गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०२६



              मुंबईत 2728 मार्च रोजी वैद्यकीय परिषद 'पल्स' चे आयोजन

'पल्स' परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा 'महाराष्ट्र ब्रँड' निर्माण करा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ५ : वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या 'पल्स' या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर, येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या परिषदेत देशातून आणि जगभरातून वैद्यक क्षेत्रातील २९०० पेक्षा जास्त तज्ज्ञ, अभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत.

 'पल्स' वैद्यकीय परिषदेचे भव्य दिव्य आयोजन करून परिषदेच्या माध्यमातून 'वेलनेस' उपचारांचा  वैद्यकीय पर्यटनातील 'महाराष्ट्र ब्रँड' निर्माण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी परिषद आयोजनाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.

        पारंपरिक खर्चिक असलेल्या वैद्यकीय उपचाराऐवजी 'वेलनेस' उपचारांकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. 'वेलनेस' उपचार पद्धतीत राज्यात मोठ्या प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे आयुषमधील उपचार पद्धतींना 'वेलनेस' कडे वळविण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक स्टार्टअप कार्यरत आहेत. अधिकाधिक स्टार्टअपला परिषदेत सहभागी करून घ्यावे. जेणेकरून परिषदेमध्ये या क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन संशोधनावर आधारित चर्चांमधून कर्करोगासारख्या आजारांवर सहज, सोपी आणि परवडणारी उपचार पद्धती विकसित करण्यात स्टार्टअपला मदत होईल.वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदार या परिषदेत सहभागी होतील याबाबत दक्षता घ्यावी, त्यांच्या माध्यमातून राज्यात होत असलेल्या 'बल्क ड्रग पार्क' मध्ये गुंतवणूक होईल, यासाठी प्रयत्न करावे. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभागांनी नोडल अधिकारी नियुक्त करावेत. सबंधित विभागांनी समन्वयाने काम करीत परिषदेच्या आयोजनातून राज्याला वैद्यकीय क्षेत्रात मोठा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

          वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा बळकट होण्यासाठी परिषदेत वैद्यक क्षेत्रातील गुंतवणूकदारांसोबत करार करण्यात यावेत. यामधून ग्रामीण भागात आरोग्याच्या दर्जेदार सुविधा निर्माण होतील. मानसिक आजारांवरील नवनवीन उपचार पद्धती, वैद्यकीय पर्यटन विकसित होण्यासाठी परिषदेच्या संधीचा उपयोग करण्यात यावा.

           बैठकीस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्रीधर दुबे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुख्यमंत्री यांच्या सल्लागार पूजा मिसाळ, आदी उपस्थित होते.


 अशी असणार परिषद

-परिषदेचे उद्घाटन 27 मार्च रोजी होईल.

-परिषदेत प्लेनरी, 360 डिग्री डोम, आदींसह स्टार्टअपसाठी वेगळी दालने असणार आहेत. -तसेच उद्योग क्षेत्रातील नवनवीन संशोधनाची माहिती असणारी दालने असणार आहेत.

-परिषदेत जागतिक आरोग्य संघटना, युनेस्को यांचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी होतील.

-जगातील नामांकित वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचे कुलगुरू आणि संशोधकही परिषदेत सहभाग घेणार आहेत. -भविष्यातील वैद्यकीय शिक्षण, डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, उपचार पद्धतीतील संशोधन या विषयांवर पॅनल चर्चा, कार्यशाळा आणि केस स्टडीज होणार आहेत.

-तसेच प्रदर्शन, राऊंड टेबल चर्चा, 'टेक टॉक' असणार आहे. 

0000


विशेष लेख : मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीने राज्यात भूजल सुधार ; ३५२ तालुक्यात सकारात्मक बदल ! -रितेश मो.भुयार,



 

 

विशेष लेख :

मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीने राज्यात भूजल सुधार ; ३५२ तालुक्यात सकारात्मक बदल !

  कोणत्याही राज्याला सुजलाम सुफलाम होण्यासाठी व जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी भुजलाचा स्तर चांगला असणे गरजेचे असते. भूजलस्तर सुधार म्हणजे  दुष्काळापासून मुक्तता हा मंत्र  ठरला आहे. राज्याला दुष्काळ मुक्त करण्याचा हाच ध्यास व मंत्र  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उराशी बाळगून वर्ष 2015 च्या सुरुवातीलाच ‘जलयुक्त शिवार’ ही महत्वाकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून भूजलस्तर वाढून राज्यात दुष्काळी भागाची स्थिती सुधारली. या कार्यक्रमाला जोड म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सक्षम नेतृत्वात राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’, ‘अटल भूजल योजना’ आणि ‘जलजीवन मिशन’ ची अंमलबजावणीही प्रभावीपणे होत आहे. परिणामी  केंद्रशासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहिते प्रमाणे विहित कार्यपद्धतीत अंतर्गत भूजल दुष्काळ निर्देशांकानुसार वर्ष २०२५ अखेर राज्यातील ३५३ तालुक्यांपैकी ३५२ तालुक्यात दुष्काळ नसल्याचे व भूजल तूट वर्गवारी  सामान्य असल्याची आणि मागील दहा वर्षांच्या तुलनेत भूजल स्तर १.५२ मिटरने वाढल्याची सुवार्ता पुढे आली आहे.

  राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेच्या उपजीविकेचा मुख्य स्त्रोत शेतीच आहे तर ८२ टक्के भूभाग हा पावसावर अवलंबून आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील काही गावांमध्ये अनिश्चित व अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होऊन लोकांच्या राहणीमानावर आणि शेतीवर त्याचा प्रतिकुल परिणाम होत असल्याचे चित्र होते. पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळीत होणारी तूट भरून काढण्यासाठी व या सर्व परिस्थितीत कृतीशील कार्याद्वारे बदल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने २६ जानेवारी २०१५ रोजी राज्यात ‘जलयुक्त शिवार’ ही  महत्वाकांक्षी योजना राबविण्यास सुरुवात झाली. २५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याच्या उदिष्टातून लोकसहभागाद्वारे सूक्ष्म सिंचन आणि पावसाचे पाणी साठविण्यास सुरुवात झाली. स्थानिक जलप्रवाहांना मोठया जलप्रवाहांशी आणि नैसर्गिक प्रवाह उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जलवाहिन्या तयार करून जलप्रवाहांशी जोडण्यात आले. पाण्याच्या प्रवाहाची आवक होऊन हे पाणी संवर्धनासाठी सूक्ष्म जलसाठयांमध्ये वाहून नेण्यात येऊ लागले. उपलब्ध जलप्रवाहांचे पुनरुज्जीवन करण्यावर आणि गावांमध्ये नवीन जलप्रवाह निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

नद्यांच्या तळांचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यावर भर देण्यात आला. पाण्याची झिरपण रोखण्यासाठी तलाव, तळी, शेततळे आणि कालव्यांमधून गाळ काढण्यात आला. चेकडॅम, कालवे, लहान तलाव आणि सार्वजनिक व खाजगी विहीरी बांधण्यात आल्या. पावसाच्या पाण्याची साठवण करण्यात आली. विशेष करून दुष्काळी भागात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यात आले. शेतीसाठी कार्यक्षमतेने पाणी वापराबाबत जागरुकता निर्माण करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले आणि मोठया प्रमाणात वृक्षारोपणही करण्यात आले. परिणामी २०१९ पर्यंत राज्यात अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण होऊन १९ हजार ६५५ गावे कायमस्वरुपी दुष्काळ मुक्त झाले. याकाळातच २२ हजार ५३९ गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या ६ लाख ३२ हजार ८९६ कामांद्वारे २७ लाख ८ हजार २९७ टीएमसी जलसाठा क्षमता निर्माण होऊन ३९ लाख ४ हजार ३९४ हेक्टर सिंचन क्षमतेचा भूभाग निर्माण झाला. याद्वारे २९ हजार ५४४ गावांना पाणी पुरवठा करण्याचे लक्ष पूर्ण झाले. लक्षणीय यशानंतर पुन्हा ३ जानेवारी २०२३ पासून राज्यात ‘जलशिवार योजना’ (२.०) सुरु करण्यात आली .

    प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता निर्माण करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने वर्ष 2015-16 पासून 'प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना' सुरू केली. राज्याच्या 34 जिल्ह्यांमध्ये केंद्र व राज्याच्या 60:40 हिश्श्याच्या अर्थसाहाय्याद्वारे  ही योजना सुरु आहे.

 माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95 व्या जन्मदिनी 25 डिसेंबर 2019 रोजी केंद्र शासनाने महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या 78 जिल्ह्यांमधील कायम दुर्भिक्ष असणाऱ्या 8350 ग्राामपंचायतीसाठी 'अटल भूजल योजना’ सुरु केली. जागतिक बँकेच्या सहकार्यातून केंद्र शासनाने या योजनेसाठी 6000 कोटी रुपयांस मंजुरी दिली होती. लोकसहभागातून या योजनेत अंतर्भूत  सर्व 78 जिल्ह्यांमधील 8350 ग्राामपंचायतींचा भूजल आराखडाही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

‘जल जीवन मिशन’ या केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या योजनेमुळेही ग्रामीण महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण घराला सुरक्षित, शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी नळजोडणीद्वारे नियमितपणे उपलब्ध करुन देण्याचा उद्देश यशस्वी होताना दिसत आहे.                     १५ ऑगस्ट २०१९ रोजी सुरु झालेल्या या योजनेनुसार राज्यात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन’  सुरु करण्यात आले. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा तसेच अन्य विभागांच्या समन्वयाने व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या मान्यतेने जल जीवन मिशन चे जिल्हास्तरीय आराखडे तयार करण्यात येतात.

 या सर्व प्रयत्नांतून राज्यातील दुष्काळी परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या भूजल दुष्काळ निर्देशांकात ते प्रकर्शाने दिसते. त्याविषयी जाणून घेवूया.

अशी होते भूजल पातळी जाहीर

   राज्याच्या महसूल व वनविभागाचा ७ ऑक्टोबर २०१७ चा शासन निर्णय आणि केंद्र शासनाची दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ च्या अनुषंगाने राज्यात दुष्काळ जाहीर करण्याचे निकष व कार्यपद्धती विहीत करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रामुख्याने वनस्पती निर्देशांक, मृद आर्दता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक व पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण, सत्यापन विचारात घेण्यात येतात.

यातील जलविषयक निर्देशांक हा राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कार्यरत व पुणे स्थित भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए) द्वारे तयार करण्यात येतो. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिक गरजांसाठी भूजलाचे सर्वेक्षण, संशोधन, नियोजन आणि विकास करणारी ही यंत्रणा तालुका निहाय भूजल दुष्काळ निर्देशांक तयार करून  या निर्देशांकाचे मूल्य व त्यानुसार भूजल तुटीची वर्गवारी दर तीन महिन्याने जाहीर करते.

राज्यात एकुण 3920 निरिक्षण विहिरी स्थिर भूजल पातळीच्या मोजपासाठी स्थापित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ऑक्टोबर 2025 मध्ये 3665 निरीक्षण विहिरींची माहिती संकलित करण्यात आली असून त्यानुसार वर्ष 2025 चा भूजल पातळी निर्देशांक काढण्यात आला आहे. यात राज्यातील 33 जिल्ह्यांतील 352 तालुक्यांमध्ये भूजल पातळी ०.१५ च्या आत असून भूजल तुटीची वर्गवारी सामान्य असून  अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात हा निर्देशांक ०.१६ ते ०.३० दरम्यान असल्याने भूजल तुटीची वर्गवारी सौम्य वर्गात समाविष्ट आहे. ०.६० पर्यंत एकूण पाच स्तरांमध्ये भूजल पातळी निर्देशांकानुसार सामान्य, सौम्य, मध्यम, गंभीर आणि अती गंभीर अशी भूजल तुटीची वर्गवारी काढण्यात येते.

 

भूजल स्तरात १.५२ मिटरने वाढ

मागील दहा वर्षांच्या तुलनेत भूजल स्तर १.५२ मिटरने वाढला असून राज्याच्या दृष्टीने ही महत्वाची उपलब्धी आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत राज्यातील कोणताच तालुका  मध्यम, गंभीर आणि अती गंभीर भूजल तुटीच्या वर्गात नसल्याने हे सकारात्मक चित्र आहे.

 

 भूजल पातळी निर्देशांकानुसार भुजलाच्या दृष्टीने नेहमीच संवेदनशील समजल्या जाणाऱ्या  विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सकारात्मक बदल घडल्याचे दिसून येते. अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी जिल्ह्यांमधील सर्वच तालुके सामान्य भूजल तुटीच्या श्रेणीत आहेत. त्याच प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्येही भूजल तूट स्थिर असून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांमधील तालुक्यांचा यात समावेश आहे.

              भुगर्भातील जल हे शाश्वत आहे. शेती, पिण्यासाठी, पर्यावरण आणि उद्योगासाठी आपणास ते वर्तमानकाळात  टिकवून भविष्यासाठीही राखून ठेवायचे आहे. त्यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने सुरु झालेली ‘जलयुक्त शिवार योजना’ आणि राज्यातील दुष्काळ कायमचा नष्ट करण्यासाठी ‘नदी जोड प्रकल्प’ राबविण्याच्या कामालाही गती प्राप्त झाली आहे. त्याचा परिणाम होऊन झालेले बदल  भूजल पातळी निर्देशांकातील आकडयांद्वारे अधिक  स्पष्ट झाले आहेत. या योजनांसह केंद्र शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने राज्य मार्गक्रमण करीत आहे.

                                            रितेश मो.भुयार,

                                           माहिती अधिकारी,

                                    माहिती व जनसंपर्क नागपूर.

 

                                                      ०००००

 

 

 

 

 

विभागीय आयुक्तालयात 9 फेब्रुवारीला विभागीय लोकशाही दिन

 


विभागीय आयुक्तालयात

9 फेब्रुवारीला विभागीय लोकशाही दिन

 

         अमरावती, दि. 5 :  विभागीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार येत्या सोमवारी दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आले आहे, असे अपर आयुक्त संजय जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

विभागीय लोकशाही दिनासाठी यापूर्वी प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. विभागीय लोकशाही दिनात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी तसेच महिलांनी त्यांचे तक्रार अर्ज (तालुका, जिल्हा किंवा महापालिका लोकशाही दिनानंतर) विहित नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. नागरिकांनी तक्रार अर्ज dcgamravati@gmail.com किंवा dcg_amravati@rediffmail.com या ई-मेलवर विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन आयुक्तालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  

00000

 

मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०२६

पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासासाठी आवश्यक भूसंपादन गतीने पूर्ण करावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी घेतला महत्त्वाच्या भूसंपादन प्रकरणांचा आढावा

मुंबई, दि. ३ :- राज्यात पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकासासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया गतीने आणि पारदर्शक पद्धतीने राबवावी, प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलरासु, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्यासह सर्व संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते. राज्यात औद्योगिक विकासासाठी विविध विभागांमध्ये एकूण ८,९६९ एकर क्षेत्र उपलब्ध असून नव्याने २०,४३१ एकर जमीन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात औद्योगिक गुंतवणुकीसाठी मोठी मागणी येत असून उद्योजकांना लागणाऱ्या जागेचा विचार करुन एमआयडीसीने एक लाख एकर जागा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. मुंबई-पुणे-नागपूर बरोबरच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी भागांमध्ये गुंतवणूकदारांकडून जमिनीची मागणी वाढत आहे. यादृष्टीने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादनाच्या कामांना गती द्यावी. यासाठी शासन स्तरावरून आवश्यक ते साहाय्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विविध जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’च्या भूसंपादनाबरोबरच ‘एमएसआरडीसी’कडील शक्तिपीठ एक्स्प्रेस वे, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, नागपूर-गोंदिया एक्स्प्रेस वे, भंडारा-गडचिरोली एक्स्प्रेस वे, नागपूर चंद्रपूर एक्स्प्रेस वे, नवेगाव-सुरजागड मिनरल कॉरिडॉर, जालना नांदेड एक्स्प्रेस वे आदी प्रकल्पांच्या सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात सुरू असलेले सर्व प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण होतील, असे नियोजन करावे. यासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती द्यावी. त्याचबरोबर वनक्षेत्र नसलेल्या जास्तीत जास्त सलग जागेचे भूसंपादन करुन ती उद्योजकांना उपलब्ध करुन द्यावीत. याशिवाय, विविध विभागाकडील शासकीय जमिनी औद्योगिक वापरासाठी विनामूल्य हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सादर करावा, यामुळे उद्योजकांना कमी दरात भूखंड उपलब्ध होऊन राज्यातील औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी, कोकणातील भूसंपादन प्रक्रियेदरम्यान कुठेही वन जमिनीचे संपादन केले नसल्याची माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील अतिरिक्त गोंडपिंपरी औद्योगिक क्षेत्रात उद्योजकास जमीन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव मान्यतेसाठी प्राप्त झाला आहे. या प्रस्तावास मान्यता देण्यात येईल, असेही त्यांनी उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले. बैठकीत ‘एमआयडीसी’ आणि ‘एमएसआरडीसी’च्या वतीने विविध ठिकाणी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. 00000