सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

 राज्यात एकाचवेळी झालेल्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन लाखांहून अधिक नागरिकांच्या सहभागातून जलसंधारणाचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. हा केवळ शासनाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या भवितव्याशी निगडित विषय आहे. या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाराष्ट्रातील जनतेची जलसंधारणाबाबतची जागरूकता आणि सहभागाची भावना अधोरेखित करणारा आहे, असे मत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले.



मुंबईतील वरळी येथे या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याचवेळी राज्यभरातील विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, कर्मचारी, महाविद्यालयीन तरुणाई तसेच विविध सामाजिक घटकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. राज्यात ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’, ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’, ‘अमृत सरोवर’, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आदी विविध माध्यमांतून जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी ‘वॉक फॉर वॉटर’ प्रभावी माध्यम ठरले आहे.

१५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यात ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावागावांत पाणलोट विकास, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, भूजल पुनर्भरण आणि मृदसंवर्धनाच्या कामांना गती देण्यासोबतच अभियानादरम्यान काही निवडक गावांमध्ये जलशोषक खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. ‘वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्राने दिलेला संदेश आता प्रत्यक्ष कृतीत उतरवून जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करूया,' असेही मंत्री राठोड यांनी आवाहन केले.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे थेट ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला.



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना एकूण ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असून, लाभार्थींची संख्या सातत्याने अद्ययावत होत आहे. आतापर्यंत १३.७० लाख कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.

दुसऱ्या टप्प्यात विभागनिहाय लाभ
⏩अमरावती विभाग : १ लाख ४५ हजार ८०८ शेतकऱ्यांना ₹१,२०८ कोटींचा लाभ.
⏩नाशिक विभाग : ८४ हजार ८१३ शेतकऱ्यांना ₹७५६ कोटींचा लाभ.
⏩छत्रपती संभाजीनगर विभाग : ३ लाख २ हजार २७३ शेतकऱ्यांना ₹२,२८४ कोटींचा लाभ.
⏩पुणे विभाग : ४९ हजार २२४ शेतकऱ्यांना ₹४१७ कोटींचा लाभ.
⏩नागपूर विभाग : ४४ हजार ८६४ शेतकऱ्यांना ₹३६६ कोटींचा लाभ.
⏩कोकण विभाग : ९ हजार ५४ शेतकऱ्यांना ₹५४ कोटींचा लाभ.

#शेतकरीकर्जमुक्ती२०२६
#शेतकरी
#महाकर्जमुक्ती
#कर्जमुक्ती
#महाराष्ट्रशासन
#Maharashtra

 असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे मानद सचिव डॉ. आगम वोरा यांच्या नेतृत्वाखालील संस्थेच्या सदस्यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय महत्त्वाची दोन वैद्यकीय प्रकाशने भेट दिली.

यापैकी पहिले प्रकाशन ‘Unified Consensus on Adult Immunization 2026’ हे असून, ते इंडियन मेडिकल असोसिएशनने विविध विविध वैद्यकीय संस्थांच्या सहकार्याने प्रकाशित केले आहे. प्रौढांच्या लसीकरणाबाबत तज्ज्ञांचे एकत्रित मार्गदर्शन आणि शिफारसी या प्रकाशनात देण्यात आल्या आहेत असे डॉ. वोरा यांनी सांगितले. दरवर्षी विषाणूजन्य संसर्गामुळे देशातील पाच लाख लोक मृत्युमुखी पडतात. लसीकरणामुळे हे मृत्यू टाळता येतील असे डॉ. वोरा यांनी यावेळी सांगितले.
दुसरे प्रकाशन ‘COPD Compass 2026’ या शीर्षकाचे असून, हे भारतातील COPD (Chronic Obstructive Pulmonary Disease – दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुसविकार) व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक आहे. भारतातील COPD व्यवस्थापनासंदर्भात तज्ज्ञांच्या पॅनेलने केलेल्या शिफारसींचा यामध्ये समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुसविकारांचे निदान कसे करायचे व उपचार कसा करायचा या संदर्भात दुसऱ्या पुस्स्तकात मार्गदर्शन असल्याचे वोरा यांनी सांगितले.
यावेळी डॉ. राकेश बडदे, डॉ. मिलिंद नाडकर्णी, डॉ. अमित सराफ, डॉ. जयस लेले, आशुतोष पांडे तसेच झायडस हेल्थकेअरच्या एम.डी. स्वाती दलाल यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
See less

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा

पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत

मुंबई, दि. २४: यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात करण्यात आलेला पहिलाच सामंजस्य करार राज्यातील गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. या करारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार मिळत असून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या करारानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्यातील विविध भागांतील ९ रुग्णांना ८९ लाख ६० हजार ३०१ रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या मदतीतून यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार, मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या अत्यंत खर्चिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. पहिल्यांदाच झालेल्या या कराराअंतर्गत राज्यातील १५० गरजू रुग्णांना दुर्धर आणि गंभीर आजारावर उपचारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर आणि प्रभावी वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारचे करार इतर अनेक नामांकित संस्थांसोबतही प्रक्रियेत असून ते लवकरच पूर्णत्वास येणार आहेत. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून शासन, सामाजिक संस्था आणि आरोग्य क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना नवे जीवन मिळण्यास मदत होत आहे.

*प्रतिक्रिया :*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला. याच धर्तीवर इतरही अनेक नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. पैशांअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये, या उद्देशातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. गरजू रुग्णांनी अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

 #अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले असून घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. आरोग्य मंत्री आणि सचिव दोघांनाही आजच अमरावती येथे भेट देण्यास सांगण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे तसेच जखमी बालकांवरील उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देशही अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सुदैवाने या घटनेत ३६ बालकांना सुखरूप वाचवण्यात यश मिळाले.

रविवार, २३ ऑगस्ट, २०२६

 रेशीमबाग, नागपूर


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मंथन फॉर युवा २०२६’ या उपक्रमाचा समारोप झाला. शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग असून तो वाढविण्यासोबतच स्टार्टअप इकोसिस्टममध्ये चर्चा करून चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल, असे त्यांनी तरुणाईला संबोधित करताना सांगितले.





ढोल ताशा पथकाचा जागतिक विक्रम तसेच विविध क्षेत्रातील आयकॉन असलेल्या व्यक्तींसोबत थेट संवाद, नशामुक्त महाराष्ट्र व देश यासाठी युवकांना शपथ आदी उपक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने युवक व युवतींनी सहभाग नोंदवला.

सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक रिधिमा पाठक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत क्रिकेटपटू तिलक वर्मा, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते दिलीप महादू गावित, अर्जुन देशपांडे, किरण शहाजी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कार्याची प्रेरणा व अनुभव युवकांसमोर मांडले.

महाराष्ट्राची परंपरा असलेल्या ढोल ताशा पथकाने ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’मध्ये जागतिक विक्रम नोंदविला आहे. आधार नोंद असलेल्या ५८५ ध्वजधारकांच्या या उपक्रमामुळे जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी विश्वविक्रम नोंदविलेल्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.

आजची युवा पिढी सर्वच क्षेत्रांत आपल्या कौशल्याने नावलौकिक मिळवत आहे. संविधानामुळेच लोकशाही प्रगल्भ झाली आहे. त्यामुळेच मला मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. युवकांना शासनाची संपूर्ण मदत करण्याचे धोरण असून स्टार्टअपसाठी इकोसिस्टीम पॉलिसी तयार करण्यात आली आहे. या धोरणामध्ये युवकांना शंभर टक्के मदत करण्याचा उद्देश असून युवकांसोबत चर्चा करून आणखी चांगले धोरण तयार करण्यात येईल. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी विचारमंथन सुरू आहे. स्क्रीनवरून मैदानावर कसे वळता येईल याबद्दलही या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून निश्चित धोरण ठरविण्यात येणार आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

#मंथनफॉरयुवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ यांच्यात ‘सामंजस्य करार’ करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी आणि त्यांना अधिक चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे.



धर्मादाय संस्थांचे योगदान आणि शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून एकत्र येऊन एक आदर्श आरोग्य सहाय्य मॉडेल राज्यात उभे राहील. अशा धर्मादाय न्यासांच्या सहकार्याने विविध ‘त्रिपक्षीय सामंजस्य करार’ करण्यात येऊन त्याचा थेट लाभ रुग्णांना देणे शक्य होईल. सीएमआरएफच्या संकेतस्थळावर सर्व तपशील उपलब्ध आहे. त्यात सर्व संस्थानी सहभाग नोंदविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

या करारामुळे धर्मादाय रुग्णालये आणि विविध स्वयंसेवी संस्थांद्वारे मिळणारी मदत थेट आणि वेळेत रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखालील रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केले जातात. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची यंत्रणा जोडली जाणार आहे. रुग्णालयांच्या परिसरात नातेवाईकांसाठी निवारा, अल्पदरात, मोफत भोजन आणि वैद्यकीय मार्गदर्शनाची सोय अधिक प्रभावीपणे केली जाईल.

सर्वसामान्यांना आरोग्य सेवा मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि त्यांना प्रशासकीय प्रक्रियेत सुलभता मिळवून देणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. यामुळे राज्यातील हजारो गरीब आणि गरजू रुग्णांना व त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

#सामंजस्यकरार
#MoU

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६

 राज्यात केंद्रीय योजनांच्या अमंलबजावणीसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीचा प्रभावी आणि वेळेत विनियोग करण्यास सर्व विभागांनी प्राधान्य द्यावे. केंद्रीय निधीच्या परिपूर्ण विनियोगास प्राधान्य देत यावर्षी विनियोगाचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त राहील याची खबरदारी विभागप्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.




सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित केंद्रीय योजनांच्या निधीच्या उपलब्धतेसह त्याच्या विनियोगाच्या आढावा बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, निवासी आयुक्त (गुंतवणूक) महाराष्ट्र सदन सुशील गायकवाड यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राकडे राज्याच्या विविध योजनांसाठी उपलब्ध असलेल्या निधीला केंद्रीय योजनांच्या निधीची जोड देऊन त्याचा अधिक प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने विभागांनी नियोजन करावे. केंद्रीय निधीचा पूर्ण क्षमतेने वापर करत विकासकामांना अधिक गती देता येईल. पुढील वर्षी सुमारे १६ ते १७ हजार कोटी रुपयांचा केंद्रीय निधी खर्च करण्याची क्षमता असून, त्यातील मोठा हिस्सा भांडवली खर्चाचा आहे. त्यामुळे हा केंद्रीय निधी खर्च करण्यास विभागप्रमुखांनी प्राधान्य द्यावे. विहित मुदतीत योजनांच्या व्यापक अमंलबजावणीसाठी हा निधी विनियोगात आणल्या जाईल यासाठी विभागांनी त्याची जबाबदारी निश्चितपणे स्वीकारावी, असे मुख्यमंत्री यांनी सूचित केले.

केंद्रीय क्षेत्रातील योजनांचा किती निधी कोणत्या विभागाकडे उपलब्ध आहे, त्यापैकी किती निधी खर्च झाला आहे आणि किती निधी शिल्लक आहे, याचा विभागनिहाय आढावा घेऊन निधीचा वेळेत विनियोग करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. लेखा प्रक्रियेतील अडचणींमुळे निधीचा विनियोग रखडत असल्यास त्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 #महाराष्ट्र आणि जर्मनीतील #हेसन राज्य यांच्यामधील परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसन राज्याचे अध्यक्ष बोरीस ऱ्हेइन यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत स्वाक्षरी केली.



जर्मनीतील हेसन राज्य आणि महाराष्ट्र यांच्यातील भागीदारी ही दोन आर्थिक सक्षम राज्यांमधील सहकार्य आहे. हेसन हे महाराष्ट्रासाठी जर्मनी आणि युरोपमधील तर महाराष्ट्र हे हेसनसाठी भारत आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील प्रवेशद्वार ठरेल, महाराष्ट्र-हेसन भागीदारीतून गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल आणि नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विश्वास, ज्ञान, व्यापार, नवोन्मेष आणि लोकांमधील संबंधांच्या भक्कम पायावर भारत-जर्मनी भागीदारी उभी आहे. राष्ट्रीय स्तरावरील सहकार्याला आता राज्यस्तरावरील आर्थिक भागीदारीची जोड मिळत असून महाराष्ट्र आणि हेसन या दोन्ही राज्यांतील आर्थिक सामर्थ्य, औद्योगिक प्रगती आणि नवोन्मेष क्षमता यामुळे हे सहकार्य अधिक बळकट होणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, कौशल्य विकास आयुक्त अमित सैनी, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांच्यासह जर्मनीच्या हेसन राज्याचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

#IndiaGermany