मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण

 


विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण

अमरावती, दि. 01 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपायुक्त (साप्रवि) संजय पवार, गजेंद्र बावणे (महसूल), सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, विशेष कार्य अधिकारी हर्षद चौधरी यांच्यासह विभागीय आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.

0000

बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळेल --मिशन महासंचालक नंदकुमार

 बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळेल


                                                                    --मिशन महासंचालक नंदकुमार

 

Ø अमरावती विभागाची आढावा बैठक

अमरावती, दि.30




 :  बांबू हे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त पीक असून वातावरणातील सर्वाधिक कार्बन शोषून घेण्याची क्षमता त्यात आहे. बांबू लागवडीमुळे रोजगार निर्मिती, हरित आच्छादनात वाढ, मातीच्या पोतमध्ये सुधारणा व सिंचन व्यवस्था बळकट होण्यास मदत होते. बांबू लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत (मनरेगा) बांबू लागवडीची कामे अमरावती विभागात मोठ्या प्रमाणात हाती घ्यावीत, असे निर्देश महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांनी संबंधित यंत्रणांना आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ‘समता मुलक शाश्वत पर्यावरणीय विकासातून समृध्दीसाठी मनरेगा मिशन मोडवर राबविणे’ या विषयावर श्री. नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

 विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, पर्यावरण व वातावरणीय बदलाचे संचालक अभिजीत घोरपडे, राज्य गुणवत्ता सनियंत्रक राजेंद्र शहाळे, मनरेगा उपायुक्त सुबोध मोहरील, अकोल्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अमरावतीचे मुख्य कार्यकारी संतोष जोशी, क्षमता बांधणी व राज्य प्रशिक्षक निलेश घुगे, बांबू लागवड मार्गदर्शक संजीव करपे, रोहयो उपायुक्त वैशाली पाथरे यांच्यासह महसूल, कृषी, वने व पर्यावरण, मृदा व जलसंधारण, ग्रामविकास आदी विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

श्री. नंदकुमार म्हणाले की, मनरेगा योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात (2024-25) राज्यात एक लक्ष हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीतून हरित आच्छादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गरिबी निर्मूलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये बांबू लागवडीला प्राधान्य देण्यात यावे. बांबू पिक सिंचित असल्यास त्याची उत्पादकता अधिक राहते. त्यामुळे मनरेगांतर्गत सर्व बांबू लागवड ही सिंचित स्वरुपाची करण्याचा प्रयत्न करावा. बांबू लागवडीसाठी जलव्यवस्थापन आराखडा, कुरण विकास तसेच ‘जलतारा’ संकल्पनेच्या अंमलबजावणीसंदर्भात  त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  नियोजन, महसूल, वने व पर्यावरण, ग्रामीण विकास, कृषी, सार्वजनिक बांधकाम, मृद संधारण, जलसंपदा आदी विभागांनी उत्तम समन्वय राखून शेतकऱ्यांना शेती व पर्यावरणपूरक बांबू लागवडीचे महत्व व त्या माध्यमातून आर्थिक लाभ याबाबत मार्गदर्शन करावे. या कार्यक्रमाच्या गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीतून जनतेला गरिबीतून बाहेर काढणेही शक्य होईल. जिल्ह्याच्या हवामानानुसार बांबूच्या जातिची निवड करण्याबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे श्री. नंदकुमार यांनी  सांगितले. बांबू लागवडीसाठी जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून ग्रामस्तरावर, तालुकास्तराव तसेच विभागस्तरावर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. लक्षांक पूर्ण करणाऱ्या जिल्हा किंवा संस्थांना सुमारे कोटी रुपयांचे बक्षीसही दिले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक शासकीय यंत्रणांनी बांबू लागवडीचे लक्षांक पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे आवाहन श्री नंदकुमार यांनी केले.

हवामान बदलाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी बांबू लागवडीतून जास्तीत जास्त परिक्षेत्र हरित आच्छादीत करणे आवश्यक आहे. वातावरणातील कार्बन उत्सर्जनातून तापमान वाढीने मानवजातीसह सजीवांना हानी, बांबूच्या लागवडीतून ऑक्सिजनची निर्मिती व त्याचे दिर्घकालीन फायदे याबाबत श्री. घोरपडे यांनी माहिती दिली. बांबू लागवडीतून चीन, सिंगापूर, मलेशिया, व्हीएतनाम या देशांनी केलेली प्रगती याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. राज्यात बांबू लागवडीसाठी नेमण्यात आलेल्या टास्कफोर्स, स्टिअरिंग कमिटी आणि टेक्निकल कमिटी आदीं विषयी अभिजीत घोरपडे यांनी माहिती दिली.

उपायुक्त श्रीमती पाथरे यांनी अमरावती विभागात मनरेगा अंतर्गत बांबू व फळबाग लागवडीसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची प्रास्ताविकातून माहिती दिली. कोनबॅक बांबू संस्थेचे संजीव करपे यांनी बांबू लागवड, उत्पादन आणि विपनण आदी विषयांवर मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार संजय मुरतकर यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

0000


हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमांसाठी 10 जूनपर्यंत प्रवेश अर्ज आमंत्रित

 

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका

अभ्यासक्रमांसाठी 10 जूनपर्यंत प्रवेश अर्ज आमंत्रित

 

अमरावती, दि. 29 :  केंद्र शासनाच्या भारतीय वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान संस्था, बरगढ (ओडिशा) येथील हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका या  तीन वर्षीय (सहा सत्रीय) अभ्यासक्रमांसाठी दिनांक 10 जूनपर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग प्रादेशिक उपआयुक्त सीमा पांडे यांनी दिली.

            भारतीय वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान संस्था, बरगढ (ओडिशा) येथे प्रथम वर्षासाठी महाराष्ट्र राज्यातून 13 जागा व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एका जागेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच वेंकटगिरी येथे दोन जागेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. व्दितीय वर्षासाठी तीन जागा असून यापैकी एक जागा आर्थिक दुर्बल घटकाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

            हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी विहित नमुन्यातील अर्ज 10 जून 2024 पर्यंत नागपूर, सोलापूर, मुंबई व छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) प्रादेशिक वस्त्रोद्योग उपआयुक्त यांच्यामार्फत मागविण्यात आले आहे. या अभ्यासक्रमासंदर्भात सविस्तर माहिती तसेच प्रवेश अर्जाचा नमूना वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या   http://www.dirtexmah.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्‌ध आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले परिपूर्ण अर्ज 10 जून पर्यंत 2024 पर्यंत प्रादेशिक उपआयुक्त नागपूर कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे.

अर्जाचा नमूना जूने सचिवालय येथील वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर तसेच विदर्भातील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रादेशिक उपायुक्त कार्यालय, प्रशासकीय भवन क्रमांक 2, आठवा माळा, बि-विंग, सिव्हील लाईन, नागपूर 440001,  दूरध्वनी क्रमांक 0712-2537927 येथे उपलब्ध आहे. विदर्भातील पात्र विद्यार्थ्यांनी हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त श्रीमती सीमा पांडे यांनी केले आहे.

00000

 

सोमवार, २९ एप्रिल, २०२४

चिंचफळाच्या विक्रीचा जाहीर लिलाव

चिंचफळाच्या विक्रीचा जाहीर लिलाव 

 

अमरावती, दि. 29 : अधिक्षक अमरावती मध्यवर्ती कारागृह येथील शेती विभागातील 47 चिंचफळाच्या झाडावरील चिंचफळाचा लिलाव करावयाचा आहे. त्यासाठी दि. 25 एप्रिल ते    4 मे 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत मोहरबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त होणाऱ्या निविदा 6 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता मध्यवर्ती कारागृह यांच्या कार्यालयात उघडण्यात येईल.

तरी इच्छुकांनी निविदा फॉर्म, लिलाव अटीबाबत माहीतीसाठी तसेच चिंच झाडाचे पाहणी करण्यासाठी अधिक्षक मध्यवती कारागृह येथे शासकीय सुटीचे दिवस सोडून कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                   0000 

रविवार, २८ एप्रिल, २०२४

अमरावती विभागात उत्साहात मतदान

 



अमरावती विभागात उत्साहात मतदान

 

Ø दिव्यांग, ज्येष्ठ व नवमतदारांनी उत्साहात केले मतदान

Ø विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह मान्यवरांनी

   बजावला मतदानाचा अधिकार

Ø सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.31 टक्के मतदान



 

 

अमरावती, दि. 26 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील चारही लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजतापासुनच मतदारांनी हजेरी लावली होती. ठिक-ठिकाणी मतदारांच्या लांब रांगा दिसल्या. दिव्यांग व जेष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर, रॅम्प यासारख्या विशेष व्यवस्था करण्यात आल्या होत्या.


विभागातील चारही लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 53.31 टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडल्यामुळे मतदानाला वेग आला. मतदान केंद्रांवर महिला व युवा मतदारांची एकच गर्दी दिसून आली.

अमरावती लोकसभा मतदारसंघात विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय तसेच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सपत्नीक सेंन्ट थॉमस महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मतदान केले.

            अमरावती विधानसभा मतदारसंघातील सेंट थॉमस महाविद्यालय, जि.प. उर्दु हायस्कुल, शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, विदर्भ ज्ञान-विज्ञान महाविद्यालय तसेच राजापेठ परिसरातील भारतीय महाविद्यालय, समर्थ हायस्कुल याठिकाणी सकाळी सात वाजतापासूनच मतदानासाठी मतदारांच्या लांब रांगा दिसून आल्या. राजापेठ परिसरातील भारतीय महाविद्यालयाच्या सखी मतदान केंद्रावर महिलांची विशेष उपस्थिती दिसून आली. तसेच दिव्यांग व वयोवृध्द व्यक्तींसाठी स्थापित करण्यात आलेल्या कॅम्प परिसरातील जिल्हा परिषद माजी कन्या शाळेतील मतदान केंद्रावर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची गर्दी दिसून आली. गाडगेनगर परिसरातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रावरही मतदारांची गर्दी दिसून आली. सर्व मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदान यादी, पिण्याचे पाणी, दिव्यांग व ज्येष्ठ व्यक्तींसाठी व्हीलचेअर, सावलीचा मंडप, बैठक व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती.

 

असे झाले मतदान….

 

           विभागातील 05-बुलडाणा, 06-अकोला, 07-अमरावती, 14-यवतमाळ-वाशिम या चारही लोकसभा मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाने सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती. त्यानुसार सकाळी सात वाजतापासूनच चारही मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. त्यानंतर मतदानाला वेग आला.

अमरावती विभागातील चारही मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत 6.83 टक्के, सकाळी 11 वाजेपर्यंत 17.76 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 31.04 टक्के, दुपारी 3 वाजेपर्यंत 42.66 टक्के तसेच सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.31 टक्के मतदान झाले.

सायंकाळी 5 वाजेपर्यंत बुलडाणा लोकसभा मतदारसंघात 52.24, अकोलामध्ये 52.49 टक्के, अमरावतीत 54.50 टक्के व यवतमाळ-वाशिम मतदारसंघात 54.04 टक्के मतदानाची नोंद झाली.

0000

गुरुवार, २५ एप्रिल, २०२४

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य

 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या

मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य

 

·        शुक्रवारी 26 एप्रिलला मतदान


अमरावती, दि. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदारांची ओळख पटविण्याकरीता मतदार फोटो ओळखपत्रासह (EPIC) इतर बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील 05- बुलडाणा, 06- अकोला, 07-अमरावती, 14-यवतमाळ-वाशिम या चारही लोकसभा मतदारसंघात शुक्रवार, दि. 26 एप्रिलला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी स्वतःची ओळख पटविण्याकरीता निवडणूक आयोगाने बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहे.  त्यामुळे आता लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करतांना मतदारांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.  

त्यानुषंगाने मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्रासह (EPIC Card) आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, कामगार मंत्रालयाने जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र व राज्य सरकार/ पीएसयू /पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे, खासदार, आमदार यांना जारी केलेल्या अधिकृत ओळखपत्र,  भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे एकुण 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही. ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील.

0000

शुक्रवारच्या मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना

 






शुक्रवारच्या मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना

पोलींग पार्टींना मतदान साहित्याचे वितरण ; मतदान पथके मतदानस्थळी रवाना

18 लाख 36 हजार 078 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

जिल्ह्यात 1 हजार 983 मतदान केंद्र ; मेळघाटात 354 सर्वाधिक मतदान केंद्र

 

अमरावती, दि. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना आज वितरीत करण्यात असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत.

जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून तेथील मतदान केंद्राकरिता ईव्हीएम मशीन व साधनसामग्रींचे बडनेरा मतदारसंघाकरिता श्री. शिवाजी बीपीएड कॉलेज या ठिकाणाहून वितरण झाले. अमरावती मतदारसंघाकरिता ईव्हीएम गोडावून न.1 (लोकशाही भवन) विद्यापीठ रोड येथून वितरण झाले. तिवसा मतदारसंघाकरिता एपीएमसी परिसर, सातरगाव रोड तिवसा, दर्यापूर मतदारसंघाकरिता एपीएमसी परिसर,दर्यापूर, मेळघाट मतदारसंघाकरिता फातिमा कान्वेंट हायस्कुल हॉल तर अचलपूर मतदारसंघाकरिता कल्याण मंडपम्, कोर्ट रोड या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण करण्यात आले.

जिल्ह्यात 354 सर्वाधिक मतदान केंद्र मेळघाटात असून सर्वात कमी 309 मतदारसंघात अचलपूर येथील आहे. बडनेरा मतदारसघांत 337 मतदानकेंद्र, अमरावती मतदारसंघात 322, तिवसा मतदारसंघात 319, दर्यापूर मतदारसंघात 342 याप्रमाणे एकूण 1 हजार 983 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट व अचलपूर या सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र (पिंक बुथ), एक दिव्यांग मतदान केंद्र, युवा अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. तसेच बडनेरा मतदारसंघातील मतदान केंद्र 257 - मनपा उर्दु प्राथमिक मुलांची शाळा क्र.10 खोली क्र.4 जुनी वस्ती बडनेरा हे इंद्रधनुष्य (Rainbow) या थीमवर असणार आहे. आणि धामणगाव रेल्वे येथील जि.प.प्रायमरी मराठी शाळा खोली क्र.1 उसळगव्हाण हे मतदान केंद्र आदिवासी मतदान केंद्र या थीमवर असणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिले जात आहेत. जिल्ह्यातील 993 मतदान केंद्रावर वेब कास्टींगव्दारे निगरानी ठेवली जाणार आहे. सर्व मतदार केंद्रावर सावली मंडप, प्रतिक्षा कक्ष, एनएसएस/एनसीसी स्वयंसेवकांची मदत, मतदार मदत कक्ष, मेडीकल किटसह वैद्यकीय पथक आदी सुविधा मतदारांना पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हिल चेअरसह इतर आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व  सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, नि:ष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले आहे.

0000

बुधवार, २४ एप्रिल, २०२४

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in  संकेतस्थळ

 

अमरावती दि. 24:  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीद्वारे  विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मंगळवार दि. 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी कळविले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आदी योजना राबविण्यात येतात.

सन2023-24 या वर्षाअखेर महाडीबीटी पोर्टलवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज प्रलंबित असल्याचे डॅशबोर्डवरील स्थितीवरून दिसून येत आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी परिक्षा फी(फ्रीशिप) या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची नोंदणी कमी झालेली आहे.

महाडीबीटी पोर्टलवर विविध कारणास्तव अद्यापही अर्ज प्रलंबित असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची कागदपत्रे परिपूर्ण नसणे, संबंधित महाविद्यालयाची शुल्क रचना निश्चित नसणे, संबंधित अभ्यासक्रमास मान्यता प्रदान नसणे, विद्यापीठाने इतर शुल्क मंजुरीकरिता उशिराने महाआयटी कडे पाठविणे व त्या शुल्कास महाआयटी कडून उशिराने मान्यता प्रदान करणे इ.बाबींचा/ त्रुटींचा प्रामुख्याने समावेश आहे.

सन 2023-24 या वर्षाकरिता विविध स्तरावर प्रलंबित अर्जाची संख्या व अनुषंगीक अडचणींना लक्षात घेता महाडीबीटी पोर्टलवर सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे नवीन अर्ज व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी दि. 30 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पोर्टलवरील होम पेजवर सुध्दा मुदतवाढीबाबत सूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अर्ज विहित वेळेत निकाली न काढल्यास, असे अर्ज महाडीबीटी प्रणालीमधून कायमस्वरूपी रद्दबातल (Auto-Reject) होतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच महाडीबीटी पोर्टलवर चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता ओंनलाईन अर्जाची नोंदणी दि 1 जून, 2024 पासून सुरु होणार आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी त्रुटींचे निराकरण करुन शिष्यवृत्तींचे प्रलंबित अर्ज विहित मुदतीत निकाली काढावे, अशा सूचना विभागाव्दारे देण्यात आल्या आहेत.

            विहित मुदतीत महाडीबीटी प्रणालीवरील पात्र अर्ज निकाली न काढल्यास किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

0000

शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in संकेतस्थळ

                            महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in  संकेतस्थळ

 

अमरावती दि. 19:  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीद्वारे  विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मंगळवार दि. 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी कळविले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आदी योजना राबविण्यात येतात.

सन2023-24 या वर्षाअखेर महाडीबीटी पोर्टलवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज प्रलंबित असल्याचे डॅशबोर्डवरील स्थितीवरून दिसून येत आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी परिक्षा फी(फ्रीशिप) या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची नोंदणी कमी झालेली आहे.

महाडीबीटी पोर्टलवर विविध कारणास्तव अद्यापही अर्ज प्रलंबित असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची कागदपत्रे परिपूर्ण नसणे, संबंधित महाविद्यालयाची शुल्क रचना निश्चित नसणे, संबंधित अभ्यासक्रमास मान्यता प्रदान नसणे, विद्यापीठाने इतर शुल्क मंजुरीकरिता उशिराने महाआयटी कडे पाठविणे व त्या शुल्कास महाआयटी कडून उशिराने मान्यता प्रदान करणे इ.बाबींचा/ त्रुटींचा प्रामुख्याने समावेश आहे.

सन 2023-24 या वर्षाकरिता विविध स्तरावर प्रलंबित अर्जाची संख्या व अनुषंगीक अडचणींना लक्षात घेता महाडीबीटी पोर्टलवर सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे नवीन अर्ज व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी दि. 30 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पोर्टलवरील होम पेजवर सुध्दा मुदतवाढीबाबत सूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अर्ज विहित वेळेत निकाली न काढल्यास, असे अर्ज महाडीबीटी प्रणालीमधून कायमस्वरूपी रद्दबातल (Auto-Reject) होतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच महाडीबीटी पोर्टलवर चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता ओंनलाईन अर्जाची नोंदणी दि 1 जून, 2024 पासून सुरु होणार आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी त्रुटींचे निराकरण करुन शिष्यवृत्तींचे प्रलंबित अर्ज विहित मुदतीत निकाली काढावे, अशा सूचना विभागाव्दारे देण्यात आल्या आहेत.

            विहित मुदतीत महाडीबीटी प्रणालीवरील पात्र अर्ज निकाली न काढल्यास किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

0000

गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सक्रीय सहभाग नोंदवावा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

                                 








लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सक्रीय सहभाग नोंदवावा

                                                      -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

* दिव्यांग, तृतीयपंथी मतदारांशी संवाद

* लोकसभा निवडणुकीचा आढावा ; नियंत्रण कक्षाची पाहणी

बुलडाणा, दि. 18 : सक्षम लोकशाहीसाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, तृतीयपंथी आदी सर्व मतदारांनी मतदानासाठी समोर येऊन मतदान करावे. तसेच मतदानासाठी इतरांनाही प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमती पाण्डेय यांनी आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिव्यांग आणि तृतीयपंथी यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना मतदान करण्यासंदर्भात जनजागृती करुन मतदान करण्यासाठीची शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचरकर, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, समाजकल्याण सहायक आयुक्त अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आदी यावेळी उपस्थित होते.

            श्रीमती पाण्डेय यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षास भेट दिली. मतदार हेल्पलाईन, सी-व्हिजील, सीसीटीव्ही यंत्रणा आदींबाबत त्यांनी माहिती घेतली. मतदार हेल्पलाईनवर येणाऱ्या दूरध्वनीबाबत कॉलसेंटरप्रमाणे उपस्थित कर्मचारी यांनी आपली ओळख द्यावी. त्यानंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, ही माहिती देताना नम्रपणे ही माहिती देण्यात यावी. निवडणुकीच्या कालावधीत नियंत्रण कक्ष महत्वाची भूमिका बजावित असतो. या कक्षाने इतर नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे. जिल्ह्याला इतर राज्याची सिमा आहे. याठिकाणी असलेल्या चेकपोस्टवरील यंत्रणा सक्षमपणे सुरू ठेवावी.

            लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. महिला मतदारांची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेत त्यांनाही सहभागी करून घ्यावे. ही‍ निवडणूक मुक्त आणि नि:ष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीमती पाण्डेय यांनी यावेळी केले. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध घटकांशी संवाद साधून त्यांचा सहभाग नोंदवून घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज श्रीमती पाण्डेय यांनी दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. तसेच तृतीयपंथी आणि दिव्यांग मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना व्हील चेअर आणि मतदान केंद्रावर आणण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्तांची नियंत्रण कक्षाला भेट

            विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालात स्थापित लोकसभा निवडणूक नियंत्रण कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी हेल्पलाईनवरील नोंदीची पाहणी केली. तसेच दूरध्वनी, सी-व्हीजील ॲपवरील तक्रारींची माहिती घेतली. निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या स्थीर सर्व्हेक्षण पथकाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फिरत्या पथकांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. यावेळी त्यांनी थांबलेल्या पथकांशी संपर्क साधून माहिती घेतली.

00000

विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा


 विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा


निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, नि:ष्पक्ष व भयमुक्त वातावरणात

पार पडण्यासाठी जबाबदारीने प्रयत्न करा

                             - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर दि. 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. याअनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक नियमांचे व सूचनांचे विभागातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काटेकोर पालन करुन निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, नि:ष्पक्ष व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आज दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक पूर्वतयारीचा आढावा विभागीय आयुक्तांनी आज घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त संजय पवार, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, विधी अधिकारी प्रत्यक्षरित्या तसेच पाचही जिल्ह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.

श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक मतदाराचे मतदान महत्त्वपूर्ण व निर्णायक आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्व नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राज्यघटनेने दिलेल्या मतदान करण्याच्या अधिकाराचा वापर करावा. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, मतदार जागृती व साक्षरतेसाठी स्वीप मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात यावे. युवा मतदारांना मतदानाच्या राष्ट्रीय उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करावे. जिल्ह्यातील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचे गृहमतदान अधिक प्रमाणात होण्यासाठी प्रयत्न करावे. आदर्श आचारसंहितेचे उमेदवारांकडून काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री करावी, अशा सूचना डॉ. पाण्डेय यांनी केल्या.

            मतदान केंद्रे, मतदारांची माहिती, मतदानाची ठिकाणे व तेथील व्यवस्था, माध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण समिती, प्रशिक्षण कार्यक्रम, मनुष्यबळ, आचारसंहिता कक्ष, सीव्हीजील ॲप, खर्च सनियंत्रण समिती पथक, आदर्श आचारसंहितेचे पालन, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात चेकपोस्टव्दारे तपासणी, वनविभागाचे चेकपोस्ट, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी, राजकीय प्रचाराच्या जाहिराती व चित्रफीतींचे माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणिकरण, पेड न्यूज आदी लोकसभा निवडणूक अनुषंगाने विविध विषयांचा विभागीय आयुक्तांनी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.

0000

सोमवार, १५ एप्रिल, २०२४

विभागीय आयुक्तालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 


                           विभागीय आयुक्तालयात

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

अमरावती दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावने, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, ‍विशेष कार्य अधिकारी हर्षद चौधरी यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

00000