बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६

 खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

·         महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम

·         पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित

 

मुंबई, दि. २५ : हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी माध्यमातून ' युवा कनेक्ट ' कार्यक्रमांतर्गत देशभरातील १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांना संबोधित करणार आहेत. युवा सहभाग, क्रीडा विकास आणि राष्ट्रनिर्माणावर भर देणाऱ्या या उपक्रमामुळे विविध भागांतील युवक एका समान राष्ट्रीय व्यासपीठावर जोडले जाणार आहेत, अशी माहिती मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या माय भारत -  महाराष्ट्र विभागाचे राज्य संचालक अमित पुंडे यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्रचे राज्य संचालक अमित पुंडे, माय भारत, मुंबईचे उपसंचालक अनूप इंगोले, भारतीय क्रीडा प्राधिकरण (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया - SAI) चे उपसंचालक माधव कांबळे उपस्थित होते.

अमित पुंडे म्हणाले,  महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मुंबई येथे आयआयटी, पवई येथे केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे येथे केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळ (जि. जळगाव) उपस्थित असतील.

माय भारत, भारतीय क्रीडा प्राधिकरण  आणि राष्ट्रीय सेवा योजना  यांच्या सहकार्याने देशभरात खेलो इंडिया संवाद आयोजित करण्यात येत आहे. भारतातील युवक, खेळाडू आणि क्रीडा व्यावसायिकांना एकत्र आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमध्ये युवा कनेक्ट आयोजित करण्यात येणार आहे. आयआयटी पवई, सिम्बॉयसिस आणि एम्स नागपूर  यांसारख्या संस्थांमध्येही हा उपक्रम राबविण्यात येईल.

कार्यक्रमात युवकांना खेळाडू, खासदार, आमदार, मंत्री आणि स्थानिक नेत्यांशी थेट संवाद साधता येणार आहे. तसेच भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासाठी आपले विचार आणि आकांक्षा मांडण्याची संधी मिळणार आहे. गेल्या १२ वर्षांतील भारताच्या क्रीडा परिसंस्थेतील परिवर्तनाचा प्रवास अधोरेखित करणे आणि युवकांच्या आकांक्षा जाणून घेणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

सहभागी युवकांना संकेत सरगर, स्वप्नील कुसाळे, रुझा भोसले, प्रीतम साळवे, फाल्गुनी पिल्लई आणि पूर्वा जाधव यांच्यासह नामांकित खेळाडूंशी संवाद साधता येणार आहे. या चर्चेत खेळाडूंचा क्रीडा प्रवास तसेच भारतीय क्रीडा पायाभूत सुविधा आणि क्रीडा परिसंस्थेत झालेल्या परिवर्तनावर चर्चा केली जाईल, असेही यावेळी पुंडे यांनी सांगितले.

युवा संवादात क्रीडा परिसंस्था मजबूत करणे, २०३६ ऑलिम्पिकसाठी वैज्ञानिक पद्धतीने प्रतिभा ओळखून खेळाडू विकसित करणे, युवा नेतृत्वाला शासन प्रक्रियेत अर्थपूर्ण सहभागासाठी प्रोत्साहन देणे आणि विकसित भारतासाठी युवकांना आवश्यक कौशल्ये, स्वयंसेवा व राष्ट्रनिर्माणाच्या संधींशी जोडणे या चार प्रमुख विषयांवर विचारमंथन होणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

युवकांच्या सूचना क्यूआर कोडद्वारे संकलित करून त्यांच्या कल्पना आणि विचारांची नोंद केली जाईल. सहभागींना कार्यक्रमस्थळी व्हीबीवायएलडी क्विझ मध्ये सहभागी होण्यासाठीही प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

00000





 दहीहंडी हा खेळ कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक मध्ये

नेण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि.२५ : गोविंदा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि मुंबईची ओळख आहे. प्रो गोविंदाच्या माध्यमातून हा खेळ संपूर्ण भारतासह जगात पोहोचला आहे. गोविंदाच्या या साहसी खेळाला अखिल भारतीय स्तरावर मान्यता मिळवून देत एशियाड, कॉमनवेल्थ आणि पुढे ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी  राज्य शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

प्रो गोविंदा लीग २०२६ सिझन ४ चा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  एसव्हीपी स्टेडियम, वरळी येथे पार पडला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे, आमदार रणजीत पाटील, लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, श्रीमती शायना एन. सी  उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवाला आधुनिक आणि व्यावसायिक क्रीडा स्पर्धेचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली प्रो गोविंदा लीग (पीजीएल) देशातील मानवी मनोरे रचण्याच्या खेळासाठीची पहिली व्यावसायिक लीग म्हणून ओळखली जाते.

 

दहीहंडी हा केवळ उत्सव नसून समाजाला एकत्र आणणारा आणि सामाजिक अभिसरणाचा संदेश देणारा उपक्रम आहे. गोविंदांनी एकमेकांना आधार देत मानवी साखळी तयार करून हंडी फोडण्याची परंपरा जपली आहे. भगवान श्रीकृष्णांनी दिलेला संपूर्ण समाज एक आहेहा संदेश या खेळातून अधोरेखित होतो. एकीच्या बळावर कोणत्याही संकटाचा सामना करता येतो आणि मोठे कार्य साध्य करता येते.

 

या खेळाला अखिल भारतीय स्तरावर ऑलिम्पिक असोसिएशन तसेच संबंधित क्रीडा संघटनांची मान्यता मिळवून देणे त्यानंतर हा खेळ एशियाड, कॉमनवेल्थ आणि अखेरीस ऑलिम्पिकपर्यंत नेण्याच्या दृष्टीने शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री यांनी सर्व गोविंदा पथके, त्यांचे प्रशिक्षक तसेच गोविंदांना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या.

 

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, दही - हंडी ( प्रो गोविंदा) खेळाला राज्य शासनाने साहसी खेळाचा दर्जा दिला आहे.  तसेच शासन २०२३ पासून गोविंदांना  विमा देत आहे.  यावर्षी गोविंदांची संख्या वाढवून एक लाख ६० हजार गोविंदा ना विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी १६ संघ आणि ३२०० गोविंदांनी सहभाग घेतला असून, तीन दिवस या स्पर्धा सुरू रहाणार आहेत.


 ईद ए मिलाद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ईद ए मिलाद निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला  ईद ए मिलाद हा सण त्यांच्या प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो. ईद ए मिलादच्या मंगल पर्वावर मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषतः मुस्लिम बंधु - भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 

आदिवासी विद्यार्थ्यांना अॅनिमियापासून मुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम

·         सीएसीआरसोबत करार; ७९,६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी

 मुंबई, दि. २५ : आदिवासी विद्यार्थ्यांमधील अॅनिमिया (रक्तक्षय) समस्येचे प्रभावीपणे निर्मूलन करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत अॅनिमिया निवारण कार्यक्रमराबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत दीड महिन्यात राज्यातील २०३ शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील ७९ हजार ६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

अॅनिमिया निवारण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने सिटिझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईट्स’ (सीएसीआर) या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या माध्यमातून आश्रमशाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन पातळी तपासण्यात येत आहे. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ३७ हजार ९१९ विद्यार्थी आणि ४१ हजार ७०५ विद्यार्थिनींचा समावेश आहे.

यामध्ये १४९ शासकीय आश्रमशाळांमधील ५५ हजार ८६८, ४८ अनुदानित आश्रमशाळांमधील २२ हजार ४२० तसेच ६ एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील १ हजार ३३६ विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली आहे.

नाशिक विभागात १०४ शाळांमधील ४१ हजार ४६९ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ८० शासकीय आश्रमशाळांतील ३१ हजार ३९३, २१ अनुदानित आश्रमशाळांतील ९ हजार २२७ आणि ३ एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील ८४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

ठाणे विभागात ८१ शाळांमधील ३३ हजार ४२६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ५९ शासकीय आश्रमशाळांतील २२ हजार ५४, १९ अनुदानित आश्रमशाळांतील १० हजार ८८५ आणि ३ एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील ४८७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

अमरावती विभागात ८ शासकीय आश्रमशाळांमधील १ हजार ८८५ आणि ३ अनुदानित आश्रमशाळांमधील १ हजार १३ विद्यार्थ्यांची, तर नागपूर विभागात २ शासकीय आश्रमशाळांमधील ५३६ आणि ५ अनुदानित आश्रमशाळांमधील १ हजार २९५ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून आले आहे, अशा विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राखण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

विभागनिहाय तपासणी झालेली विद्यार्थी संख्या

नाशिक ४१,४६९

ठाणे ३३,४२६

अमरावती ,८९८

नागपूर ,८३१

 आदिवासी विद्यार्थ्यांचे सुदृढ आरोग्य आणि दर्जेदार शिक्षण याला विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. अॅनिमिया निवारण कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील रक्तक्षयाची समस्या लक्षात घेऊन व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अवघ्या दीड महिन्यात ७९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण झाली असून, आवश्यकतेनुसार पुढील उपचार व पोषणात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. अशी माहिती आदिवासी विकास विभाग आयुक्त लीना बनसोड यांनी दिली.

0000

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

 #गणेशोत्सव२०२६ #उत्कृष्टगणेशोत्सवमंडळस्पर्धा #गणेशोत्सवमंडळस्पर्धा #महाराष्ट्रगणेशोत्सव #राज्यमहोत्सव #पर्यावरणपूरकगणेशोत्सव #सामाजिकबांधिलकी #गणेशोत्सव #महाराष्ट्रशासन See les



 #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६

#Maharashtra #MahaDGIPR See less
See less



 

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाणाच्या विविध योजनांसाठी

३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

        अमरावती, दि. २५ : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाण, कोलकाता यांच्या समान (Matching) व असमान (Non-Matching) निधी योजनांतर्गत सन २०२६-२७ साठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुक ग्रंथालयांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील प्रस्ताव संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे दि. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

            ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या माध्यमातून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अर्थसहाय्य योजना राबविण्यात येतात. या योजनांचे नियम, अटी तसेच अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाणाच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुक ग्रंथालयांनी तेथून अर्ज डाउनलोड करून भरावेत.

        सन २०२६-२७ साठी समान निधी (Matching) योजनेअंतर्गत इमारत बांधकाम व विस्तारासाठी कमाल २५ लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध आहे. या योजनेव्यतिरिक्त इतर समान निधी योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येणार असल्याने त्या योजनांसाठी प्रस्ताव सादर करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

        असमान निधी (Non-Matching) योजनांमध्ये ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर खरेदीसाठी ४ लाख रुपये तसेच इमारत बांधकामासाठी (प्रस्ताव फक्त एकदाच) १० ते १५ लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध आहे. तसेच "ज्ञान कोपरा" विकसित करण्यासाठी २.५० लाख रुपये व विशेष आधुनिकीकरणासाठी २ लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

            याशिवाय ग्रंथालयांच्या ५०, ६०, ७५, १००, १२५ आणि १५० व्या महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ६.२० लाख रुपये तसेच इमारत विस्तारासाठी १० लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध आहे. राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग आणि जनजागृती कार्यक्रमांच्या आयोजनासाठी १.५० लाख, २.५० लाख व ३ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असून "बालकोपरा" स्थापन करण्यासाठी कमाल ६.८० लाख रुपये अर्थसहाय्याचा लाभही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

            वरील योजनांपैकी कोणत्याही एका योजनेसाठी इच्छुक ग्रंथालयांनी आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत प्रस्ताव चार प्रतींमध्ये संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे दि. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर करावेत. तसेच हे प्रस्ताव राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाणाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारेही सादर करणे आवश्यक आहे.

            योजनांबाबत अधिक माहितीसाठी www.rrrlf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

 उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्र पुरस्कारासाठी

प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
अमरावती, दि. २५: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने "डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार" तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने "डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार" देण्यात येतात. या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील "अ", "ब", "क", "ड" वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे १ लाख रुपये. ७५ हजार रुपये. ५० हजार रुपये, २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.
राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रु. ५० हजार तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रु. २५ हजार इ. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.
सन २०२५-२६ या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असे आवाहन राज्य ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.


 राज्य महोत्सव गणेशोत्सवाच्या स्पर्धेत

अधिकाधिक गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा
विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे आवाहन
अमरावती, दि. २५ : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा 'राज्य महोत्सव' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, या अंतर्गत 'उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा' आता तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार या भव्य स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. अमरावती विभागातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
या स्पर्धेची माहिती पुढील प्रमाणे आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या ganeshostav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे विहित वेळेत दि. ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन सादर करावयाचा आहे. स्पर्धेसाठी पात्रता व अटी पुढील प्रमाणे आहेत या स्पर्धेत केवळ संबंधित यंत्रणेद्वारे नोंदणीकृत संस्था अथवा परवानाधारक गणेशोत्सव मंडळेच सहभागी होऊ शकतात. नवीन मंडळांना संधी देण्याच्या उद्देशाने, चालू आर्थिक वर्षाच्या मागील सलग दोन वर्षे राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय पारितोषिके प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यावर्षीच्या पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत. (सदरची अट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव मंडळांनाही लागू राहील). या स्पर्धेसाठी मंडळांनी केलेल्या कामाचा कालावधी मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशीपासून चालू वर्षाच्या अनंत चतुर्दशीपर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.
विविध स्तरांवरील विजेत्या मंडळांना खालीलप्रमाणे भरघोस रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. तालुका स्तर: प्रथम क्रमांक - २५ हजार रुपये, जिल्हा स्तर: प्रथम क्रमांक -५० हजार रुपये, द्वितीय क्रमांक -४० हजार रुपये, तृतीय क्रमांक - ३० हजार रुपये, राज्य स्तर: प्रथम क्रमांक - ७ लाख ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांक - ५ लाख रुपये, तृतीय क्रमांक- २ लाख ५० हजार रुपये राष्ट्रीय स्तर: प्रथम क्रमांक - ७ लाख ५० हजार रुपये द्वितीय क्रमांक- ५ लाख रुपये, तृतीय क्रमांक-२ लाख ५० हजार रुपये आंतरराष्ट्रीय स्तर: प्रथम क्रमांक- ७ लाख ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ५ लाख रुपये, तृतीय क्रमांक- २ लाख ५० हजार रुपये याव्यतिरिक्त, राज्यस्तरीय निवड समितीकडे आलेल्या ३६ जिल्हास्तरीय प्रथम विजेत्या मंडळांपैकी, राज्यस्तरावरील पहिले ३ विजेते वगळून उर्वरित ३३ मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० हजार रुपये चे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
उत्कृष्ट मंडळांची निवड करताना कलांचे जतन व संवर्धन, संस्कृतीचे जतन, निसर्गाचे व सार्वजनिक संपत्तीचे संवर्धन, सामाजिक कार्य आणि गणेशोत्सव आयोजनातील विधायकता (उदा. पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, महिलांचा ३० टक्के सहभाग इत्यादी) या १०० गुणांच्या निकषांवर परीक्षण केले जाईल.
स्पर्धेचे सविस्तर निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाच्या प्रक्रियेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयाचे सविस्तर अवलोकन करावे तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या अधिकृत संकेतस्थळाला ganeshostav.pldmka.co.in आवर्जून भेट द्यावी. अधिक माहितीसाठी शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. तरी समाजाभिमुख आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करणाऱ्या अमरावती विभागातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त, नयना गुंडे, यांनी केले आहे.