बुधवार, २९ जुलै, २०२६

 

आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी डिजिटल शेतीशाळेचे आयोजन



        अमरावती, दि. २९ : पाणी फाऊंडेशन, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, उमेद आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांच्या सहकार्याने सन २०२६-२७ साठी शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेतीशाळा राबविण्यात येत असून, या उपक्रमाचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक गणेश घोरपडे यांनी केले आहे.

          दि. २५ मे २०२६ पासून सुरू झालेल्या या डिजिटल शेतीशाळेत कापूस, सोयाबीन, तूर, खरीप ज्वारी, बाजरी, भुईमूग, भात, मका, नाचणी, घेवडा (राजमा), तूर-मूग-उडीद तसेच भाजीपाला आदी पिकांबाबत कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञ आणि कृषि विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांकडून मोफत ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येत आहे. या माध्यमातून पीक नियोजन, कीड व रोग व्यवस्थापन, उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजना तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण केले जाते.

       डिजिटल शेतीशाळेच्या साप्ताहिक वेळापत्रकानुसार दर सोमवारी बाजरी (सायं. 6.15 ते 7.15, झूम आयडी : 898 4570 1136, पासकोड : 624786) व सोयाबीन (सायं. 7.30 ते 9.30, झूम आयडी : 815 4923 0008, पासकोड : 012175), मंगळवारी खरीप ज्वारी (सायं. 6.15 ते 7.15, झूम आयडी : 890 2479 4378, पासकोड : 237266) व कापूस (सायं. 7.30 ते 9.30, झूम आयडी : 891 8697 2779, पासकोड : 502403), बुधवारी भुईमूग (सायं. 6.15 ते 7.15, झूम आयडी : 826 4619 6818, पासकोड : 935125) व भात (सायं. 7.30 ते 9.30, झूम आयडी : 839 4244 9675, पासकोड : 445624), गुरुवारी घेवडा (राजमा) (सायं. 6.15 ते 7.15, झूम आयडी : 873 6607 9713, पासकोड : 626140) व मका (सायं. 7.30 ते 9.30, झूम आयडी : 875 3149 6031, पासकोड : 437805), शुक्रवारी नाचणी (सायं. 6.15 ते 7.15, झूम आयडी : 891 1996 0593, पासकोड : 782580) व तूर-मूग-उडीद (सायं. 7.30 ते 9.30, झूम आयडी : 819 2564 0002, पासकोड : 757471) तसेच शनिवारी भाजीपाला (सायं. 7.30 ते 9.30, झूम आयडी : 839 8992 4758, पासकोड : 689151) या पिकांवरील ऑनलाइन मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. शेतकरी बांधवांनी आपल्या पीकनिहाय संबंधित झूम बैठकीत सहभागी होऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

          या उपक्रमासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर या संस्था ज्ञानसहभागी  म्हणून सहभागी आहेत.

          डिजिटल शेतीशाळेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी गावपातळीवर व्यापक जनजागृती व प्रसिद्धी करण्यात यावी. शेतकरी बांधवांनी आपल्या पिकानुसार संबंधित ऑनलाइन सत्रात सहभागी होऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

 

मंगळवार, २८ जुलै, २०२६

 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' चा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे.


#AgriStack #FarmerRegistration #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #कर्जमुक्ती #MahaDGIPR #FarmerWelfare #DBT

महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. सध्याच्या मतदार यादीतील सर्व मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी करून गृहभेटीस येणाऱ्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे. वेळेत गणना अर्ज भरून सादर करणाऱ्या मतदारांची नावे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.


प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना तसेच नवमतदारांना १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना क्रमांक ६ (आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रांसह) भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी अर्जांची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करतील, असे यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
#SIR
#पुनरिक्षण
#मतदार

 शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या! 📢


'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' चा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे.

📲आजच नोंदणी करून प्रक्रिया पूर्ण करा आणि योजनेचा लाभ सुनिश्चित करा.

#AgriStack #FarmerRegistration #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #कर्जमुक्ती #MahaDGIPR #FarmerWelfare #DBT

सोमवार, २७ जुलै, २०२६

 

वृत्त क्र. 136                                                    

 

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाणाच्या विविध योजनांसाठी

२१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

        अमरावती, दि. २७ : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाण, कोलकाता यांच्या समान (Matching) व असमान (Non-Matching) निधी योजनांतर्गत सन २०२६-२७ साठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुक ग्रंथालयांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील प्रस्ताव संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे दि. २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

            ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या माध्यमातून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अर्थसहाय्य योजना राबविण्यात येतात. या योजनांचे नियम, अटी तसेच अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाणाच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुक ग्रंथालयांनी तेथून अर्ज डाउनलोड करून भरावेत.

        सन २०२६-२७ साठी समान निधी (Matching) योजनेअंतर्गत इमारत बांधकाम व विस्तारासाठी कमाल २५ लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध आहे. या योजनेव्यतिरिक्त इतर समान निधी योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येणार असल्याने त्या योजनांसाठी प्रस्ताव सादर करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

        असमान निधी (Non-Matching) योजनांमध्ये ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर खरेदीसाठी ४ लाख रुपये तसेच इमारत बांधकामासाठी (प्रस्ताव फक्त एकदाच) १० ते १५ लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध आहे. तसेच "ज्ञान कोपरा" विकसित करण्यासाठी २.५० लाख रुपये व विशेष आधुनिकीकरणासाठी २ लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

            याशिवाय ग्रंथालयांच्या ५०, ६०, ७५, १००, १२५ आणि १५० व्या महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ६.२० लाख रुपये तसेच इमारत विस्तारासाठी १० लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध आहे. राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग आणि जनजागृती कार्यक्रमांच्या आयोजनासाठी १.५० लाख, २.५० लाख व ३ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असून "बालकोपरा" स्थापन करण्यासाठी कमाल ६.८० लाख रुपये अर्थसहाय्याचा लाभही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

             वरील योजनांपैकी कोणत्याही एका योजनेसाठी इच्छुक ग्रंथालयांनी आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत प्रस्ताव चार प्रतींमध्ये संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे दि. २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर करावेत. तसेच हे प्रस्ताव राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाणाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारेही सादर करणे आवश्यक आहे.

            योजनांबाबत अधिक माहितीसाठी www.rrrlf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

-०००००-

 

 

 

 

 

वृत्त क्र. 135                                                

 

विभागात मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' मोहिमेचे सुधारित वेळापत्रक जाहीर;

३० जून ते ८ ऑगस्ट दरम्यान 'बीएलओ' करणार घरोघरी जाऊन पाहणी

 


            अमरावती, दि. २५: राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या संपूर्णपणे अद्ययावत, अचूक आणि दोषविरहित करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 'विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६' ही विशेष मोहीम राबवली जात आहे. वाढते नागरीकरण, मतदारांचे होणारे स्थलांतर, दुबार नोंदी आणि मृत मतदारांची नावे यामुळे मतदार याद्या दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे बनले असून, या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या वतीने या मोहिमेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

             या नव्या कार्यक्रमानुसार अमरावती विभागातील सर्व जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणांना अंमलबजावणीचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार, ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेतील. यानंतर ८ ऑगस्टपर्यंत मतदान केंद्रांची पुनर्रचना आणि सुसूत्रीकरणाचे काम पूर्ण केले जाईल. या प्रक्रियेनंतर १७ ऑगस्ट २०२६ (सोमवार) रोजी मतदार याद्यांची प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर दरम्यान नागरिकांना मतदार यादीबाबत आपले दावे व हरकती दाखल करता येतील, तर १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत या सर्व हरकतींचा निपटारा केला जाईल. अखेर १९ ऑक्टोबर २०२६  रोजी अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे.

            गृहभेटीदरम्यान 'बीएलओ' अधिकाऱ्यांकडून मतदारांची सध्याची माहिती, सन २००२-२००४ च्या मागील SIR यादीशी स्वतःची (Self-mapping) किंवा नातेवाईकांची जुळवणी (Progeny mapping), जन्म तारीख, मोबाईल क्रमांक आणि ऐच्छिक आधार क्रमांक नोंदवला जाईल. प्रपत्रावर मतदाराची किंवा कुटुंबातील प्रौढ सदस्याची स्वाक्षरी अनिवार्य असेल. जर भेटीदरम्यान घर बंद आढळले, तर अधिकारी दारात नोटीस ठेवून संपर्क साधण्याचे आवाहन करतील. सतत तीन भेटींनंतरही मतदार अनुपस्थित किंवा स्थलांतरित आढळल्यास, त्याचे नाव प्रारूप यादीतून वगळले जाईल. जुन्या नोंदींशी जुळवणी न झाल्यास ओळख सिद्ध करण्यासाठी पासपोर्ट, जन्म दाखला, १० वी चे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड यासारख्या १२ मान्यताप्राप्त वैध पुराव्यांपैकी एक पुरावा सादर करावा लागेल.

            तसेच, ज्या नवमतदारांचे वय १ ऑक्टोबर २०२६ पूर्वी १८ वर्षे पूर्ण होत आहे, त्यांना प्रारूप यादी प्रसिद्धीनंतर 'फॉर्म ६' भरून नाव नोंदवता येईल. नागरिक voters.eci.gov.in किंवा 'Voter Helpline App' द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात, मात्र बीएलओची प्रत्यक्ष गृहभेट अनिवार्य राहील. एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव नोंदवणे किंवा चुकीची माहिती देणे हा लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार १ वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद असलेला गुन्हा आहे.        

              प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही फसव्या मेसेज, आर्थिक मागण्या किंवा बँक तपशील/OTP मागणाऱ्या संशयितांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक आयोगाची ही सेवा पूर्णपणे मोफत असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घरी येणाऱ्या बीएलओ अधिकाऱ्यांना अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन अपर आयुक्त सूरज वाघमारे यांनी केले आहे.

****

रविवार, २६ जुलै, २०२६

 राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या आशा-आकांक्षांना नवी उमेद देणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ या महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी सविस्तर माहिती देणारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांमधून प्रसारित होणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्याने शासनाने शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचा भार कमी करून त्यांना नव्या उमेदीने शेती करण्यासाठी सक्षम करणे, आर्थिक स्थैर्य प्रदान करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणे, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत दि. २७ व २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून; तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमामध्ये ही विशेष मुलाखत मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे; तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होईल. या मुलाखतीचे निवेदन डॉ.मृण्मयी भजक यांनी केले आहे.

#दिलखुलास
#जयमहाराष्ट्र
#शेतकरीकर्जमुक्ती२०२६
#शेतकरी
#महाकर्जमुक्ती
#कर्जमुक्ती
#महाराष्ट्रशासन
#MahaDGIPR
#Maharashtra

 राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६' अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळविण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहनही सहकार मंत्री पाटील यांनी केले.

योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक राहणार असून, राज्यातील सुमारे ३२ हजार 'आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

#शेतकरीकर्जमुक्ती२०२६
#शेतकरी
#महाकर्जमुक्ती
#कर्जमुक्ती
#महाराष्ट्रशासन
#Maharashtra

शुक्रवार, २४ जुलै, २०२६

 शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती!




‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’अंतर्गत निकषांमध्ये करण्यात आलेल्या महत्त्वाच्या सुधारणा जाणून घ्या.




 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी जाहीर..!




#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #कर्जमुक्ती #MahaDGIPR #FarmerWelfare #DBT