सोमवार, ३० मार्च, २०२६

      


महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार #आरोग्यसुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या राज्यव्यापी अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे.

हे अभियान फक्त सरकारी कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता, लोकसहभागाद्वारे त्यातून एक व्यापक आरोग्य चळवळ उभी राहावी, असा राज्य शासनाचा मानस आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न केले जाणार आहे. यामुळे गाव ते राज्यस्तरावरील आरोग्य सेवांचे आणि यंत्रणांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. तसेच या उपक्रमामुळे तळागाळातील लोकांपर्यंत #वैद्यकीयसेवा पोहोचणार आहेत.

 

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानातंर्गत पुरस्कार :
🏆 
राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करीत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या जिल्हा परिषदेला ५ कोटी रुपये, दुसऱ्या क्रमांकाला ३ कोटी रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी २ कोटी रुपये दिले जाणार आहेत. जिल्हा परिषदेनंतर पंचायत समिती स्तरावरही प्रोत्साहनासाठी मोठ्या रक्कमेची तरतूद आहे. ज्यामध्ये पहिल्या क्रमांकाला २ कोटी, दुसऱ्या क्रमांकाला १.५ कोटी रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला १.२५ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

 

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, निर्मित


 

विशेष लेख :

 


                                                                                                                 

                   नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ई-गव्हर्नन्सची राज्यात छाप

राज्याचे द्रष्टे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात १०० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कृती कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि डिजीटल सुविधांचा वापर वाढविण्यासाठी  १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमही राज्यात यशस्वीपणे राबविण्यात आला. जिल्हा व विभागीय स्तरावरील विविध कार्यालये व मंत्रालयीन विभाग स्तरावर राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये सर्वोत्कृष्ट कार्यालयांची  सात निकषांवर निवड करण्यात आली. यात विभागीय आयुक्त गटात नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने सर्वोत्तम कामगिरी करत राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच विभागीय आयुक्त कार्यालयाचा सन्मान करण्यात आला. ई- गव्हर्नन्स सुधारणा संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाने केलेल्या  वैशिष्ट्यपूर्ण कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख.

            विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या सक्षम नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयाने वापरकर्ता पूरक संकेतस्थळ निर्माण करून आवश्यक ते सर्व निकष पूर्ण केले व त्याची रीतसर अंमलबजावणी केली. जनतेला राज्य शासनाच्या अधिसूचित सेवांचा लाभ १ कोटींच्यावर लाभ दिला. नागरीकांच्या तक्रारींचे काल मर्यादेत निराकरण केले. ई-ऑफिसद्वारे फाईल व निपटारा प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या योजना व कार्यक्रमांच्या माहितीसाठी दृश्य डॅश बोर्ड तयार करण्यात आले. याद्वारे विभागातील कार्यक्षमता निरीक्षणही करण्यात आले. व्हाट्सअपस्नेही चॅट बॉट तयार करण्यात आला. वापरासाठी सुलभ असलेल्या या माध्यमाद्वारे तक्रार निवारण पोर्टल, सीएम व्हाट्सअप चॅनल, धरणे-तलावांच्या  पाण्याची पातळी आदी माहिती देण्यात आली .विशेष करून आपत्ती काळात जनतेला सतर्कतेची माहिती देण्यात आली.

 'ए आय' आणि 'ब्लॉक चेन' या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतातील पहिले ‘स्मार्ट व इंटेलिजंट गाव सातनवरी’ हा प्रकल्प प्रत्यक्षात आला. इतरांसाठी प्रेरक ठरलेला हा प्रकल्प आता राज्यातील 75 गावांमध्ये रविण्यात येत आहे. राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जीआयएसचा वापर करून वर्धा जिल्ह्यात  ‘इंफ्रा युनिक आयडी’ तयार करण्यात आली. हा प्रकल्पही उल्लेखनीय ठरला असून राज्यात याची अंमलबजावणी सुरू आहे.

                                           संकेतस्थळ निकषात उत्तम कामगिरी

          राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयाचे संकेतस्थळ व त्यासाठी घालून दिलेल्या निकषांची उत्तम अंमलबजावणी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने केली आहे. या अंतर्गत कार्यालयाच्या  https://divcomnagpur.maharashtra.gov.in/  संकेतस्थळावर पृष्ठ लोड होण्याची गती २.४ सेकंद झाली आहे त्यामुळेच ते वापरकर्ते  स्नेही  झाले आहे. शासनाच्या अन्य विभागांची माहिती सहजी उपलब्ध करून देत डोमेन अनुपालन चोखपणे करण्यात आले आहे. देशातील सर्व राजभाषांमध्ये या संकेतस्थळाचा मजकूर उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे संकेतस्थळ सामान्य जनतेला मोबाईल उपकरण आणि वेब ब्राऊझर वर उपलब्ध करून देण्यात आल्याने वापरकर्त्यांना सहज वापरता येते. संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्याही दृष्य स्वरूपात दिसते.

हे संकेतस्थळ दिव्यांग वापकर्त्यांसाठी सुलभ करण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या मालकीचा उल्लेख दर्शवताना सायबर सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. यासंदर्भात सायबर सुरक्षा ऑडिट प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. संकेतस्थळावरील माहिती वेळोवेळी अद्यावत करण्यात येते तसेच सर्व पुनरुत्पादित कागदपत्रे स्त्रोतांचा उल्लेख करण्यात येतो. यामध्ये दस्तऐवजांचे शीर्षक, मालक संस्था आणि प्रकाशन  तारीख यांचा समावेश आहे. नागरिकांची सनद, माहितीचा अधिकार, नवीन घडामोडी व घोषणांचा समावेश आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर विभागीय संचालक कार्यालय, नागपूर जिल्हा माहिती कार्यालय आणि नागपूर महानगर पालिकेच्या समाज माध्यमांवरील अद्यावत माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

                       आपले सरकारच्या माध्यमातून जनतेला विविध सेवा

                        राज्य शासनाकडून अधिसूचित करण्यात आलेल्या 20 सेवांचा लाभ विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या मार्फत जनतेला देण्यात आला. 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी निहित कालावधीमध्ये 20 कोटी 3 लाख 47 हजार सेवा जनतेला पुरविण्यात आल्या.सेवा प्रदानतेचा दर 98.32 टक्के आहे. यापैकी 21 लाख 97 हजार 548 लोकांनी  माहितीच्या अधिकार सेवेचा लाभ घेतला. यातील 1 हजार 780 प्रकरणे पहिल्या अपिलासाठी आले तर 218 दुसऱ्या अपिलात प्राप्त झाले. शासनाच्या अधिसूचित सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या. या सर्व सेवा आपले सरकार पोर्टल सोबत जोडण्यात आल्या.नागरिकांच्या तक्रारींचे विहित कालमर्यादेत निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.

    ई-ऑफिसचा प्रभावी उपयोग

       विभागीय आयुक्त कार्यालयातील 164 वापरकर्ते हे ई-ऑफिसचा अवलंब करतात. यातील 154 वापरकर्ते हे सक्रियपणे ई-ऑफिसचा वापर करतात. १५० दिवसांच्या मोहीम काळात ई-ऑफिसद्वारे फाईलींची प्रक्रिया गतीने करून निपटारा करण्याचा दर 93.39 टक्के राहिला. नेहमीच्या पाच टप्प्यांवर फाईल निकाली काढण्याचा दर कमी होऊन तीन टप्प्यांवर आला. ई-ऑफिसच्या हाताळणीसाठी तांत्रिक सहाय्यकाची नेमणूक करण्यात आली. ई-ऑफिसच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले.

                             डॅशबोर्डद्वारे माहितीचे अद्यतन व अचूकता

     नागपूर विभागाने विभागीय आयुक्तांच्या 'केआरए' मधील कार्यक्षमता निरीक्षणासाठी नवीन डॅशबोर्ड तयार केला आहे. या डॅशबोर्डची मांडणी व्हिज्युअलायझेशन कस्टम, माहितीची छाननी आणि विभाग निहाय परस्पर संवादी इंटरफेस, माहितीचे अद्यतन आणि अचूकता, भूमिका निहाय प्रवेश नियंत्रण, राज्य व केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या योजना व कार्यक्रमांचा यात समावेश करण्यात आला आहे. डॅशबोर्डचा उपयोग  महसुली अधिकाऱ्यांद्वारे थेट बैठकांमध्ये माहितीच्या विश्लेषणासाठी होऊ लागला आहे. हे डॅशबोर्ड मोबाईल, वेब ब्राऊजरच्या माध्यमातून सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. डॅशबोर्डच्या हाताळणी व वापरासाठी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले.

                      व्हाट्सअप चॅटबॉटद्वारे सर्वसामान्यांना मोबाईलवर अधिकृत माहिती

      नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने 9370434662 या क्रमांकावर व्हाट्सअप चॅटबॉट जनतेला उपलब्ध करून दिला आहे. आयओएस, अँड्रॉइड आणि वेब प्लॅटफॉर्मवर चॅटबॉट उपलब्ध करून देण्यात आला असून नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची माहिती, जिल्ह्यांसंबंधित सेवा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या.पावसाची आकडेवारी, हवामान सूचना, धरण व तलावाची पातळी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती, आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदा तसेच पंचायत समिती कार्यालयांच्या अखत्यारितयेणाऱ्या विविध लोकसेवांचा लाभ याद्वारे देण्यात येतो. सीएम व्हाट्सअॅप चॅनल, आपले सरकार पोर्टल, तक्रार निवारण पोर्टल हा चॅटबॉट सोबतही जोडण्यात आला आहे. येथे हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले असून अभिप्राय प्रणालीचाही यात समावेश आहे.

           ‘ए आय’ व ‘ब्लॉकचेन’च्या वापराद्वारे राज्यासमोर निर्माण केले मॉडेल

       कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेन या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून नागपूर ग्रामीण मधील सातनवरी हे गाव देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नेतृत्वात हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 ऑगस्ट 2025 रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. मुख्य सचिवांनी या प्रकल्पास भेट देऊन वेळोवेळी आढावा घेतला. या प्रकल्पांतर्गत गावात स्मार्ट आरोग्य, पशुसंवर्धन, ड्रोन नियंत्रित खते व कीटकनाशक फवारणी, सीसीटीव्ही सर्वेलन्स, डिजीटल शिक्षण, महिला व बालकल्याण विभागाच्या ऑनलाईन सेवा, रस्त्यावरील स्मार्ट दिवे इत्यादी सेवा पुरविण्यात आल्या.

            स्मार्ट शेतीमुळे 25 ते 40 टक्के पाण्याची बचत होते. खतांच्या किमतीस 30 टक्यांनी कपात होत. उत्पादनात 25 टक्केपर्यंत वाढ होते. ड्रोन द्वारे फवारणीमुळे कीटकनाशकांचा वापर 50 टक्यांपर्यंत कमी होतो. स्मार्ट स्ट्रिट लायटिंगमुळे ऊर्जेचा वापर 50 ते 70 टक्के कमी होऊन देखभाल खर्चही कमी होतो. या प्रकल्पाची दखल घेत स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील अन्य पाच विभागांमधील 75 गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे तर नागपूर जिल्ह्यातील 10 गावांचा यात समावेश आहे. प्रकल्पाचा भांडवली खर्च राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असून सीएसआर तसेच योग्य संस्थांचे प्रायोजकत्व घेण्याची मुभा या प्रकल्पासाठी देण्यात आली आहे.

             जीआयएसच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यात युनिक आयडी

          सातनवरीच्या स्मार्ट इंटेलिजन्स व्हिलेज ची अंमलबजावणी राज्यभर होत असतानाच नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्याने तयार केलेल्या जीआयएस आधारित युनिक आयडी ची संकल्पना राज्यभर राबविण्यात येत आहे. नागरी मालमत्तेसाठी इन्फ्रा युनिक आयडी तयार करण्यासाठी समर्पित भूस्थानिक प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला. याद्वारे संपत्ती व मालमत्तेची योग्य नोंद घेण्यात आली. या पद्धतीद्वारे स्थानिक आणि वैशिष्ट्यात्मक डेटा उपलब्ध झाला. त्यातून मिळालेली माहिती  गुणवत्ता पूर्ण व अचूक ठरली आणि या माहितीच्या वापराद्वारे विकास कार्यांच्या नियोजनात सुधारणा करण्यात आली. या माहितीच्या आधारे निर्णय घेणे, नियोजन करणे, निधी वाटप, निधीचा वापर, मालमत्तेचा मागावा घेणे, मालमत्तेची स्थिती, योजनेचा वापर, क्षेत्रनिहाय मालमत्तेचे उपलब्धता नवीन मालमत्तेचा प्रस्तावधी आदींमध्ये या पद्धतीचा उपयोग झाला. वर्धा जिल्हासह नागपूर विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.

            राज्यभरात सात निकषाधारे ७ मे २०२५ ते १० जानेवारी २०२६ दरम्यान एकूण सहा विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयांच्या कामगिरीचे मुल्यमापन कॉलिटी कॉन्सिल ऑफ इंडिया कडून १२७ निकषांवर करण्यात आले.या स्पर्धेत नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने २०० पैकी १५९.५२ गुण मिळवून राज्यात प्रथम स्थान पटकाविले. २८ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत एका शानदार समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विभागीय आयुक्तांच्यावतीने महसूल अपर आयुक्त राजेश खवले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

       विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की, हा पुरस्कार संपूर्ण नागपूर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासन अधिक सुलभ, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहील. भविष्यातही अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना जलद, सुलभ आणि दर्जेदार सेवा पुरविण्यावर भर दिला जाईल.

आयुक्तालयाने मिळविलेला हा पुरस्कार केवळ नागपूर विभागापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यातील प्रशासनासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

           

रितेश मोतीरामजी भुयार,

माहिती अधिकारी,

माहिती व जनंसर्क नागपूर.

                                                         

महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा..

 महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 

मुंबई,दि.३०: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महावीर जयंती, तीर्थंकर भगवान महावीरांचे जीवन कार्य तसेच त्यांच्या अहिंसा, त्याग, क्षमा, जीवदया व अनेकांतवादाच्या शिकवणीचे स्मरण करून देते. त्यांच्या आदर्श विचारांचा प्रभाव आजही भारतीय जनमानसावर दिसून येतो. भगवान महावीरांचे विचार आज सर्वाधिक प्रासंगिक आहेत. महावीर जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.



राज्य सरकारने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 




'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
मुंबई दि.३०:- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या राज्यव्यापी अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे.
हे अभियान फक्त सरकारी कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता, लोकसहभागाद्वारे त्यातून एक व्यापक आरोग्य चळवळ उभी राहावी, असा राज्य शासनाचा मानस आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न केले जाणार आहे. या प्रस्तावित योजनेमुळे गावापासून ते राज्यस्तरावरील आरोग्य सेवांचे आणि यंत्रणांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. तसेच या उपक्रमामुळे तळागाळातील लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचणार आहेत.
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर, हे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणणे आणि त्यांच्यात आरोग्यदायी जीवनशैली रुजवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये फक्त आजारांवर उपचार करण्यापेक्षा ते होऊ नयेत यासाठी सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पोषण यासारख्या मूलभूत घटकांवरही विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. संसर्गजन्य आजारांसोबतच बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणारे असंसर्गजन्य आजार, माता-बाल आरोग्य आणि मानसिक आरोग्य यासारख्या विषयांनाही या मोहिमेत सामावून घेण्यात आले आहे. या अभियानात ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणा सक्रियपणे सहभागी होणार आहेत. गावागावात स्वच्छतेचा आणि आरोग्याचा जागर करून आरोग्यदायी गाव ही संकल्पना राबवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे.
सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य स्तरापासून ते ग्रामपंचायत स्तरापर्यंत तीन टप्प्यांवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समिती ही अभियानाच्या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे. तर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखालील कृती समिती प्रत्यक्ष कामाचे नियोजन करणार आहे. त्याचबरोबर गाव पातळीवर आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी विशिष्ट निकष ठरवण्यात आले आहेत. या निकषांच्या आधारे ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून गौरविण्यात येणार आहे. अशा गावांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रकमेचा पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाणार आहे. या संपूर्ण अभियानासाठी राज्य सरकारने ८०.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, गाव, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना कोट्यवधी रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत.
२ ते ५ कोटींचे पुरस्कार
राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करीत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या जिल्हा परिषदेला ५ कोटी रुपये, दुसऱ्या क्रमांकाला ३ कोटी रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी २ कोटी रुपये दिले जाणार आहेत. जिल्हा परिषदेनंतर पंचायत समिती स्तरावरही प्रोत्साहनासाठी मोठ्या रक्कमेची तरतूद आहे. ज्यामध्ये पहिल्या क्रमांकाला २ कोटी, दुसऱ्या क्रमांकाला १.५ कोटी रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला १.२५ कोटी रुपये दिले जाणार आहेत.
राज्य स्तरावर सर्वोत्तम ठरणाऱ्या ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांना ७५ लाख रुपयांचा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. उपआरोग्य केंद्रांना पहिल्या क्रमांकासाठी जिल्हा आणि राज्यस्तरासाठी अनुक्रमे ५ लाख आणि २५ लाख रुपये दिले जाणार आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा स्तरावर १० लाख आणि राज्य स्तरावर ५० लाखांचा पुरस्कार दिला जाणार आहे. त्याचबरोबर गावांनाही पहिल्या क्रमांकासाठी जिल्हा, विभाग राज्य स्तरासाठी अनुक्रमे २५ लाख, १ कोटी आणि ५ कोटी रुपयांचे पुरस्कार दिले जाणार आहेत. हे अभियान दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या कालावधीत राबवले जाणार असल्याने, प्रत्येक वर्षी गावांना आपली कामगिरी सुधारण्याची आणि पुरस्कार मिळवण्याची संधी मिळणार आहे.

डिजीटल शेतीशाळा - 1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन

 

हवामान अनुकूल शेतीसाठी जिल्ह्यांत 'डिजिटल शेतीशाळा';

· 1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन
· सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती, दि. ३० : हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत आहे. यावर मात करण्यासाठी कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत महाराष्ट्र राज्याकरिता "हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान" डिजीटल शेतीशाळा सुरू केली आहे.
हे अभियान शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची हमी देणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाबरोबरच, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन विभाग इ. यंत्रणादेखील सहभागी होत आहेत. या अभियानाचा एक टप्पा म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात चार विशेष डिजिटल शेती शाळा’ आयोजित करण्यात येत आहेत.
शेतकरी, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे, बिजोत्पादक, फार्मर कप स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणारे निमंत्रक व शेतकरी गट, वनपट्टे धारक या सर्वांनी मोठ्या संख्येने डिजिटल शेती शाळांना जॉईन व्हावे, असे आवाहन कृषी विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात येत आहे.
राज्यातील सर्व प्रकारच्या पिक पद्धतींना उपयुक्त असणाऱ्या तंत्रांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागातील तज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांचेमार्फत या डिजिटल शेतीशाळामध्ये ज्ञानाचे आदान प्रदान होणार आहे.

विशेष डिजिटल शेतीशाळांचे वेळापत्रक व विषय पुढीलप्रमाणे आहे.
· शेतीशाळा १ (१ एप्रिल २०२६) पेरणीपूर्व तंत्रज्ञान - बेड तयार करणे व बेडवर टोकण करणे, शून्य/कमीत कमी मशागत करणे, आंतरपीक पद्धत, बियाणे उगवण क्षमता तपासणी आणि बीजप्रक्रिया.

· शेतीशाळा २ (८ एप्रिल २०२६): जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन- बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती व फायदे

· शेतीशाळा ३ (१५ एप्रिल २०२६): एकात्मिक कीड व्यवस्थापन- सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र किटकांचे संवर्धन, लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर

· शेतीशाळा ४ (२२ एप्रिल २०२६) : भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र- भाताची थेट पेरणी श्री पद्धत आणि भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धत


सर्व शेतीशाळा वर नमूद तारखांना सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणार असून या शेती शाळांचे लाइव्ह प्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाउंडेशन आणि उमेद च्या युट्यूब चॅनेलवर केले जाणार आहे.