मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६

१७ सप्टेंबर रोजी भरती परीक्षा सुधारणांसाठी

उच्चस्तरीय टास्क फोर्सचा संवाद

विद्यार्थी,उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद

 

          अमरावती, दि. ८ : भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स येत्या १७ सप्टेंबर रोजी अमरावती येथे येणार आहे. या भेटी दरम्यान टास्क फोर्स् सदस्य हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार आहेत.


            राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. या कार्यक्रमांतर्गत स्टास्क फोर्स १७ सप्टेंबर २०२६ रोजी अमरावती येथे  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संवाद साधणार आहेत. या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. 

amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय पाठवू शकतात.

          टास्क फोर्स येत्या १२ ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्यातील ६ महसुली विभागाला भेट देणार असून  या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.                                                                

0000

#भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR #भरतीपरीक्षा #परीक्षासुधारणा #परीक्षासुरक्षा #पारदर्शकभरती #स्पर्धापरीक्षा #महाराष्ट्रशासन #taskforce


भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद

 

·         सहा विभागांना याच महिन्यात भेटी

·         विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद

 

            मुंबई, दि. ७ : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. 

            या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. 


*टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक*

 

पुणे विभाग  १२ सप्टेंबर २०२६

स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

नागपूर विभाग  १६ सप्टेंबर २०२६

स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर

ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

अमरावती विभाग  १७ सप्टेंबर २०२६

स्थळ : अमरावती

ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

छत्रपती संभाजीनगर विभाग  २१ सप्टेंबर २०२६

स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर

ई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

कोकण विभाग  २९ सप्टेंबर २०२६

स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई

ई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

नाशिक विभाग  ३० सप्टेंबर २०२६

स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक

ई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात. 

            या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील. 

            भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

0000

 


 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी दि. १ सप्टेंबर २०२६ ते दि. १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. यासाठी विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा.


ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रांचा एक संच सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर, नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई – ४०००७१, येथे जमा करावा.

महाविद्यालय स्तरावर या योजनांसाठी पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, तसेच महाविद्यालयांनी याबाबत पात्र विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती देऊन त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

 इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षणासाठी जिल्हानिहाय शासकीय वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ करिता शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.



मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई उपनगर, चौथा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर. सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई – ४०००७१. यांनी केले आहे.

#शासकीयवसतिगृह

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

 

राजधानीत राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 

            नवी दिल्ली, दि. 7 : ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करून महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ रोवणारे अग्रणी योद्धे उमाजी नाईक यांच्या जयंतीदिनी कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. निवासी आयुक्त व सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

 

            यावेळी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक सारिका शेलार, प्रमोद कोलपते यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उमाजी नाईक यांना अभिवादन केले.

 

 यावेळी व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी उमाजी नाईक यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी दिलेला सशस्त्र लढा, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी केलेला संघर्ष तसेच त्यांच्या शौर्याची माहिती दिली.

0000



#mahadgipr See less See less
See less

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

 



            मुंबई, दि. ७ : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.


#आद्यक्रांतिवीर_राजे_उमाजी_नाईक

#mahadgipr See less See less
See less

 

0000

 



राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारात महाराष्ट्राचा गौरव

·         शहरांमध्ये अमरावती मनपा आणि नाशिक मनपा वॉर्ड क्रमांक सात देशात तृतीय

 नवी दिल्ली, दि. ७ : शहरांमधील वायू प्रदूषणाला आळा घालून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या प्रभावी उपाययोजनांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६अंतर्गत महाराष्ट्रातील अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार, तर नाशिक महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ७ ला वॉर्डस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला आहे. अमरावतीला २५ लाख रुपये, तर नाशिकच्या वॉर्ड क्रमांक ७ ला ३० लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

नवी दिल्ली येथील इंदिरा पर्यावरण भवनातील गंगा सभागृहात आयोजित राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार सोहळ्यात हा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय हरित अधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाचे अध्यक्ष राजेश वर्मा, पर्यावरण सचिव तन्मय कुमार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अमनदीप गर्ग यांच्यासह केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अमरावती मनपाची उल्लेखनीय कामगिरी

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ३ ते १० लाख लोकसंख्या गटात अमरावती शहराने राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. यासाठी शहराला २५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

नाशिकच्या वॉर्ड क्रमांक ७ चा राष्ट्रीय गौरव

वॉर्डस्तरीय स्वच्छ वायू सर्वेक्षणात ३० हजारांहून अधिक लोकसंख्या गटात नाशिक महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ७ ने राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक मिळविला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वॉर्डला ३० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके, उपमहापौर विलास शिंदे, अमित रंजन यांच्यासह प्रतिनिधींनी पुरस्कार स्वीकारला.

स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६मधील राज्यस्तरीय कामगिरीसाठी महाराष्ट्रातील पुणे येथील वॉर्ड क्रमांक ४ व ७ आणि अमरावती येथील वॉर्ड क्रमांक १२ यांची निवड करण्यात आली आहे. या वॉर्डमध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, या वॉर्डना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.

देशातील उत्कृष्ट शहरांचाही गौरव

१० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या गटात उत्तर प्रदेशातील लखनौने प्रथम, मध्य प्रदेशातील इंदूरने द्वितीय, तर जबलपूरने तृतीय क्रमांक मिळविला. ३ ते १० लाख लोकसंख्या गटात ओडिशातील राऊरकेला प्रथम, तर फिरोजाबाद आणि गुंटूर यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळविला. तीन लाखांपेक्षा कमी लोकसंख्या गटात कलिंग नगर, अंगुल आणि तालचेर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.

राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना एकूण ५ कोटी २५ लाख रुपये, तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वॉर्डना २ कोटी ७० लाख रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली. ही पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे.

0000