शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

  





📍 विधानभवन, पुणे
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विधानभवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. त्यानंतर राज्यपालांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, बापूसाहेब पठारे, महापौर मंजुषा नागपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, विभागीय आयुक्त शीतल तेली -उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्यासह सैन्यदलातील अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
#IndependenceDay See less
See less





 दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा मंत्रालयात ध्वजारोहण समारंभ
मुंबई, दि. १५ : विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. महाराष्ट्राचा विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, क्रांतिकारक तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मंत्रालय येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, याप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर ८.८ टक्के
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या बारा वर्षांत जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होण्याचा टप्पा गाठला असून २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यात देशाला यश आले आहे. विकसित भारत म्हणजे केवळ विकसित अर्थव्यवस्था नव्हे, तर दीन-दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर आणि महिलांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणे होय, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य असून यंदाच्या पहिल्या सहामाहीतील राज्याचा आर्थिक विकासदर जवळपास ८.८ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हा विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असून आतापर्यंत जवळपास १३ जिल्ह्यांनी निर्धारित लक्ष्य पूर्ण केले आहे. गडचिरोली, पालघर, नंदुरबार यांसह राज्यातील प्रत्येक भागात विकास पोहोचविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्तव्यांचे भान ठेवून तिरंगा सदैव उंच ठेवण्याचा संकल्प
संविधानाने नागरिकांना अधिकार दिले आहेत, त्याचबरोबर कर्तव्यांची जाणीवही करून दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी सर्व नागरिकांनी आपल्या कर्तव्यांचे भान ठेवून देशाचा तिरंगा सदैव उंच राहील, असा संकल्प करावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी
शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राबविण्यात येत असून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या दिशेनेही मोठी प्रगती झाली असून सध्या ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. पुढील वर्षभरात १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या मागील पिढ्यांनी दुष्काळ पाहिला; मात्र येणाऱ्या पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये, यासाठी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यातून महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांना शेतकऱ्याचा दर्जा देणारे महाराष्ट्र पहिले राज्य
महिला शेतकरी कायदा तयार करून महिलांना शेतकऱ्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. महिलांसह समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी लक्षित योजना राबवून सर्वांना सोबत घेऊन विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, रोजगाराच्या संधी
महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ‘एज्युसिटी’च्या माध्यमातून परदेशी विद्यापीठांना राज्यात आणले जात आहे. राज्यातील विद्यापीठांचा दर्जा उंचावण्यासोबतच आधुनिक आणि ‘कटिंग-एज’ शिक्षण उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्र देशाचे ‘स्टार्टअप कॅपिटल’ बनले असून राज्यात सर्वाधिक गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूक होत आहे. त्यामुळे युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘देशाच्या प्रगतीत आजही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि भविष्यातही देशाच्या प्रगतीचा सर्वात मोठा वाटेकरी महाराष्ट्र असेल,’ असा विश्वास व्यक्त केला.
ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकारी, सेनादलाचे अधिकारी, निमंत्रित नागरिक यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, राजशिष्टाचार सचिव राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मंत्रालयीन विभागांचे प्रमुख, तिन्ही सेनादलांचे प्रमुख अधिकारी, शासकीय अधिकारी -कर्मचारी आणि निमंत्रित नागरिक उपस्थित होते.
मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, यांच्या प्रतिमांना वंदन करून पुष्पहार अर्पण केले.

 




राज्य माहिती आयोगात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


अमरावती, दि. १५ : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्य माहिती आयोगाच्या अमरावती येथील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. अमरावती येथील राज्य माहिती आयुक्त श्री. रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राज्य माहिती आयोगाचे उपसचिव श्री. देविसिंग डाबेराव, मधुसुदन देशमुख,आशिष मन्वर यांच्यासह आयोगातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालय परिसरात उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग, संघर्ष आणि बलिदान यांचे स्मरण करून देणारा हा दिवस आहे. स्वातंत्र्याबरोबरच देशाची लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी संविधानिक मूल्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

माहितीचा अधिकार हा नागरिकांना शासनाच्या कामकाजाबाबत माहिती मिळवून देणारा तसेच प्रशासनात पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढविणारा महत्त्वपूर्ण कायदा आहे. नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचे संरक्षण आणि लोकाभिमुख प्रशासनाला चालना देण्यामध्ये राज्य माहिती आयोगाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या अनुषंगाने आयोगातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि उत्तरदायी सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशाची एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्ये जपण्यासोबतच आपल्या शासकीय कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करण्याचा संकल्प केला. राष्ट्रप्रेम, संविधानिक मूल्ये आणि देशसेवेची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

#स्वातंत्र्यदिन
#स्वातंत्र्यदिन२०२६
#IndependenceDay2026
#IndependenceDay See less See less









स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

जलसंधारण, शेतकऱ्यांच्या मदतीवर भर - दादाजी भुसे
अमरावती, दि. 15 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३०८ कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. त्यासोबतच जलसंधारणासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे. येत्या काळातही जलसंधारण आणि शेतकऱ्यांना मदतीवर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुसे यांनी, जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी 'जलसंधारण अभियान' राबवले जाणार आहे. तसेच, २१ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 'जलसंधारण दिन' साजरा करण्यात येणार आहे. त्यासोबतच काही भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी, म्हणून कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे.
शिक्षण क्षेत्रातही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे. शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत अनिवार्य करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्रप्रमुख पदांची भरती करण्यात आली आहे, तसेच पवित्र पोर्टलद्वारे ३० हजार शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. २६ जानेवारी रोजी २ कोटी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक कवायतीची 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात पायाभूत सुविधा आणि ग्राम विकासासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रामुख्याने पांदण रस्त्यांसाठी निधी देण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांचे वहीवाटीचे रस्ते उपलब्ध करून होणार आहे. चिखलदरा हे परिपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी निधी देण्यात येत आहे. येथील स्कायवॉकचे वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या विकासात योगदान देणारे अमरावती विमानतळ विस्तारीकरण, नाईट लँडिंग सुविधा आणि पायलट प्रशिक्षण केंद्र उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. तसेच वस्त्रोद्योग विकासासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, पोलिस उपअधिक्षक तयुब युनुस मुजावर, नागरी हक्क संरक्षण च्या पोलिस अधीक्षक अनिता पाटील, पोलिस निरीक्षक अशोक लांडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल काळे, पोलिस हवालदार प्रशांत भटकर, त्र्यंबक मनोहर, राजेश पांडे, प्रभाकर बोदडे, हेड कॉन्स्टेबल निलेश अंबर्ते, दिपमाला साळुंखे, अतुल कडू, प्रदिप बद्रे, मिलींद बेलसरे, हरीना नेत्रदान समितीचे मनोज राठी, राजेंद्र वर्मा, रामप्रकाश मिश्रा, मुकेश लोहिया, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्याबद्दल सारांश सारडा, गार्गी कुऱ्हाडे, दिया पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा, साक्षरतेची शपथ घेण्यात आली. तसेच जलसंधारणाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

  


जिंकूया यशाचे शिखर
बनवूया भारताला आत्मनिर्भर!
८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

 विशेष लेख :

माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा

महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत माती आणि पाणी या दोन नैसर्गिक संसाधनांचे अनन्यसाधारण महत्व आहे. शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा थेट संबंध या दोन्ही घटकांशी आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन आणि पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती व्यापक लोकचळवळ बनणे ही काळाची गरज आहे. याच विचारातून राज्यात यंदा २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस त्यांच्या जलसंधारणविषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरणार आहे.

दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यासमोरील दुष्काळ आणि पाणीटंचाईचे आव्हान केवळ मोठ्या धरणांच्या माध्यमातून सोडविता येणार नाही, हे ओळखले. पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे, तो जमिनीत मुरविणे आणि स्थानिक पातळीवरील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे, या भूमिकेतून त्यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र दिला. पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण, पाझर तलाव, गाव तलाव, नाला बांध, माती बंधारे आणि अन्य छोट्या जलसंधारण संरचनांवर त्यांनी भर दिला. जलसंधारणाला स्वतंत्र प्रशासकीय दिशा देत त्यांनी या विषयाला लोकसहभागाची जोड दिली.

१९९१ ते १९९३ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आजही दिशादर्शक ठरतात. ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती आणि जलसंधारणाची कामे यांची सांगड घालून त्यांनी जलस्रोत निर्मितीला चालना दिली. जलसंधारण हे केवळ अभियांत्रिकीचे काम नसून गावागावातील नागरिकांच्या सहभागातून उभे राहणारे अभियान आहे, ही भूमिका त्यांच्या कार्यातून स्पष्ट झाली. आज जलयुक्त शिवार, भूजल पुनर्भरण, पाणलोट विकास यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसून येते.

            याच योगदानाची दखल घेत दिवंगत सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन १० मे हा २००३ पासून जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जात होता. मात्र, स्मृतिदिनाऐवजी जन्मदिवस अधिक उत्साहपूर्ण आणि लोकसहभागातून साजरा व्हावा, या विचारातून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विभागातील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित घटकांशी चर्चा करून २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यास मान्यता दिल्यानंतर शासनाने त्याबाबतचा निर्णय घेतला. त्यामुळे यापुढे दरवर्षी २१ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्राच्या जलसंधारण चळवळीचा महत्त्वपूर्ण दिवस ठरणार आहे.

                                                       व्यापक जनसहभागाची जोड

यंदाचा जलसंधारण दिन केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता त्याला व्यापक जनसहभागाची जोड देण्यात आली आहे. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था आणि विविध प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या अभियानातील सर्वात आकर्षक उपक्रम म्हणजे ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’. २१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकाच वेळी तीन किलोमीटरची महा वॉकेथॉन आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान दहा हजार नागरिकांच्या सहभागाचे उद्दिष्ट असून, राज्यभरातून तीन लाखांहून अधिक नागरिक प्रत्यक्ष सहभागी होण्याची अपेक्षा आहे. नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी, महिला, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, ‘माय भारत’, क्रीडा संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योग क्षेत्र, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

ही केवळ चालण्याची स्पर्धा नसून जलसंधारणासाठी जनजागृतीची सामूहिक पावले आहेत. वॉकथॉनच्या प्रारंभी सहभागी नागरिकांकडून मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेतली जाणार आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, मातीची धूप रोखणे, पावसाचे पाणी अडविणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करणे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा यंदाच्या अभियानाचा मुख्य संदेश आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेशही या चळवळीला दिशा देणार आहे.

युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी डिजिटल माध्यमांचाही प्रभावी वापर करण्यात येणार आहे. ‘रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ या उपक्रमातून १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींना मृद व जलसंधारणाचा संदेश सर्जनशील पद्धतीने मांडण्याची संधी मिळणार आहे. ३० ते ६० सेकंदांच्या इन्स्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून मातीची धूप, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळी, बंधारे, वृक्षारोपण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांवर संदेश देता येणार आहे. अभिनय, संगीत, विनोद, लघुपट, ॲनिमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन दृश्ये किंवा अन्य नाविन्यपूर्ण माध्यमांचा वापर करून युवकांना आपली कल्पकता सादर करता येणार आहे. #SaveSoilSaveWater हा अधिकृत हॅशटॅग वापरून राज्यभरातून मोठ्या प्रमाणात रिल्स तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

जलसंधारणाचा संस्कार पुढील पिढीवर व्हावा यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्येही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. निबंध, चित्रकला, पोस्टर, वादविवाद स्पर्धा, जलसंधारणाची शपथ, ‘एक शाळा–एक शोषखड्डा’, जलमित्र किंवा जलदूत घोषित करणे अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना जलसंधारणाशी जोडले जाणार आहे. २१ ऑगस्ट रोजी दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या जलसंधारणविषयक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

अभियानाच्या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागात प्रत्यक्ष जलसंधारणाच्या कामांनाही गती दिली जाणार आहे. विविध योजनांतर्गत कामांचे भूमीपूजन, लोकार्पण आणि जलपूजन, शेततळी व जलस्रोतांची पाहणी, अमृत सरोवरांच्या परिसरात वृक्षारोपण, नाला, तलाव, विहीर आणि पाझर तलावांची लोकसहभागातून स्वच्छता अशा उपक्रमांवर भर दिला जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, अमृत सरोवर आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक यांसारख्या उपक्रमांची माहितीही जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

जलसंधारणाच्या कामात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव, लोकसहभागातून श्रमदान, जलस्रोतांचे संवर्धन आणि जनजागृती या माध्यमातून शासन आणि समाज यांच्यातील सहभाग अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर समन्वय साधून कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

            आज हवामान बदल, अनियमित पाऊस, वाढते तापमान, भूजल पातळीतील घट आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे जलसुरक्षेचे आव्हान अधिक गंभीर झाले आहे. अशा परिस्थितीत सुधाकरराव नाईक यांनी दशकांपूर्वी दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश अधिकच महत्त्वाचा ठरतो. जलसंधारणाची कामे किती झाली यापेक्षा ती किती परिणामकारक ठरली, पाणी किती काळ टिकले आणि पुढील पिढीसाठी आपण किती जलसाठा निर्माण केला, हा खरा प्रश्न आहे.

            मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती असून त्यांचे संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.

२१ ऑगस्टचा ‘जलसंधारण दिन’ त्यामुळे केवळ एका महान नेत्याच्या स्मरणाचा दिवस न राहता महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी सामूहिक संकल्पाचा दिवस ठरला पाहिजे. सुधाकरराव नाईक यांना खरी आदरांजली त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात नाही, तर त्यांच्या विचारांना कृतीची जोड देण्यात आहे. प्रत्येक गावात जलस्रोत जपला, प्रत्येक शेतात पाण्याचा थेंब अडविला, प्रत्येक शाळेत जलसंधारणाचा संस्कार रुजविला आणि प्रत्येक नागरिकाने पाण्याची जबाबदारी स्वीकारली, तरच ‘जलसंधारण दिना’चा खरा उद्देश साध्य होईल.

माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर जीवन सुरक्षित राहील आणि लोकसहभाग वाढला तर महाराष्ट्र जलसंपन्न बनेल. चला, सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणाच्या विचारांना कृतीची जोड देऊया—‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा!’‍

-गजानन पाटील,

विभागीय संर्पक अधिकारी,

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई

                                         0000

 

 


मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यव्यापी महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ, युवकांसाठी लघुचित्रफीत स्पर्धा,शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. 'महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर' मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला असून हा क्यूआर कोड स्कॅन करुन नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.