शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले गणेश दर्शन, मनोभावे आरतीही केली

मुंबई, दि. २९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विविध देशातील महावाणिज्य दूतांनी गणेशाचे दर्शन घेत मनोभावे आरती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी सर्व महावाणिज्य दूतांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसोबत सुमारे ३५ महावाणिज्य दूतांनी सहकुटुंब आरतीत सहभाग घेतला. फ्रान्सचे जीन मारे सेरे चार्लेट, ब्रिटीश उच्चायुक्तालयाचे राजकीय प्रमुख जॉन निकेल, मलेशियाचे अहमद झुवारी युसूफ, साउथ कोरियाचे डाँगवान यू, ब्राझिलचे जाओ दे मेंडोन्का लिमा नेतो, बांग्लादेशच्या श्रीमती फरहाना अहमद चौधरी, इंडोनेशियाचे इडी वॉरडोयो, यूएईचे अब्दुल्ला हुसेन अल्मारझुकी, अर्जेंटिनाचे डॅनिअल क्यूर कन्फलोनिरी, श्रीलंकेचे प्रियंगा विक्रमसिंघे, इजिप्तचे दहिला तवाकोल, फिनलंडच्या इवा निल्सन, पोलंडचे थोमाझ, कतारचे अहमद साद अल सुलैती, मॉरिशसचे दुशांत बक्तोवार, इसराईलचे कोब्बी शोशनी, जपानचे कोजी यागी, युएसएचे मायकेल स्क्रेन्डर, टर्कीचे मुस्तफा केमालटीन युगूर, पनामाचे रॉर्बटो रॉड्रिग्ज प्रडा, इराकचे झुहायर साद अब्बास, कुवेतचे शाये अबू शायबा, ऑस्ट्रेलियाचे पौल मुर्फी, आर्यलँडचे टॉम नूनन, नेदरलँडचे नाबील तौती, बेलारूसचे अलिकसंदर मत्सूको, स्पेनचे जॉर्ज डी लुकास कॅडेनास, थायलंडच्या थितीपॉर्न चुचीन्नावट, स्वीडनचे उपमहावाणिज्य दूत जोकीम गुन्नारसन, स्विर्झलँडचे मॅथिअस कोएग्ल, सौदी अरेबियाचे सुलेमान ईद अलोतैबी, इटलीचे वॉल्टर फेरारा, मेक्सिकोच्या अड्रिना विल्लानेवा, चीनचे क्वीन जी, जर्मनीचे क्रिस्टोफ रेंडटॉर्फ, सिंगापूरचे जेरम वाँग, बहरिनचे अली अब्दुल अझीज अल बलुशी यांच्यासह अफगाणिस्तानचे महावाणिज्य दूत यांनी सहकुटुंब आरतीत सहभाग घेतला. गणेश दर्शन, आरतीनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि श्रीमती अमृता फडणवीस यांनी सर्वांची वैयक्तिक विचारपूस करीत चर्चा केली.

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी "मासूम" § मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

मुंबई, दि.२८ : राज्यातील बालसंगोपन संस्थांमध्ये (Child Care Institutions - CCI) राहणाऱ्या समस्याग्रस्त आणि विधी संघर्षीत मुलांना मानसिक आरोग्यसेवा व समुपदेशन करण्यासाठी महिला व बालविकास विभाग एमपॉवर संस्थेच्या माध्यमातून "मासूम" प्रकल्प राबवित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील निर्णयामुळे या प्रकल्पाचा आजपर्यंत ३,३३७ मुलांना लाभ झाला असून एकूण ९५९३ वैयक्तिक समुपदेशन सत्रे पार पडली आहेत. महाराष्ट्रातील महिला व बालविकास विभाग (WCD) राज्यातील बालकल्याण व मानसिक आरोग्याच्या कार्याला बळकटी देण्यासाठी, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या Mpower या उपक्रमामार्फत ‘मासूम’ प्रकल्प राबवीत आहे. या प्रकल्पांतर्गत अडचणीत असलेल्या व विधी संघर्षीत मुलांना, जे बाल संगोपन संस्थांमध्ये (Child Care Institutions – CCIs) राहतात, त्यांना मानसिक आरोग्य सेवा व समुपदेशन (counselling) पुरवले जाते. हा सार्वजनिक-खाजगी भागीदारीचा उपक्रम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला आहे. सेवेची भावना या उद्देशाने व बांधिलकीने Mpower व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापिका व अध्यक्षा, श्रीमती नीरजा बिर्ला यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून १८० दशलक्षाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचून, Mpower हे दक्षिण आशियातील मानसिक आरोग्य साक्षरता, क्षमता-वृद्धी आणि सामुदायिक संपर्कावर लक्ष केंद्रित करणारे सर्वांत मोठे खासगी व्यासपीठ ठरले आहे. महिला व बालविकास विभाग (WCD) सोबतच्या सामंजस्य करारानंतर हा प्रकल्प मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि नाशिक या विभागांमध्ये राबवला जात आहे. एकूण १९ बालसंगोपन संस्थांना पाच मानसशास्त्रज्ञाच्या टीमकडून सेवा दिल्या जात आहेत. या प्रकल्पांतर्गत मानसशास्त्रज्ञ रोटेशन पद्धतीने सीसीआयला भेट देतात, स्तिथीपरत्वे समुपदेशन करतात, मुलांचे मानसिक आरोग्य स्क्रिनिंग करतात आणि गरजेनुसार थेरपी सेवा पुरवतात. याशिवाय गंभीर प्रकरणांमध्ये बालकल्याण समिती (CWC) आणि किशोर न्याय मंडळाला (JJB) तज्ज्ञांचे सहकार्य दिले जाते. थेरपिस्ट काही मुलांच्या आरोग्य आणि मानसिक परिस्थितीनुसार त्यांचे तणाव मापन पट्टी (Stress Scale), आक्रमकता मापन पट्टी (Aggression Scale), स्थिती-गुणधर्म चिंतामापन चाचणी (State Trait Anxiety Test), मानसिक आरोग्य व कल्याण मापन पट्टी (Psychological Well-Being Scale) यांसारख्या साधनांद्वारे सखोल परीक्षण केले जाते. मुलांच्या कुटुंबियांनाही समुपदेशनाची सुविधा दिली जाते. पालकांचे समुपदेशन केल्याने , मुले घरी परतल्यावर त्यांना पुर्वीप्रमाणे मोकळे वातावरण मिळेल हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. मासूम प्रकल्प हा राज्यातील बालसंगोपन संस्थांमध्ये मानसिक आरोग्य सेवांना बळकटी देणारा ठरला असून मुलांच्या पुनर्वसन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या प्रकल्पासंदर्भात Mpower व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापिका व अध्यक्षा नीरजा बिर्ला म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या मानसिक आरोग्याला दिलेले प्राधान्य हे दूरदर्शी नेतृत्वाचे द्योतक आहे. या सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे Mpower चे कार्य म्हणजे अडचणीत असलेल्या व विधी संघर्षीत मुलांना त्वरित ट्रॉमा रिलिफ व सर्वसमावेशक मानसशास्त्रीय आधार देणे. प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञांच्या मदतीने विद्यमान प्रणालीला बळकटी देऊन मुलांच्या पुनर्वसन व समाजात पुन्हा समावेशक होण्यासाठी सुरक्षित व सहाय्यकारी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी § मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

मुंबई, दि.२८ : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर यांचा संयुक्त सहभाग राहणार आहे. याशिवाय मोठ्या संख्येने गणेश मंडळे या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले आहेत. मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती दिली जाणार असून, तपासणी दरम्यान आजार आढळणाऱ्या रुग्णांना पुढील उपचार संबंधित योजनांतर्गत मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाचा उद्देश फक्त तपासणीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता निर्माण करणे हा देखील आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या कक्षाच्यावतीने गणेश मंडळांशी संपर्क साधून भव्य आरोग्य शिबिरे राबवली जात आहेत. यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, स्थानिक वैद्यकीय महाविद्यालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांचे तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांची संपूर्ण टीम सक्रिय सहभागी झाले आहेत. गणेशमंडळांकडून व्यापक जनजागृती नागरिकांना या उपक्रमाची माहिती मिळावी यासाठी मागील आठवडाभर गणेश मंडळांकडून बॅनर, पत्रकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती सुरू आहे. परिणामी या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि भाविक पुढे येत आहेत. आरोग्य तपासणीच्या माध्यमातून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आदी आजारांचे लवकर निदान करून वेळेत उपचार मिळण्याची सोय होणार आहे. गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची अभिनव कल्पना आहे. ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळत आहे. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचारही दिले जाणार आहेत. हा उपक्रम म्हणजे आरोग्यसेवेतील लोकाभिमुख आणि जनहिताचा उत्तम आदर्श ठरत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख श्री रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.

नागरिकांच्या आरोग्यासाठी सहाय्यभूत 'श्रीगणेशा आरोग्याचा' उपक्रमाची जिल्ह्यात सुरुवात · मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे समन्वय · नागरिकांनी आरोग्य शिबीरांचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

अमरावती, दि. 27 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणि मुख्यमंत्री सचिवालयाच्या सूचनेनुसार राज्यात सर्वत्र 'श्रीगणेशा आरोग्याचा' या विशेष उपक्रमाची गुरुवारपासून (ता.28 ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पर्वात आरोग्य विभाग व गणेश मंडळांच्या सहाय्याने आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरात केवळ आरोग्य तपासणी व उपचारच नव्हे, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि विविध शासकीय आरोग्य योजनांची व्यापक जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात एकत्रितपणे आयोजित होणाऱ्या या आरोग्य शिबिरांमुळे हजारो नागरिकांना थेट लाभ होणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील नोंदणीकृत रुग्णालये वेगवेगळ्या गणेश मंडळांशी समन्वय साधून आरोग्य शिबिरे आयोजित करणार आहेत. तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रे ग्रामीण भागातील गणेश मंडळांसोबत सहभागी होत आरोग्य शिबिरे घेणार आहेत. आरोग्य शिबिरांच्या ठिकाणी शहरी आणि ग्रामीण भागात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि इतर शासकीय योजनांची माहिती दर्शनी भागात प्रसारित केली जाणार आहे. धर्मादाय आयुक्त यांच्या अधिपत्याखालील धर्मादाय रुग्णालये प्रत्येकी दोन आरोग्य शिबिरे घेऊन या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभागी होणार आहेत. या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये नोंदणीकृत खाजगी रुग्णालयेही उत्स्फूर्तपणे अमरावती शहरात आरोग्य शिबिरे घेणार आहेत. विशेषतः नोंद घेण्यालायक म्हणजे, या उपक्रमांतर्गत शहरातील सायन्स कोर मैदानावर सलग आठ दिवस चालणारे आरोग्य शिबिर हे मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांच्या सक्रिय सहभागाने आयोजित होत आहे. जिल्ह्यात ही मोहिम जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणार असून निवासी उपजिल्हाधिकारी, धर्मादाय उपायुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवला जाणार आहे. या आरोग्य शिबिरांचा जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५

‘दिलखुलास’ कार्यक्रमात आयुक्त राजेश नार्वेकर यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 26 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात “सणांच्या काळातील अन्न व औषध प्रशासन विभागाची भूमिका व खबरदारी” या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत गुरुवार दि. 28, शुक्रवार दि. 29, शनिवार दि. 30 ऑगस्ट तसेच सोमवार दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘News On AIR’ या मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. ही मुलाखत निवेदक राजेंद्र हुंजे यांनी घेतली आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. अन्नधान्य, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ तसेच औषधांच्या दर्जावर काटेकोर नियंत्रण ठेवणे तसेच ग्राहकांना सुरक्षित खाद्यपदार्थ व औषधे मिळावीत यासाठी ग्राहक जागरूकता मोहीम राबविणे, योग्य माहिती उपलब्ध करून देणे, खाद्यपदार्थ खरेदी करताना लेबल, उत्पादन दिनांक व एक्सपायरी तपासण्याचे आवाहन आदी उपक्रम सातत्याने राबविले जात आहे. सणाच्या काळात मिठाई व खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होऊ नये, खराब झालेले पदार्थ विक्रीस येऊ नयेत तसेच औषधांचा गैरवापर टाळण्यासाठी विभागाकडून सतत तपासण्या केल्या जात आहेत. राज्यातील ही यंत्रणेविषयीची सविस्तर माहिती आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

नांदेड- मुंबई ' वंदे भारत एक्सप्रेस' ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

मुंबई, दि. 26 : मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. 'वंदे भारत एक्सप्रेस' मुळे नांदेड शहर मुंबईच्या अधिक जवळ आले आहे. यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, प्रधान मुख्य परिचालन अधिकारी श्याम सुंदर गुप्ता, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) अवनीश कुमार पांडे, विभागीय प्रबंधक हिरेश मीना आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे. प्रगत देशांसारखी आरामदायी सुविधा असलेली भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्याचेच प्रतीक आहे. मुंबई ते नांदेड हे ६१० किलोमीटरचे अंतर ९ ते ९.३० तासात पूर्ण होणार आहे. पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहिब नांदेड पर्यंत जात आहे. या रेल्वे गाडीची क्षमता ५०० वरून १४४० पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच गाडीचे डब्बे ८ वरून २० पर्यंत वाढवण्यात आले आहे. नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना, प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती ' वंदे भारत' एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस च्या सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले. नांदेड येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, नांदेड परिशेत्राचे पोलिस उपमहनिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, डीएमआर प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते. नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेस विषयी थोडेसे · मराठवाड्यातील नांदेडला राज्याची राजधानी मुंबईशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस. · नांदेड ते मुंबई असा 610 कि. मी. चा प्रवास फक्त 09 तास 30 मिनिटांत पूर्ण, इतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी. · महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांदरम्यान वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी दिवसभरातील वातानुकूलित प्रवासाची सुविधा. · हुजूर साहिब नांदेड हून बुधवार व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस गाडीची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. · नियमित प्रवास करणारे प्रवासी, भाविक, अधिकारी व व्यापारी यांच्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त. · पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सोपा.

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्यास २६ तारखेपर्यंत मुदतवाढ अमरावती. २५ : राज्य शासनाच्यावतीने या वर्षीपासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा 'महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या राज्य उत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५' च्या अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेस मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांना सहभागी होता यावे, यासाठी आता अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख मंगळवार दि. २६ ऑगस्ट २०२५ असेल. या स्पर्धेचे अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वीकारले जाणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभागी होऊन तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पारितोषिके जिंकण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले आहे.

गणेशोत्सव : राज्य महोत्सव अनिल आलुरकर उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, अमरावती

यंदा राज्य शासनाने गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” दर्जा दिल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळख अधिक गडद होणार आहे. लोकसहभाग, डिजिटल प्रसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे. या विषयीच्या विविध निर्णयांची माहिती देणारा हा लेख. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, जिथे तो एक सार्वजनिक उत्सव बनला आहे. १९ व्या शतकात, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला एक सार्वजनिक सण म्हणून सुरू केले, ज्यामुळे तो अधिक लोकप्रिय झाला. विशेषतः मुंबई - पुण्याचा गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. जगात आणि देशात आपल्या गणेशोत्सवाची ओळख सर्वात मोठा महोत्सव म्हणून झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. महाराष्ट्र शासनाने यंदा गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्याने विशेष आनंद आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवात सहभागी असते. आता ‘गणेशोत्सव’ प्रथमच राज्य शासन साजरा करत असल्याने हा उत्सव आता अधिक व्यापक प्रमाणात साजरा करून त्यात लोकसहभाग वाढवावा हा मुख्य उद्देश आहे. यासाठी प्रत्येक विभागांनी विविध उपक्रमातून आपली सहभागीता वाढवून आपापल्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता २२ देशांमध्ये साजरा होतो. सार्वजनिक तसेच घरगुती पद्धतीने आणि आता राज्य शासनामार्फतही साजरा होणारा हा गणेशोत्सव सर्व धर्म, जात, भाषांना जोडणारा उत्सव असावा. या गणेशोत्सव काळात तालुका ते राज्य स्तरावरील विविध सांस्कृतिक स्पर्धांसाठी १० कोटी रुपयांची बक्षिसे ठेवली गेली असून समाज माध्यमांवरून विशेष मोहीम राबवली जात आहे. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कृत करणे. राज्यातील सुमारे ४८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुमारे १.५० कोटी रुपये इतक्या रकमेची पारितोषिके वितरित करण्यात येणार आहेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक विभागाने नाट्य, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील वर्ल्ड युनेस्कोचा दर्जा मिळालेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, ऑपरेशन सिंदूर, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संकल्पना असे विषय घेऊन कार्यक्रम राबविण्यात यावेत. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो-व्हिडिओ जगभरातून अपलोड करता यावेत, यासाठी विशेष प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यात प्रमुख मंडळांचे थेट प्रक्षेपण सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर चित्रपट महोत्सव, शैक्षणिक कार्यक्रम आदी विषयांवर निबंध, चित्रकला, ब्लॉग स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात, अशा सूचनाही शासनाने दिल्या आहेत. गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या काळात आपापल्या विभागात विशेष उपक्रम, स्पर्धा, रोषणाई आदींसह विशेष उपक्रम अंतर्गत “ऑपरेशन सिंदूर”द्वारे माजी सैनिकांचा जिल्हानिहाय सत्कार करण्यात यावा. तसेच आत्मनिर्भर भारत व स्वदेशी संकल्पना यांचा गौरव करण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळख अधिक घट्ट होणार आहे. लोकसहभाग, डिजिटल प्रसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे. वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासनाची यंत्रणा सज्ज झाली असून गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेश आरास स्पर्धा, चौकाचौकात रोषनाई, ड्रोन शो, विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. शासन निर्णयानुसार तालुका स्तरापासून राज्य स्तरावर विविध गणेशोत्सव मंडळ जे धार्मिक प्रथा परंपरानुसार सहभागाने पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमात काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पारितोषिकाची घोषणा केली आहे. तसेच गिरगाव चौपाटीवर ड्रोन महोत्सव आयोजन करण्यात येणार असून पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई आणि राज्यातील सर्व भागात स्थानिक स्तरावर शक्य असेल त्या सार्वजनिक ठिकाणी रोषणाई करण्यात येणार असून गणेशोत्सव काळामध्ये भजनी मंडळांना भजनामधील साहित्यासाठी थेट लाखो रुपयांचे अनुदान देण्याची योजना घोषित झाली आहे. परदेशातही गणरायाचे आगमन धुमधडाक्यात व्हावे, म्हणून हा राज्य महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, ही भूमिका घेण्यात आली आहे. या महोत्सवांतर्गत, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा, तालुका या तीनही स्तरांवर होणार आहे. या स्पर्धेचे अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबईच्या pldeshpandekalaacaderny.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टल द्वारे ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले जात आहेत. ही स्पर्धा विनामूल्य आहे. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. विजेत्या मंडळांना तालुकास्तरावर एक, जिल्हा व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरविले जाणार आहे यासोबतच, महाराष्ट्रातील घरगुती गणपतीचे दर्शन, सार्वजनिक गणपतीचे दर्शन व विविध प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणपतींचे लाईव्ह दर्शन अकादमीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in पोर्टलद्वारे घरबसल्या घेता येणार आहे. आपल्या घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे छायाचित्र या पोर्टलद्वारे विनामूल्य प्रसिद्ध करता येईल. याकरीता अधिकाधिक मंडळांनी व कुटुंबांनी आपल्या गणपतीची छायाचित्रे ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टल द्वारे प्रसिद्ध करावीत व सर्वांना श्री गणरायाचे दर्शन घेता येईल याची व्यवस्था करावी. हा ‘गणेशोत्सव- राज्य महोत्सवाचा’ शासन निर्णय गणरायाच्या चरणी घोषित करताना आनंद होत असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. याबाबत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा आणि विविध कार्यक्रम यांचे दोन स्वतंत्र सविस्तर शासन निर्णयही जारी करण्यात आले आहेत. पु. ल. देशपांडे कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे या महोत्सवाचे नियोजन व समन्वय करण्यात येत आहे. गणेशोत्सवात यंदा शासनाचा सहभाग मोठ्या प्रमाणात राहणार आहे. गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून शासकीय आस्थापनाच्या इमारती, वारसास्थळांवर या बोधचिन्हाची रोषणाई करण्यासोबत महत्त्वाच्या चौकाचे सुशोभीकरण करुन रोषणाई करावी. संपूर्ण राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्राची कला व संस्कृती आणि परंपरेचे दर्शन या कार्यक्रमांतून घडेल. हे कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर ज्या ठिकाणी मराठी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणीही करण्यात येत आहेत. तसेच मराठी भाषिक बहुल भारताबाहेरील काही देशामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. काही ठिकाणी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अध्यात्म नाट्यरंग महोत्सवाचेही आयोजन करण्यात येत आहे. ज्या चित्रपटांमधून गणपती विषयक परंपरा, कला संस्कृती दर्शवलेली आहे, अशा चित्रपटांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट आणि नाणे काढण्यात येईल. संपूर्ण राज्यभरातून गणपतीविषयक रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘ड्रोन शो’ चे आयोजन करण्यात आले आहे. या राज्य महोत्सवाची माहिती संपूर्ण देशभर व्हावी यासाठी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ आणि समाज माध्यमे यांच्या माध्यमातून देशभरात प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रम, उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. उत्सवाच्या दरम्यान प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभिकरण करण्यात येणार आहे. पारंपरिक भजन व आरती सादर करणाऱ्या भजनी मंडळांना साहित्य वाटप, अनुदान देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. विसर्जन सोहळ्यामध्ये आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा व वाहन व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे. राज्यात शिकत असणाऱ्या देशाबाहेरील विद्यार्थ्यांना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी योजना,उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ७ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत परवानगी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देण्यात आली असून याबाबत प्रशासनाने गणेश मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला आहे. प्रसिद्ध गणेश मंडळे, गणेश मंदिरांनी भक्तांकरिता थेट प्रक्षेपणाद्वारे घरातूनच दर्शनाची सोय उपलब्ध करुन द्यावी, केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचा बँड शो आणि पोलीस दलांचा बँड शो तसेच डॉग शोचे आयोजन करावे. शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजनांचे विद्यार्थी, सामाजिक संस्थांना सहभागी करुन उपक्रमाचे आयोजन करावे. महावितरणने गणेश मंडळांना वीज उपलब्ध करुन द्यावी. आरती करणाऱ्या भजनी मंडळाना मोफत साहित्य वाटप करण्यात यावे. विसर्जन मार्गावर ड्रोन शोचे आयेाजन, जाहिरात फलकांवर सामाजिक संदेश देण्याची कार्यवाही करावी. विदेशी विद्यार्थी, नागरिक, विदेश दुतावासातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे. भारतीय हवामान विभागाकडून पावसाबाबत देण्यात येणाऱ्या अंदाजानुसार प्रशासनाने तयारी करावी. गणेशोत्सवानिमित्त सर्वांचा सन्मान झाला पाहिजे, अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणावे. विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करण्याबाबत तालुका आणि जिल्हास्तरावर विविध स्पर्धां आयोजित कराव्यात. मराठी संस्कृती, कलाकार, पंरपरांना प्रोत्साहन देण्याकरीता मराठी नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात यावा. विविध विषयांबाबत व्याख्यानमाला, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करावे. समाजमाध्यमाद्वारे व्यापक स्वरुपात प्रसार आणि प्रचार करावा. गणेश मंडळांनी ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करुन त्यांच्या कर्तृत्वावर आधारित माहिती फलक लावावेत. मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा. यंदाचा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून सर्वांच्या स्मरणात राहील असाच साजरा करावा हीच गणेशभक्तांकडून अपेक्षा

राज्य शासनाच्यावतीने या वर्षीपासून महाराष्ट्रातील #गणेशोत्सव 'महाराष्ट्राचा राज्य उत्सव' म्हणून साजरा करण्यात येत आहे. या राज्य उत्सवाअंतर्गत होणारी 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५' च्या अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेस २६ ऑगस्ट २०२५ पर्यंत #मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. स्पर्धेचे अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून ऑनलाईन पोर्टलद्वारे ते स्वीकारले जाणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन मंत्री ॲड. शेलार यांनी केले आहे. #महागणेशोत्सव #गणेशोत्सव२०२५ #राज्यमहोत्सव #महाराष्ट्र #Ganeshotsav #Ganeshotsav2025

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाज कल्याण अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

मुंबई, दि. २१ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी. शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे, असा दृष्टीकोन बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी (गट–ब) पदावर निवड झालेल्या २२ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, बार्टीचे महासंचालक सुनील वारे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सामाजिक न्याय विभाग हा समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणारा महत्त्वाचा विभाग आहे. समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करण्याची संधी या विभागात काम करताना मिळते. समाजातील सर्व घटक जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाहीत तोपर्यंत आपण सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. आपण सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून समाजातील शेवटच्या घटकाच्या आयुष्यात परिवर्तन घडविण्याचे कार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, शासकीय सेवेत आल्यामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. जनतेप्रती प्रामाणिक राहून जनतेची सेवा करण्याचे कार्य आपल्या हातून होणार आहे. या संधीचे आपण सोने करावे, असे आवाहनही श्री. शिरसाट यांनी यावेळी केले.

बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

नव्या काळातील बदल स्वीकारणारी पिढी ‘एमकेसीएल’ने घडवावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम

पुणे, दि. २० : कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेत समाजात होणारे नवे बदल स्वीकारणारी आणि त्यांना सक्षमपणे सामोरे जाणारी पिढी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने घडवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमकेसीएल’च्या नावीन्यपूर्ण आणि विकासाभिमूख उपक्रमांत राज्य शासनही अग्रेसर राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बाणेर येथील बंटारा भवन येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, ‘एमकेसीएल’चे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, संस्थापक पद्मभूषण डॉ.विजय भटकर, डॉ.विवेक सावंत, ‘एमकेसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज कृत्रिम बुद्धीमत्तेचे मोठे आव्हान आपल्यासमोर असतांना हे ज्ञान शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. डेटा हा जगातील संपत्तीचा भाग झाला आहे. या परिस्थितीत नवी मूल्ये आणि आव्हाने ओळखून पुढे जावे लागेल. क्वांटम कम्युटींग, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सेमीकॉन या तीन क्षेत्रात उत्तम मनुष्यबळ निर्माण करून नव्या लाटेत आपल्याला पुढे जाता येईल. महाराष्ट्र हे देशाचे डेटा सेंटर कॅपीटल आहे. देशातील ६० टक्के डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्राकडे आहे, या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रयत्न ‘एमकेसीएल’ने करायला हवे. राज्य शासन त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात सहकार्य करेल. माहिती तंत्रज्ञान लाटेप्रमाणे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या काळात आपल्याला पुढे रहावे लागेल. रोजगाराचे स्वरुप बदलत असतांना नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था उभी केली तर राज्य शासन त्याला निश्चितपणे सहकार्य करेल. ‘एमकेसीएल’चे विविध उपक्रम समाजासाठी आणि शासनासाठी उपयुक्त ठरले आहेत. ‘एमकेसीएल’ने विकसित केलेल्या नव्या संकेतस्थळावर ५० हजार पुस्तके वाचता येणार आहेत. ‘एमकेसीएल’च्या विविध प्रकल्पामुळे प्रशासनात पारदर्शकता आणण्यासोबत कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे. गेल्या २५ वर्षात उत्तम प्रकारचे बदल ‘एमकेसीएल’ने घडवून आणले आहेत, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. कुठल्याही समाजजीवनात नेहमी आव्हाने येत असतात आणि त्यावर उत्तरे शोधणाऱ्या व्यक्ती-संस्था उभ्या राहतात. जगात इंटरनेटची लाट आली असतांना डिजीटल विषमतेसंदर्भातील समाजजीवनापुढच्या प्रश्नाला उत्तर शोधण्यासोबत ते सर्वांपर्यंत पोहोचविणारी व्यवस्था उभी करण्याचे कार्य महाराष्ट्र ज्ञान मंडळाने केले. समाजातील एक विशिष्ट वर्गाला पुढे आणण्यासाठी केवळ लाभाचा विचार न करता दीर्घकालीन लाभ लक्षात घेऊन ‘एमकेसीएल’ने जबाबदारीने उत्तम प्रकारचे कार्य केले. राज्यात साडेसहा हजार उद्योजकांचे जाळे आणि कोणत्याही क्षणी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था या माध्यमातून उभी राहिली. सामान्यातल्या सामान्य माणसाला आपण या व्यवस्थेत आणू शकलो, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी ‘एमकेसीएल’च्या कार्याचे कौतुक केले. राज्यातील जनतेचे जीवन ज्ञानसमृद्ध करण्यात ‘एमकेसीएल’ची भूमिका महत्त्वाची - उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने गेल्या २५ वर्षात जगभरात ज्ञानाचा प्रकाश पसरविण्याचे कार्य अखंडपणे केले. संस्थेने संगणक साक्षरतेपासून सुरूवात करून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत संगणकीय तंत्रज्ञान पोहोचविले. डिजीटल युगात ग्रामीण भागात नवे तंत्रज्ञान पोहोचविण्याचे कार्य संस्थेने केले. जगात कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे विविध क्षेत्रात वेगाने बदल घडत असतांना बदलत्या तंत्रज्ञान युगासाठी तरुण पिढीला सक्षम बनविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे ‘एमकेसीएल’ आणि माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे तंत्रज्ञान संशोधन संस्था उभारण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, तंत्रज्ञान युगात राज्यातील विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याची गरज आहे. आपल्या लोकसंख्येचे रुपांतर मानवी भांडवलात केले तरच देशाला प्रगती करता येईल. ज्ञान, कौशल्य, नवनिर्मिती आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधण्याची गरज आहे. ‘एमकेसीएल’ने यासाठी पुढाकार घेऊन नवीन डिजीटल उत्पादने, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि समाजाभिमुख उपक्रम आणण्याची हीच योग्य वेळ आहे. संस्थेने या संदर्भात शासनाला उपयुक्त सूचना कराव्यात, त्यासाठी सर्व सहकार्य शासनामार्फत करण्यात येईल. आगामी काळ कृत्रिम बुद्धीमत्तेचा असल्याने शासनाने कृषी क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. नवी मुंबईत अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता शहर स्थापित करण्यात येणार आहे. नव्या पिढीला उत्तम शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी पाच परदेशी नामवंत विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. ‘एमकेसीएल’ने अधिक व्यापक दृष्टीकोन ठेवून कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, ब्लॉकचेन अशा नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील जनतेचे जीवन सुलभ, समृद्ध आणि ज्ञानसमृद्ध करण्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘एमकेसीएल’ प्रत्येक जबाबदारीला न्याय देईल आणि महाराष्ट्राच्या ज्ञानयात्रेतील डिजीटल प्रगतीत महत्त्वाचा दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था उभारण्यात येईल - माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ शासनासाठी अभिमानास्पद असून ज्ञान आणि कौशल्याला ‘एमकेसीएल’ महत्त्व देत असल्याने ही ज्ञानमार्गातील चळवळ झाली आहे. २ कोटी प्रशिक्षणार्थींना संस्थेने माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले आहे. जगात प्रगती करतांना मराठी भाषेसोबत तंत्रज्ञानाचे शस्त्र आवश्यक आहे हे ‘एमकेसीएल’ने ओळखले आणि डिजीटल साक्षरतेचा प्रसार केला. ६ हजारावर केंद्र सुरू करून कृत्रिम बुद्धीमत्तेचा समावेशही प्रशिक्षणात केला. डिजीटल साक्षरतेसंदर्भात सर्व नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देण्याचे महान कार्य एमकेसीएलने २५ वर्षात केले आहे. ई-गव्हर्नन्सकडून एआय गव्हर्नन्सकडे वळतांना ‘एमकेसीएल’चे सहकार्य आणि सहभाग अपेक्षित आहे. विकसीत महाराष्ट्र घडविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था उभारण्यात ‘एमकेसीएल’बरोबर माहिती तंत्रज्ञान विभाग कार्य करेल आणि त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कृत्रिम बुद्धीमत्ता सक्षम ग्रामीण युवक तयार करा - डॉ.अनिल काकोडकर डॉ.अनिल काकोडकर म्हणाले, ज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी उलाढाल होत असतांना व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून देखील समाज परिवर्तनाचे कार्य करणे शक्य आहे हे महाराष्ट्र ज्ञान मंडळाने दाखवून दिले. देशात आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक प्रगती घडवून आणण्यासाठी ज्ञानक्षेत्रात खूप काही करण्यास वाव आहे. येत्या काळात विकसीत राष्ट्र म्हणून पुढे येण्यासाठी सामरिक आणि आर्थिक शक्तीसोबत तात्विक शक्ती मिळणे आवश्यक आहे आणि हे ज्ञानाच्या माध्यमातून शक्य आहे. ‘एमकेसीएल’चे हेच उद्दीष्ट असायला हवे. विविध प्रकारच्या क्षमता असणाऱ्या व्यक्तींच्या परस्पर सहकार्याने अधिक समृद्ध समाज निर्माण करू शकू. जगभरात संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे. जगभरात उन्नत तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करणे गरजेचे आहे. उद्योग आणि संशोधनाचा समन्वय साधण्यासाठी ‘एमकेसीएल’ने प्रयत्न केल्यास देशाला आवश्यक कार्य करणे शक्य होईल. त्यासोबतच डिजीटल ज्ञानावर आधारित विषमता कमी करण्यासाठी ग्रामीण भागात काम करणे सर्वात प्रभावी उपाय आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता सक्षम ग्रामीण युवक तयार केल्यास ही विषमता लवकर दूर होऊन आर्थिक प्रगतीला गती मिळेल. हे उद्दिष्ट साध्य करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन डॉ.काकोडकर यांनी केले. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात ‘एमकेसीएल’चे मुख्य मार्गदर्शक डॉ.विवेक सावंत यांनी ‘एमकेसीएल’च्या वाटचालीची माहिती दिली. ६ हजार ३०० उद्योजकांनी समाज परिवर्तनाच्या उद्दिष्टाने एकत्रितरित्या कार्य करून ‘एमकेसीलएल’चे काम पुढे नेले आहे. ग्रीन कॉलर जॉबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याने त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. एमकेसीएलने गेल्या २४ वर्षात सेवेतील आनंद घेतला, असे त्यांनी सांगितले. मराठी साहित्याबाबत अद्ययावत माहिती डिजीटलस्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी ‘एमकेसीएल’तर्फे तयार करण्यात आलेल्या ‘मराठी साहित्यसृष्टी’ या संकेतस्थळाचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ‘प्रांजळाचे आरसे’ या पुस्तकाचे डॉ.काकोडकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ई-पुस्तकांचे प्रकाशन महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवसाच्या सकाळच्या सत्रातील कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘हायब्रिड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन इकोसिस्टीम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘युनिफाईड क्रेडीट इन्टरफेस’ या ॲपचे लोकार्पणही श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्याने विविध अभ्यासक्रमातून मिळविलेले क्रेडीट त्याच्या पदवीत रुपांतरीत करण्यात सुलभता येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या डिजीटल साक्षरतेतील मोठी क्रांती एमकेसीएलने केली आहे. डिजीटल ज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘एमकेसीएल’ने नव्या ॲपची माहिती सोप्या सुलभ भाषेत तयार करावी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. डिजीटल ज्ञानाच्या क्षेत्रात नवे संशोधन करून देशाला पुढे नेण्यात ‘एमकेसीएल’ने योगदान द्यावे. समाज साक्षर होत असतांना डिजीटल निरक्षरता दूर करण्यासाठी ‘एमकेसीएल’ने मोबाईल संगणक प्रयोगशाळेसह विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यातील ९० टक्केपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे क्रेडीट अकाऊंट सुरू करण्यात आले आहे. विविध अभ्यासक्रमाचे क्रेडीट्स विद्यार्थ्यांना मिळणार असून त्या विषयाचे पुढील शिक्षण घेतांना ते उपयोगात येणार आहे. जागतिक स्तरावरील नामांकीत विद्यापीठातून शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी राज्य शासनाने पाच विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत, असेही श्री.पाटील म्हणाले.

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्तालयात ‘सद्‌भावना दिवस’प्रतिज्ञा

अमरावती, दि. 20 : दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘सद्भावना दिवस’ प्रतिज्ञा दिली. "जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडवण्याची" प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली. दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात येते. यावेळी अपर आयुक्त अजय लहाने, सुरज वाघमारे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेल्या १२ गडकिल्ल्यांवरील 'लोकराज्य'च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, छगन भुजबळ, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय राठोड, शंभूराज देसाई, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, दादाजी भुसे, दत्तात्रय भरणे आदी सदस्यांसह राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते. #युनेस्को #WorldHeritage #लोकराज्य

महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित

मुंबई, दि. 19 : महाराष्ट्र "डेटा सेंटर कॅपिटल" आणि "सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल" म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रांत येत असून उत्पादन क्षेत्रातही मोठी क्रांती घडणार आहे. यूकेसोबत झालेल्या रणनीतिक करारामुळे नवे दरवाजे उघडले असून भारतात अधिक गुंतवणूक होत आहे. हे गुंतवणूकदारांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे द्योतक आहे. आज विविध गुंतवणुकींसाठी महत्त्वपूर्ण असे आठ सामंजस्य करार (MoUs) आणि दोन रणनीतिक करार करण्यात आले असून, त्यातून राज्यात तब्बल 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन 28 हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज मंत्रालयातील समिती कक्षात 10 सामंजस्य करारांचे आदानप्रदान करण्यात आले. त्यावेळी ते गुंतवणूकदारांसमोर बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेशकुमार, उद्योग सचिव डॉ.पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू, विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह तसेच विविध क्षेत्रातील कंपन्यांचे गुंतवणूकदार उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, गुंतवणूकदारांनी अतिशय ठाम आणि सकारात्मक बांधिलकी दाखवली आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक सुरळीत होण्यासाठी शासनाची संपूर्ण टीम सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्यासोबत काम करेल. याशिवाय हायपरलूप प्रकल्पालाही गती मिळत आता आयआयटी मुंबई व आयआयटी मद्रास यांच्यामुळे प्रकल्पाला गती मिळत आहे. लॉजिस्टिक, वाहतूक आणि मोबिलिटी क्षेत्रात राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात हा प्रकल्प आमूलाग्र बदल घडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. *मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेले 8 सामंजस्य करार आणि 2 रणनीतिक करार* : * सोलर पॅनेल निर्मितीसाठी ज्युपिटर इंटरनॅशनल लि. या कंपनीसोबत 10900 कोटी रूपयांची गुंतवणूक करार झाला असून यातून 8308 रोजगार निर्मिती होणार आहे. * रोचक सिस्टिम्स प्रा.लि. या कंपनीसोबत डेटा सेंटर करिता 2508 कोटी रूपयांचा करार. 1 हजार रोजगार निर्मिती. * रोव्हिसन टेक हब प्रा.लि. या कंपनीसोबत डेटा सेंटर या सेक्टरकरिता 2564 कोटी रूपयांची गुंतवणूक करार. 1100 रोजगार निर्मिती. * वॉव आयर्न ॲण्ड स्टिल प्रा.लि. यासाठी पोलाद उद्योगाकरिता 4300 कोटी रूपयांचा करार. 1500 रोजगार निर्मिती. * वेबमिंट डिजिटल प्रा.लि. या कंपनीसोबत डेटा सेंटरकरिता 4846 कोटी रूपयांचा गुंतवणूक करार. 2050 रोजगार निर्मिती. * औद्योगिक उपकरणे क्षेत्राकरिता ॲटलास्ट कॉपको या कंपनीसोबत 575 कोटी रूपयांचा करार. 3400 रोजगार निर्मिती. * हरित उर्जा क्षेत्रात एलएनके ग्रीन एनर्जी या कंपनीसोबत 4700 कोटी रूपयांचा गुंतवणूक करार. 2500 रोजगार निर्मिती. * डेटा सेंटर, लॉजिस्टिक सेंटर रिअल इस्टेट या क्षेत्राकरिता प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट लि.या कंपनीसोबत 12500 कोटी रूपयांचा गुंतवणूक करार. 8700 रोजगार निर्मिती. याशिवाय, ग्लोबल इंडिया बिझिनेस कॉरिडॉर तर्फे महाराष्ट्रातील युके व युरोपमधील गुंतवणूक आकर्षिक करण्यासाठी सहकार्य करण्याचा सामंजस्य करार आणि टीयूटीआर हायपरलूम प्रा.लि. कंपनीकडून जेएनपीटी व वाढवण बंदरावर अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासंदर्भात करार करण्यात आला आहे.

सोमवार, १८ ऑगस्ट, २०२५

#मुख्यमंत्रीसहाय्यतानिधी च्या मदतीतून वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात राहणाऱ्या सात वर्षीय देवांशी रवींद्र गावंडे हिच्यावर नुकतीच यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही महागडी शस्त्रक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने पार पडल्याचे समाधान मुलीच्या पालकांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून प्रत्येक गरजू, गरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. देवांशी त्याचेच एक उदाहरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कक्ष काम करत असून राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी कक्ष तत्पर आहे. या कक्षाचा फायदा सामान्य रुग्णांना मोठ्या प्रमाणावर होत आहे — रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुंबई

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष हा आधार ठरत आहे. अमरावती विभागात मागील सात महिन्यांमध्ये तब्बल १,१८७ रुग्णांना १० कोटी ६१ लाख ११ हजार रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून प्रदान करण्यात आली आहे. #मुख्यमंत्रीसहाय्यतानिधी

गोड्या पाण्यातील मत्स्योद्योगाचे यवतमाळ जिल्हा आदर्श मॉडेल तयार करा - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १८ : मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजना एकत्रित करून यवतमाळ जिल्ह्यात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाचे आदर्श मॉडेल उभारण्याचा आराखडा तयार करावा असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. यवतमाळ जिल्ह्यातील मत्स्य संवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी पायाभूत सुविधा उभारण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री राणे बोलत होते. बैठकीला माजी आमदार मदन येरावार, आयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्याचे आदर्श मॉडेल तयार करून ते राज्यात सर्वत्र राबवण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश देऊन मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यात मत्स्योद्योग विकासासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात याव्यात. मच्छीमारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

गोल्डमन सॅक्सच्या नव्या मुंबई कार्यालयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 18 : मुंबई महानगरक्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत आहे. ही तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक विकासाचा नवा अध्याय असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वरळी येथे गोल्डमन सॅक्स या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकेच्या नव्या, विस्तारित मुंबई कार्यालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी गुंतवणूकदारांशी चर्चा करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गोल्डमन सॅक्ससारख्या जागतिक वित्तसंस्थेचे नवे कार्यालय महाराष्ट्रात उघडले जाणे ही राज्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. यामुळे महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ, भक्कम बाजारपेठा आणि गुंतवणूक-अनुकूल वातावरणाची पुष्टी होते. ही घटना महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील नेतृत्वाला अधोरेखित करणारी आहे. महाराष्ट्र शासन विकासासाठी कटिबद्ध असून, खासगी क्षेत्रासोबत भागीदारीतून ‘तिसरी मुंबई’ घडवण्यासाठी कार्यरत आहे. तिसऱ्या मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची केंद्रे उभारण्यात येत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. वैद्यकीय महाविद्यालय उभारली जाणार असून या ठिकाणी इनोवेशन हब होणार आहे. त्यामध्ये संशोधनासाठीच्या सर्व सुविधा असतील. तसेच क्वांटम कम्प्युटिंग क्षेत्रातील संशोधन व ‘एआय’ आधारीत व्यवस्था असेल. तिसऱ्या मुंबईची सध्याच्या मुंबईसोबत कनेक्टिव्हिटी उत्तम असेल. कोस्टल रोड, अटल सेतू सोबतच सध्या काम सुरू असलेला वरळी - शिवडी लिंक रोड असेल. मुंबईच्या विकासाला आणखी गती देण्याचे काम ही तिसरी मुंबई करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या क्षेत्राच्या विकासामध्ये खासगी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. खासगी आणि सरकारी भागीदारीतूनच चांगला विकास होतो. येथे येणाऱ्या गुंतवणूकदारांना लागणाऱ्या सर्व मंजुऱ्या देण्याचे काम शासनस्तरावरून जलद पूर्ण करण्यात येईल. महाराष्ट्र गुंतवणूक स्नेही राज्य आहे. इज ऑफ ड्यूइंग बिसनेससाठी सध्या काम सुरू आहे. गुंतवणूकदारण कोणत्याही अडचणी येणार नाहीत यासाठी आम्ही काम करत आहोत. कोणतीही अडचण आल्यास ती तत्परतेने सोडवण्यात येत आहे. त्यामुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासात गुंतवणूकदारांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोल्डमन सॅक्सचे नव्या कार्यालयासाठी अभिनंदन केले. गोल्डमन सॅक्सचे अध्यक्ष केविन स्नेडर म्हणाले की, भारतीय बाजारपेठेतील संधी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. गोल्डमन सॅक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चॅटर्जी म्हणाले की, हे नवे कार्यालय आमच्या भारतातील प्रवासातील एक मैलाचा दगड आहे. या नव्या जागेच्या रचनेत सहकार्य, नवोपक्रम आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणावर भर देण्यात आला आहे. या कार्यालयाची थोडक्यात माहिती . या कार्यालयात जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत, जसे की – अत्याधुनिक कॉन्फरन्स सेंटर झूम-सक्षम मीटिंग रूम्स माहिती सहयोग जागा (information collaboration space) फोकस रूम्स आणि टीम रूम्स उंची समायोजित करता येणारे डेस्क बहुउद्देशीय जागा आणि ऑन-साइट केटरिंगसह कॅफे गोल्डमन सॅक्सची भारतातली कामगिरी : २०२१ पासून Dealogic नुसार भारतात गुंतवणूक बँक म्हणून मान्यता. २०२४ पासून आयपीओ आणि ब्लॉक ट्रेड्सद्वारे $10 अब्जांहून अधिक निधी उभारणारे प्रकल्प पूर्ण. यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या आयपीओ आणि ब्लॉक ट्रेडचा समावेश. २००६ पासून भारतात $8.5 अब्जांहून अधिक भांडवली गुंतवणूक. गोल्डमन सॅक्सने भारतात आपली सेवा १९८० च्या दशकात सुरू केली होती. २००६ मध्ये मुंबईत पूर्ण मालकीची उपस्थिती प्रस्थापित केली. सध्या कंपनी भारतात गुंतवणूक बँकिंग, इक्विटी विक्री आणि ट्रेडिंग, फिक्स्ड इनकम सिक्युरिटीज, अ‍ॅसेट मॅनेजमेंट आणि संशोधन अशा विविध सेवा पुरवते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अमरावती विभागातील १,१८७ रुग्णांना १०.६१ कोटींची मदत

अमरावती, दि. 18 : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष हा आधार ठरत आहे. अमरावती विभागात मागील सात महिन्यांमध्ये तब्बल १,१८७ रुग्णांना १० कोटी ६१ लाख ११ हजार रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून प्रदान करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. प्रथम रुग्णांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचतो, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. अमरावती विभागातील मदतीचा आढावा (१ जानेवारी ते ३१ जुलै २०२५) जिल्हा रुग्णसंख्या मदत रक्कम बुलढाणा 443 3,67,89,000 अकोला 265 2,36,44,000 अमरावती 231 2,21,45,000 वाशीम 139 1,35,80,000 यवतमाळ 109 99,53,000 या आजारांसाठी मिळते मदत • कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६) • हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण • कर्करोग (शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन) • रस्ते अपघात • बालकांच्या शस्त्रक्रिया • हिप व गुडघा रिप्लेसमेंट • मेंदूचे आजार, डायलिसिस, अस्थिबंधन • बर्न/विद्युत अपघातग्रस्त रुग्ण • नवजात शिशुंचे आजार इत्यादी २० प्रकारच्या गंभीर आजारांसाठी मदत प्रदान केली जाते. आवश्यक कागदपत्रे • रुग्णाचे आधार कार्ड व रेशन कार्ड • रुग्ण दाखल असल्यास जिओ टॅग फोटो (अनिवार्य) • तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला (१.६० लाखांपेक्षा कमी) • वैद्यकीय रिपोर्ट व खर्चाचे प्रमाणपत्र • एफआयआर (अपघातग्रस्तांसाठी) • ZTCC पावती (अवयव प्रत्यारोपणासाठी) सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात पुढील ईमेलवर पाठवा: aao.cmrf-mh@gov.in अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक : 9321 103 103 वर संपर्क साधावा. “संपूर्ण राज्यातील गरजू, गरीब रूग्णांना वेळेत मदत पोहचवणे हे कक्षाचे उद्दीष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्ष सुरू करण्यात आले. त्यामुळे लाभार्थी रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कक्षात केलेल्या विविध सकारात्मक बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत आणि खऱ्या गरजूंपर्यंत निधी पोहोचत आहे.” — रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महाराष्ट्र

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकाराने चिमुकल्या देवांशीवर यशस्वी शस्त्रक्रिया

वाशीम, दि. 18 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या मदतीतून वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात राहणाऱ्या सात वर्षीय देवांशी रवींद्र गावंडे हिच्यावर नुकतीच यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही महागडी शस्त्रक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने पार पडल्याचे समाधान मुलीच्या पालकांनी व्यक्त केले. रवींद्र गावंडे (रा. वरूड बु.) यांच्या मुलीला जानेवारी २०२५ मध्ये तीव्र पोटदुखीचा त्रास होत होता. मुलीची अकोला आणि त्यानंतर नागपूर येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी तिचे यकृत गंभीर स्वरूपात बाधित झाल्याचे निदान केले. तसेच तिचे यकृत तातडीने प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. शस्त्रक्रियेसाठी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला. भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या देवांशीच्या वडिलांसमोर एवढी मोठी रक्कम गोळा करण्याचा पेच निर्माण झाला होता. दरम्यान, मुलीच्या वडिलांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती मिळताच या कक्षाकडे त्यांनी मदत मागितली. याशिवाय सोशल मीडियावर मदतीकरिता आवाहन केले. कक्षाच्या पुढाकाराने देवांशीवर पुढील उपचार मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये सुरू झाले. या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, टाटा ट्रस्ट, सामाजिक संस्था तसेच गावकऱ्यांच्या वर्गणीतून आर्थिक मदत उपलब्ध झाली. देवांशीला तिची आई मीनाक्षी गावंडे यांनी यकृताचा भाग दिला. त्यातून मुलीवर ७ जुलै २०२५ रोजी यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. आता देवांशीची प्रकृती स्थिर असून तिच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. नुकताच ३ ऑगस्ट रोजी पालकांनी तिचा वाढदिवस साजरा केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्टच्या मदतीमुळेच आपल्या मुलीला पुनर्जीवन मिळाल्याचे समाधान देवांशीच्या पालकांनी व्यक्त केले. “मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून प्रत्येक गरजू, गरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. देवांशी त्याचेच एक उदाहरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कक्ष काम करत असून राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी कक्ष तत्पर आहे. या कक्षाचा फायदा सामान्य रुग्णांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.” — रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुंबई