शुक्रवार, २० मार्च, २०२६


पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ चा निकाल जाहीर केला असून तो परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीइटी अथवा सीटीइटी उत्तीर्ण झाल्याची माहिती भरण्यासाठी २२ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी झाल्याने आता ही माहिती https://mscepune.in/dtedola/KP2026Info.aspx या लिंकवर २२ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत भरण्याची अतिरिक्त संधी देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे. 

महाराष्ट्र राज्याचे चित्ररथ

 

नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर पार पडलेल्या भव्य संचलनात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे गिरगाव, मुंबई येथे नागरिकांसाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला नागरिक, विद्यार्थी, सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन, सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

#चित्ररथ
#DGIPR
#MaharashtraGovt

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2025 साठी प्रवेशिका पाठविण्याकरीता मुदतवाढ                     

                                                                                                      


मुंबई, दि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका मागविण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च, 2026 असा होता. सदर पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविण्याकरीता दि. 31 मार्च, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.          

 राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्पर्धकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. तसेच अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.

पुरस्कारांची माहिती

पुरस्कारांचे नाव व पारितोषिकांचा तपशील पुढीलप्रमाणे -

                                                                                                                           

1.अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)-  रु.1 लाख रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

2.बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)-51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

3.अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)-51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

4.बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)-51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

5.मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 

6.यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

7.पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

8.तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)-      51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

9.केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)-51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

10.समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)-51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

11.स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)-51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

12. पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)-51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

विभागीय पुरस्कार

13.  दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,

या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

14. अनंतराव भालेराव पुरस्कार, (औरंगाबाद आणि लातूर विभाग)-51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

15. आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)-51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

16.नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग)- 51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

17. शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग)-51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

18. ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग)-51 हजाररुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

19. लोकनायक बापूजी अणे पुरस्कार,  (अमरावती विभाग)-51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

20. ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग)-51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

00000

#उत्कृष्टपत्रकारितापुरस्कार

#मुदतवाढ


बुधवार, १८ मार्च, २०२६

गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा..


 

गुढीपाडव्यानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 



मुंबई, दि. १८ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुढी पाडवा तसेच नूतन वर्षानिमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या.

 

            देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी, युगादि, संसर पाडवो आणि चेटीचंड  म्हणून साजरा केला जातो.

 

            गुढी पाडव्याचे मंगल पर्व तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो. युगादी, चेटीचंड तसेच संसर पाडवो निमित्तदेखील मी सर्वांना शुभेच्छा देतो, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.     

००००

 

गिरीप्रेमी युवकांच्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेला राज्यपालांच्या शुभेच्छा




मुंबई, दि. १८ : अर्जुन पुरस्कार व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली २ एप्रिलपासून माऊंट एव्हरेस्टवर जाणाऱ्या गिर्यारोहकांच्या चमूला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवन येथून झेंडी दाखवून रवाना केले. 'गिरीप्रेमी' या संस्थेतर्फे 'माऊंट एव्हरेस्ट मोहीम २०२६' या पन्नास दिवसांच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

'गिरीप्रेमी' हे संस्थेचे नाव जसे सुंदर आहे तसेच हिमनदीच्या रक्षणासाठी संस्था करीत असलेले पर्यावरण जागृतीचे काम देखील कौतुकास्पद आहे असे उद्गार राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी काढले.

हिमालय केवळ पर्वतराज नसून हिमालय आपल्या संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. हिमालय संस्कृतीचे जिवंत प्रतीक असून त्याचे संवर्धन व रक्षण झाले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. आपण स्वतः माऊंट एव्हरेस्ट चढू शकत नाही. त्यामुळे गिर्यारोहकांच्या अनुभवातूनच एव्हरेस्ट समजून घेऊ शकतो असे सांगून राज्यपालांनी शिखर सर करुन आल्यावर पुन्हा आपणांस भेटण्यास यावे असे गिर्यारोहकांना सांगितले.

यावेळी गिरीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष जयंत तुळपुळे, भूषण हर्षे, प्रसाद जोशी, चंदन चव्हाण व अजित ताटे आदी गिर्यारोहण क्षेत्राशी निगडित संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
'गिरीप्रेमी'चे संस्थापक उमेश झिरपे यांच्यासह गिर्यारोहक विवेक शिवदे, निकुंज शहा, मिहीर जाधव व अखिल कारकर यंदाच्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी होत आहेत.



‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन




मुंबई दि 18 : तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आज प्रकाशन करण्यात आले. 

यावेळी ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री डॉ.अश्विनी भिडे-देशपांडे, कॉफीटेबल बुकचे निर्माते विनोद पवार, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे तसेच शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते.




मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अतिशय सुंदर अशा कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करता आले याबद्दल अतिशय आनंद आहे. महाराष्ट्राचे प्रतिबिंब हे आपल्याला आपल्या वारीमध्ये दिसते, ते पंढरपुरात दिसते, ते विठ्ठलाच्या आराधनेत आपल्याला पाहायला मिळते. इतक्या वेगवेगळ्या कथा, प्रत्येक वारीमध्ये तयार होतात. ते सर्व कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येणार आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तीर्थ आणि त्या तीर्थातला जो देव आहे, हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. त्याची माहिती, इतिहास किंवा त्यातल्या प्रमुख गोष्टी या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून मिळाले.  माहिती आणि छायाचित्रे यामुळे हे कॉफी टेबल बुक संग्रहणीय झाले आहे. आपली सांस्कृतिक माहिती जर कोणाला द्यायची असेल, तर काय द्यावे तर यामध्ये या पुस्तकाचा समावेश झाला आहे. इन्टॅन्जिबल हेरिटेजमध्ये युनेस्कोला आता ही पंढरीची वारी सादर करण्यात येईल, यासाठी हे कॉफी टेबल बुक महत्त्वाचे ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगतिले.

 

 

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इक्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

·      विदर्भातील नवउद्योग परिसंस्था अधिक मजबूत


 

मुंबई, दि. १७ : विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांनी त्यांच्या सहाय्यित इन्क्यूबेशन सेंटरसाठी दोन दिवसीय धोरणात्मक कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेत राज्यभरातील इन्क्यूबेशन सेंटर प्रमुख, शैक्षणिक संस्था तसेच परिसंस्थेतील विविध घटक सहभागी झाले.

या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. यामुळे भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर यांना अधिकृतपणे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या सहाय्यित इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली. या धोरणात्मक समावेशामुळे विदर्भातील नवोपक्रम, उद्योजकता आणि नवउद्योगांच्या वाढीस मोठी चालना मिळणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्यात मजबूत व सर्वसमावेशक नवउद्योग परिसंस्था उभारण्याबाबत शासनाची कटिबद्धता अधोरेखित केली. अशा संस्थात्मक सहकार्यांमुळे नवउद्योगांना योग्य मार्गदर्शन, साहाय्य व संधी उपलब्ध होऊन प्रादेशिक विकासास हातभार लागेल, असे त्यांनी नमूद केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी प्रारंभिक टप्प्यातील नवोपक्रमकर्त्यांना साहाय्य देण्यासाठी संस्थात्मक क्षमता वाढ महत्त्वाची असल्याचे सांगितले. जिल्हा व स्थानिक पातळीवर नवोपक्रम विकसित करण्यासाठी सक्षम इन्क्यूबेशन प्रणाली आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी सांगितले की, राज्यात २९ सहाय्यित इन्क्यूबेशन सेंटरचे मजबूत जाळे उभे करण्यात आले असून ते नवउद्योगांना कल्पनांपासून विस्तारक्षम उपक्रमांपर्यंत पोहोचण्यास मदत करत आहेत. तसेच इन्क्यूबेशन सेंटरनी परस्पर ज्ञान, कौशल्य व संधींची देवाणघेवाण करत सहकार्यपूर्ण परिसंस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यशाळेत इन्क्यूबेशन पद्धती अधिक सक्षम करण्याबरोबरच दीर्घकालीन शाश्वततेवरही भर देण्यात आला. अटल नाविन्यता मिशनचे माजी संचालक आणि नीति आयोगाचे अतिरिक्त सचिव रमणन रमणाथन, आयएसबीएचे अध्यक्ष प्रसाद मेमन यांच्या सत्रांमध्ये इन्क्यूबेशन सेंटरची आर्थिक, कार्यात्मक व धोरणात्मक शाश्वतता सुनिश्चित करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या इन्क्यूबेशन केंद्रामध्ये नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेचा समावेश झाल्यामुळे विदर्भातील नवउद्योजकांना मार्गदर्शन, उद्योगसाखळीशी जोडणी आणि नवोपक्रम साहाय्य अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे इच्छुक उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण होऊन महाराष्ट्राची देशातील अग्रगण्य नवउद्योग केंद्र म्हणून ओळख अधिक बळकट होणार आहे.

                                                                               ००००