृत नोंद उपलब्ध राहणार आहे. रील्स अपलोड करण्याचा कालावधी १५ ते २१ ऑगस्ट २०२६ असा आहे.

रील्स बनवण्यासाठी विषय

माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य असे रील्स बनवण्यासाठी विषय देण्यात आले आहेत.

रील्स बनवितांना Storytelling, Acting, Music, Dance, Animation, Al Creative, Comedy, Short Film, Before-After, Drone Visuals किंवा अन्य नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करता येणार आहे.  मात्र रीलचा मुख्य संदेश माती आणि पाणी संवर्धनाशी संबंधित असणे आवश्यक राहणार आहे.

रील्स करिता गुणांकन पद्धती पुढील प्रमाणे असणार आहे. विषय व संदेश - ३० गुण, कल्पकता -२५ गुण, प्रभावी सामाजिक संदेश - २० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता - १५ गुण, Instagram Engagement - १० गुण असे एकूण - १०० गुण असणार आहेत.  केवळ Likes किंवा Followers वर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media Engagement या दोन्हींचा समतोल ठेवण्यात येणार आहे. गुणांकानुसार विजेत्याची निवड करण्यात येईल.

संपूर्ण राज्यासाठी एकच अधिकृत हॅशटॅग #SaveSoilSaveWater वापरण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५०ल्स आणि राज्यभरातून १० हजार रिल्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत डिजिटल स्वरूपात मृद व जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. ल स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात प्रथम पुरस्कार २५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार १५ हजार व

 

गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार १० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष युवा मृद-जलदूत म्हणून गौरविण्यात येणार आहे

"एक Reel... मातीसाठी !, एक Reel... पाण्यासाठी !, एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी !" हा रील्स प्रचारासाठी मुख्य संदेश आहे.

 

जलसंधारण अभियान

या स्पर्धेसोबतच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या जलसंधारण अभियानादरम्यान राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा (जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे महत्व, जल है तो कल है, जलसंवर्धन उपाय, घरातील पाण्याचा वापर - Water Budget), चित्रकला / पोस्टर स्पर्धा- जलसंवर्धन उपाय, पाणी बचत उपाय, Rainwater Harvesting., वाद-विवाद स्पर्धाः (विषय- जलसंधारण शासनाची जबाबदारी कि जनतेची जबाबदारी, इतर विषय), एक शाळा- एक शोषखड्डा उपक्रम राबविणे, सर्व शाळांमध्ये पाणी बचतीचे महत्व विद्यार्थांना सांगणे., जलमित्र / जलदूत घोषित करणे, २१ ऑगस्ट रोजी शाळेत माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणे, २१ ऑगस्ट रोजी मृद व जलसंधारणाची शपथ घेणे, २१ ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र / सन्मानचिन्ह / पुरस्कार वितरण करणे, २१ ऑगस्ट रोजी गावातील किंवा शहरातील जलतज्ञ/प्रतिष्ठीत व्यक्ती यांना प्रमुख पाहूणे म्हणून आमंत्रित करणे असे कार्यक्रम घेण्यात यावेत.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना आणि उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मृद व जलसंधारण विभागाचे पुढील सोशल मीडिया अकाऊंट आहेत.

Instagram - https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en

Facebook - https://www.facebook.com/mahawalkathon2026/

Twitter- https://x.com/MahaWalkathon26

 

संकलन – गजानन पाटील,

विभागीय संपर्क अधिकारी,

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.

0000


 


महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटरउपक्रमात

सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा

-मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

 

मुंबई,दि. १३ : मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यव्यापी महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ, युवकांसाठी लघुचित्रफीत स्पर्धा,शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला असून हा क्यूआर कोड स्कॅन करुन नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन  मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

 

            जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआरआधारित ऑनलाईन नोंदणी गरजेची आहे. तसेच २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात. १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि त्यानंतर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे.

 

१५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इन्स्ट्राग्राम (Instagram) च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी "Reel for Soil and Water Conservation" स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याची थीम  Save Soil, Save Water, Secure Tomorrow अशी असून सोशल मीडियावर #SaveSoil Save Water हे हॅशटॅग वापरण्यात यावे. यामुळे एकाच हॅशटॅगखाली विक्रमी संख्येने रील्स तयार होऊन मोठ्या डिजिटल सहभागाची नोंद होणार असल्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

 

या स्पर्धेचा पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे असा ठेवण्यात आला आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी. व्हिडीओ/ रीलच्या सुरुवातीला व्हिडीओ / रीलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद सहभागी स्पर्धकांनी करणे आवश्यक आहे. स्पर्धाकाने रील स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. स्पर्धकांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहील. यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil Save Water वापरणे अनिवार्य राहणार आहे.

 

मृद व जलसंधारण विभागाचे Instagram – https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en , Facebook - https://www.facebook.com/mahawalkathon2026/, Twitter https://x.com/MahaWalkathon26  सोशल मीडिया अकाऊंट आहेत असे त्यांनी सांगितले.

0000

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२६

 15 ते 21 ऑगस्टदरम्यान 'जलसंधारण सप्ताह'; विविध उपक्रमांचे आयोजन

 

21 ऑगस्टला 'वॉक फॉर वॉटर' वॉकेथॉनचे आयोजन ;

जिल्हाधिकाऱ्यांचे  नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

 

जलसंधारणावर आधारित सर्वोत्कृष्ट 'रील्स' बनवणाऱ्यांना

25 हजार रुपयांपर्यंतची  पारितोषिके

 

अमरावती, दि.13 : जिल्ह्यात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 21 ऑगस्ट रोजी ‘वॉक फॉर वॉटर -वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले असून नागरीकांनी मोठया संख्येत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. युवा पिढीच्या कल्पकतेला मंच उपलब्ध करून देत जलसंधारणावर आधारीत रील्ससाठी आकर्षक पारितोषिकही प्रदान करण्यात येणार आहेत.

 

मृद व जलसंधारण विभागामार्फत संपूर्ण राज्यात 15 ते 21 ऑगस्ट या कालावधीत 'जलसंधारण सप्ताह' राबविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील आयोजनाच्या पूर्व तयारीसाठी  जिल्हाधिकारी आशिष  येरेकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात  जलसंधारण सप्ताह अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध उपक्रमांची घोषणाही केली. या अंतर्गत ‘पाणी बचत’ आणि ‘जलसंधारणाचा व्यापक संदेश देण्या’साठी  21 ऑगस्ट  रोजी 'वॉक फॉर वॉटर' ही विशेष वॉकेथॉन आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिक, तरुण, विद्यार्थी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

युवा पिढीला या अभियानात जोडण्यासाठी आणि जलसंधारणाचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया 'रील्स स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. जलसंधारणावर आधारित सर्वोत्कृष्ट रील्स तयार करणाऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे  25 हजारांचे प्रथम पारितोषिक, 15 हजारांचे द्वितीय तर 10 हजारांचे तृतिय पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार  असल्याचे श्री. येरेकर यांनी सांगितले.

 

जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात वृक्षलागवड, श्रमदान, जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये व वॉकेथॉनमध्ये  हिरिरीने सहभागी होऊन जलसंधारण सप्ताह यशस्वी करण्याचे आवाहन श्री. येरेकर यांनी केले आहे.

00000

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

 



वर्षा निवासस्थान, मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची बैठक झाली. महाराष्ट्रास‍‍ह देशभरातील युवकांना क्रीडा, नवोन्मेष, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे राष्ट्रीय स्तरावरील ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-२०२६’ हा तीन दिवसीय भव्य युवा महोत्सव आयोजित असून युवकांना एकत्र आणणारा हा दुवा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यामध्ये सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून युवक सहभागी होतील. प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून सुमारे ३० ते ३५ तर एकूण सुमारे एक हजार प्रतिनिधी सहभागी होतील. यामध्ये महाराष्ट्राचे ३०० प्रतिनिधी, तर इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून ७०० प्रतिनिधी सहभागी होतील. याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

हे संमेलन भारताच्या युवा शक्तीला क्रीडा, नवोन्मेष आणि संस्कृतीच्या माध्यमातून एकत्र आणणारा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम म्हणून प्रस्तावित आहे. यातून युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, नवोन्मेष व उद्योजकतेला चालना देणे, देशाची सांस्कृतिक विविधता साजरी करणे, आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्याचाही उद्देश आहे. याची संकल्पना ‘वॉरिअर, फ्युचर आणि कल्चरल असा तीन अनुभव क्षेत्रांमध्ये करावी. या महोत्सवासाठी पूर्णपणे डिजिटल नोंदणी विकसित करावी. ‘खेलो इंडिया’अंतर्गत केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार असल्याने महाराष्ट्राने केंद्राच्या योजनांमध्ये प्रभावी सहभाग घेण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रात खासगी क्षेत्राची गुंतवणूक आणि सार्वजनिक खाजगी भागीदारीवर भर देण्याबरोबर क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील क्रीडा फाउंडेशनशी समन्वय साधण्याबाबत चर्चा करावी. महाराष्ट्राला आगामी दशकात क्रीडा क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी शासकीय प्रयत्नांसोबतच खासगी क्षेत्राची भागीदारी आवश्यक आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त दीपक सिंगला आदी उपस्थित होते.

#राष्ट्रीययुवासंमेलन
#पुणे
#राष्ट्रीययुवामहोत्सव
#ViksitBharatYuthConclave2026