शनिवार, २८ मार्च, २०२६

अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाला राज्यात 'ई-गव्हर्नन्स' मध्ये तृतीय क्रमांक ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाला राज्यात 'ई-गव्हर्नन्स' मध्ये तृतीय क्रमांक ; 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव


​मुंबई, दि.२८ : महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभरातील शासकीय कार्यालयांमध्ये डिजिटल सेवांचा वापर वाढवण्यासाठी राबविण्यात आलेल्या "१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रम" या विशेष मोहिमेत अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या यशाबद्दल राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांना प्रशस्तिपत्र प्रदान करून यथोचित गौरव करण्यात आला.

*​यशाचे निकष आणि मूल्यांकन:*
महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरील विविध शासकीय कार्यालयांमध्ये १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या मोहिमेमध्ये सहभागी कार्यालयांचे खालील सात मुख्य घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले:

​१. कार्यालयाचे संकेतस्थळ (Website)
२. 'आपले सरकार' प्रणालीची अंमलबजावणी
३. ई-ऑफिस (e-Office) चा वापर
४. कार्यालयाचा डॅशबोर्ड (Dashboard)
५. व्हॉट्सॲप चॅटबॉट (WhatsApp Chatbot) सुविधा
६. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर
७. भौगोलिक माहिती प्रणाली (GIS - Geographic Information System) चा वापर

*​राज्यात तिसरा क्रमांक:*
या विशेष मोहिमेअंतर्गत राज्यातील एकूण ३४ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांची दोन टप्प्यांत कसून तपासणी आणि मूल्यमापन करण्यात आले. या स्पर्धेत "पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला" हे कार्यालय सातही निकषांवर सरस ठरत राज्यात "तृतीय क्रमांकाने" विजयी झाले आहे.

*​गौरव समारंभ:*
मुंबई येथे आयोजित एका विशेष समारंभात, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अकोला पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक आणि त्यांच्या संपूर्ण चमूचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या प्रशस्तिपत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

​अकोला पोलिसांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या डिजिटल उपक्रमांमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढण्यास आणि नागरिकांना अधिक सुलभ व पारदर्शक सेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव; ई-गव्हर्नन्समध्ये अमरावतीची राज्यात उल्लेखनीय कामगिरी

महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव; ई-गव्हर्नन्समध्ये अमरावतीची राज्यात उल्लेखनीय कामगिरी

मुंबई, दि. २८ मार्च — महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री १५० दिवस ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री सभागृह, मुंबई येथे आयोजित समारंभात गौरव करण्यात आला.

या राज्यस्तरीय मूल्यमापनात अमरावती महानगरपालिकेने २९ महानगरपालिकांमधून २०० पैकी १७९.५० गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, विदर्भ व मराठवाडा विभागातून या मानाच्या यादीत स्थान मिळवणारी अमरावती महानगरपालिका ही एकमेव संस्था ठरली आहे.

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख उपक्रमांमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. मर्यादित संसाधनांमध्येही मोठ्या महानगरपालिकांशी स्पर्धा करत मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.

महानगरपालिकेने राबविलेल्या प्रमुख उपक्रमांमध्ये “माय अमरावती” व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट, चॅनेल व मोबाईल अ‍ॅपद्वारे नागरिकांशी सुलभ संवाद, रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारित कूल रूफ उपनियम २०२५, शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (GPR) अंतर्गत सेवांचे डिजिटायझेशन व नवीन वेब पोर्टल्सची निर्मिती, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे परवाने व प्रमाणपत्रांची पडताळणी तसेच मालमत्ता करासह विविध विभागांमध्ये GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा समावेश आहे.

अमरावती महानगरपालिकेची ही कामगिरी राज्यातील तंत्रज्ञानाधारित व उत्तरदायी शहरी प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून, भविष्यातील स्मार्ट प्रशासनासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

00000

शुक्रवार, २७ मार्च, २०२६

बीकेसी, मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोन दिवसीय ‘#पल्स वैद्यकीय परिषद २०२६’चे उद्घाटन करण्यात आले.

 






बीकेसी, मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोन दिवसीय ‘#पल्स वैद्यकीय परिषद २०२६’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य शासन कार्यरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने राज्यात दुर्धर आजारांचे लवकर निदान, कमी खर्चाची उपचार पद्धती विकसित करणे आणि दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पल्स वैद्यकीय परिषदेत केले. ही परिषद राज्याच्या वैद्यकीय धोरणाला आणि आरोग्यसेवा व्यवस्थेला नवे दिशा-दर्शन मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत, या सेवा नागरिकांच्या निवासस्थानापासून आठ ते दहा किलोमीटरच्या परिसरात उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (#एआय) प्रभावी वापर करण्यावर राज्य शासनाचा विशेष भर असून, यामुळे आरोग्य सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवताना गुणवत्ताही टिकवून ठेवता येईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

डिजिटल आरोग्य बळकट करणे, ग्रामीण-शहरी दरी कमी करणे आणि महाराष्ट्राला जागतिक वेलनेस केंद्र बनविण्याच्या दिशेने ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार असून, महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेची सद्याची स्थिती व भविष्यातील दिशा दर्शवते, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य क्षेत्रातील विविध आव्हानांवर वैद्यकीय शिक्षण व उद्योग क्षेत्राच्या समन्वयाने आरोग्य सेवा पुरविण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आरोग्य क्षेत्राच्या सकारात्मक भविष्यनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘पल्स वैद्यकीय परिषद २०२६’ ही केवळ परिषद नसून महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रातील परिवर्तनाचा रोडमॅप आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी सांगितले.

‘महापशुधन वार्ता’

 

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रकाशित होणारे ‘महापशुधन वार्ता’ हे डिजिटल ई-मासिक पशुपालक, शेतकरी, उद्योजक, पशुवैद्यकीय विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त माहितीचे प्रभावी माध्यम ठरत आहे. पशुपालन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील शासनाच्या योजना, नवनवीन तंत्रज्ञान, यशस्वी प्रकल्प, प्रशिक्षण उपक्रम, रोगनियंत्रण, तसेच विभागाच्या कार्याची सविस्तर माहिती या मासिकातून नियमितपणे प्रसिद्ध केली जाते.

पशुसंवर्धन सचिव डॉ. रामास्वामी एन. यांच्या संकल्पनेतून या मासिकाची निर्मिती झाली असून आतापर्यंत या मासिकाचे ११ अंक प्रसिद्ध झाले आहेत. या मासिकामध्ये राज्यातील विविध भागातील यशस्वी पशुपालकांच्या प्रेरणादायी यशोगाथा, आधुनिक शेळीपालन, कुक्कुटपालन, गो-आधारित शेती, बायोफ्लॉक मत्स्यपालन, लसीकरण मोहिमा, तसेच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांचे क्षेत्रीय दौरे व उपक्रम यांच्या माहितीचा समावेश असतो. पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळाबरोबरच आता हे मासिक महाविस्तार ॲपमध्येही वाचता येणार आहे.

“पशुपालन व दुग्धव्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. विभागामार्फत प्रकाशित होणारे हे मासिक पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना व यशस्वी प्रयोगांची माहिती देणारे प्रभावी साधन आहे. महापशुधन वार्ता हे डिजिटल ई मासिक पशुपालक शेतकरी बांधवांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत आहे. प्रत्येक पशुपालक, तरुण उद्योजक आणि विद्यार्थ्यांनी हे मासिक नियमित वाचावे,” असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

बुधवार, २५ मार्च, २०२६

नमो शेतकरी महासन्मान निधी


          नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरण द्वारे वितरित करण्यात आले.


          मुंबईतील विधान भवन येथे झालेल्या या समारंभास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



          ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेंतर्गत २४ मार्च २०२६ अखेर एक ते सात हप्त्यांमध्ये एकूण १३०१७.३० कोटी रुपये ९३.०८ लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण द्वारे जमा करण्यात आले आहेत.

 #नमोशेतकरीमहासन्माननिधी

#DGIPR


 

विशेष लेख-

‘होय..आपण क्षयरोगावर मात करू शकतो, जनभागीदारीच्या सहकार्याने..!

 

          दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. 1882 साली डॉ. रॉबर्ट कोच यानी क्षयरोगाच्या जंतूचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. क्षयरोग (TB) हा आजही भारतासह जगभरातील एक गंभीर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. मात्र, योग्य वेळी निदान आणि संपूर्ण उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे जनजागृती, वेळेवर तपासणी आणि उपचार पूर्ण करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

क्षयरोग म्हणजे काय –

          क्षयरोग हा Mycobacterium tuberculosis या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो पण शरीराच्या इतर अवयवानाही बाधा करू शकतो. संक्रमित व्यक्ती खोकताना किंवा शिकताना हवेतून जंतू पसरतात आणि इतर व्यक्तीना संसर्ग होऊ शकतो.

लक्षणे व ओळख

          खोकला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास त्वरित तपासणी करणे अत्यावश्यक आहे. सतत खोकला येणे. कफात रक्त येणे. ताप व रात्री घाम येणे. वजन कमी होणे. भूक न लागणे व अशक्तपणा. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आजार गंभीर होऊ शकतो आणि इतरानाही संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

निदान व उपचार

        भारत सरकारच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (NTEP) अंतर्गत क्षयरोगाचे निदान आणि उपचार मोफत

उपलब्ध आहेत. क्षयरोग पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. डॉक्टरानी दिलेली औषधे नियमित आणि पूर्ण कालावधीसाठी घेणे अत्यावश्यक आहे. उपचार मध्येच सोडल्यास औषध-प्रतिरोधक क्षयरोग (Drug Resistant TB) निर्माण होऊ शकतो, जो अधिक धाकादायक असतो.

प्रतिबंधात्मक उपाय

          खोकताना किया शिकताना तोड व नाक झाकावे. मास्कचा वापर करावा. घरात स्वच्छ हवा व पुरेसे वायुवीजन ठेवावे. नवजात बालकांना BCG लस द्यावी. पोषक आहार व निरोगी जीवनशैली अंगी कारावी.

TB मुक्त भारताचे लक्ष्य

          भारताने ‘TB मुक्त भारत’ हे महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी शासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाची सक्रिय भूमिका आवश्यक आहे. लवकर निदान, उपचारांचे पालन आणि समाजातील जागरूकता ही या लढ्यातील तीन महत्त्वाची शस्त्रे आहेत.

AI Hand Held X-Ray Machine

          राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत AI Hand Held एक्सरे मशीन हे एक असे उपकरण आहे जे एक्स-रे प्रतिमां मधील क्षयरोग (टीबी) शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करते.  AI Hand Held एक्सरे मशीन बॅटरीवर चालणारी आणि सुवाह्य असल्यामुळे त्यांचा वापर दुर्गम भागात करता येतो. या मशीनने एका वेळी जास्तीत जास्त 100 एक्स-रे काढता येतात. AI Hand Held एक्सरे मशीन द्वारे सन 2025 मध्ये ठाणे ग्रामीण अंतर्गत 15,541 नोंदणी करण्यात आली आहे.

जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांचे आवाहन

          ‘क्षयरोग हा लपवण्याचा आजार नाही, तर उपचार करून पूर्ण बरा होणारा आजार आहे. लक्षणे दिसताच जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करा. उपचार पूर्ण घ्या आणि आपल्या कुटुंबाला व समाजाला सुरक्षित ठेवा. आपल्या सहकार्याने आपण निश्चितच क्षयरोगमुक्त समाज निर्माण करू शकतो.’

          जागतिक क्षयरोग दिन हा केवळ एक दिवस नसून जनजागृतीची चळवळ आहे. समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागून, लवकर निदान व पूर्ण उपचार यावर भर दिल्यास क्षयरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. ‘जागरूकता, उपचार आणि सहकार्य यामुळेच TB मुक्त भारत शक्य आहे, तरी सर्वांनी मिळून क्षयरोग विषयी गैरसमज दूर करु या’ असे आवाहन ठाणे जिल्हा क्षयरोग केंद्र जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.दिनेश सुतार केले आहे.

000000

 

 

विशेष लेख -

‘पल्स-२०२६’ : महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राला दिशा देणारी महत्त्वपूर्ण परिषद!

 

          महाराष्ट्राने आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांप्रमाणेच वैद्यकीय सेवेतही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आधुनिक वैद्यकीय शिक्षण, अत्याधुनिक रुग्णालये, संशोधन संस्था आणि कुशल डॉक्टर यांच्या बळावर राज्य देशाच्या वैद्यकीय व्यवस्थेत अग्रस्थानी आहे. या क्षमतेला जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यासाठी २७ व २८ मार्च २०२६ रोजी ‘पल्स-२०२६’ पल्स (PULSE) प्लॅटफॉर्म फॉर युनिफाइड लर्निंग, स्किल्स, हेल्थ अँड एज्युकेशन ही महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार असून राज्यात वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार होण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण परिषद ठरणार आहे.

          राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यवस्था सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित केल्याशिवाय राज्याचा सर्वांगीण विकास शक्य नाही. राज्याची वैद्यकीय व्यवस्था अधिक आधुनिक, तंत्रज्ञानसज्ज, संशोधनप्रधान आणि सर्वसमावेशक करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. परिषदेत वैद्यकीय शिक्षणक्षेत्रातील विद्यार्थी, अधिष्ठाता, विशेषतज्ज्ञ, खाजगी शैक्षणिक संस्था तसेच आधुनिक वैद्यकीय उपकरणे उत्पादक कंपन्या सहभागी होणार आहेत. राज्याच्या मेडिकल टूरिझम आणि ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेचा दर्जा सुधारणे यासाठी या परिषदेची भूमिका महत्वाची ठरेल.

          राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या पुढाकारातून आयोजित होणारी ही परिषद वैद्यकीय शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, वैद्यकीय सेवा व्यवस्थापन आणि वैद्यकीय पर्यटन यांना एकत्र आणणारा व्यापक मंच आहे. या परिषदेत देश-विदेशातील नामवंत डॉक्टर, संशोधक, वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील धोरणनिर्माते तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेतील आव्हाने आणि त्यावरील उपाय यावर सखोल चर्चा होण्यासाठी हे एक व्यासपीठ ठरेल.

महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राचा जागतिक लौकिक

          वैद्यकीय सेवा ही केवळ उपचारांपुरती मर्यादित नसून ती आर्थिक प्रगतीची मोठी संधीही ठरू शकते. जागतिक स्तरावर ‘मेडिकल टुरिझम’ म्हणजेच वैद्यकीय पर्यटनाचा वेगाने विस्तार होत आहे. कमी खर्चात दर्जेदार उपचार मिळण्याच्या दृष्टीने भारत आणि विशेषतः महाराष्ट्राकडे अनेक देशांचे लक्ष वेधले जात आहे. ‘पल्स-२०२६’ परिषद ही संधी अधिक प्रभावीपणे मांडण्याचे काम करणार आहे. महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण संस्था, सुपर-स्पेशालिटी रुग्णालये आणि संशोधन केंद्रांची मोठी संख्या आहे. या क्षमतेचा उपयोग करून राज्याला जागतिक वैद्यकीय सेवेत एक प्रभावी केंद्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. परिषदेकरिता जगभरातून २९०० पेक्षा जास्त तज्ञ, जवळपास १३० नामांकित डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील अभ्यासक संशोधक येणार आहेत. या परिषदेत वगेवेगळी २० सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

          राज्य वैद्यकीय क्षेत्रात अग्रगण्य असून देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक, उद्योगपती आणि धोरणकर्ते या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यांच्या सहभागामुळे नवीन तंत्रज्ञान, आधुनिक उपचारपद्धती आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक राज्यात येण्यास मदत होईल. याचा थेट फायदा रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यात, डॉक्टरांना नवीन संधी उपलब्ध होण्यात आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण व संशोधनाचा अनुभव मिळण्यात होणार आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळणे, आयुष क्षेत्रात आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांच्यात समन्वय साधून एकात्मिक वैद्यकीय व्यवस्था निर्माण करणे, फार्मसी क्षेत्रातील नवीन संशोधन, डॉक्टरांचे संशोधन पेपर आणि नवकल्पना यांचे सादरीकरणही परिषदेत होणार आहे.

 वैद्यकीय वेलनेस पर्यटनासाठी ‘महाराष्ट्र ब्रँड’

          ‘पल्स – २०२६’ परिषदेमार्फत महाराष्ट्राला वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचे महत्त्वपूर्ण केंद्र बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र ब्रँड’ म्हणून वैद्यकीय पर्यटनाची ओळख निर्माण करण्यासाठी राज्यातील रुग्णालये, वेलनेस केंद्रे, संशोधन संस्था आणि पर्यटन क्षेत्र यांच्यात समन्वय निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे राज्यात वैद्यकीय सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय उपकरणे, जैवतंत्रज्ञान, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि संशोधन यांसारख्या क्षेत्रांना नवी चालना मिळणार आहे. याचा थेट परिणाम रोजगारनिर्मितीवरही होईल.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाला चालना

          ‘पल्स-२०२६’  परिषदेत वैद्यकीय शिक्षणातील सुधारणा आणि संशोधनाला प्रोत्साहन मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल हेल्थ, रोबोटिक सर्जरी, टेलीमेडिसिन यांसारख्या नव्या संकल्पना वैद्यकीय शिक्षणात कशा समाविष्ट करता येतील यावर या परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. आज वैद्यकीय क्षेत्र अत्यंत वेगाने बदलत आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे निदान आणि उपचार पद्धती अधिक अचूक आणि परिणामकारक होत आहेत. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आणि विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान व कौशल्ये उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. ‘पल्स-२०२६’ ही परिषद त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. ‘डिजि होम’ आणि ‘टेक टॉक’ या विशेष संकल्पना सुद्धा या परिषदेत असतील. ३६० डिग्री डोममध्ये रोबोटिक सर्जरी, व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये मेडिकल प्रशिक्षण, डिजिटल हॉस्पीटल व्यवस्थापन यासारख्या तंत्रज्ञानाचे लाईव्ह आणि इमर्सिव्ह प्रेझेंटेशन सादर केले जाणार आहे.

ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेला लाभणार नवी दिशा

          वैद्यकीय क्षेत्रातील विकास हा केवळ शहरांपुरता मर्यादित राहून चालणार नाही. ग्रामीण आणि दुर्गम भागात दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचविणे ही मोठी गरज आहे. ‘पल्स-२०२६’ परिषदेमुळे ग्रामीण वैद्यकीय सेवेसाठी नव्या संकल्पना आणि उपाययोजना समोर येतील. टेलीमेडिसिन, मोबाइल हेल्थ युनिट्स, डिजिटल हेल्थ रेकॉर्ड्स आणि आधुनिक निदान तंत्रज्ञान यांच्या मदतीने ग्रामीण भागातही दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता येऊ शकते. या तंत्रज्ञानांचा वापर कसा वाढवता येईल यावर परिषदेत चर्चा केली जाणार आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील नवकल्पनांचा संगम

          ‘पल्स-२०२६’ परिषद ही केवळ वैद्यकीय चर्चांपुरती मर्यादित नसून वैद्यकीय क्षेत्रातील नवकल्पनांचा संगम घडविणारा मंच ठरणार आहे. या परिषदेत स्टार्ट-अप्स, संशोधन संस्था, औषधनिर्मिती उद्योग, वैद्यकीय उपकरण उत्पादक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार आहेत. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील नव्या कल्पना आणि संशोधनाला प्रत्यक्ष उद्योगाशी जोडण्याची संधी मिळेल. वैद्यकीय तंत्रज्ञानातील नवकल्पना समाजापर्यंत अधिक वेगाने पोहोचण्यासाठी अशा प्रकारच्या मंचांची आवश्यकता असते.

भविष्याच्या वैद्यकीय व्यवस्थेचा आराखडा

          आजच्या काळात वैद्यकीय व्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत. नवीन रोगांचे उद्भव, वाढते वैद्यकीय खर्च, तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा विकास आणि लोकसंख्येच्या वैद्यकीय गरजा, या सर्वांचा विचार करून भविष्यातील वैद्यकीय व्यवस्थेचा आराखडा तयार करणे आवश्यक आहे.

          या परिषदेत विविध देशांतील अनुभव, संशोधन आणि तंत्रज्ञान यांचा आदानप्रदान होऊन वैद्यकीय व्यवस्थेत अधिक प्रभावी धोरणे तयार करण्यास मदत होईल. ‘पल्स-२०२६’ ही परिषद महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी केवळ एक कार्यक्रम नसून भविष्यातील वैद्यकीय व्यवस्थेची दिशा ठरविणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. वैद्यकीय शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, उद्योग आणि शासन यांचा समन्वय घडवून वैद्यकीय क्षेत्रात व्यापक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न या परिषदेमार्फत केला जाणार आहे.

          डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वैद्यकीय व्यवस्थेत महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेणे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनात जागतिक दर्जाचे केंद्र निर्माण करणे, ग्रामीण आणि आदिवासी भागात मजबूत प्राथमिक वैद्यकीय सुविधा उभारणे आहे.

          या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक लौकिक अधिक दृढ होईल, तसेच राज्याला वैद्यकीय पर्यटन आणि सेवांच्या क्षेत्रात नवे स्थान मिळेल. ‘पल्स-२०२६’ ही परिषद महाराष्ट्राला जागतिक वैद्यकीय नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित करेल, यात शंका नाही.

 

वर्षा फडके – आंधळे

उपसंचालक (वृत्त)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

 

 

विशेष लेख-

‘पल्स’ वैद्यकीय परिषदेमुळे आरोग्यव्यस्थेचा पाया अधिक बळकट – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ


 

          पल्स वैद्यकीय परिषदेच्या माध्यमातून आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नवोन्मेष, संशोधन पुढे येईल. या क्षेत्रात नवनवीन संकल्पना, कार्य करणाऱ्या स्टार्टअप्सलाही परिषदेत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. जगभरातून उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक परिषदेत येणार आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यवस्थेचा पाया अधिक बळकट करणे शक्य होणार आहे.

   भविष्यातील वैद्यकीय शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित राहणार नाही, तर तंत्रज्ञानाधारित, संशोधनकेंद्रित आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असणे अत्यावश्यक आहे. आज आरोग्य क्षेत्र झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे   वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता देणे ही काळाची गरज आहे. यासाठी काही महत्त्वाचे बदल आवश्यक आहेत. डिजिटल आणि सिम्युलेशन-आधारित शिक्षण, व्हर्चुअल लॅब्स, थ्री-डी ॲनाटॉमी, सर्जिकल सिम्युलेटर यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळेल. एआय आणि डेटा ॲनालिटिक्सचा समावेश, रोग निदान, रोग नियंत्रण आणि संशोधनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता समजणे अत्यंत गरजेचे ठरेल. संशोधन संस्कृतीला प्रोत्साहन, वैद्यकीय महाविद्यालयात रिसर्च लॅब्स, स्टार्टअप कक्ष आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्सशी जोडणी वाढवणे. ग्रामीण व समुदायाधारित प्रशिक्षण, विद्यार्थ्यांनी गावपातळीवर आरोग्यसेवा समजून घेतल्यास त्यांची सामाजिक जाणीव वाढेल. आंतरराष्ट्रीय सहकार्य व एक्सचेंज प्रोग्राम, परदेशी विद्यापीठांशी भागीदारी करून जागतिक दर्जाचे शिक्षण अनुभवण्याची संधी. मल्टिडिसिप्लिनरी दृष्टिकोन, वैद्यकीय शिक्षणासोबत व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि संवाद कौशल्यांचा समावेश. थोडक्यात, भविष्यातील डॉक्टर केवळ उपचार करणारे नसून तंत्रज्ञान जाणणारे, संशोधनप्रिय आणि समाजाभिमुख आरोग्यदूत असावेत, हा राज्य शासनाचा दृष्टिकोन आहे. महाराष्ट्र याच दिशेने वैद्यकीय शिक्षणात बदल घडवून आणत आहे.

डिजिटल हेल्थ आणि डेटा ॲनालिटिक्स

          कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय वैद्यकीय क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती घडवू शकते, कारण ती डॉक्टरांच्या कौशल्याला पूरक ठरते. एआयमुळे आजारांचे लवकर आणि अधिक अचूक निदान, एक्स-रे, एमआरआय, सीटी-स्कॅन यासारख्या तपासण्यांचे जलद विश्लेषण आणि उपचाराची योग्य दिशा ठरवणे शक्य होत आहे. त्यामुळे रुग्णाचा वेळ वाचतो, चुका कमी होतात आणि उपचार अधिक परिणामकारक होतात. भविष्यात एआय आधारित रोबोटिक सर्जरी, वैयक्तिकृत उपचार योजना आणि रोगाचा पूर्वानुमान हे मोठे बदल घडवतील. डिजिटल हेल्थ आणि डेटा ॲनालिटिक्स यांचे महत्त्वही तितकेच मोठे आहे. डिजिटल नोंदी, ई-हॉस्पिटल प्रणाली, ऑनलाईन रिपोर्ट्स आणि मोबाईल हेल्थ ॲप्स यामुळे आरोग्यसेवा अधिक पारदर्शक आणि सुलभ होते. डेटा ॲनालिटिक्समुळे राज्य शासनाला रोगांचे ट्रेंड, लसीकरणाची गरज, संसर्गाचा प्रसार आणि आरोग्य धोरणांची दिशा अचूकपणे समजते. म्हणजेच, निर्णय हे अंदाजावर नव्हे तर अचूक माहितीवर आधारित घेतले जातात.

आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत सहकार्य

          आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत सहकार्याची शक्यता अत्यंत सकारात्मक आणि व्यापक आहे. एक्सचेंज प्रोग्राम, संयुक्त संशोधन प्रकल्प, ऑनलाईन अभ्यासक्रम आणि प्राध्यापक-विद्यार्थी देवाणघेवाण यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान आणि अनुभव मिळेल. महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांना यामुळे आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल आणि आपल्या डॉक्टरांना जगभरात स्पर्धा करण्याची ताकद प्राप्त होईल. थोडक्यात, एआय, डिजिटल हेल्थ आणि जागतिक सहकार्य यांची सांगड घातली तर महाराष्ट्राचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्र आधुनिक, अचूक आणि जागतिक दर्जाचे बनू शकते.

          संशोधनाला चालना देणे ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण नवीन औषधे, आधुनिक उपचार पद्धती आणि तंत्रज्ञानाची प्रगती ही संशोधनातूनच घडते. यासाठी  राज्य शासनाकडून वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संशोधन प्रयोगशाळा बळकट करणे,

          विशेष संशोधन अनुदाने देणे, बायो-डेटा व क्लिनिकल स्टडीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि उद्योग-संशोधन संस्था-शासकीय विभाग यांच्यात सहकार्य वाढवणे अशी ठोस पावले उचलली जात आहेत.

          तसेच पेटंट प्रक्रियेसाठी आर्थिक व तांत्रिक मदत, आंतरराष्ट्रीय जर्नल्सशी जोडणी आणि संयुक्त संशोधन प्रकल्प यांना प्रोत्साहन दिले जात आहे, जेणेकरून राज्यातील संशोधन जागतिक स्तरावर पोहोचेल.

चर्चेपासून कृतीकडे नेणारी परिषद

          वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘पल्स’ परिषद ही एक मोठी संधी आणि प्रेरणादायी व्यासपीठ ठरेल. या परिषदेमुळे विद्यार्थ्यांना-देश-विदेशातील तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन ऐकण्याची संधी, नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजिटल हेल्थ यांचा प्रत्यक्ष अनुभव, संशोधन पोस्टर सादरीकरण, पेपर प्रेझेंटेशन आणि स्पर्धांमध्ये सहभाग घेणे, इंटर्नशिप, फेलोशिप आणि करिअर नेटवर्किंगच्या संधी आणि स्टार्टअप व इनोव्हेशन क्षेत्रातील मार्गदर्शन म्हणजेच ही परिषद विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देणार नाही, तर आत्मविश्वास, दृष्टी आणि जागतिक स्तरावर पुढे जाण्याची प्रेरणा देईल. भविष्यातील डॉक्टर केवळ उपचार करणारे नसून संशोधनप्रिय आणि तंत्रज्ञानसज्ज असावेत, यासाठी ही परिषद महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

          थोडक्यात, ‘पल्स’ परिषद ही चर्चेपासून कृतीकडे नेणारी परिषद असेल जिथे निष्कर्ष थेट धोरणात आणि धोरण थेट जनतेच्या हिताच्या उपक्रमात रूपांतरित होईल. ‘पल्स’ परिषदेचा व्यापक दृष्टीकोन हा केवळ एका वर्षाचा किंवा एका प्रकल्पाचा नाही, तर पुढील काही वर्षांचा आरोग्य रोडमॅप ठरवण्याचा आहे. आम्ही महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्राला असे पाहतो की जिथे प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळेल मग तो शहरात राहो किंवा दुर्गम गावात.

महाराष्ट्र : आंतरराष्ट्रीय हेल्थ डेस्टिनेशन

          पुढील दशकात आमची स्पष्ट दिशा अशी आहे की, महाराष्ट्राला डिजिटल हेल्थ आणि  कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आरोग्य व्यवस्थेत देशात अग्रस्थानी नेणे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनात राज्याला जागतिक दर्जाचे केंद्र बनवणे, ग्रामीण व आदिवासी भागात मजबूत प्राथमिक आरोग्य सुविधा उभ्या करून आरोग्यसेवेतील असमानता कमी करणे, मेडिकल आणि वेलनेस पर्यटनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय हेल्थ डेस्टिनेशन म्हणून ओळख मिळवून देणे. स्टार्टअप्स, मेडटेक आणि बायोटेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती घडवून आणणे. या सर्वांचा अंतिम उद्देश एकच आहे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था अधिक आधुनिक, तंत्रज्ञानसज्ज, संशोधनप्रधान आणि सर्वसमावेशक बनवणे. ‘पल्स’ परिषद म्हणजे या प्रवासाची सुरुवात आहे, जिथून पुढील दहा वर्षांसाठी ठोस दिशा आणि आत्मविश्वास मिळेल.

          जागतिक आरोग्य संघटनांचा सहभाग हा महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी विश्वास, पारदर्शकता आणि आंतरराष्ट्रीय मान्यता यांचा स्पष्ट संदेश देणारा आहे. जेव्हा अशा नामांकित संस्था आपल्या परिषदेचा भाग होतात, तेव्हा जगाला हे दिसून येते की महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात गंभीरपणे आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून काम करत आहे. यामुळे दोन महत्त्वाचे संदेश जातात. पहिला म्हणजे आपली आरोग्य व्यवस्था जागतिक दर्जाची बनवण्याचा आपला निर्धार ठाम आहे. दुसरा म्हणजे- ज्ञान, संशोधन आणि सर्वोत्तम पद्धती स्वीकारण्यासाठी आपण तयार आहोत.

महाराष्ट्र: भारताचा हेल्थ गेटवे

          भारताला आरोग्य क्षेत्रात ग्लोबल हब बनवण्याच्या प्रवासात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि नेतृत्व करणारी असेल. आपल्या राज्यात आधीपासूनच जागतिक दर्जाची रुग्णालये, कुशल डॉक्टर, मजबूत वैद्यकीय शिक्षण व्यवस्था, औषधनिर्मिती उद्योग, प्रगत तंत्रज्ञान  आणि पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. मुंबई, पुणे, नागपूरसारखी शहरे आधीच आरोग्यसेवा, संशोधन आणि मेडिकल टूरिझमची मोठी केंद्रे बनली आहेत. ‘पल्स’ परिषदेच्या माध्यमातून आम्ही गुंतवणूक, संशोधन सहकार्य, स्टार्टअप इकोसिस्टीम आणि वेलनेस पर्यटन या सर्व घटकांना एकत्र आणत आहोत. यामुळे महाराष्ट्र केवळ राज्यापुरता मर्यादित न राहता भारताचा हेल्थ गेटवे म्हणून उभा राहू शकतो. जिथे जगभरातून रुग्ण उपचारासाठी, विद्यार्थी शिक्षणासाठी आणि उद्योग गुंतवणुकीसाठी येतील.

महाराष्ट्र शासन तुमच्या संशोधनाला, स्टार्टअप कल्पनांना आणि जागतिक संधींना नेहमी पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध

          माझा युवा डॉक्टर आणि संशोधकांना एकच संदेश आहे फक्त पदवी मिळवणारे डॉक्टर न होता, परिवर्तन घडवणारे डॉक्टर बना. आज वैद्यकीय क्षेत्र अतिशय वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पना यांना स्वीकारणे ही काळाची गरज आहे. आपल्या ज्ञानासोबत संवेदनशीलता, सामाजिक जाणीव आणि सतत शिकण्याची वृत्ती ठेवली तर आपण केवळ चांगले डॉक्टरच नव्हे, तर समाजाचे खरे आरोग्यदूत बनू शकता, महाराष्ट्र शासन तुमच्या संशोधनाला, स्टार्टअप कल्पनांना आणि जागतिक संधींना नेहमी पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध आहे.या परिषदेचा महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांना थेट आणि दीर्घकालीन फायदा होणार आहे. अधिक दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. डिजिटल हेल्थ आणि टेलिमेडिसिनमुळे गावागावात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला सहज मिळेल.

          औषधनिर्मिती आणि वैद्यकीय क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, वेलनेस आणि मेडिकल पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आरोग्यविषयक जनजागृती वाढल्याने लोक अधिक सजग आणि निरोगी जीवनशैलीकडे वळतील.

          ‘पल्स’ परिषद ही केवळ तज्ज्ञांची किंवा उद्योगांची परिषद नसून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्य, रोजगार आणि भविष्याशी थेट जोडलेली एक सकारात्मक चळवळ आहे. एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे जिथे महाराष्ट्र आरोग्य, शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या बळावर देशात आणि जगात एक आदर्श राज्य म्हणून उभे राहील.


शब्दांकन-दत्तात्रय कोकरे,

विभागीय संपर्क अधिकारी