सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी
शेतीपुरक व्यवसाय करावे
   -पालकमंत्री प्रविण पोटे
* प्रत्येक व्यक्तीने तीन व्यक्तींना मदत करावी
* जिल्ह्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत

             अमरावती, दि. 26 : विदर्भातील अमरावती व यवतमाळ या दोन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. पूर्वीच्या काळात गाई-म्हशीच्या दुध उत्पादनातून शेतकरी कुटुंबातील महिला पैश्याची बचत करीत होत्या. आणि ऐन अडचणीच्या वेळेस हा बचत केलेला पैसा कामी येत असे चित्र खेड्यागावात पाहायला मिळत होते. कालांतराने शिक्षणासाठी व रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी गावातील लोक शहराकडे स्थलांतरीत होऊ लागली. तसेच सततची नापिकी व निर्सगाचा लहरीपणा इत्यादी कारणामुळे शेतकरी आर्थिक विवंचणेत सापडू लागला. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वीप्रमाणेच शेतीपुरक व्यवसाय करुन आत्मनिर्भर व्हावे, असे संवेदनशील आवाहन पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी आज केले.
            हॉटेल गौरी इन येथे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी अभियंता सहकारी पतसंस्था मर्या. अमरावती या संस्थेची 31 वी वार्षिक आमसभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी या पतसंस्थेव्दारे जिल्ह्यातील 14 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दहा हजार रुपये मदतीचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सुनील जगताप, महावितरण यवतमाळचे अधिक्षक अभियंता रामेश्वर माहुरे, महावितरण अमरावतीचे अधिक्षक अभियंता अनिल वाकोडे, महापारेषणचे अधि. अभियंता प्रफुल्ल औघड, वाशिमचे अधि. अभियंता श्री. कैशरीया, आम्ही सारे फॉउंडेशनचे शेतकरी नेते विजूभाऊ विल्हेकर यांचेसह पतसंस्थेचे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
            श्री पोटे-पाटील म्हणाले, राज्य शासनाकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. यावर्षी कर्जमाफी योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार रुपयाची तातडीची मदत आणि सुमारे दिड लाखापर्यंतचे कर्जमाफी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी सुध्दा खचून न जाता इतर शेतीपूरक व्यवसाय करुन आर्थिक सुब्बता प्राप्त करावी. शेतीपुरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून गाई-म्हशीचे पालनपोषण करावे. आणि या माध्यमातून दुधाचे उत्पादन घेऊन यावर प्रक्रिया उद्योग कसा उभारता येईल यासाठी प्रयत्न करावे.  
            पुढे बोलतांना ते म्हणाले, महावितरणच्या अभियंतांनी आत्महत्याग्रस्त व गोर-गरीब कुंटुंबातील तीन विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च भागवावा. होतकरु विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच व दोन गणवेशाचे जोड उपलब्ध करुन दिल्यास आयुष्यभर आपण सुध्दा समाजिक दायीत्व पूर्ण केल्याची भावना निर्माण होईल.
            समारंभात 10 वी, 12 वी मध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या अभियंतांच्या पाल्यांचा व वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळालेल्या अभियंतांचे तसेच सेवानिवृत्त झालेल्या अभियंतांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात राजेंद्र ठाकरे यांनी पतसंस्थेचा लेखाजोखा वाचून दाखविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उज्वल गावंडे यांनी केले तर आभार श्री. मोघे यांनी मानले.

***********


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा