मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६' या ऐतिहासिक कायद्याच्या अनुषंगाने तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

या कायद्याच्या तरतुदी सर्वसामान्य नागरिक, महिला शेतकरी; तसेच संबंधित यंत्रणांना सहज समजाव्यात, यासाठी ही माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. असा कायदा करणारे #महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या सर्व विधेयकाची माहिती या पुस्तकात आहे.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह उपस्थित होते.

#महाराष्ट्रशासन
#महिलाशेतकरीविधेयक
#कृषीविभाग
#माहितीपुस्तिका
#महिलाशेतकरी

 

समाजकारण- राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

           


            मुंबई, दि.४:- शिक्षण, सहकार क्षेत्रातील कार्याने समाजकारण, राजकारणात भरीव योगदान देणारे आणि या क्षेत्रातील अनेक संस्थांचे आधारवड ठरलेले कार्यतपस्वी नेतृत्व पद्मश्री डॉ डी. वाय पाटील यांच्या निधनाने काळाने हिरावून नेले आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. पाटील यांच्या निधनामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

             शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. पाटील यांनी ज्ञानदेव या आपल्या नावाप्रमाणेच ज्ञानाची आराधना केली. शिक्षण क्षेत्रालाच आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. एका छोट्याशा शाळेपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. सुमारे दोनशे संस्था, विविध प्रकारची आठ विद्यापीठे आणि हजारो विद्यार्थी, असा त्यांच्या कार्याचा विस्तार झाला. विशेषत: वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्चर अशा वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांची महाविद्यालये आणि आधुनिक सुविधांच्या उभारणीतून त्यांनी आपल्या शैक्षणिक समुहासोबतच महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला. या महाविद्यालयांच्या माध्यमातून वैद्यकीय सोयी सुविधा आणि आरोग्य सेवेचे जाळे विस्तारले. राजकारणातही त्यांनी काम केले. ते दोनदा विधानसभा सदस्य होते. पण डॉ. पाटील रमले शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात. यातून त्यांनी अनेक भव्य दिव्य अशी शैक्षणिक संकुले, डॉ डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय स्टेडियमसारखे प्रकल्पही साकारले. डॉ. पाटील हे सहकार, शिक्षण, सांस्कृतिक  साहित्यिक आणि सामाजिक चळवळीचे आधारवड होते. त्यांनी आयुष्यभर शिक्षण, सेवा आणि विनम्रतेची मूल्ये जपली. 'अहंकार म्हणजे जीवनाचा मृत्यू; तर अहंकाराचा मृत्यू म्हणजेच खरे जीवन' हा त्यांचा विचार त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचे प्रतिबिंब होता. त्यांनी रुजवलेली शिक्षणसेवेची परंपरा, विनम्रतेचा आदर्श आणि समाजहिताची मूल्ये कायम प्रेरणादायी राहतील. त्यांच्या जाण्याने एका दूरदर्शी शिक्षणमहर्षीचा अंत झाला असला, तरी त्यांचे विचार आणि कार्य पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहतील. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे त्यांच्याशी निगडित अनेक समूह, संस्थांवर शोकमग्न झाल्या आहेत. डॉ. पाटील यांच्या परिवारावर दुःखाचा आघात झाला आहे, या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळावी, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो, असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

0000

 

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 



          शिक्षणाची गुणवत्ता, मातृभाषेचे संवर्धन, इतिहासाची समृद्ध परंपरा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा यांचा समतोल साधत राज्य शासन विद्यार्थीकेंद्रित शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून राष्ट्रीय स्तरावरही महाराष्ट्राचे शालेय शिक्षण महत्त्वपूर्ण स्थान राखून आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगाने पाठ्यक्रमाचा समावेश करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाचा आढावा घेतला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी व शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

          मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र पीजीआय 2.0 मध्ये देशात दुसऱ्या स्थानावर कायम आहे. राज्यात पीएम श्री शाळांसह सर्व शाळांमधून चांगले शिक्षण दिले जात आहे. शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्यातील विद्यार्थ्यांचे शालेय आधार प्रमाणीकरण, आरटीईद्वारे 35 लाख विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेचा लाभ, पवित्र पोर्टल, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, यांसह विविध शैक्षणिक उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती घेतली. 

          राज्य शासनाने शाळांमध्ये नशाविरोधी मार्गदर्शक व समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा आणि 'ड्रग-फ्री स्कूल' अभियान राबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शाळांमधील सुरक्षा, सायबर फसवणूक आणि अमली पदार्थ प्रतिबंधासाठी प्रभावी व कठोर उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

 

#शालेयशिक्षण

#SchoolEducation

  

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण

पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन



 

          अमरावती/मुंबई दि.४: आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले.

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्रशांत इंगळे यांच्यासाठी २ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून १९ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक मदतही उपलब्ध झाली. त्यामुळे एकूण २१ लाख ६० हजार रुपयांचा निधी उभारला गेला आणि अत्यंत खर्चिक असलेले यकृत प्रत्यारोपण शक्य झाले.

          प्रशांत इंगळे हे अकोला येथे केबल टाकण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी, महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी आणि दहावीत शिकणारा मुलगा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ दरम्यान त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अकोला आणि नागपूर येथे झालेल्या वैद्यकीय तपासण्यांनंतर त्यांचे यकृत गंभीररीत्या निकामी होत असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र, लाखो रुपयांचा उपचार खर्च कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेबाहेर होता.

          अशा कठीण परिस्थितीत पत्नी वर्षा इंगळे यांनी कुटुंबीयांसह अकोल्याच्या आमदारांची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती देत मुंबईत उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. नाईक यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच टाटा ट्रस्टकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रभावी पाठपुरावा केला.

          या आर्थिक सहाय्यामुळे २५ जून २०२६ रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याने १३ जुलै २०२६ रोजी प्रशांत इंगळे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते हळूहळू पूर्णपणे बरे होत आहेत.

          वेळेवर मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे आपल्याला नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त करत इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक तसेच टाटा ट्रस्ट यांचे मनःपूर्वक आभार मानले.

प्रतिक्रिया------------

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचा उपचार पैशांअभावी थांबू नये, या उद्देशाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. त्याच भावनेतून प्रशांत इंगळे यांना वेळेत आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून देता आली, याचा आम्हाला आनंद आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

-रामेश्वर नाईक

कक्ष प्रमुख

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष

                                                                  00000 

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

 विभागीय आयुक्तालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन


अमरावती, दि. 03 : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.


#KrantisinhNanaPatil #Amravati #Maharashtra


 

ऐतिहासिक निर्णय : शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना

खाजगी प्रॅक्टिस बंदी कायम

 


          मुंबई, दि. २ : मा. उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी ३० जुलै २०२६ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी वैद्यकीय व्यवसाय (Private Practice) करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तयेच या विषयासंदर्भातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत.

          मा. न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले की, शासन सेवेत कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा नियम व शासनाच्या धोरणानुसार बांधील असून, त्यांनी पूर्णवेळ शासकीय सेवा बजावणे अपेक्षित आहे. त्यामुळे शासकीय सेवेत असताना खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

          या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून, ग्रामीण व शहरी भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि रुग्णसेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

          या महत्त्वपूर्ण प्रकरणात शासनाच्या वतीने सहायक शासकीय अभियोक्ता अतुल काळे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तसेच, आरोग्य विभागाचे विधी सल्लागार ॲड. सतीश भेंडेकर यांनी कायदेशीर मुद्द्यांची मांडणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व समन्वय साधून शासनाच्या बाजूला परिपूर्ण सहकार्य केले.

          कायदेतज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या मते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, शासकीय सेवेतील शिस्त, उत्तरदायित्व आणि रुग्णहिताला प्राधान्य देणारा हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

0000

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती



 

       नागपूर, दि. २ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘रामगिरी’ येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.

          विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना व्यसनमुक्त, निरोगी आणि सक्षम युवा शक्ती घडविण्याचा संकल्प या अभियानाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. युवकांनी अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहून शिक्षण, कौशल्य, क्रीडा आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. व्यसनमुक्त भारत आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन, शैक्षणिक संस्था, पालक, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

          ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ हे अभियान युवकांमध्ये अमली पदार्थांविरोधात जनजागृती निर्माण करून त्यांना सकारात्मक, निरोगी आणि जबाबदार जीवनशैलीकडे प्रेरित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे.

००००००

·          

 

केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख ९ हजार कोटींचे कर वितरण; महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी

 


          नवी दिल्ली, दि. १ : राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी देत विकासकामांना अधिक गती मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने  आज सर्व राज्यांना १ लाख ९ हजार  कोटी रुपयांच्या कर वितरणाची अतिरिक्त अग्रीम हप्ता वितरित केला आहे.राज्यनिहाय वाटपानुसार, महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे.

          केंद्र शासनाने ही रक्कम १० ऑगस्ट  रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त वितरित केली आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसेच प्राधान्याच्या लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. यामुळे विकासकामांच्या अंमलबजावणीला गती मिळण्यास आणि निधी नियोजन अधिक सक्षमपणे करण्यास मदत होणार आहे.

          महाराष्ट्राला प्राप्त ७ हजार २२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीमुळे राज्यातील विविध विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक चालना मिळणार आहे.

००००

 


 विभागीय आयुक्तालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन



अमरावती, दि. 1 : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी अपर आयुक्त संजय जाधव, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

*****

 संवेदनशीलता आणि शिस्तीतून लोकाभिमुख प्रशासन घडवा

                                           - विभागीय आयुक्त नयना गुंडे

* अमरावती विभागात 'महसूल दिन' उत्साहात साजरा

* उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार



अमरावती, दि. 01 : महसूल विभाग हा संपूर्ण शासनाचा कणा आणि मुख्य चेहरा आहे. सामान्य जनता शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूल प्रशासनाकडे पाहते. त्यामुळे या विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या वर्तनात शिस्त, संवेदनशीलता आणि सहानुभूती आणून लोकाभिमूख प्रशासन घडवावे, असे विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी आज येथे सांगितले.

1 ऑगस्ट 'महसूल दिना' निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी से.नि. अपर आयुक्त सुरज वाघमारे, अपर आयुक्त संजय जाधव, अपर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह विभागातील पुरस्कारार्थी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे म्हणाल्या की, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांचा थेट संपर्क या विभागाशी येतो. 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजऱ्या होणाऱ्या महसूल सप्ताहाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत जलदगतीने पोहोचवावा. महसूल विभागात होत असलेले नवनवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल बदल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वेगाने स्वीकारून अधिक पारदर्शक व लोकाभिमुख काम करावे. डिजिटल सेवांचा प्रभावी वापर करून नागरिकांना सुलभ व पारदर्शक सेवा देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. महसूल विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या योजनांच्या फलश्रुतीची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनजागृती व प्रसिद्धी द्यावी.

त्या पुढे म्हणाल्या की, सध्या 'एल निनो'च्या परिणामांमुळे अत्यंत कमी दिवसांत अधिक पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती विभागात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी येथील आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि बचाव पथकांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आपत्तीच्या काळात जिवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांचा (Social Media) वापर करताना अत्यंत काळजी घ्यावी. आपल्या कोणत्याही कृत्याने शासनाची प्रतिमा डागाळणार नाही याची दक्षता बाळगावी.

सामान्य जनतेच्या प्रत्येक प्रश्नांचे निराकरण करणारा महसूल विभाग हा एकमेव विभाग आहे. नागरिकांच्या जीवनात विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी जबाबदारीपूर्वक कार्य करावे, असे से. नि. अपर आयुक्त सुरज वाघमारे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

योजना, धोरण, उपक्रम, शासन निर्णयांची अंमलबजावणी व महसूल गोळा करण्याचे महत्वपूर्ण कार्य करुन देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण भूमिका निभावणारा विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहीले जाते, असे उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनी सांगितले.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सुरज वाघमारे (अपर आयुक्त), संतोष आठरे (तहसीलदार), मधुकर धुळे (नायब तहसीलदार), संतोष चव्हाण (निम्नश्रेणी लघुलेखक), उषा गवई (अव्वल कारकून), शशिकांत पाचघरे (महसूल सहाय्यक), संतोष चव्हाण (वाहन चालक), श्रीमती माया राजवाडे (शिपाई) या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.  

तसेच विभागातील जिल्हाधिकारी कार्यालयातील गोविंद दाणेज (अपर जिल्हाधिकारी, अमरावती), शरद जावळे (उपविभागीय अधिकारी, अकोला), जीवन मोराणकर (तहसीलदार, चिखलदरा), अनिल वाडेकर (नायब तहसीलदार, वाशिम), श्रीमती विद्या गोमासे (लघुलेखक, यवतमाळ), अरुण कुकडे (सहा. महसूल अधि., अमरावती), कु. वर्षा ठाकरे (सहा. महसूल अधि. अकोला), चंद्रशेखर मनवर (मंडळ अधिकारी, वाशिम), श्रीमती अश्विनी फाटे (महसूल सहाय्यक, यवतमाळ), शैलेश घोगरे (ग्राम महसूल अधि, वाशिम), अतुल टाके (वाहनचालक, यवतमाळ), आकाश वानखडे (शिपाई, अमरावती), छत्रपती मडावी (महसूल सेवक, यवतमाळ), सौ. छायाबाई डहाके (पोलीस पाटील, वाशिम) या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.  

*******