सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

सायबर गुन्ह्यांवर सायबर लॅब चे प्रतिबंध
-पालकमंत्री प्रविण पोटे


सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्यात 51 ठिकाणी सायबर लॅब
स्वातंत्र्यदिनी पोलीस आयुक्तालयातील सायबर लॅब चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अमरावती, दि.15 : सायबर गुन्हेगारीवर वचक बसविण्याबरोबरच अशा गुन्ह्यांची तात्काळ उकल करुन आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि पोलीस आयुक्तालयांच्या क्षेत्रात 51 ठिकाणी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत सायबर लॅब सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात उभारण्यात आलेल्या सायबर लॅबमुळे जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारीवर प्रतिबंध स्थापित होणार आहे, असे पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज सांगितले.
आज 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे प्रसंगी अमरावती पोलीस आयुक्तालय कार्यालयात स्थापित करण्यात आलेल्या सायबर लॅबचे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रविण पोटे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
याप्रसंगी विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलीक, मुख्य वनसरंक्षक दिनेशकुमार त्यागी, पोलीस उपायुक्त शशिकुमार मिना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधिक्षक महेश चिंते, वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक  विजय ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ई-बॅंकिंग, पेपरलेस कार्यालय, सोशल मिडिया आदींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यातून आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे वापरुन गुन्हे करण्याच्या विविध युक्त्या सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जात आहेत, या गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच हे गुन्हे करणाऱ्यांना वचक बसावा, यादृष्टीने गृह विभागाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालये आणि पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 51 ठिकाणी सायबर लॅबउभारण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.
अमरावती जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीस प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधिक्षक (ग्रामीण) कार्यालयात सायबर लॅबची स्थापना करण्यात आली आहे. या लॅबच्या सहाय्याने जिल्हयातील सायबर गुन्हेगारांवर नजर ठेवून त्यांना जेरबंद करण्यासाठी मदत होणार आहे. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत राज्याज 44 विविध ठिकाणी सायबर लॅबची उभारणी करुन गृह विभागाने या निर्णयाची अमंलबजावणी केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलीक म्हणाले की, गुन्हेगारामध्ये एकाच पध्दतीने गुन्हे करण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. गुन्हेगारांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन गुन्हे करण्याचे प्रमाण वाढले आहे. खोटे नाव व कपंनीची बतावणी करुन एटीएमचा नंबर व पीन विचारून जनतेला लुबाळण्याचे प्रकार हल्ली मोठया प्रमाणात घडत आहे. अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांवर आता सायबर लॅबच्या सहाय्याने गुन्हेगार शोधने व तांत्रिक गुन्ह्याची माहिती गोळा करणे सोपे होणार आहे. या प्रकल्पांतर्गत अद्ययावत डाटा सेंटर उभारले जाणार असून त्यामुळे फरारी गुन्हेगारांना पकडण्याबरोबरच गुन्ह्यांची उकल करुन अपराध दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे शक्य होणार आहे.
सोशल बॅकींग व सोशल मिडीयाचा वापर वाढल्यामुळे सायबर क्राईमचे प्रकार जास्त आढळून येत आहे. या गोष्टीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयात उभारण्यात आलेली सायबर लॅब महत्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारीवर नजर ठेवता येणार आहे असे मत विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलीक यांनी केले, तर पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम यांनी आभार मानले. याप्रसंगी आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी – कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा