सार्वजनिक कामे तातडीने पूर्ण करावीत
-
राज्यमंत्री बच्चू कडू
*आढावा बैठकीत
अधिकाऱ्यांना निर्देश
अमरावती, दि. 3 : नागरिकांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असलेली
फेरफार, सातबारा यासारखी कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अधिकाऱ्यांनी नागरिकांना उत्कृष्ट
सेवा द्यावी, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अचलपूर येथील उपविभागीय
अधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार आणि
संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार योजना व पांदण योजनेबाबत बच्चू कडू यांनी माहिती
घेतली. यावेळी त्यांनी पांदण रस्ता व जलयुक्त शिवार ही दोन्ही कामे पूर्ण
होण्यासाठी सर्व नद्यांवर एक किलोमीटरपर्यंत निघणाऱ्या खनिजांचा पांदण रस्त्याच्या
कामात उपयोग करुन घेण्यात यावा. याबाबतचा एकत्रित प्रस्ताव गटविकास अधिकारी यांनी
तातडीने सादर करण्यास त्यांनी सांगितले. उपविभागात 342 पांदण रस्ते प्रस्तावित असून
याकरिता स्वातंत्र संग्राम सैनिक, गणेश मंडळ तसेच संबंधित गावातील नागरिक व निमशासकीय
कर्मचारी यांची तालुकास्तरावर समिती गठीत करुन त्या समितीने नवीन पांदण रस्ताच्या
खर्चाचे अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जुन्या व नवीन खचलेल्या
विहिरींबाबत एकत्रित पंचनामे पूर्ण करावे, असे चांदूरबाजार तहसिलदारांना सांगितले.
अतीवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींचे सर्व्हेक्षण करावे, पिकविमा योजना व प्रधानमंत्री
किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तालुका कृषि अधिकारी यांनी ऑनलाईन द्यावी,
पात्र लाभार्थ्यांना याचा त्वरीत लाभ द्यावा, अचलपूर तहसील कार्यालयाने 200
आदिवासी समाजाचे जात प्रमाणपत्राबाबत प्रस्ताव तयार केले असून चांदूरबाजार तहसील
कार्यालयात 207 प्रकरणे प्रलंबित असून ती तात्काळ निकाली काढावीत, तसेच शालेय जात
प्रमाणपत्र वाटपाबाबत शाळानिहाय कार्यक्रम आखून महा ई-सेवा केंद्राच्या सहाय्याने
विद्यार्थ्यांना त्वरीत जात प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे, असे निर्देश दिले.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा