गुरुवार, ४ जून, २०२६

 



 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ अभियानाला गती ;

·         लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा निर्धार

 

·         प्रत्येक विभाग व नागरिकांना ई-शपथ घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. ४ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२६ रोजी राज्यभर ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार असून नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाची ई-शपथ घ्यावी व पर्यावरण संवर्धनाचा निर्धार करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

या अंतर्गत विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त तसेच विविध विभागांच्या प्रमुखांना ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत विविध जनजागृती उपक्रम आपापल्या जिल्ह्यात राबविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. वाढते तापमान, पर्यावरणीय बदल आणि नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण लक्षात घेता, पर्यावरण संवर्धनासाठी सर्व स्तरांवर व्यापक जनजागृतीची गरज असल्यामुळे त्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय विभागांनी कार्यवाही करावी, असेही सांगण्यात आले आहे.

‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि ऊर्जा या पंचमहाभूतांच्या संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांकडून करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि विविध शासकीय कार्यालयांमध्ये पर्यावरण संवर्धन विषयक चर्चा, जनजागृती कार्यक्रम आणि शपथविधी आयोजित करण्यात यावेत. नागरिकांनी https://majhivasundhara.in/en या पोर्टलवर जाऊन ई-शपथ घेऊन प्रमाणपत्र प्राप्त करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून भावी पिढ्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि संतुलित पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपली भूमिका पार पाडावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने सर्व संबंधित यंत्रणांना अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा