गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३

छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेंतर्गत मागेल त्याला शेततळे शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेंतर्गत मागेल त्याला शेततळे

शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

            अमरावती, दि.2 : शेतकऱ्यांना आवश्यक असणारी बाब त्याला मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करुन दिल्यास त्याचा शेतकऱ्यास मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजना (मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत मागेल त्याला शेततळे) वैयक्तिक शेततळे ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.

योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता अर्जदार शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर किमान ०.४० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे व जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. शेतकऱ्यांनी महा- डीबीटी पोर्टलचे http://mahadbt.maharashtra.gov.in/Farmar/Login/Login या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. अर्ज सादर करतेवेळी जमिनीचा ७/१२, ८अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबूक झेरॉक्स, हमीपत्र, जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे. महा-डीबीटी पोर्टल वरील सांगणकीय प्रणालीद्वारे अर्ज करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल. या योजनेत किमान १५×१५×३ ते ३४×३४×३ मीटर आकारमानाचे शेततळे घेता येईल व अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेततळ्याकरिता किमान रु. १४४३३/- ते रु. ७५०००/- अनुदान अनुज्ञेय आहे.

अमरावती विभागातील बहुतांश शेती ही कोरडवाहू असून ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. पावसाचे होणारे असमान वितरण आणि पावसामध्ये येणारे खंड या प्रमुख अडचणी आहेत. अशा कालावधीत सिंचन सुविधेअभावी पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते अथवा पाण्याचा खूप जास्त ताण पडल्यास पिके देखिल नष्ट होतात व पर्यायाने शेतकऱ्यास आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. या वर्षीचा कमी पाऊसमानाच्या परिस्थितीत शेततळे खोदुन या योजनेचा लाभ घेण्याबाबत कृषी विभागाव्दारे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा विभागातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

 

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा