बुधवार, १९ ऑगस्ट, २०२६

 


विशेष लेख :

जलदूत बनून पाण्यासाठी चालूया; जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र येऊया...
महाराष्ट्र समृद्ध, हिरवागार आणि जलसमृद्ध व्हावा, यासाठी जलसंधारण ही केवळ शासनाचीच जबाबदारी न राहता ती लोकचळवळ होणे आवश्यक आहे. याच व्यापक उद्देशाने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त राज्यभर विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा केला जातो. यंदा १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत जलसंधारणाचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातील प्रमुख उपक्रम म्हणजे २१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणारी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’. हा उपक्रम या राज्यव्यापी उपक्रमातून जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्याबरोबरच नागरिकांमध्ये पाण्याच्या संवर्धनाची जबाबदारी आणि त्यातील आपली भूमिका याविषयी जागर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘वॉक फॉर वॉटर’ लोकजागृती अभियानाचे प्रतीक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना या महत्त्वपूर्ण जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः तरुणांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जलसंधारणाचा संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. ‘वॉक फॉर वॉटर’ ही केवळ एक वॉकेथॉन नसून, पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या व्यापक लोकजागृती अभियानाचे प्रतीक आहे. पाण्याची उपलब्धता, त्याचे संवर्धन आणि भविष्यातील पाणी सुरक्षेसाठी आजपासूनच सामूहिक प्रयत्न करण्याची गरज या माध्यमातून अधोरेखित केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
महावॉकेथॉन २०२६ आणि मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा
मृद व जलसंधारण विभागामार्फत स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण सप्ताह व अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत महावॉकेथॉन २०२६ आणि मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महावॉकेथॉन २०२६ मध्ये ३ कि.मी. चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पाणी वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा हा संदेश देण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम पुरस्कार २५ हजार रुपये आणि गौरव चिन्ह, द्वितीय पुरस्कार १५ हजार रुपये आणि गौरव चिन्ह तर तृतीय पुरस्कार १० हजार रुपये आणि गौरव चिन्ह देण्यात येणार आहे. तसेच ईश्वरी चिठ्ठीद्वारे सात सहभागींना प्रत्येकी ३ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
व्यापक लोकसहभाग आवश्यक
महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण आणि भौगोलिक परिस्थिती जिल्हानिहाय वेगळी आहे. काही भागांत अतिवृष्टी तर काही भागांत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे उपलब्ध पावसाच्या प्रत्येक थेंबाचे योग्य व्यवस्थापन, पाणी अडविणे, पाणी जमिनीत मुरविणे आणि भूजल पातळी वाढविणे यासाठी व्यापक लोकसहभाग आवश्यक आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा केवळ घोषवाक्यापुरता मर्यादित न राहता तो दैनंदिन जीवनाचा आणि सामूहिक प्रयत्नांचा भाग बनणे ही काळाची गरज आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि नागरिकांचे जीवनमान यांना दीर्घकालीन आधार मिळू शकतो. त्यामुळे पाण्याचे संवर्धन ही भविष्यातील पिढ्यांसाठी जबाबदारीदेखील आहे.
जनजागृती अभियानाला आधुनिक माध्यमांची जोड
जनजागृती अभियानाला आधुनिक माध्यमांची जोड देत युवा पिढीपर्यंत जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘रील्स स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून तरुणांनी जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि जलस्रोतांचे संरक्षण यांसारख्या विषयांवर सर्जनशील पद्धतीने जनजागृती करावी, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. युवा पिढीची सर्जनशीलता आणि डिजिटल माध्यमांची पोहोच यांचा प्रभावी संगम या माध्यमातून साधला जाणार आहे.
मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये स्पर्धेच्या नियमानुसार पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे असा आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदाची इन्स्टाग्राम रील्स करावी. व्हीडिओ रिलच्या सुरूवातीला रीलचा उद्देश, स्वत:चे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. रील्स स्वत:च्या पब्लिक इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करावी. रील मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटला टॅग करावी. #Save Soil Save Water हे अधिकृत हॅशटॅग वापरणे अनिवार्य आहे. रील्स बनविण्यासाठी १. माती संवर्धन, मातीची धूप रोखणे २. पाणी बचत आणि जलसंधारण ३. पावसाच्या पाण्याचे संकलन ४. शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास ५. वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण ६. गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे ७. पारंपारिक मृद व जलसंधारण पद्धती ८. माती व पाणी वाचवण्याच्या नावीन्यपूर्ण कल्पना ९. आजचे संवर्धन, उद्याचे सुरक्षित भविष्य असे विषय देण्यात आले आहे. उत्कृष्ट रील्सना २५ हजार रुपयांचा प्रथम १५ हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार आणि १० हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार देण्यात येत आहे. पुरस्कारासोबत गौरवचिन्ह ही देण्यात येणार आहे.
‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’मध्ये सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या जाहिराती तसेच समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेल्या अधिकृत क्यूआर कोडच्या माध्यमातून नागरिकांना आपला सहभाग नोंदविता येणार आहे.
त्यामुळे केवळ वॉकेथॉनमध्ये सहभागी होणे एवढ्यापुरतेच हे अभियान मर्यादित न ठेवता प्रत्येकाने आपल्या कुटुंबात, परिसरात, गावात आणि समाजात जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. लोकसहभागातून निर्माण झालेली जनजागृतीच जलसंधारणाच्या प्रयत्नांना अधिक व्यापक आणि परिणामकारक बनणार आहे.
जलसंधारणाच्या या राज्यव्यापी मोहिमेच्या माध्यमातून राज्य शासन आणि नागरिक यांच्यातील सहभागाचे नवे पर्व सुरू होत आहे. पाण्याचा प्रश्न केवळ शासकीय योजनांमधून सुटणार नाही, तर त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने यात सामील होऊन जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. आज वाचवलेला प्रत्येक थेंब उद्याच्या महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र येत जलसंधारणाचा संदेश देणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’मध्ये सहभागी व्हावे आणि जलदूत बनून पाण्याच्या संवर्धनाचा संदेश घराघरात पोहोचवावा. चला, एकत्र येऊया, पाण्यासाठी चालूया आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मूलमंत्राला लोकचळवळीचे स्वरूप देत समृद्ध, हिरवागार आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया...
वर्षा फडके - आंधळे
उपसंचालक (वृत्त)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.




 महा वॉकेथॉनमधून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचविणार

‘ महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ मध्ये नागरिकांनी
मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
मुंबई, दि. १८ : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्याला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या दिवशी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
मृद व जलसंधारण विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची संकल्पना ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टूमॉरो’ अशी असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देण्यात येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात तीन किलोमीटर अंतराची वॉकेथॉन आयोजित केली जाणार असून त्यानंतर सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग
राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथील बिंदु महादेव चौक प्रवेशद्वार, प्रोमोनेड वरळी समुद्र किनारा येथे होणार असून जिल्हास्तरावरील कार्यक्रम सर्व जिल्ह्यांचे मुख्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, युवक, खेळाडू, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक व क्रीडा संघटना, महिला, उद्योग-व्यापारी संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.
महा वॉकेथॉनसाठी क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा सहभागींना सन्मानचिन्ह देण्यात येणार असून प्रायोजकांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकासाठी २५ हजार, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व गौरवचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्ष सहभागींपैकी ईश्वरी चिठ्ठीद्वारे सात जणांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचे विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत.
युवकांसाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’
जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींसाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ ही राज्यव्यापी रील स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. माती व पाण्याच्या संवर्धनाचा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक जनतेपर्यंत पोहोचविणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. स्पर्धकांनी ३० ते ६० सेकंदांची रील तयार करून स्वतःच्या सार्वजनिक इन्स्टाग्राम खात्यावर प्रसिद्ध करावी. रीलमध्ये स्वतःचे नाव, जिल्ह्याचे नाव आणि रीलचा उद्देश नमूद करणे तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्याला टॅग करणे आवश्यक आहे.
माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, पारंपरिक जलसंधारण पद्धती आणि नाविन्यपूर्ण संवर्धनाच्या कल्पना या विषयांवर रील तयार करता येणार आहे. रील स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १९ ऑगस्ट २०२६ आहे.
प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० आणि राज्यभरातून १० हजार रील्स तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपये आणि गौरवचिन्ह देण्यात येणार आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल, तर विजेत्यांचा ‘युवा-जलदूत’ म्हणून गौरव करण्यात येणार आहे.
मृद व जलसंधारण सप्ताह, जलसंधारण अभियान आणि महा वॉकेथॉनच्या माध्यमातून माती व पाण्याच्या संवर्धनाचा संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून जलसंधारणाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या उपक्रमाच्या प्रचारासाठी #MahaWalkathon, #WalkForWater आणि #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग वापरण्याचे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

 


गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार आहे. भविष्यातील विविध क्षेत्रातील गरजा लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि विकास, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर यासोबत पायाभूत सुविधांची परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचे महाराष्ट्र हे आवडते डेस्टिनेशन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील विविध क्षेत्रातील संधीचा लाभ घेत अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना, संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावे. महाराष्ट्र शासन त्यांना येथील बाजारपेठ, पायाभूत सुविधा, कौशल्ययुक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देईल. त्यामुळे त्यांनी राज्यात गुंतवणूक करावी असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने मुंबईत हॉटेल ललित येथे राष्ट्रीय परिषद २०२६ चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर भारतातील अमेरिकेचे राजदूत जॉर्जिस गोर, उत्तर प्रदेशाचे राज्यमंत्री दिनेश प्रताप सिंह, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय अध्यक्ष अनुप आचार्य, कार्यकारी उपाध्यक्ष प्रशांत कृष्णन, उपासना अरोरा, अवनीश अवस्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सध्या अमेरिका आणि भारतातील भागीदारी ही २१ व्या शतकातील अत्यंत महत्त्वपूर्ण भागीदारीपैकी एक आहे. या भागीदारीचा पुढील टप्पा हा धोरणात्मक आणि अर्थव्यवस्थेमध्ये सहभाग वाढविण्याचा आहे. या टप्प्यामध्ये महाराष्ट्र हा केंद्रस्थानी असणार आहे. हे दशक भारत आणि अमेरिकेच्या धोरणात्मक भागीदारीचे आहे.
इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सने या परिषदेसाठी 'भारत-अमेरिका सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीची पुनर्रचना' हा अत्यंत महत्वाचा विषय घेतला आहे. ही परिषद भारत आणि अमेरिकेतील गुंतवणूक, संशोधन, निर्माण आणि विकास यामध्ये सहकार्य वाढविण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
महाराष्ट्र ही ६६० बिलियन डॉलर अर्थव्यवस्था असून मागील सात वर्षांपासून १०.२ टक्के दराने विकास करीत आहे. राज्यात एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के लोकसंख्या ही २७ वर्ष वयापर्यंत आहे. जगाच्या दृष्टीने विचार केला, तर महाराष्ट्र ही जगातील पहिल्या २० देशांमधील अर्थव्यवस्था आहे. भारत हा जगामध्ये सर्वात तरुण देश आहे आणि या तरुण देशांमध्ये महाराष्ट्र हे तरुणाईचे आकर्षण आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही वैविध्यपूर्ण आहे. उत्पादन क्षेत्रापासून ते मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रांचा वाढता सहभाग राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नवी मुंबई परिसरात १६५ एकर क्षेत्रावर महाराष्ट्र मेडिसिटी विकसित करीत आहे. जागतिक दर्जाची अद्ययावत रुग्णालय या ठिकाणी उभारण्यात येत आहे. यासोबतच डिजिटल पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये मुंबई आणि नवी मुंबई परिसर विकसित होत आहे. भारताच्या एकूण डिजिटल पायाभूत सुविधांपैकी ६५ टक्के सुविधा या महाराष्ट्रामध्ये आहेत. संपूर्ण डिजिटल परिसंस्था राज्यामध्ये विकसित होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांना महाराष्ट्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत. या संपूर्ण विकासाच्या बळावर भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीवर विश्वसनीय जागतिक पुरवठा साखळी बनविणे शक्य आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
#IACC
See less

 

798 patients provided assistance so far

Through the Chief Minister’s Medical Assistance Fund, financial assistance was provided for kidney, liver, heart and lung transplants, helping patients access timely, life-saving treatment.
Financial Support. Timely Treatment. A New Lease of Life.
📞 Need medical assistance? Call 1800 123 2211
📲 Scan the QR code for more information.

 

#जलसंधारणदिन

#वॉकेथॉन२०२६

#MahaDGIPR See less See less
See less



 महा वॉकेथॉन २०२६’ मध्ये अभिनेते संजय दत्त यांचा सहभाग


मुंबई, दि. १८ : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये
‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राज्यव्यापी उपक्रमात सहभागी होण्यासाठी अभिनेते संजय दत्त यांना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी निमंत्रित केले असून, त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.

जलसंधारणाचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचावा आणि हा उपक्रम लोकचळवळीचे स्वरूप धारण करावा, या उद्देशाने लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी, कलाकार, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांना ‘महा वॉकेथॉन’मध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कमाल ३ किलोमीटर अंतराची महा वॉकेथॉन आयोजित केली आहे. या वॉकेथॉननंतर सहभागींकडून मृद व जलसंधारणाची शपथ घेतली जाणार आहे. सहभागी नागरिकांना
ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींचा जिल्हास्तरावर गौरव करण्यात येणार आहे.

या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावर प्रथम १० विजेत्यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय प्रायोजकांच्या माध्यमातून एकूण ७१ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सोडतीद्वारे सात सहभागींची निवड करून प्रत्येकी ३ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.

‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश घेऊन होणाऱ्या या उपक्रमातून जलसंधारणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते
२६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून २१ ऑगस्ट रोजी होणारा ‘महा वॉकेथॉन’ जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

#जलसंधारणदिन
#वॉकेथॉन२०२६
#वॉकफॉरवॉटर
#रिलस्पर्धा
#महाराष्ट्रशासन
#MahaWalkathon
#WalkForWater
#SaveSoilSaveWater
#MahaDGIPR See less


 मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

मंगळवार, दि. १८ ऑगस्ट, २०२६.

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी. श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुल आराखड्यातील ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकास कामांना गती लाभणार. पंढरपुरचे धार्मिक, पारंपरिक महत्व, वारकरी भाविकांची संख्या, स्थानिक परिस्थिती व प्रकल्पाची तातडीची गरज विचारात घेऊन विशेष पुनर्वसन धोरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार प्रकल्प बांधितासाठी विशेष पॅकेज देण्याच्या सुचनेला अनुसरून, जिल्हा प्रशासनाकडून धोरण सादर. (नगर विकास विभाग)

सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ट्रेडस प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर होणार. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, कंत्राटदारांची प्रलंबित देयके वेळेत दिली जाण्यासाठी सुलभता येणार. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा – २ मधील विविध क्रीडा सुविधांच्या कामांना मंजुरी. क्रीडा संकुलाच्या सुमारे ८० कोटी १२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकातील कामांसाठी अनुदान मिळण्याचा मार्ग सुलभ. (क्रीडा विभाग)

सोलापूर शहरातील श्री. जांबुमनी मोची समाज सेवा मंडळास जागा देण्यास मंजुरी. शहर सोलापूर उत्तर सदर बझार येथील शैक्षणिक कारणासाठी आरक्षित असलेली ३ हजार ९१० चौ.मी. जागा सेवा मंडळाच्या शैक्षणिक उपक्रमाला देण्यात येणार. (महसूल विभाग)

पुणे जिल्ह्यातील मौजे मोशी ( ता. हवेली) येथील १५ हे. ०० आर. शासकीय जमीन क्रांतीवीर चापेकर समिती, क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय चिंचवड गाव, पुनरुत्थान समरसता गुरकुलम अनुदानित आदिवासी आश्रम शाळा (चिंचवड) यांना देण्यात येणार. या याठिकाणी मागास वंचित आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकासाचे केंद्र स्थापन करण्यात येणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

पुण्यातील युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०३२ च्या आयोजनाला पाठबळ. पुणे ग्रँड टूर – २००६ स्पर्धेनंतर आता युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०३२ चे यजमानपद पुण्याकडे येणार. पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे ग्रँड टूर – २०२६ च्या यशस्वी आयोजनामुळे मिळणार संधी. युसीआय वर्ल्ड चॅम्पिनयशिप, २०३२ च्या निमित्ताने आशियातील पहिले यजमान पद भारताकडे. स्पर्धेच्या माध्यमातून सुमारे ३३० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल अपेक्षित. याकरिता स्पर्धा संयोजनासाठी शासनाकडून समर्थनपत्र, आर्थिक हमी, पायाभूत सुविधा व कार्यान्वयन विषयक विविध बाबींना धोरणात्मक मान्यता. (क्रीडा विभाग)

जायकवाडी प्रकल्प टप्पा – २ च्या ६ हजार ४७७ कोटी ८८ लाख रुपयांच्या आर्थिक तरतुदीस मंजुरी. टप्पा दोन मुळे गोदावरी खोऱ्यातील सिंदफणा नदीवरील माजलगाव धरणाच्या कामास गती मिळणार. यातून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी व नांदेड या पाच जिल्ह्यातील सुमारे १ लाख ३१ हजार ६५२ हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळणार. तसेच औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय, व विद्युत निर्मितीस चालना मिळणार. (जलसंपदा विभाग)

महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम २०१३ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. महाखनिज २.० या पोर्टलवर गौण खनिजाचे खाणक्षेत्रे, साठवणूक क्षेत्रे, वाहतूकीची अद्ययावत माहिती पारदर्शकपणे उपलब्ध होणार. गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखणे प्रभावी होणार. परराज्यातून येणाऱ्या गौण खनिजाचे वाहतूकीचे नियमन होणार, वाहतूक पास घेणे बंधनकारक. (महसूल व वन विभाग)

वित्त व नियोजन विभागांची पूनर्रचना. दोन्ही विभागांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन विभागाकडील अर्थसंकल्पीय विषय व पदे वित्त विभागाकडे हस्तांतरित होणार. (नियोजन विभाग)

किमान आधारभूत किंमत योजनेत २०२४-२५ हंगामातील खरेदी करण्यात आलेल्या धान व भरडधान्य वाहतूक खर्चाकरिता ३२८ कोटी ४७ लाख रुपयांच्या तरतूदीस मंजुरी ( अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग)