मंगळवार, १७ मार्च, २०२६

कोकणची ओळख आंबा व काजू फळ

 



#आंबा#काजू हे कोकणची ओळख आहे. कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या आंबा व काजू फळ पिकाचा मोहोर गळून पडल्यामुळे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका असून अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात ही मदत जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबा व काजू प्रश्नाबाबत विधान भवनात आयोजित बैठकीत सांगितले.

या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे नुकसानीची तीव्रता लक्षात येत आहे. अशा प्रकारच्या नुकसानीच्या परिस्थितीत यापूर्वी कशाप्रकारे मदत केली आहे, या संदर्भातील सर्व बाबींचा सांगोपाग विचार करून मदत देण्यात येईल. याबाबत दोन्ही उपमुख्यमंत्री, फलोत्पादन व कृषी मंत्री तसेच कोकणातील लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, रोहयो व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, गृह राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, दीपक केसरकर, भास्कर जाधव, महेंद्र दळवी, निलेश राणे, राजेंद्र गावित, प्रसाद लाड, किरण सामंत, ज्ञानेश्वर म्हात्रे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे यांनी बैठकीत सहभाग घेतला


विधानपरिषदकामकाज

#विधानपरिषदकामकाज

ग्रामीण भागातील बांधकाम परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

युद्धजन्य परिस्थितीमुळे बंदरांमध्ये अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातीसंदर्भात शेतकरी व निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे काही कृषी माल बंदरांमध्ये अडकण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाने आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यातील आरोग्य विभागाच्या कामकाजात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सेवा गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण उपाययोजना सुरू केल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत दिली.
सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/194358/

दिल्लीस्थित राष्ट्रीय सुरक्षा महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवन येथे भेट घेतली.

 


दिल्लीस्थित राष्ट्रीय #सुरक्षा महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवन येथे भेट घेतली. शिष्टमंडळात रशिया, ओमान, नायजेरिया, नेपाळ, इंडोनेशिया, टांझानिया या देशांमधील भूदल, नौदल आणि वायुदलातील सैन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता.

महाराष्ट्राची वेगाने वाटचाल करणारी अर्थव्यवस्था, सक्षम सागरी सुरक्षा, संपर्क यंत्रणा, तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गुंतवणुकीची यशोगाथा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला सांगितली आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती दिली.
@devendra_fadnavis




केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या पात्र उमेदवारांना माहिती सादर करण्यासाठी २१ मार्चपर्यंतची मुदत


 

अमरावती, दि. १७ : केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी/सीटीईटी) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती वेबसाईटवर सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने प्रसिद्धी निवेदनाद्वारे केले आहे. त्याचप्रमाणे या परीक्षेची गुणपडताळणी ऑनलाईन उपलब्ध करण्यात आली असून, दोन्ही प्रक्रिया उमेदवारांना विशिष्ट मुदतीत पूर्ण करावयाच्या आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५चे ऑनलाईन पद्धतीने तीन सत्रात आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल १३ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या परीक्षेत पात्र उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची प्रक्रिया निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आली असून, त्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती https://mscepune.in/dtcdola/KP2026Info.aspx या लिंकवर १६ ते २१ मार्च यादरम्यान भरावयाची आहे. ही माहिती केवळ नमूद लिंकमध्येच भरायची असून, ई-मेल, पत्राद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे सादर केलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.

या परीक्षेची गुणपडताळणी/रिस्पॉन्स शीट ही  १६ ते ३१ मार्च पर्यंत https://mscepune.in/DTEDOLA/KP2026 ResponseSheet.aspx  या लिंकवर उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठीचे शुल्क प्रती पेपर रुपये ५००/- असून ते सदर लिंकद्वारे भरावे लागणार आहे. शुल्क भरल्यानंतर १५ दिवसात उमेदवारांच्या ई-मेल वर रिस्पॉन्स शीट उपलब्ध करुन देण्यात येईल, असे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००