सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१

नोव्हेंबर अखेर पर्यंत कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा - विभागीय आयुक्त पीयूष सिंह

 




नोव्हेंबर अखेर पर्यंत कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट
  पूर्ण करा

                                                             -  विभागीय आयुक्त पीयूष सिंह योग्य नियोजन व अंमलबजावणी करण्याच्या आरोग्य विभागाला सूचना

अमरावती दि.8: कोविडची संभाव्य तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. ही लाट थोपवून लावण्यासाठी 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणे गरजेचे आहे. लसीकरण मोहीमा, शिबीरे व जनजागृती करुन लसीकरणाची गती वाढवावी. धारणी, चिखलदरा भागात नागरिकांच्या लसीकरणासाठी  योग्य नियोजन गरजेचे आहे. स्थलांतरीत मजूर, खासगी औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी या सर्वांचे लसीकरण करण्यासाठी या मोहीमेत आरोग्य विभाग, जिल्हा व ग्रामीण प्रशासनासह सामाजीक संस्थांनी सहभागी होऊन नोव्हेंबर अखेरपर्यंत लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले.

विभागिय आयुक्त कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी पवनीत कौर, महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे, आरोग्य विभाग अकोलाचे उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम , उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर आदी उपस्थित होते.

श्री. सिंह म्हणाले, लसीकरणाची गती वाढविणे गरजेचे आहे. कोणत्या विशिष्ठ भागात लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये भिती किंवा संभ्रम असल्यास त्यांच्यात  विविध माध्यमांचा उपयोग करुन  जनजागृती करावी. विशेष करुन अशा भागात आरोग्य विभागाने लसीकरण शिबीरांचे आयोजन करावे. लसीकरण केंद्रावर रोजचे  उद्दिष्ठ पूर्ण करावे, असे सांगितले.

 मिशन बिगीन अंतर्गत मॉल, सिनेमागृह सुरु झाले आहेत. तेथे प्रवेश करण्यासाठी लसीकरण बंधनकारक करावे. लसीकरणास प्रोत्साहन मिळावे यासाठी, ज्या गावातील अठरा वर्षावरील शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असेल अशा गावांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिली. शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे दोनीही डोज घेऊन लसीकरण पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. ज्या नागरिकांनी ठरावीक वेळेत लसीकरणाचा दुसरा डोज घेतला नाही त्या नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे सांगितले. लसींचा  पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहीती यावेळी संबंधितांनी दिली. 

 

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा