शुक्रवार, १७ जुलै, २०२६

 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

महाराष्ट्र शासन

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील

लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा !

पूर्वीची मर्यादा ₹५०,०००

आता मिळणार ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती

Maharashtra DGIPR

#कर्जमुक्ती 

#कर्जमुक्तीयोजना२०२६

 


📍बारामती, जि.पुणे
#अमृतभारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ अत्याधुनिक अमृत #रेल्वे स्थानकांचे तसेच महाराष्ट्रातील #बारामती आणि #नांदुरा या दोन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यानंतर बारामती येथील पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचे प्रत्यक्ष अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचे सांगितले. देशातील आतापर्यंत २६१ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास पूर्ण झाला असून आज आणखी ७५ स्थानके राष्ट्राला समर्पित होत आहेत, ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.
बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे योगदान स्मरणात ठेवून विकासाचा हा वारसा पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी केले. केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून विकासकामांना गती मिळत असून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास त्याचेच उदाहरण असल्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या.
#पुणे विभागीय रेल्वे मंडळाकडून बारामती येथील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शिस्त, शिक्षण, तंत्रज्ञान या विषयांवर स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील यशस्वी विध्यार्थ्यांचा गौरव उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पुणे रेल्वे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे उपस्थित होते.
See less

 


नांदुरा रेल्वे स्थानकाचा कायापालट; १०.६३ कोटींच्या विकासकामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नांदुरासह देशातील ७५ पुनर्विकसित स्थानके राष्ट्राला समर्पित

बुलढाणा, दि. 17 (जिमाका) : भारतीय रेल्वेच्या 'अमृत भारत स्टेशन योजने' अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा १०.६३ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेला पुनर्विकास पूर्ण झाला असून, या अत्याधुनिक स्थानकाचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील ७५ पुनर्विकसित रेल्वे स्थानके राष्ट्राला समर्पित करण्यात आले.

नांदुरा रेल्वे स्थानकावर आयोजित मुख्य कार्यक्रमाला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती, नांदुरा नगराध्यक्ष मंगला मोरकर, माजी आमदार विजय शिंदे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील – संजय सावकारे

यावेळी बोलताना वस्त्रोउद्योग मंत्री तथा सहपालकमंत्री संजय सावकारे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण झाले आहे. नवीन रेल्वेगाड्या, वंदे भारतसारख्या आधुनिक सेवा, डिजिटल तिकीट व्यवस्था आणि रेल्वे स्थानकांचा कायापालट यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुखकर झाला आहे. नांदुरा स्थानकाच्या पुनर्विकासामुळे परिसरातील प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळणार असून रेल्वे क्रॉसिंगसह स्थानिक प्रश्नही लवकरच मार्गी लावले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पाठपुराव्यामुळे नांदुराचा विकास – आकाश फुंडकर

कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात रेल्वे विकासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे. अमृत भारत स्टेशन योजनेत नांदुरा स्थानकाचा समावेश होण्यासाठी आमदार चैनसुख संचेती यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे नांदुरा स्थानकाला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. भविष्यात नांदुरा स्थानकावर लिफ्ट, स्वयंचलित जिने (एस्केलेटर) आणि अन्य प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज स्थानक

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नांदुरा रेल्वे स्थानकात आधुनिक स्थानक इमारत, प्रशस्त आरक्षण कार्यालय, चार आरक्षण कक्ष, वातानुकूलित प्रतीक्षागृह, पुरुष, महिला व दिव्यांगांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे, नवीन प्रवेशद्वार, वाहनतळ, संरक्षक भिंत, आधुनिक प्रकाशयोजना, व्हिट्रिफाइड फरशी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, टिकाऊ फर्निचर तसेच दृष्टीहीनांसाठी मार्गदर्शक पट्ट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय फलाट क्रमांक १ वर १६० मीटर आणि फलाट क्रमांक २ वर २२४ मीटर लांबीचे नवीन छत उभारण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी अडथळामुक्त प्रवेश, कमी उंचीचे आरक्षण कक्ष, विशेष प्रसाधनगृहे, राखीव वाहनतळ आणि आधुनिक दिशादर्शक फलकांमुळे स्थानक अधिक प्रवासी-केंद्रित आणि सर्वसमावेशक बनले आहे.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

#कर्जमुक्तीयोजना२०२६

#महाराष्ट्रशासन

#राज्यसरकार

 


‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

#कर्जमुक्तीयोजना२०२६

#महाराष्ट्रशासन

#राज्यसरकार

 


#पुण्यश्लोक #अहिल्यादेवी होळकर #शेतकरी #कर्जमुक्ती योजना- २०२६ च्या निकषात सुधारणा.

🌾शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा.

 


#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६’

#कर्जमुक्तीयोजना

#महाराष्ट्रशासन

#महाकर्जमुक्ती

#शेतकर

शेतकरीकर्जमुक्ती

कर्जमुक्तीयोजना२०२६

 


#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६’ 

#कर्जमुक्तीयोजना

#महाराष्ट्रशासन

#महाकर्जमुक्ती

#शेतकर

#शेतकरीकर्जमुक्ती

#कर्जमुक्तीयोजना२०२६

#mahadgipr

#GovernmentScheme

गुरुवार, १६ जुलै, २०२६

 विशेष लेख : 


‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ :

सुधारणांमुळे आणखी दिलासादायक…

 

शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर शेती व त्यासंबधित पुरक व्यवसायावर अवलंबून आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, उत्पादन खर्चात वाढ आणि बाजार भावातील चढ-उतार यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नव्याने उभारी देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ लागू केली आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना महत्त्वाची ठरत आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध लाभांचा आलेख मांडणारा हा लेख….

राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ही योजना शेतकऱ्यांना कर्जमुक्तीतून आर्थिक सक्षमतेकडे नेणारी ठरणार आहे. राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी आणि सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांची ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शाश्वत कृषी विकासाच्या व्यापक धोरणाचा महत्त्वाचा भाग म्हणून पाहिली जात आहे.

कर्जमुक्तीचा मूलभूत उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे हा असला, तरी त्यामागील व्यापक विचार अधिक महत्त्वाचा आहे. कर्जमुक्त झालेला शेतकरी पुन्हा पतपुरवठ्यास पात्र होतो. नव्याने पीककर्ज उपलब्ध झाल्यामुळे तो वेळेवर बियाणे, खते, औषधे आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. यामुळे उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते आणि शेती अधिक सक्षम बनते.

या योजनेची नुकतीच घोषणा करण्यात आली. लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या या योजनेतून कोणीही पात्र लाभार्थी अटी व शर्तींमुळे वंचित राहू नये, यासाठी लगेच या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत आणखी काही महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर करून तिची व्याप्ती अधिक वाढविली आहे. त्यामुळे आता ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित न राहता, अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारी आणि न्याय्य स्वरूपाची योजना ठरली आहे.

राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना तब्बल ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ही योजना राज्याच्या कृषी इतिहासातील महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून नोंदवली जात आहे. आता नवीन केलेल्या बदलांमुळे या संख्येत वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, शासनाने केवळ मोठी आर्थिक तरतूद केली नाही, तर सभागृहात जाहीर केलेल्या सुधारणांमुळे योजनेतील काही अटी शिथिल करून अनेक शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीचे दरवाजे अधिक व्यापकपणे खुले केले आहेत.

या सुधारणांमधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे सन 2019 च्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली ५० हजार रुपयांच्या लाभाची मर्यादा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी अशा शेतकऱ्यांना नव्या योजनेत मर्यादित लाभ मिळत होता. आता मात्र ही अट रद्द करण्यात आल्यामुळे अशा सर्व पात्र शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा संपूर्ण लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली असमानता दूर झाली असून शासनाने समान न्यायाची भूमिका अधिक ठळकपणे मांडली आहे.

तितकाच महत्त्वाचा दुसरा निर्णय म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये नवीन कर्ज घेऊन ते वेळेत परतफेड करण्याची अटही रद्द करण्यात आली आहे. अनेक शेतकरी या अटीमुळे संभ्रमात होते. शासनाने हा संभ्रम दूर करत नियमित परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे योजनेचा लाभ अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक झाला आहे.

यापूर्वीच्या घोषणेनुसार, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागत होते. नव्या योजनेत हा महत्त्वाचा अडसरही दूर करण्यात आला आहे. आता दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असली, तरी त्यातील दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासनाकडून माफ करण्यात येणार आहे.

या योजनेची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे तिची अंमलबजावणी अत्यंत व्यापक स्वरूपात केली जात आहे. राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँका, खासगी बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील माहितीच्या आधारे पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी निश्चित करण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि अचूकता सुनिश्चित झाली आहे. या योजनेला अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कर्जमुक्तीची रक्कम ही थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. अशा प्रकारे या योजनेला डिजीटल स्वरुप सुध्दा प्राप्त झाले आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कर्जापुरत्या मर्यादित नसतात. शेतीचा वाढता खर्च, वीज, सिंचन, हमीभाव, बाजारपेठ आणि नैसर्गिक संकटे या सर्वांचा त्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत असतो. याची जाणीव ठेवून राज्य शासन कृषी क्षेत्रावर दरवर्षी सुमारे ९५ हजार कोटी रुपये खर्च करीत आहे. केवळ कृषी वीजबिलासाठीच सुमारे २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. कापूस खरेदीसाठी दहा हजार कोटी रुपयांहून अधिक चुकारे अदा करण्यात आले असून, सोयाबीन खरेदी, कांदा बाजारभाव स्थिरीकरण, ठिबक सिंचनासाठी प्रलंबित निधी आणि कृषी समृद्धी योजनेसाठी अतिरिक्त तरतूद, कृषी फिडरवर दिवसा वीजपुरवठा यांसारख्या निर्णयांतूनही शासनाची शेतकरीहिताची भूमिका स्पष्ट दिसून येते.

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ही केवळ आर्थिक मदतीची योजना नाही; तर शेतकऱ्यांचा आत्मविश्वास पुन्हा दृढ करण्याचा प्रयत्न आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना नव्याने उभारी देणे, त्यांना पुन्हा शेतीकडे आत्मविश्वासाने वळविणे आणि कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देणे, हा या योजनेमागील व्यापक दृष्टिकोन आहे.

विधिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, या सुधारणांमुळे शासनावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तरी एकही पात्र शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहू नये, हीच शासनाची भूमिका आहे. ही भूमिका केवळ घोषणांपुरती मर्यादित नसून, त्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक जबाबदारी स्वीकारण्याची शासनाची तयारीही यातून दिसून येते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ आकडेवारीच्या नजरेतून न पाहता त्यांच्या आयुष्याशी निगडित वास्तव समजून घेऊन निर्णय घेण्याची संवेदनशीलता या सुधारणांमधून दिसून येते. त्यामुळे ही योजना आता पूर्वीपेक्षा अधिक व्यापक, अधिक समावेशक आणि अधिक परिणामकारक ठरली आहे.

‘शेतकरी समृद्ध तर राज्य समृद्ध’ या संकल्पनेला प्रत्यक्ष बळ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करणारा महत्त्वाचा निर्णय आहे. कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्तता, नव्या गुंतवणुकीची संधी आणि आधुनिक शेतीकडे वाटचाल या माध्यमातून ही योजना राज्यातील कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारी ठरणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कर्जमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी पाऊल पडल्याची भावना राज्यातील शेतकऱ्यांमध्ये निश्चितच दृढ झाली आहे.

 

-विभागीय माहिती कार्यालय, अमरावती



 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

#कर्जमुक्तीयोजना२०२६

#महाराष्ट्रशासन

#राज्यसरकार