मंगळवार, १ सप्टेंबर, २०२६

 #नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक व नागरिकही अडकले आहेत. यातील ६७ जणांचा संपर्क व शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण बाधित नागरिक संख्या ४०५ आहे. यापैकी २६२ नागरिकांना स्वगृही आणण्यासाठी यशस्वी कार्यवाही होत असून उर्वरित ७६ संपर्कात असून सुरक्षित आहेत, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.




रिचा टूर्स प्रा. लि. या संस्थेमार्फत गेलेल्या ६० नागरिकांच्या गटाशी अद्याप थेट संपर्क प्रस्थापित झालेला नाही. तसेच अन्य ७ नागरिकांची लिंकद्वारे नोंद झाली असून त्यांच्याशीही अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. संपर्क होऊ न शकलेल्या पर्यटकांच्या शोधासाठी केंद्र सरकारचे विशेष पथक काठमांडू येथे दाखल झाले असून भारताचे नेपाळमधील राजदूत यांनी देखील या पथकाची भेट घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत.

आपत्तीमुळे बाधित नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची माहिती घेण्याबरोबरच त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांनुसार प्रवासातील अडचणी दूर करण्याबरोबरच विविध प्रकारची मदत उपलब्ध केली जात आहे.

#महापूर
#आपत्तीव्यवस्थापन
#महाराष्ट्रशासन
#Maharashtra
#NepalFloods
#SafeReturn

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६


 #नेपाळ मधील महापुराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६९ नागरिकांनी काल सायंकाळी उशिरा कोदारी इमिग्रेशन केंद्रावरून चीनची सीमा ओलांडून नेपाळमध्ये प्रवेश केला असून, प्राप्त माहितीनुसार ते उद्या ३१ ऑगस्ट पर्यंत मुंबईत पोहोचणार आहेत. आपत्तीमध्ये अडकलेल्या ४०४ नागरिकांची राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (एसइओसी) कडे नोंद असून त्यापैकी राज्यातील २६२ पर्यटक नागरिक अजूनही नेपाळ किंवा चीनमध्ये होते. अजून ६९ नागरिकांना सुखरूप परत आणण्यात यश आले असून यापूर्वी १४२ नागरिक परत आले आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सक्रिय पाठपुरावा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे अचूक मार्गदर्शन यामुळे एसइओसीद्वारे सुविधा व मदत याद्वारे नियोजनबद्ध प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राद्वारे कार्यवाही करण्यात येत आहे.

नेपाळ येथील महापुराच्या आपत्तीमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काम करताना राज्य आपत्कालीन कार्य केंद्राद्वारे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (एमईए) नियंत्रण कक्षाशी समन्वय साधून राज्यातील चीन, तिबेट व नेपाळ च्या आपत्तीग्रस्त भागात गेलेल्या नागरिक पर्यटकांची माहिती पाठवण्यात येते. या आधारे पूरग्रस्त विविध ठिकाणी आवश्यक बचाव पथके तैनात करून व्यक्तींचा शोध सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल आणि संचालक भालचंद्र चव्हाण कार्यवाहीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

यासाठी माहिती संकलित करण्यासाठी वेब-आधारित लिंक विकसित करण्यात येऊन नातेवाईक अथवा माहिती संकलित केली जात आहे. हेल्पलाइनद्वारे ट्रॅव्हल एजन्सी आणि संबंधित कुटुंबांशी सतत समन्वय 24 X 7 केला जात आहे. पर्यटकांना मदतीसाठी सुरक्षितपणे त्यांना परत आणण्यासाठी एसइओसीचा संपर्क क्रमांक : १०७० आहे.

#महापूर #आपत्तीव्यवस्थापन #महाराष्ट्रशासन #Maharashtra #NepalFloods #SafeReturn



सीएफएसडी (सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट) च्या लीना बुद्धे यांनी लिहिलेल्या 'फूटप्रिंट्स ऑफ डिग्निटी : बिल्डिंग टेन्युअर राइट्स इन अर्बन स्लम्स ऑफ इंडिया' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'रामगिरी' येथे झाले. नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना हक्काचे मालकी पट्टे मिळवून देऊन त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केलेले प्रयत्न आणि त्याअनुषंगाने झालेले निर्णय या संपूर्ण प्रक्रियेचा या पुस्तकात समावेश आहे.

झोपडपट्टीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात मालकी हक्काचे पट्टे देणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर आहे. मात्र आम्ही फक्त मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा देऊन तेथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या या पुस्तकाच्या लेखिका लीना बुद्धे यांनी हा गुंतागुंतीचा विषय अभ्यासपूर्ण मांडला. या संपूर्ण प्रक्रियेचे या पुस्तकामुळे दस्तावेजीकरण झाले आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी श्रीमती बुद्धे यांचे अभिनंदन केले.

रविवार, ३० ऑगस्ट, २०२६

 

राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित; ३३८ जण संपर्कात

प्रवास सुविधा व  मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश



 

  • नेपाळमधील महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या  मदतीसाठी विविध  शासकीय यंत्रणा कार्यरत

मुंबई, दि. २९: नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी विविध पातळीवर शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहेत. सर्वजण सुरक्षितपणे त्यांच्या गावी परत पोहोचण्यासाठी सतर्कतेने योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

सागा येथून ४१ जण आज परतले असून १०६ जण नागपूरला उद्या पहाटे ४:३० वाजता पोहोचतील. जवळपास १४३  नागरिक राज्यात यशस्वी व सुरक्षितरित्या परतण्याच्या मार्गावर असून नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात २४ तास हा कक्ष कार्यरत असून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सहाय्यता व मदतकार्य समन्वय साधला जात आहे.

महाराष्ट्रातील ४५ पर्यटकांचा भारतीय हद्दीत सुरक्षित प्रवेश

राज्यातील ४५ जणांच्या पर्यटकांच्या ग्रुपने आज भारतीय हद्दीत  प्रवेश केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक, पुणे, मुंबई व अहिल्यानगर येथील नागरिक नेपाळ येथे गेले होते. महापुराच्या घटनेच्या कालावधीत हे नागरिक चितवन येथे होते. आज काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्याने नेपाळमधील लुंबिनी मार्गे त्यांना आणण्यात येत असून आज अयोध्या पोहोचल्यानंतर पुढील नियोजन शासनाच्या सूचनेनुसार केले जाणार आहे.

राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित व ३३८ संपर्कात

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन सूचनानुसार महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून आवश्यक मदत देण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. आत्तापर्यंत प्राप्त माहितीनुसार राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित असून ३३८नागरिकांशी संपर्क झाला आहे.

अजून १४९ भारतीय पर्यटकांचा चीनमधून नेपाळमध्ये सुरक्षितरित्या प्रवेश

परराष्ट्र मंत्रालयाकडून काल २८ ऑगस्ट अखेरपर्यंत चीनमधून नेपाळमध्ये सुरक्षितरित्या प्रवेश केलेल्या १४९ भारतीय पर्यटक नागरिकांची यादी राज्यांना पाठवण्यात आली आहे. यातील त्यांच्या जिल्ह्यांमध्ये सुरक्षितरित्या पोहोचविण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. यातील महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील संबंधित नागरिकांना असतील त्यांचे माहिती व नावे खात्री करून एकत्रित करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. हे पर्यटक लवकरच भारतात परतणार आहेत. यामध्ये मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर जिल्ह्यांतील कोणत्याही नागरिकाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला (BMC EOC) आतापर्यंत कोणताही कॉल आलेला नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर बसेस व प्रवासासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येऊन या पर्यटकांना भारतात आणले जात आहे. तर नागपूर येथील १०६ जणांचा प्रवास आज बिहार मार्गे नागपूरच्या दिशेने सुरू झाला आहे.

बोरीवली आणि अंधेरी येथील ८ पर्यटक

बोरीवली आणि अंधेरी येथील ८ पर्यटकांची माहिती देण्यात आली असून. आपत्तीमुळे ते नेपाळमध्ये अडकले आहेत. यापैकी अंधेरी येथील लक्ष्मीनारायण आचार्य यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु त्यांचा अथवा ग्रुप मधील इतराचा  मोबाईलद्वारे संपर्क होत नसल्याने सद्यस्थितीत अडचणी येत आहेत. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील या पर्यटकांच्या नातेवाईकांच्या  संपर्कात प्रशासन आहे.

 

00000

 

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६

 

नेपाळमधील पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अडकलेल्या

पर्यटकांसाठी केंद्र सरकारशी संपर्कात

- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

 

·         आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क

·         नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्याच्या प्रशासनाला सूचना

·         नातेवाईक व इतरांनी माहिती असल्यास देण्याचे आवाहन


 

            मुंबई, दि. 27 : नेपाळ-तिबेट परिसरातील भूकंप, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तेथे गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात येत आहे. आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप आहेत. केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क सुरू असून यंत्रणा 24 तास सतर्क असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

मंत्री महाजन म्हणाले, प्रशासनाकडे 80 लोकांची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र तिथे मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम झाल्यामुळे तसेच दूरध्वनी सेवा खंडित झाल्यामुळेदेखील संपर्क होत नाही. मात्र नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये. केंद्र व राज्य सरकार महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.

रिचार्ड टूर्स ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोन गाड्यांमधून पर्यटक मानस सरोवर येथे गेले आहेत. त्यापैकी एका गाडीतील जवळपास 37 जण सुरक्षित आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे तेथील दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाल्याने काही पर्यटकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. उर्वरित पर्यटकांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यांमधून या भागात पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांकडे यासंदर्भात अतिरिक्त माहिती असल्यास ती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देण्यासाठी वेबसाइटही 24 तास (24x7) खुली ठेवण्यात आली आहे.

नागरिकांना आवाहन

            नेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तत्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

माहिती नोंदवण्यासाठी लिंक:

https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

            नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात आले आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन: 1070 (टोल-फ्री क्रमांक)

नियंत्रण कक्ष +91-9321587143

अधिकृत ई-मेल: controlroom@maharashtra.gov.in

महाराष्ट्रातील नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती भरावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

००००

 

महिला आर्थिक सक्षमीकरणास प्राधान्य;

उमेदमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी अवजार बँक, कृषी निविष्ठा केंद्रांसह महिलांच्या हातात शेतीची यंत्रे 

 

मुंबई, दि. २६ : ग्रामीण महिलांना केवळ बचत गटांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना शेती, व्यवसाय आणि उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रभावी प्रयत्न राज्य शासन विविध माध्यमातून करत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदच्या माध्यमातून सक्षणीकरणाचे हे काम ग्रामीण भागात यशस्वीपणे व्यापक स्वरुपात  सुरू आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, कृषी निविष्ठांची उपलब्धता आणि विविध व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळत असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवी दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            उमेदअभियानांतर्गत कृषी अवजार बँक आणि कृषी निविष्ठा केंद्र हे दोन महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना महागडी कृषी यंत्रे स्वतः खरेदी न करता भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे, हा कृषी अवजार बँकेचा प्रमुख उद्देश आहे.


४०८ कृषी अवजार बँकांची उभारणी

            वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीत राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३५१ तालुक्यांत ४०८ कृषी अवजार बँका स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचा सुमारे ४० हजार ८०० महिला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ झाला आहे. या अवजार बँकांमध्ये विविध कृषिपूरक अवजारांसह ट्रॅक्टरचीही सुविधा उपलब्ध आहे. महिला स्वयंसहाय्यता समूह, ग्राम संघ, प्रभाग संघ तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून या अवजार बँकांचे व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे या सुविधा केवळ यंत्रसामग्री उपलब्ध करून देणाऱ्या केंद्रांपुरत्या मर्यादित न राहता समुदायाच्या मालकीच्या आणि व्यवस्थापनाखालील कृषी सेवा केंद्रे म्हणून विकसित होत आहेत.

शेतीचा खर्च कमी; उत्पादकतेला हातभार

            महागडी कृषी यंत्रे खरेदी करण्याची गरज नसल्याने महिला शेतकऱ्यांचा भांडवली खर्च कमी होत आहे. पेरणी, आंतरमशागत आणि कापणीसारखी कामे आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने वेळेत पूर्ण होत असल्याने शेतीतील कार्यक्षमता वाढण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर अवजारे भाड्याने देण्याच्या माध्यमातून समुदाय आधारित संस्थांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळत आहे. अवजार बँकांच्या व्यवस्थापन, देखभाल आणि वाहतुकीमुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. त्यामुळे एका उपक्रमातून महिला शेतकरी, बचत गट आणि स्थानिक ग्रामीण अर्थव्यवस्था अशा अनेक घटकांना लाभ मिळत आहे.

५४ महिला उत्पादक कंपन्यांकडून कृषी निविष्ठांचा पुरवठा

            कृषी निविष्ठांच्या क्षेत्रातही उमेदच्या माध्यमातून महिलांना नवी संधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील ५४ महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे बियाणे व खत विक्रीसाठी आवश्यक परवाने उपलब्ध आहेत. या माध्यमातून सुमारे ५४ हजार महिला सभासदांना सेवा दिली जात आहे.

            महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आपल्या सभासदांची मागणी एकत्रित करून मोठ्या प्रमाणावर बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठांची खरेदी करतात. सामूहिक खरेदीमुळे दर्जेदार निविष्ठा वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध करून देण्यास मदत होत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा निविष्ठांवरील खर्च आणि बाजारपेठेवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेनेही या उपक्रमाची वाटचाल सुरू आहे.

रेशन दुकानापासून वीट निर्मितीपर्यंत

            उमेदअभियानाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला कृषी क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता विविध व्यवसायांपर्यंत विस्तार दिला आहे. राज्यात स्वयं-सहाय्यता समूहांच्या माध्यमातून रेशन दुकाने, सिमेंट एजन्सी, वीट निर्मिती, केरोसीन एजन्सी आणि टाईल्स निर्मिती यांसारखे व्यवसायही महिलांकडून चालविले जात आहेत.

            ३२ स्वयं-सहाय्यता समूहांमधील ५८ महिला रेशन दुकाने, तर एका स्वयं-सहाय्यता समूहातील २३ महिला सिमेंट विक्रीचा व्यवसाय सांभाळत आहेत. दोन समूहांमधील २४ महिला वीट निर्मिती व्यवसायात कार्यरत आहेत. याशिवाय दोन महिला केरोसीन एजन्सी, तर दोन महिला टाईल्स निर्मितीचा व्यवसाय चालवत आहेत.

बचत गटातून उद्योजकतेकडे

            उमेदच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचा प्रवास बचत आणि कर्जाच्या चौकटीपलीकडे जाऊन उद्योजकतेकडे होत आहे. व्यवसाय व्यवस्थापन, वित्तीय समावेशन आणि बाजारपेठेशी जोडणी यासाठी संस्थात्मक पाठबळ मिळत असल्याने महिलांची निर्णयक्षमता आणि आर्थिक स्वावलंबन वाढत आहे. ग्रामीण भागातच रोजगार आणि नियमित उत्पन्नाच्या संधी उपलब्ध झाल्याने महिलांच्या कौटुंबिक उत्पन्नाला हातभार लागत आहे. त्याचवेळी गावातील नागरिकांनाही आवश्यक वस्तू आणि सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होत आहेत.

            महिला स्वयंसहाय्यता समूहांची सामूहिक ताकद, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि उद्योजकतेला संस्थात्मक पाठबळ यांचा संगम घडवून उमेदअभियान ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच गावच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी देत आहे. शेतीतील यांत्रिकीकरणापासून व्यवसायाच्या व्यवस्थापनापर्यंत महिलांचा वाढता सहभाग हा ग्रामीण महाराष्ट्राच्या बदलत्या आर्थिक चित्राचा महत्त्वपूर्ण भाग ठरत आहे.

0000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘डिजिटल अरेस्ट’ या विषयावरील #सायबर जनजागृती लघुपटाचे आणि ‘१९३० महाराष्ट्र सायबर अँथम’चे लोकार्पण सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. याप्रसंगी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, लघुपट व १९३० महाराष्ट्र सायबर अँथम मध्ये योगदान देणारे कलाकार आशिष विद्यार्थी, पंकज त्रिपाठी, शरद केळकर, सोनाली बेंद्रे, जावेद जाफरी, गायिका सुनिधी चौहान, अभिषेक बॅनर्जी, मंगेश देसाई, समय रैना आदी उपस्थित होते.





सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने नागरिकांना भीती दाखवून, घाबरवून फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाल्यास तातडीने ‘१९३०’ या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

सायबर फसवणुकीनंतरचा ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असून, या काळात तक्रार नोंदविल्यास फसवणुकीची रक्कम रोखण्याची किंवा परत मिळविण्याची शक्यता अधिक असते. मात्र तीन ते पंधरा दिवसांचा विलंब झाल्यास पैसे अनेक खात्यांमधून वळविले जातात आणि त्यांची रिकव्हरी अत्यंत कठीण होते. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विलंब न करता १९३० वर संपर्क साधणे आवश्यक आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे व्हॉईस क्लोनिंग, डीपफेक तसेच बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ तयार करण्याचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सायबरकडून सुरू असलेले कार्य प्रशंसनीय असून, भविष्यातही सर्वांच्या सहकार्याने व्यापक सायबर जनजागृती मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पोलीस महासंचालक सदानंद दाते, अपर पोलीस आयुक्त (मीरा भाईंदर) संजय शिंत्रे, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव उपस्थित होते.

#DigitalArrest

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६

 खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

·         महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम

·         पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित

 

मुंबई, दि. २५ : हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी माध्यमातून ' युवा कनेक्ट ' कार्यक्रमांतर्गत देशभरातील १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांना संबोधित करणार आहेत. युवा सहभाग, क्रीडा विकास आणि राष्ट्रनिर्माणावर भर देणाऱ्या या उपक्रमामुळे विविध भागांतील युवक एका समान राष्ट्रीय व्यासपीठावर जोडले जाणार आहेत, अशी माहिती मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या माय भारत -  महाराष्ट्र विभागाचे राज्य संचालक अमित पुंडे यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्रचे राज्य संचालक अमित पुंडे, माय भारत, मुंबईचे उपसंचालक अनूप इंगोले, भारतीय क्रीडा प्राधिकरण (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया - SAI) चे उपसंचालक माधव कांबळे उपस्थित होते.

अमित पुंडे म्हणाले,  महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मुंबई येथे आयआयटी, पवई येथे केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे येथे केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळ (जि. जळगाव) उपस्थित असतील.

माय भारत, भारतीय क्रीडा प्राधिकरण  आणि राष्ट्रीय सेवा योजना  यांच्या सहकार्याने देशभरात खेलो इंडिया संवाद आयोजित करण्यात येत आहे. भारतातील युवक, खेळाडू आणि क्रीडा व्यावसायिकांना एकत्र आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमध्ये युवा कनेक्ट आयोजित करण्यात येणार आहे. आयआयटी पवई, सिम्बॉयसिस आणि एम्स नागपूर  यांसारख्या संस्थांमध्येही हा उपक्रम राबविण्यात येईल.

कार्यक्रमात युवकांना खेळाडू, खासदार, आमदार, मंत्री आणि स्थानिक नेत्यांशी थेट संवाद साधता येणार आहे. तसेच भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासाठी आपले विचार आणि आकांक्षा मांडण्याची संधी मिळणार आहे. गेल्या १२ वर्षांतील भारताच्या क्रीडा परिसंस्थेतील परिवर्तनाचा प्रवास अधोरेखित करणे आणि युवकांच्या आकांक्षा जाणून घेणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

सहभागी युवकांना संकेत सरगर, स्वप्नील कुसाळे, रुझा भोसले, प्रीतम साळवे, फाल्गुनी पिल्लई आणि पूर्वा जाधव यांच्यासह नामांकित खेळाडूंशी संवाद साधता येणार आहे. या चर्चेत खेळाडूंचा क्रीडा प्रवास तसेच भारतीय क्रीडा पायाभूत सुविधा आणि क्रीडा परिसंस्थेत झालेल्या परिवर्तनावर चर्चा केली जाईल, असेही यावेळी पुंडे यांनी सांगितले.

युवा संवादात क्रीडा परिसंस्था मजबूत करणे, २०३६ ऑलिम्पिकसाठी वैज्ञानिक पद्धतीने प्रतिभा ओळखून खेळाडू विकसित करणे, युवा नेतृत्वाला शासन प्रक्रियेत अर्थपूर्ण सहभागासाठी प्रोत्साहन देणे आणि विकसित भारतासाठी युवकांना आवश्यक कौशल्ये, स्वयंसेवा व राष्ट्रनिर्माणाच्या संधींशी जोडणे या चार प्रमुख विषयांवर विचारमंथन होणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

युवकांच्या सूचना क्यूआर कोडद्वारे संकलित करून त्यांच्या कल्पना आणि विचारांची नोंद केली जाईल. सहभागींना कार्यक्रमस्थळी व्हीबीवायएलडी क्विझ मध्ये सहभागी होण्यासाठीही प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

00000





 दहीहंडी हा खेळ कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक मध्ये

नेण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि.२५ : गोविंदा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि मुंबईची ओळख आहे. प्रो गोविंदाच्या माध्यमातून हा खेळ संपूर्ण भारतासह जगात पोहोचला आहे. गोविंदाच्या या साहसी खेळाला अखिल भारतीय स्तरावर मान्यता मिळवून देत एशियाड, कॉमनवेल्थ आणि पुढे ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी  राज्य शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

प्रो गोविंदा लीग २०२६ सिझन ४ चा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  एसव्हीपी स्टेडियम, वरळी येथे पार पडला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे, आमदार रणजीत पाटील, लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, श्रीमती शायना एन. सी  उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवाला आधुनिक आणि व्यावसायिक क्रीडा स्पर्धेचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली प्रो गोविंदा लीग (पीजीएल) देशातील मानवी मनोरे रचण्याच्या खेळासाठीची पहिली व्यावसायिक लीग म्हणून ओळखली जाते.

 

दहीहंडी हा केवळ उत्सव नसून समाजाला एकत्र आणणारा आणि सामाजिक अभिसरणाचा संदेश देणारा उपक्रम आहे. गोविंदांनी एकमेकांना आधार देत मानवी साखळी तयार करून हंडी फोडण्याची परंपरा जपली आहे. भगवान श्रीकृष्णांनी दिलेला संपूर्ण समाज एक आहेहा संदेश या खेळातून अधोरेखित होतो. एकीच्या बळावर कोणत्याही संकटाचा सामना करता येतो आणि मोठे कार्य साध्य करता येते.

 

या खेळाला अखिल भारतीय स्तरावर ऑलिम्पिक असोसिएशन तसेच संबंधित क्रीडा संघटनांची मान्यता मिळवून देणे त्यानंतर हा खेळ एशियाड, कॉमनवेल्थ आणि अखेरीस ऑलिम्पिकपर्यंत नेण्याच्या दृष्टीने शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री यांनी सर्व गोविंदा पथके, त्यांचे प्रशिक्षक तसेच गोविंदांना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या.

 

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, दही - हंडी ( प्रो गोविंदा) खेळाला राज्य शासनाने साहसी खेळाचा दर्जा दिला आहे.  तसेच शासन २०२३ पासून गोविंदांना  विमा देत आहे.  यावर्षी गोविंदांची संख्या वाढवून एक लाख ६० हजार गोविंदा ना विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी १६ संघ आणि ३२०० गोविंदांनी सहभाग घेतला असून, तीन दिवस या स्पर्धा सुरू रहाणार आहेत.


 ईद ए मिलाद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ईद ए मिलाद निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला  ईद ए मिलाद हा सण त्यांच्या प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो. ईद ए मिलादच्या मंगल पर्वावर मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषतः मुस्लिम बंधु - भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.