बुधवार, १३ मे, २०२६

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि  मान्यवरांच्या हस्ते अनावरण


 

मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.



कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर यांचा एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे (देशमुख), बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बास्ते, प्रफुल्ल सावंत, डॉ. दिनेश वैद्य, अँथनी लोपेझ आणि डॉ. किरण शिंदे यांसारख्या दिग्गज डिझाइन तज्ज्ञांच्या समितीने या प्रवेशिकांचे परिक्षण केले. सर्जनशीलता, नाविन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली. या समितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकाद्वारे कुंभमेळा आयोजन आणि लोगो स्पर्धेबाबत माहिती दिली.

यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू, संत उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावेळी उपस्थित साधू संतांचे स्वागत केले.

नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाविषयी

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, 'मायगव्ह' आणि 'असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी डिझाइन स्पर्धेतून या बोधचिन्हाची निवड करण्यात आली. २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत मायगव्ह प्लॅटफॉर्मवर पार पडलेल्या या स्पर्धेत ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह एकूण ३,०६७ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.

 सहभागाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहिले, त्याखालोखाल दिल्ली आणि तामिळनाडूचा क्रमांक लागला. 18 ते 24 वयोगटातील तरुणांनी या स्पर्धेत सर्वाधिक सक्रिय सहभाग नोंदवला.

हे बोधचिन्ह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूगोल आणि धार्मिक परंपरांवर आधारित आहे.

भगवान शंकराचे त्रिशूळ: आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक.

त्र्यंबकेश्वर मंदिर: प्रादेशिक वारशाचे दर्शन घडवणारी मंदिराची प्रतिकृती.

काळाराम मंदिराची कमान आणि गोदावरी नदी: गोदावरी नदीला 'शिवलिंगा'च्या रूपात दर्शविण्यात आले असून, ते कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करते.

00000

  

मंगळवार, १२ मे, २०२६

 



विशेष लेख:

 

भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा

-         ब्रिजेश सिंह, प्रधान सचिव तथा महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच, १३ नोव्हेंबर १९४७ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथ येथे गेले. समुद्रकिनारी उभे राहून त्यांनी मंदिराच्या भग्नावशेषांकडे गंभीर नजरेने पाहिले आणि एक प्रतिज्ञा केली सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची. तो क्षण म्हणजे भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा पहिला मोठा जागर; आपल्या सभ्यतेच्या स्वाभिमानाच्या सार्वजनिक पुनर्प्राप्तीचा क्षण होता.

 

आणि आता, ११ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ अमृत महोत्सवात उपस्थित राहून मंदिराच्या पुनर्स्थापित तेजात सहभाग घेतला, तेव्हा तीच प्रतिज्ञा पुन्हा नव्याने प्रज्वलित झाल्यासारखी वाटते. विशेष महापूजा, कुंभाभिषेक, ध्वजारोहण आणि लाखो भाविकांची उपस्थितीहे सर्व मिळून भग्नावस्थेतून पुनर्निर्माणाकडे आणि पुनरुत्थानाकडे झालेल्या अखंड प्रवासाची घोषणा करतात. सरदार पटेलांच्या दूरदृष्टीपासून आजच्या आत्मविश्वासपूर्ण भारतापर्यंतचा हा अखंड सांस्कृतिक प्रवाह आहे. ही परंपरा, कालातीत आणि प्रेरणादायी, प्रत्येक पिढीला आपल्या वारशाचे जतन करण्याचे, ऐक्याचे रक्षण करण्याचे आणि भारताच्या सनातन आत्म्यावर दृढ श्रद्धा ठेवत समृद्ध, सुसंवादी आणि अखंड भविष्याकडे वाटचाल करण्याचे आवाहन करते.

 

अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांनी एकदा म्हटले होते की वाराणसी इतिहास, परंपरा आणि आख्यायिकांपेक्षाही प्राचीन आहे. पण कदाचित त्यांनी प्रभास पाटण आणि सोमनाथ पाहिले नसावे. भागवत पुराणानुसार, चंद्राला त्याचे सासरे दक्ष यांनी शाप दिला होता. त्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्राने याच स्थळी भगवान शिवाची आराधना केली आणि म्हणूनच सोमनाथचंद्राचा अधिपती’ हे नाव उदयास आले.

 

मंदिर उभे राहण्याच्या खूप आधीपासून प्रभास पाटण हे मानवी वस्तीचे केंद्र होते. इ.स.पू. ३००० पासून येथे शेती आणि पशुपालन करणारी पूर्व-हडप्पा संस्कृती अस्तित्वात होती. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतरही येथे जीवन टिकून राहिले. येथे सापडलेली रेड पॉलिश्ड वेअर मातीची भांडी आणि प्रारंभीच्या लिपींचे पुरावे याची साक्ष देतात. इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांत हे एक साधे पण महत्वाचे नगर होते. समुद्रकिनाऱ्यालगत ७ ते १० मीटर खोलीवर सापडलेले दगडी नांगर प्राचीन सागरी व्यापाराचे साक्षीदार आहेत. हा किनारा केवळ निसर्गरम्य नव्हता, तर व्यापाराचे प्रवेशद्वार होता. येथे वस्ती आणि पवित्रता एकत्र वाढत गेली.

 

प्राचीन ग्रंथांमध्ये प्रभास क्षेत्राला तीर्थ म्हणून संबोधले आहे. महाभारतामध्ये भगवान कृष्णाच्या देहत्यागाचे स्थळ म्हणून प्रभासाचा उल्लेख आहे. दगडांनी अमरत्वाची भाषा शिकण्यापूर्वीच हा किनारा सांसारिक आणि आध्यात्मिक जगामधील एक पवित्र संगम होता. त्याची प्रारंभीची रूपे साधीलाकूड आणि गवताचीअसली, तरी ती मानवी मनाच्या दैवी शोधाची खूण होती.

 

इ.स. ६४९ च्या सुमारास वल्लभीच्या मैत्रक राजवटीत पहिले ऐतिहासिकदृष्ट्या प्रमाणित मंदिर उभे राहिले. पुढे ९व्या१०व्या शतकात चालुक्य/सोलंकी काळात सोमनाथ हे काशी आणि उज्जैनच्या बरोबरीचे प्रमुख तीर्थस्थान बनले. पुरातत्त्ववेत्ता बी. के. थापर यांना १९५०५१ मधील उत्खननात असलेले गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप यांचा समावेश असलेली भव्य रचना. पूर्वाभिमुख त्रि-अंग संधार प्रासादाचे अवशेष सापडले. लक्षुलीश मूर्तीच्या अवशेषांनी त्याची शैव परंपरा सिद्ध केली. विद्वान मंदिराच्या नेमक्या कालखंडावर मतभेद करतात, परंतु एक गोष्ट निर्विवाद आहेसोमनाथ त्या काळात अत्यंत वैभवशाली झाले होते आणि लवकरच त्याची कठोर परीक्षा होणार होती.

 

ही परीक्षा अनेक लाटांमध्ये आली. इ.स. ७२५ मध्ये उमय्यद सेनापती जुनैद इब्न अब्द अल-रहमान अल-मुरीने हल्ला केला, जो पहिला इस्लामी आक्रमण मानला जातो. परंतु सर्वात मोठा आघात ८ जानेवारी १०२६ रोजी झाला, जेव्हा गझनीचा महमूद आपल्या पंधराव्या मोहिमेत सोमनाथावर चालून आला. शिवलिंग फोडण्यात आले, खजिना लुटण्यात आला. अल बिरुनी यांनी मंदिरातील संपत्तीचे वर्णन केले आहे. सोने, चांदी, मोती, रत्ने आणि गावांच्या महसुलातून जमा झालेली संपदा.

 

तथापि, पुरातत्त्वीय पुरावे दर्शवतात की मंदिराचे भग्नावशेष त्वरित एकत्र करून सुरक्षितपणे पुरले गेले. म्हणजेच, श्रद्धा उद्ध्वस्त झाली नव्हती. इ.स. १०३८ मध्ये गोव्याच्या कदंब राजाने सोमनाथाला भेट दिली, यावरून पूजा-अर्चा किंवा पुनरुज्जीवनाची भावना त्वरित पुन्हा उभी राहिल्याचे दिसते. मंदिराचे रूप तुटले, पण संस्कृतीचे चेतन कायम राहिले.

 

पुढील काळातही विध्वंस आणि पुनर्निर्माण यांचे चक्र सुरूच राहिले. इ.स. ११६९ मध्ये सोलंकी राजा कुमारपालाने पाचवे भव्य दगडी मंदिर उभारले. प्रभास पाटण येथील भद्रकाली मंदिरातील शिलालेखात त्याचा उल्लेख आहे.

 

त्यानंतर १२९९ मध्ये अलाउद्दीन खिलजीचा सेनापती उलुघ खानने मंदिर उद्ध्वस्त केले. स्थानिक रक्षक वाजा मालसुत आणि पदमल यांनी मंदिररक्षण करताना प्राण दिले. पुढे चुडासमा राजा महिपाल देव यांनी १३०८ मध्ये मंदिराचे पुनर्निर्माण केले आणि त्यांचा पुत्र खेङ्गाराने शिवलिंगाची पुनःप्रतिष्ठा केली.

 

यानंतर झफर खानने १३९५ मध्ये मंदिर उद्ध्वस्त करून तेथे जामा मशिद आणि प्रशासकीय ठाणे उभारल्याचे उल्लेख आहेत. पुढे महमूद बेगडा, पोर्तुगीज आक्रमक, आणि नंतर औरंगजेब यांच्या आदेशाने १६६५ आणि १७०६ मध्ये पुन्हा विध्वंस घडवून आणण्यात आला. पुजाऱ्यांची हत्या, मंदिर परिसरातील अपवित्र कृत्ये आणि संपूर्ण रचना पाडण्याचे प्रयत्न झाले; परंतु तीर्थक्षेत्र टिकून राहिले.

 

जरी मंदिर वारंवार उद्ध्वस्त झाले, तरी स्मृती कधीच नष्ट झाली नाही. इ.स. १७८२८३ मध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या वैयक्तिक निधीतून सोमनाथाजवळ नवीन दगडी मंदिर उभारले. हे मंदिर १९व्या आणि २०व्या शतकात सोमनाथच्या श्रद्धेचे केंद्र राहिले.

 

१८४२ मध्ये ब्रिटिश गव्हर्नर-जनरल लॉर्ड एलेनबरो यांनी अफगाणिस्तानातील महमूद गझनीच्या कबरीतून चंदनाचे दरवाजे आणले आणि ते सोमनाथचे मूळ दरवाजे असल्याचा खोटा दावा केला. हा ब्रिटिश सत्तेचा हिंदू समाजाचे समर्थन मिळवण्यासाठी आणि ब्रिटिश राजवटीला वैध ठरवण्यासाठी राजकीय प्रचार होता. हे दरवाजे नंतर आग्रा किल्ल्यात ठेवण्यात आले.

 

१९२२ मध्ये के.एम. मुन्शी यांनी सोमनाथचे भग्नावशेष पाहिले. त्यांनी त्या अनुभवाचे वर्णन भक्ती आणि लज्जा असे केले आणि याच अनुभवातून त्यांच्या मनात मंदिर पुनर्निर्माणाची आजीवन बांधिलकी निर्माण झाली.

 

स्वातंत्र्यानंतर सोमनाथच्या इतिहासाचे अंतिम पर्व सुरू झाले. ऑक्टोबर १९४७ मध्ये जुनागढ भारतात विलीन झाले आणि हिंदूंना मंदिर दुरुस्तीवरील बंदी हटवण्यात आली. १२१३ नोव्हेंबर १९४७ रोजी सरदार पटेल, एन. व्ही. गाडगीळ आणि जामसाहेब यांनी भग्नावशेषांना भेट दिली. तेव्हा पटेलांनी जाहीर केले: या शुभ नववर्षदिनी आम्ही सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणाचा निर्णय घेतला आहे.

 

जुनागढ प्रशासन आणि जामसाहेबांनी तत्काळ देणग्या दिल्या. सुमारे ५,००० एकर जमीन मंदिर, संस्कृत विद्यापीठ आणि सांस्कृतिक केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आली.

 

यानंतर वाद निर्माण झाला. महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार सरकारने थेट निधी न देता लोकवर्गणीतून मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून हे राज्यप्राय धार्मिक प्रकल्प न राहता लोकसहभागातून उभे राहिलेले सांस्कृतिक पुनरुत्थान ठरेल.

 

दरम्यान, तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी या प्रकल्पाला हिंदू पुनरुत्थानवाद म्हणून विरोध केला. परंतु सार्वजनिक देणग्यांमुळे प्रकल्प थांबवता आला नाही.

 

१५ डिसेंबर १९५० रोजी सरदार पटेल यांचे निधन झाले, तरी काम सुरूच राहिले. अखेर ११ मे १९५१ रोजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सोमपुरा शिल्पकारांनी बांधलेल्या मारू-गुर्जर शैलीतील मंदिरात नवीन ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली. शतकानुशतके कुजबुजत राहिलेली प्रतिज्ञा अखेर दगडात साकार झाली. नेहरू या समारंभाला उपस्थित नव्हते.

 

आज सोमनाथ हे केवळ पर्यटनस्थळ किंवा धार्मिक प्रतीक नाही; ते दगड आणि गाळात लिहिलेले भारतीय संस्कृतीचा इतिहासग्रंथ आहे. त्याची खरी ओळख अखंड वैभवात नसून प्रत्येक विध्वंसानंतर पुन्हा उभे राहण्याच्या मानवी निर्णयात आहे.

 

त्याच्या पायाभूत थरांमध्ये हडप्पाकालीन वसाहती, प्राचीन व्यापारी आणि शांतीच्या शोधात आलेले भक्त सामावलेले आहेत. प्रत्येक पुनर्निर्माणमैत्रक राजे, सोलंकी सम्राट, मराठा राण्या किंवा नवस्वतंत्र भारत यांनाही समाप्ती नाही; आम्ही पुन्हा उभारू हा एक जाणीवपूर्वक केलेला उच्चार होता.

 

सोमनाथ आपल्याला शिकवते की लवचिकता म्हणजे कधीही न पडणे नव्हे, तर पडूनही कायमचे न राहणेपुन्हा पुन्हा उभे राहणे. समुद्रकिनारी उभे असलेले हे मंदिर केवळ भगवान शिवाचे स्मारक नाही; तर त्या अदम्य मानवी आत्म्याचे प्रतीक आहे, जो शतकानुशतके समुद्राच्या काठावर येऊन शांतपणे म्हणत राहतो

 

आम्ही अजूनही येथे आहोत.

आम्ही स्मरण ठेवतो.

आम्ही पुन्हा उभारतो.

आम्ही टिकून राहतो.

००

#सोमनाथ_स्वाभिमान_पर्व

#Somnath
See le


 आरोग्य विभागाची गरुडझेप : २८ बालकांना थॅलेसिमियामुक्त नवजीवन!


जागतिक थॅलेसिमिया दिनानिमित्त ‘एचएलए’ तपासणी शिबिर संपन्न



अमरावती, दि. १२ : एका आईच्या डोळ्यांतील आनंदाश्रू, वडिलांच्या चेहऱ्यावर उमललेले हास्य आणि रक्ताच्या बाटल्यांपासून मुक्त झालेलं बालपण... हे सुखद चित्र आज अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामुळे साकार झाले आहे. 'जागतिक थॅलेसिमिया दिनाचे' औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरात अमरावती आरोग्य विभागाने थॅलेसिमियामुक्तीच्या दिशेने एक आशादायी पाऊल टाकले असून, आतापर्यंत २८ बालकांना यशस्वी बोन मॅरो ट्रान्सप्लांटद्वारे नवे आयुष्य मिळाले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील डे केअर युनिट आणि संकल्प इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक थॅलेसिमिया दिनानिमित्त मोफत एचएलए (HLA) तपासणी शिबिर नुकतेच पार पडले. बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या तपासणीमुळे अनेक बालकांना भविष्यात थॅलेसिमियामुक्त जीवन जगण्याची नवी आशा मिळाली आहे. या शिबिरात २० बालकांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात आली.

विशेष म्हणजे, ज्या रुग्णांना अधिक गुंतागुंतीच्या चाचण्यांची गरज आहे, त्यांचे नमुने जर्मनी येथे पाठवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. थॅलेसिमियाग्रस्त बालकांसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्याला मिळालेली नवसंजीवनी आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्प इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाने थॅलेसिमियाशी झुंज देणाऱ्या कुटुंबांना नवआयुष्याची उमेद मिळाली आहे.

दरवर्षी 8 मे रोजी जगभरात जागतिक थॅलेसीमिया दिन साजरा केला जातो. ‘थॅलेसीमिया’ हा एक आनुवंशिक रक्ताचा आजार आहे, जो आई वडीलांपासून मुलांना येतो. या आजाराचे लक्षण जवळपास 3 महिन्या नंतर कळून येतात. या आजारामध्ये बाळाच्या अंगात रक्ताची कमी होऊ लागते. जेणेकरून त्याला बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता येते. वारंवार रक्त द्यावे लागल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोह तत्त्व जमा होतं जे पुढच्या आयुष्यात हृदयासाठी प्राणघातक ठरू शकतं.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डे केअर युनिटमार्फत सीएमसी वेल्लोर, बंगळुरू, अहमदाबाद, SRCC मुंबई व इतर नामांकित रुग्णालयांमध्ये आतापर्यंत २८ बालकांचे यशस्वी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यात आले असून ही सर्व बालके आज निरोगी आणि थॅलेसिमियामुक्त आयुष्य जगत आहेत. या कृतीमुळे बालकांच्या पालकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि संकल्प इंडिया फाउंडेशनप्रती कृतज्ञता व्यक्त केली. थॅलेसिमियाविरुद्धची ही लढाई आता केवळ उपचारापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती अनेक निष्पाप बालकांना नवजीवन देणारी आशेची चळवळ बनली आहे.


--------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य विभागाची प्रभावी कामगिरी (सी.एस. डॉ. विनोद पवार यांचे कोट)

"राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या संकल्पनेनुसार आम्ही जिल्ह्यात थॅलेसिमियामुक्तीसाठी कटिबद्ध आहोत. "थॅलेसिमियाग्रस्त बालकांसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून, ती त्यांच्या आयुष्याला मिळालेली नवसंजीवनी आहे." - डॉ. विनोद पवार, जिल्हा शल्यचिकित्सक

--------------------------------------------------------------------------------------------------------------

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डे केअर युनिटव्दारे आयोजित शिबिरात २४७ रुग्णांना अपंग प्रमाणपत्र तर ३५४ रुग्णांना SBTC कार्ड वितरित करण्यात आले. तसेच ६२ मातांची CVS तपासणी करण्यात आली, ज्याद्वारे ४६ बालके थॅलेसिमियामुक्त असल्याचे जन्मापूर्वीच निष्पन्न झाले. संकल्प इंडिया फाउंडेशनच्या टीमने २० रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचे रक्तनमुने संकलित करून पुढील तपासणीसाठी बंगळुरू येथे पाठविले आहेत. आवश्यकतेनुसार काही रुग्णांना पुढील विशेष तपासणीसाठी जर्मनी येथे पाठविण्याची प्रक्रिया देखील करण्यात येणार, अशी माहिती हिमेटोलॉजी समुपदेशक मनोज सहारे यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. संदीप हेडाऊ सर (निवासी वैद्यकीय अधिकारी), डॉ. सोळंके सर (RMO), डॉ. मनीष पाडिया (संकल्प इंडिया फाउंडेशन, अकोला), डॉ. सोनाली शिरभाते मॅडम (बालरोग विभाग प्रमुख), डॉ. श्याम गावंडे (मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष) तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनोज सहारे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्रिशिला सरदार, डॉ. वासनकर मॅडम, डॉ. काबळे मॅडम (भौतिकोपचार), ललिता अग्रवाल (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), चव्हाण सिस्टर तसेच डे केअर युनिटच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

#थॅलेसिमिया
#आरोग्य


 भारताचा प्राचीन ज्ञानवारसा आता डिजिटल स्वरूपात ; 'ज्ञानभारतम्' मोहिमेचा देशभरात शुभारंभ !

विभागीय आयुक्तांकडून नागरिकांना सहभागाचे आवाहन

जिल्हानिहाय समन्वयकांची नेमणूक

हस्तलिखितांची माहिती नोंदविण्यासाठी ‘ज्ञानभारतम्’ मोबाईल ॲप

 

               अमरावती, दि. 11 : भारताचा समृद्ध आणि मौल्यवान हस्तलिखितांचा वारसा जतन करण्यासाठी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने ‘ज्ञानभारतम्’ ही महत्त्वाकांक्षी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत देशभरातून एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला 16 मार्च पासून सुरुवात झाली आहे. या मोहिमेत अमरावती विभागातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

 

             भारताला हस्तलिखितांचा मोठा वारसा लाभलेला आहे. ही हस्तलिखिते विविध ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आहेत. हे सर्व ज्ञानभंडार एकत्र करून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अंतर्गत हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार केला जाणार आहे. यात हस्तलिखितांचा 'राष्ट्रीय डिजिटल संग्रह' (National Digital Repository) तयार करण्यात येणार असून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या प्रक्रियेत हस्तलिखितांची मालकी ही मूळ संस्था, ग्रंथालय किंवा खासगी संग्राहक यांच्याकडेच राहणार आहे. मात्र, स्वखुशीने ही हस्तलिखिते शासनाकडे सुपूर्द करायची असल्यास शासन स्विकारणार आहे.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, हस्तलिखित संग्रहालये तसेच विद्वान आदींच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाणार आहे. प्रकल्पासाठी राज्याची नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालयाची नियुक्ती करण्यात आली असून कवि कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूरला क्लस्टर केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहे. या केंद्राचे डॉ. राजेंद्र जैन (मो.9372071292) यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

      या सर्वेक्षणासाठी ‘ग्यान भारतम्’ (Gyan Bharatam) हे विशेष मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. त्याद्वारे हस्तलिखितांचे मूल्यांकन, पडताळणी व दस्तऐवजीकरण केले जाणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याव्दारे संबंधित जिल्ह्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांची ज्ञानभारतम प्रकल्प जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित जिल्हा नोडल अधिकारी आणि जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून विविध मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था व खासगी संग्राहकांना या मोहिमेत जोडून घेतले जात आहे. या मोहिमेत विद्यार्थी, संशोधक, पारंपरिक पंडित, एनसीसी आणि एनएसएसच्या स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

ज्ञानभारतम् मोहिमेकरीता जिल्हानिहाय नेमणूक केलेल्या नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकाऱ्यांची यादी व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे : अमरावती व अकोला जिल्ह्याकरीता श्री. दीपक पाटील (मो.9423102051) व डॉ. प्रशांत सोनवणे (मो.8600751897), वाशिम जिल्ह्यासाठी श्री. गजानन शेळके (मो.7767802263) व श्याम बोरकर (मो.9405500812), बुलडाणाकरीता गजानन शेळके व डॉ. प्रशांत सोनवणे तर यवतमाळ जिल्ह्यासाठी श्रीमती गीता सानगरवार (मो.9370150911) व श्याम बोरकर आदी अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहतील.

नागरिकांकडे अथवा संस्था, मंदिरे, ग्रंथालये किंवा खासगी संग्रहात जुनी हस्तलिखिते उपलब्ध असल्यास, त्याची माहिती ‘ग्यान भारतम्’ या मोबाईल अॅपवर अपलोड करावीत. या अमूल्य ज्ञानवारशाचे जतन करण्याच्या कार्यात नागरिक, संस्था आणि संशोधकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.

सोमवार, ११ मे, २०२६

 #ज्ञानभारतम





 विभागीय लोकशाही दिनात चौदा प्रकरणांवर सुनावणी

लोकशाही दिनात दाखल प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्यासाठी प्रयत्न करा

                                             - विभागीय आयुक्त नयना गुंडे

             अमरावती, दि. 11 : विभागीय लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या प्रकरणांवर विहीत कालमर्यादेत कार्यवाही करुन अंतिम अहवाल सादर करणे तसेच संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करणे आवश्यक आहे. यानुसार प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांच्या संदर्भात प्रत्यक्ष स्थळ पाहणी, चौकशी अहवाल आदींची पडताळणी करुन प्रकरणांचा निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी संबंधित विभागप्रमुखांना आज दिले. लोकशाही दिनात दाखल एकूण 14 प्रकरणांवर चर्चा करुन त्यानुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.

विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात श्रीमती गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे कामकाज आज पार पडले. यावेळी अपर आयुक्त संजय जाधव, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, गिता वंजारी यांच्यासह महसूल, पोलीस, महापालिका, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी प्रत्यक्षरित्या तर पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.

            यावेळी विभागीय लोकशाही दिनात अमरावती विभागातून दाखल एकूण 14 प्रकरणांवर चर्चा करुन  प्रत्येक तक्रारींच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेण्यात आला. एकूण 14 प्रकरणापैकी 4 प्रकरणे निकाली काढण्यात आली. 2 प्रकरणे नव्याने दाखल झालीत. 12 प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांनी स्थळ पाहणी, मुद्देनिहाय चौकशी, पडताळणी करुन सुस्पष्ट अंतीम अहवाल तत्काळ सादर करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले. विभागीय महिला लोकशाही दिनांतर्गत एकही प्रकरण दाखल झाली नाही, अशी माहिती महिला व बालविकास विभागाव्दारे देण्यात आली.

यावेळी लोकशाही दिनासाठी अमरावती विभागातून उपस्थित राहिलेल्या तक्रारदारांचे म्हणने ऐकूण घेण्यात आले. मागील लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे नवीन लोकशाही दिनात सुनावणीसाठी येवू नये. न्यायप्रविष्ट किंवा अर्धन्यायिक प्रकरणांसंदर्भात तत्काळ अहवाल सादर करण्यात यावा. लोकशाही दिनासाठी दाखल होणाऱ्या तक्रार अर्जांवर वेळेत कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागाने जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचना श्रीमती गुंडे यांनी यावेळी दिल्यात.





सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक

– राज्यपाल जिष्णु देव वर्मा

सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्षी या विशेष भक्तिपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबईदि. ११ : सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नसून भारतीय संस्कृतीश्रद्धा आणि सनातन परंपरेच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक आहे. हजारो वर्षांच्या आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आजही दिमाखात उभे आहेहीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

गुजरात येथील सोमनाथ मंदिरांच्या पुनर्बांधणीस ७५ वर्षे पूर्ण झाली असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ मे रोजी प्रभास पाटण येथे विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने भारतीय संस्कृतीश्रद्धा आणि परंपरेचा जागर घडवणारा सांस्कृतिक सोहळा सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्ष या विशेष भक्तिपूर्ण कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्य विभागामार्फत श्री धाकलेश्वर महादेव मंदिरमुंबई येथे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा बोलत होते. यावेळी इलेक्ट्रानिक, माहिती तंत्रज्ञान  कृत्रिम बुद्धिमत्ता तथा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारराज्यपाल यांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरेसांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णीसांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडेमंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त अशोक भन्साळे यांनीही महादेवाचे दर्शन घेतले. यानंतर मान्यवरांनी सोमनाथ स्वाभिमान पर्व’ प्रदर्शनालाही भेट दिली.

सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेच्या ७५ वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सोमनाथ मंदिराच्या ऐतिहासिकआध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्वावर प्रकाश टाकला. महमूद गझनीपासून औरंगजेबापर्यंत अनेक परकीय आक्रमकांनी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलामात्र मंदिराचे अस्तित्व आणि त्यामागील श्रद्धा कधीही नष्ट होऊ शकली नाहीअसे त्यांनी सांगितले. भारत हा केवळ भौगोलिक देश नसून तर तो एक चिरंतन संस्कृती आहे. विविध मंदिरेसाधू-संत आणि सनातन परंपरेमुळे भारताचा आत्मा आजही जिवंत आहे. सनातन’ म्हणजे ज्याचा अंत नाही आणि सोमनाथ मंदिर हे त्याचे जिवंत उदाहरण आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना शुभदा वराडकर यांच्या नृत्याविष्काराने झाली. भारतीय संस्कृतीअध्यात्म आणि परंपरेचा समृद्ध आविष्कार त्यांच्या सादरीकरणातून अनुभवायला मिळाला. सादर झालेल्या नृत्याविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 0000 

#सोमनाथ स्वाभिमान पर्व –