शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

शेतीपिकांच्या उत्पादन वाढीसाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्‍पर्धेचे आयोजन

 शेतीपिकांच्या उत्पादन वाढीसाठी

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्‍पर्धेचे आयोजन

 

 शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

अमरावती दि. 2:  राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबलमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश  ठेऊन राज्यांतर्गत  पीकस्पर्धा  योजना’ राबविण्यात येत आहे.

            वंचित/दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिक स्पर्धांमध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून रब्‍बी हंगाम २०२३ पासून तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर पिकस्‍पर्धा योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस  या पाच पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

रब्बी पीक अंतर्गत ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा एकूण पाच पिके पिक स्पर्धेत असतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे, याप्रमाणे पात्रतेचे निकष राहतील.

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.

रब्‍बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख 31 डिसेंबर आहे. अर्ज दाखल करण्‍याच्‍या तारखेच्‍या दिवशी शासकीय सुट्टी असल्‍यास त्‍यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्‍यात यावी. विजेत्या शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकालानुसार प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस दिले जाणार.

            स्पर्धेसाठी पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३०० प्रवेश शुल्क तर आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५० प्रवेश शुल्क राहील. स्पर्धेत विजेता ठरलेल्या शेतकऱ्यांना सर्वसाधारण व आदिवासी गटात तालुकापातळीवर पहिले, दुसरे व तीसरे अनुक्रमे 5 हजार, 3 हजार व 2 हजार रुपये बक्षीस दिल्या जाणार. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस दहा हजार, दुसरे 7 हजार, तीसरे 5 हजार रुपयांचे बक्षीस दिल्या जाणार. तसेच राज्यपातळीवर पहिले बक्षीस 50 हजार, दुसरे 40 हजार व तीसरे बक्षीस 30 हजार रुपयांचे दिले जाणार.

   दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्‍हावी याकरीता जास्तीत जास्त शेतक-यांनी या पिकस्‍पर्धेत सहभागी व्‍हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्‍यात येत आहे. पिकस्‍पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी  शेतकरी  बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्‍थळाला भेट द्यावी.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा