शुक्रवार, १ मे, २०२६

 जिल्ह्याच्या कृषी-औद्योगिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानावर भर

- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
*67 वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा





अमरावती , दि. १ : शेती व उद्योग क्षेत्रात आधुनिकतेची कास धरीत जिल्ह्याने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि उद्योग क्षेत्राचा विकास करून जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या निमित्ताने पोलीस मुख्यालय, अमरावती शहर परेड मैदान येथे मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील बोलत होते .
पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, प्र. विभागीय आयुक्त अजय लहाने, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. राज्य शासनाने पीक कर्जासाठी २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार असून ही प्रक्रिया लवकरच प्रत्यक्ष सुरू होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित १ लाख १५ हजार ८६२ शेतकऱ्यांना ७४५ कोटी रुपयांची मदत थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता २ लाख ७१ हजार ७६२ शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे. ​कृषी यांत्रिकीकरणासाठी १४.८५ कोटी रुपये खर्चून २ हजार ९८ शेतकऱ्यांना यंत्र व औजारे खरेदीसाठी मदत केली आहे.
​मोर्शी आणि वरुड येथील सिट्रस इस्टेटमध्ये आता एआय (AI) आधारित तंत्रज्ञान राबविले जाईल.

​सिंचनासाठी 'प्रती थेंब अधिक पीक' योजनेत ३ हजार ५५९ आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत २ हजार १५३ लाभार्थींची निवड झाली आहे. ​प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अमरावती जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला असून ही जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे.
​जिल्ह्याच्या औद्योगिक विकास आणि महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत असल्याचे सांगून सहकार मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले,

अमरावतीमध्ये 'पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क' आणि विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. औद्योगिक वसाहतीत आयटी पार्क आणि आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र आकारास येत आहे. रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १ हजार ५५ कर्ज प्रकरणे मंजूर झाली असून, यात ६३३ महिला उद्योजिकांचा समावेश आहे.
​आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याण
आरोग्य विभागातर्फे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि आयुष्मान कार्ड वाटप सुरू आहे. मेळघाटातील माता-बालमृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी 'मेळघाट परिक्रमा' उपक्रम राबविला जात आहे. महिलांसाठी 'पिंक ई-रिक्षा', 'आई' योजना आणि 'लाडकी बहीण' योजनेद्वारे आर्थिक सक्षमीकरण केले जात असून, जिल्हा 'बालविवाहमुक्त' करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

​पर्यटन क्षेत्रात चिखलदरा येथील स्कायवॉक पूर्ण करण्यावर भर दिला जात असून आमझरी गावाची 'मधाचे गाव' म्हणून निवड झाली आहे. तसेच, संत गाडगेबाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट' विकसित करण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. देशाच्या पहिल्या डिजिटल जनगणनेत नागरिकांनी अचूक माहिती भरून सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त आणि जागतिक कामगार दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

पुरस्कार वितरण सोहळा

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सन 2024-25 या वर्षासाठी 'विशेष जिल्हा युवा पुरस्कार' नाळ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळे, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केल्याबद्दल युवक गटातून अमर वानखडे (तिवसा), युवती गटातून कु. जानव्ही राऊत (नया वाठोडा) तसेच संस्था गटातून श्री. संताजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था (गुरुकुंज आश्रम) यांना सन्मानित करण्यात आले. यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार, व्यसनमुक्ती, रक्तदान आणि आदिवासी विकास क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे.

सन 2025-26 या वर्षासाठी युवक गटात समाजप्रबोधनकार वेदांत मुंदाने (अमरावती), युवती गटात कु. पुजा गुंजरकर (ब्राम्हणवाडा थडी) आणि संस्था गटात स्वामी विवेकानंद विचार मंच (अचलपूर) यांना सन्मानित करण्यात आले. अचलपूरच्या विवेकानंद विचारमंचने आरोग्य सेवा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले आहे.

याशिवाय अपर आयुक्त सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे , सहायक ग्रंथालय संचालक राजेश पाटील, सहायक ग्रंथालय संचालक सुरजकुमार मडावी, अधीक्षक अभियंता मंगेश पाटील, महसूल सहायक मनीषा ढोके, शिक्षिका रितू तळमळे, ग्राम महसूल अधिकारी पवन मुंडे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संजय अंबाडेकर, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या सुमेधा बारलिंगे, मंजिरी महाजन, संध्या साउरकर, कविता पाचघरे,पोलीस निरीक्षक निलेश गावंडे, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुळसुंदरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश श्रीवास, अजय मिश्रा, प्रवीण काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय पेठे, होमगार्ड सैनिक राजेंद्र शाहाकार, पोलीस हवालदार राजेश कोचे, राजीव बाहेनकर, दीपक सुंदरकर, शंकर बावनकुळे,पंकज गावंडे, उज्ज्वल सामुद्रे, सुरक्षारक्षक शिवकुमार तायडे यांना उत्कृष्ट कार्याबाबत यावेळी गौरविण्यात आले.
प्रारंभी विविध शासकीय विभागामार्फत परेड संचलन करण्यात आले. मंत्री श्री. पाटील यांनी परेड संचलनाचे निरीक्षण केले. परेडचे संचलन परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे तसेच दुय्यम परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक श्रीधर गुळसुंदरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन देशमुख यांनी केले.

#महाराष्ट्रदिन





महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनी विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण व मानवंदना

 

          अमरावती, दि. 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या वर्धापन दिनोत्सवा निमित्त अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात प्रभारी विभागीय आयुक्त तथा अपर आयुक्त अजय लहाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. श्री. लहाने यांनी यावेळी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलीस पथकाव्दारे तिरंग्यास मानवंदना देण्यात आली.

                                                                                                                                                                                                      यावेळी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील, अपर आयुक्त संजय जाधव, सुरज वाघमारे, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, नायब तहसीलदार मधुकर धुळे, श्यामसुंदर देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

 


 



 

 


 

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा...
महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

 

राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. या संदर्भात १३ जुलै २०१७ रोजी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्र शासनाच्या आरोग्य संशोधन विभागामार्फत देशभर उभारण्यात येणाऱ्या १५० अत्याधुनिक विषाणू प्रयोगशाळांच्या उपक्रमाचे स्वागत करत महाराष्ट्राला योग्य वाटा देण्याची मागणी करण्यात आली होती. या पत्रात देशाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूर आणि राज्याची राजधानी मुंबई येथे राज्यस्तरीय प्रयोगशाळा तसेच राज्यातील विविध विभागांतील दहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती.

केंद्र शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे राज्यस्तरीय विषाणू प्रयोगशाळा मंजूर केली. याशिवाय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर तसेच अकोला, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धुळे आणि मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता देण्यात आली.
या योजनेसाठी केंद्र शासनाकडून एकूण २९ कोटी २१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करून प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या. कोविड-१९ महामारीच्या काळात या प्रयोगशाळांनी आरटी-पीसीआर चाचण्यांद्वारे मोठी भूमिका बजावली. याशिवाय, या प्रयोगशाळांमुळे विविध विषाणूजन्य आजारांचे निदान करणे शक्य झाले आहे.

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे

 जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. ३० : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.

या संदर्भात 13 जुलै 2017 रोजी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्र शासनाच्या आरोग्य संशोधन विभागामार्फत देशभर उभारण्यात येणाऱ्या 150 अत्याधुनिक विषाणू प्रयोगशाळांच्या उपक्रमाचे स्वागत करत महाराष्ट्राला योग्य वाटा देण्याची मागणी करण्यात आली होती. या पत्रात देशाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूर आणि राज्याची राजधानी मुंबई येथे राज्यस्तरीय प्रयोगशाळा तसेच राज्यातील विविध विभागांतील दहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती.

केंद्र शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे राज्यस्तरीय विषाणू प्रयोगशाळा मंजूर केली. याशिवाय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर तसेच अकोला, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धुळे आणि मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता देण्यात आली.

या योजनेसाठी केंद्र शासनाकडून एकूण 29 कोटी 21 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करून प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या. कोविड-19 महामारीच्या काळात या प्रयोगशाळांनी आरटी-पीसीआर चाचण्यांद्वारे मोठी भूमिका बजावली.

याशिवाय, या प्रयोगशाळांमुळे विविध विषाणूजन्य आजारांचे निदान करणे शक्य झाले आहे. आतापर्यंत कोविड-19 (37,21,154), डेंग्यू (88,327), चिकनगुनिया (39,817), झीका (3,923), स्क्रब टायफस (7,091), इन्फ्लुएंझा (27,536), एचबीव्ही (1,53,180), रोटाव्हायरस (651) अशा एकूण 40,41,689 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळाली असून भविष्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी राज्य अधिक सक्षम झाले आहे.

0000


 

विभागीय आयुक्तालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन



 

अमरावती, दि. 30 : ‘ग्रामगीता’चे रचयिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त सुरज वाघमारे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण विनम्र अभिवादन केले.

यावेळी अपर आयुक्त संजय जाधव, अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.