सोमवार, २० मार्च, २०१७

पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा
दिंडी व रॅलीने शुभारंभ

* सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दाखविली हिरवी झेंडी
* व्यसनमुक्तीच्या ज्वलंत संदेशांनी लोकांचे प्रबोधन
*व्यसने सोडा मानसे जोडा, व्यसन विनाशाचे प्रतिक

            अमरावती, दि. 19 (विमाका) : देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा व्यसनमुक्तीचे संदेश असलेल्या दिंडी व रॅलीने आज सकाळी शुभारंभ करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे आयोजित दिंडी व रॅलीला राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी हिरवी झेंडी दाखवून आरंभ केला.
            यावेळी राष्ट्रीय प्रबोधनकार, सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज, उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रविण पोटे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दिपक वडकुते, सहाय्यक आयुक्त प्राजक्ता इंगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण, जनसंपर्क अधिकारी मंगला देशमुख, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काळे, डॉ. गणेश बुब यांचेसह शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, ओम शांती ओम चे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
            रॅलीची सुरुवात नेहरु मैदान येथुन झाली. त्यांनतर जयस्तंभ चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयास ना. बडोले यांच्या हस्ते हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले. पुढे इर्विन चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास मंत्री महोदयांच्या हस्ते हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर पुढे ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात संत गाडगेबाबा यांच्या पुतळयास हारार्पण व अभिवादन करुन रॅलीची सांगता झाली.
            व्यसनमुक्ती साहित्य संमेलनानिमित्त आयोजित दिंडी व रॅलीमध्ये सामाजिक न्याय विभागाचा व्यसनमुक्ती चित्ररथ, येडाई व्यसनमुक्ती केंद्र ता. कळबं जि. उस्मादाबाद येथील चित्ररथ, ओम शांती ओम सदस्यांचा रथ, मुकबधीर विद्यालयांच्या विद्यार्थींनींचे लेझीम पथक, भातकुली तालुक्यातील रामा येथील वारकरी भजनी मंडळी, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच अन्य शाळेच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. रॅलीच्या शुभारंभा अगोदर नेहरु मैदानात विविध पथकांनी पथनाटय सादर केलीत. यानंतर उपस्थितांना व्यसनमुक्ती संबंधी थपथ देण्यात आली.
            रॅलीत सहभागी सदस्यांच्या हाती असलेल्या व्यसनमुक्त घर सुखाचे आगार, जो व्यसनाच्या आहारी, तो मृत्युच्या दारी, निर्व्यसनी महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र, संतभुमी मे संदेश हमे फैलाना है, नशे को मार भगाना है, तम्बाखु को जिसने गले लगाया, मौत को उसने पास बुलाया, यही है नारा हमारा, नशामुक्त बने प्रदेश हमारा, वही परिवार पावन है, जहॉ मद्यनिषेध कायम है, अशा अनेक व्यसनमुक्तीच्या संदेशांनी उपस्थितांचे व पादचारी लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते.


********



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा