विभागीय माहिती कार्यालय,अमरावती
सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन कार्यक्रम · धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा अभिनव उपक्रम · आवेदन अर्ज सादर करण्याची 15 फेब्रुवारी अंतीम मूदत
अमरावती, दि. 02 : आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी या प्रकल्पाव्दारे शासकीय, अनुदानित व एकलव्य मॉडेल स्कुल या शाळांमध्ये इयत्ता दहावी व बारावीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सहाय्याने अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी नीट व सीईटी परीक्षांचे मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज संबंधित शाळामार्फत 15 फेब्रुवारीपर्यंत धारणी प्रकल्प कार्यालयास सादर करावी, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ शुक्ला यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
या योजने अंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले तसेच मार्च 2026 मध्ये दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश दिला जाईल. या कार्यक्रमांतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांकडून NEET (नीट) व CET (सिईटी)/JEE (जेईई) या परीक्षांची तयारी करुन घेण्यात येईल. योजने अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, तसेच विद्यार्थ्यांला अनुसूचित जमाती प्रर्वगाचा जातीचा दाखला प्रवेशावेळी सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे. विद्यार्थी मार्च 2026 मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ असावा. चाळणी परीक्षा मे 2026 मध्ये घेण्यात येईल.
विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनपर प्रशिक्षणासाठी विहित नमून्यातील आवेदन पत्र दि. 15 फेब्रुवारीपर्यंत धारणी प्रकल्प कार्यालयास सादर करावीत. नमूद मुदतीनंतर प्राप्त होणारे आवेदन पत्र स्विकारल्या जाणार नाहीत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी व आवेदन अर्जाचा नमूना प्राप्त करण्यासाठी धारणी, प्रकल्प कार्यालयाशी प्रत्यक्षरित्या अथवा दूरध्वनी क्रमांक 07226-224217 आणि poitdp.dharni-mh@gov.in ईमेल यावर संपर्क साधावा, असेही प्रकल्प कार्यालयाव्दारे कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यात कलम 38 लागू
अमरावती, दि. 2 : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षक,अमरावती ग्रामीण विशाल आनंद यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 38 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. प्रतिबंधात्मक आदेश संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तांचे परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 2 फेब्रुवारी ते 31 डिसेंबर 2026 पर्यत लागू करण्यात आला आहे. कोणीही सदर आदेशाचा भंग केल्यास तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 1951 चे कलम 136 अन्वये शिक्षेस पात्र राहील. या कलमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समृद्धी शेत पांदन रस्ते व जल पुनर्भरण योजनेची अंमलबजावणी सुरू
अमरावती, दि. 2 : जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या दळणवळणाची समस्या सोडविण्यासाठी आणि पाणी साठा वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संपूर्ण जिल्ह्यात 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समृद्धी शेत पांदन रस्ते व जल पुनर्भरण योजना' राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये बारामाही शेत रस्ते तयार करण्यात येणार असून, यासाठी स्थानिक नदी व नाल्यांमधील गाळ व साहित्याचा वापर केला जाणार आहे, यामुळे जलस्त्रोतांचे खोलीकरण होऊन पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
योजना लोकसहभाग आणि शासकीय निधीच्या संयुक्त विद्यमाने राबविली जाणार आहे. योजनेसाठी प्रति किलोमीटर 9 लाख रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला असून, त्यापैकी 7.5 लाख रुपये शासन देणार आहे, तर उर्वरित 1.5 लाख रुपये संबंधित अशासकीय संस्थेला लोकसहभागातून उभे करावे लागणार आहेत. या कामासाठी रस्ते बांधणीचा अनुभव असलेल्या सेवाभावी संस्थांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. निवड झालेल्या संस्थांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय सामंजस्य करार करणार आहे. या योजनेमुळे शेत रस्त्यांवरील अतिक्रमणे दूर होऊन शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेपर्यंत नेणे अधिक सुलभ होईल, असे उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
रविवार, १ फेब्रुवारी, २०२६
हिंद-दी-चादर' शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत
मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दूरदर्शनच्या सह्याद्री
वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवारी 3 फेब्रुवारी,
2026 रोजी रात्री 8.00 वाजता 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या
350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत
“हिंद-दी-चादर” शहीदी समागम समितीचे सदस्य तथा उपजिल्हाधिकारी जयराम पवार या
कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर
साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी
खारघर, नवी मुंबई येथे भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या
कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक राज्य तसेच देशातून उपस्थित राहणार आहेत. श्री
गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे विचार, त्याग आणि मानवतावादी मूल्ये पुढील
पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनामार्फत विविध जनजागृतीपर तसेच शैक्षणिक उपक्रम
राबविण्यात येणार असल्याची माहितीही श्री. पवार यांनी 'जय महाराष्ट्र'
कार्यक्रमातून दिली आहे.या कार्यक्रमानिमित्त शीख, शिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी,
मोहियाल, वाल्मिकी, उदासीन तसेच वारकरी संप्रदाय समुदाय एकत्र सहभागी होत आहेत. या
समाजाचा इतिहास, संस्कृती त्यांचे गुरु नानक आणि गुरु तेग बहादुर यांच्याशी कसा
संबंध आहे, याबद्दल अधिक माहिती दिली आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या
350 व्या शहीदी समागम वर्षाचे ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट
करताना, समाजात सलोखा, एकात्मता आणि परंपरेचे संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांची
आवश्यकता असल्याचे उपजिल्हाधिकारी पवार यांनी सांगितले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
