शुक्रवार, २२ मार्च, २०१९

महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 31 मार्च पर्यंत सादर करावे


महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज
31 मार्च पर्यंत सादर करावे

अमरावती, दि. 22  : सन 2018-19 मध्ये शिष्यवृत्ती योजनेचा लाभ अदा करण्यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले आहे. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी पोर्टलवरील अनु जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या अर्जांना दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज मंजूर करता यावेत यासाठी पोर्टलवर ज्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अथवा विद्यार्थ्यांना हप्त्याचा लाभ अदा करण्यात आलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी महाविद्यालय स्तरावर दुसऱ्या हप्त्याचे टॅब बटन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
 हे अर्ज मंजूरीसाठी महाविद्यालय स्तरावर 31 मार्चच्या आधी सहाय्यक आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात याव्यात.
दिनांक 31 मार्च 2019 च्या आधी हे ऑनलाईन अर्ज आयुक्तयालयास सादर करावे असे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, अमरावती यांनी कळविले आहे.
000000


बुधवार, २० मार्च, २०१९

जिल्‍ह्यात जमावबंदी आदेश लागू


जिल्‍ह्यात जमावबंदी आदेश लागू

अमरावती, दि. 20  : लोकसभा निवडणूक 2019 अनुषंगाने सर्वत्र आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने राजकीय पक्षातर्फे प्रचाराकरिता सभा व स्थानिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच दि. 21 मार्च 2019 रोजी धुलीवंदन मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
यादरम्यान जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित रहावी, यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) 3 लागू करण्यात आले आहे. या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 16 ते 30 मार्च 2019 पर्यंत कलम 37 (1) व (3) लागू करण्यात येत आहे. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तिंविरुध्द कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असे अपर  जिल्हा दंडाधिकारी यांनी कळविले आहे.
000000






  


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सैनिकी शाळेत प्रवेशासाठी 24 एप्रिलला पूर्व परिक्षा



नुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सैनिकी शाळेत
प्रवेशासाठी 24 एप्रिलला पूर्व परिक्षा
   अमरावती, दि. 20 : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सैनिकी शाळेत पाचव्या वर्गात प्रवेशासाठी 24 एप्रिलला पूर्व परिक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सैनिकी शाळेत पाचवीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठीचे अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालय आणि सैनिकी शाळेतून विनामुल्य वाटप होईल. इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब न करता कार्यालय आणि शाळेशी प्रत्यक्ष संपर्क साधून प्रवेश अर्ज प्राप्त करावा. प्रवेश अर्ज प्राप्त करण्याची अंतिम मुदत 24 एप्रिल 2019 आहे.
अकेाला जिल्ह्यामध्ये नॅशनल मिलीटरी स्कूल गायगाव, ता. बाळापूर येथे 45         विद्यार्थी क्षमता, वाशीम जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळा, सुपखेला,        ता. वाशिम येथे 45 विद्यार्थी क्षमता, बुलडाणा जिल्ह्यातील राजीव गांधी मिलीटरी स्कूल, कोलखेड, ता. बुलडाणा येथे 90 विद्यार्थी क्षमता, राजमाता जिजाऊ मुलींची            सैनिकी  शाळा, चांघई, ता. चिखली येथे 90 विद्यार्थी क्षमता या सैनिकी शाळांमध्ये दिनांक  24 एप्रिल 2019 रोजी 11 ते 1 वाजपर्यंत पूर्व परिक्षेचे आयोजन केले आहे.
पाचवी मध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, विद्यार्थ्यांचे नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 1 लाख इतकी असावी. विधवा, घटस्फोट, निराधार, परितक्त्या यांच्या मुला आणि मुलींची प्राधान्याने निवड करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय-निमशासकीय नोकरदार नसावेत, अर्जासोबत विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे. खोटी माहिती सादर केल्याचे प्रवेश रद्द करण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.
 000000

मंगळवार, १९ मार्च, २०१९

‘पर्यावरण स्नेही’ होळीसाठी सामाजिक वनीकरणाचे आवाहन


‘पर्यावरण स्नेही’ होळीसाठी सामाजिक वनीकरणाचे आवाहन


   अमरावती, दि. 19 : होळी सणाच्या निमित्ताने करण्यात येणारी वृक्षतोड थांबावी, पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी एक गाव एक होळी करावी. गावातील होळींची संख्या कमी करावी होळीच्या सणाचा आनंद लुटावा असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. होळीसाठी लाकुड, व गोवऱ्यांचा उपयोग न करता कचरा जाळावा. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करतांना रसायनांपासून बनविलेल्या रंगाचा उपयोग करुन नये. त्याएवेजी विविध फळे, व फुलांचा रंग बनविण्यासाठी वापर करावा.  रासायनिक पदार्थंनी बनविलेल्या रंगामुळे मानवी त्वचा, व अवयव विविध आजारांनी बाधित होवू शकतात. काळा रंग ऑक्साईड पासून बनलेला असतो, त्यामुळे मुत्रसंस्थेचे विकार, हिरव्या रंगातील कॉपर सल्फेटमुळे डोळ्यांचे आजार, चांदीसारख्या रंगातील ॲल्युमिनियम ब्रोमाईड मुळे कर्करोग, निळ्या रंगातील पार्शियन निळीमुळे त्वचेचे आजार व लाल रंगातील मर्क्युरी सल्फाईटमुळे त्वचेचा कर्करोग होवू शकतो. निसर्गामध्ये पर्यावरण संतुलनाचा महत्वाच्या कार्यात वृक्षांचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे. नागरिकांनी होळी निमित्ताने वृक्षतोड न करता याच वृक्षाचे पूजन करावे व निकोप आरोग्यासाठी धुळवडीला नैसर्गिक रंगाचा वापर करावा असा संदेश सामाजिक वनीकरण विभागाने दिला आहे.

 000000


शनिवार, १६ मार्च, २०१९

नवीन वाहनांच्या नोंदणीची खात्री करावी

नवीन वाहनांच्या नोंदणीची खात्री करावी
Ø प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

   अमरावती, दि. 16 : नवीन वाहनांची नोंदणी करताना काही नागरिक  फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नवीन वाहनांच्या नोंदणीच्या वेळी नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच वाहनांची नोंदणी ऑनलाईन तपासून पहावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
   परिवहन विभागाचे कामकाज गेल्या तीन वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामध्ये नवीन वाहनाची नोंदणी करणे, अनुज्ञप्ती काढणे, जुन्या वाहनांचा अभिलेख संगणकावर घेणे, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करणे आदी कामकाज संगणकीकृत करण्यात आले आहे. वाहनांची नोंदणी झाल्यावर नोंदणी प्रमाणपत्र आणि परवाना टपालाद्वारे वाहनधारकास पाठविण्यात येतो.
       या कार्यालयाच्या असे निदर्शनास आले की, एका व्यक्तीने नवीन वाहनधारकांकडून नोंदणी करण्याच्या कामासाठी शासकीय शुल्क आणि मोटार वाहनकराची रक्कम परस्पर घेऊन ती कार्यालयात भरली नाही. तसेच वाहनधारकास खोटा वाहन क्रमांक आणि खोटी कागदपत्रे दिली आहेत.
     त्यामुळे मागील दोन-तीन वर्षांत नवीन वाहन विकत घेतलेल्या वाहनधारकांनी आपल्या वाहनांची रितसर नोंदणी झाली असल्याची खात्री कार्यालयाची वेबसाईट parivahan.gov.in/vahan या वेबसाईटवर किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात करावी. वाहनांची नोंदणी रितसर झालेली नसल्यास वाहनाच्या खरेदीची कागदपत्रे सादर करुन मोटार वाहनकर व शुल्क भरुन नोंदणी करावी.
    नोंदणी केलेली नसलेली वाहने रस्त्यांवर चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा वाहनांची तपासणी मोहिम परिवहन विभागातर्फे राबविण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

 000000

बुधवार, १३ मार्च, २०१९

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन


महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण
यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

अमरावती, दि. 12 : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला आज विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर, महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, तहसिलदार वैशाली पाथरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
 000000

अमरावती विभागात 90 लाखांवर मतदार


अमरावती विभागात 90 लाखांवर मतदार
अमरावती, दि. 13 : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील मतदारांची संख्या 90 लाख 38 हजार 747 असून यात 46 लाख 94 हजार 980 पुरुष तर 43 लाख 40 हजार 468 महिला मतदारांचा समावेश आहे.
विभागात अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ-वाशिम असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. विभागातील लोकसभा मतदारसंघ आणि त्यात समाविष्ट विधानसभा मतदारसंघ पुढीलप्रमाणे आहेत.
अमरावती (अ. जा. राखीव) : अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, मेळघाट व अचलपूर.
अकोला : अकोट, बाळापूर, अकोला-पश्चिम, अकोला-पूर्व, मुर्तिजापूर, रिसोड.
यवतमाळ-वाशिम : राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसद, कारंजा, वाशिम.
बुलढाणा : बुलढाणा, चिखली, सिंदखेड-राजा, महेकर, खामगाव, जळगाव जामोद.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व धामणगाव (रेल्वे) हे विधानसभा मतदारसंघ शेजारच्या वर्धा लोकसभा मतदारसंघात, यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी हे चंद्रपूर तर उमरखेड हे हिंगोली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा व वाशिम हे यवतमाळ तर रिसोड हे अकोला लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे.
विभागातील  90 लाख 38 हजार 747 मतदारांमध्ये सर्वाधिक मतदार अमरावती जिल्ह्यात 24 लाख सहा हजार 619 इतके आहेत, तर अकोला 15 लाख 58 हजार 544, यवतमाळ 21 लाख 28 हजार 163, बुलडाणा 20 लाख 10 हजार 468, वाशिम 9 लाख 34 हजार 549 अशी जिल्हा निहाय मतदार संख्या आहे.
अमरावती विभागात एकूण 10 हजार 143 मतदान केंद्र असणार आहेत. त्यांची जिल्ह्यानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. अमरावती दोन हजार 607, अकोला एक हजार 751, यवतमाळ दोन हजार 451, बुलडाणा दोन हजार 251, वाशिम एक हजार 43.
विभागात 48 हजार 371 कर्मचारी मतदान केंद्रावर असतील. त्याची जिल्हानिहाय संख्या अशी : अमरावती 13 हजार 476, अकोला सात हजार 4, यवतमाळ 12 हजार 460, बुलडाणा नऊ हजार 904, वाशिम पाच हजार 527.
विभागात 12 हजार 719 मतदान यंत्रे उपलब्ध झाली आहेत. अमरावती 3 हजार 383, अकोला 2 हजार 172, यवतमाळ 3 हजार 116, बुलडाणा 2 हजार 580, वाशिम एक हजार 468 मतदान यंत्रे जिल्हास्तरावर प्राप्त झाली आहेत. या यंत्रांसोबत यंदा व्हीव्हीपॅट यंत्रे उपयोगात आणली जाणार आहेत.
0000000

मंगळवार, १२ मार्च, २०१९

हातमाग विणकरांसाठी विभागीय हातमाग कापड स्पर्धा


हातमाग विणकरांसाठी विभागीय हातमाग कापड स्पर्धा

अमरावती, दि. 12 : सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ठ हातमाग कापड नमुन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी हातमाग विणकारांनी तयार केलेले नमुने दि. 16 मार्च 2019 पर्यत सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विभागीय हातमाग कापड स्पर्धा 2018-19 चे आयोजन नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाचे सभागृह, जुने सचिवालय, सिव्हील लाईन्स्, नागपूर येथे करण्यात आले आहे. अमरावती आणि नागपूर विभागातील सर्व जिल्ह्याचे हातमाग विणकरांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा. यासाठी हातमाग विणकरांनी तयार केलेले नमुने प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या कार्यालयात दि. 16 मार्च 2019 पर्यंत सादर करावे, याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालय किंवा प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, नागपूर यांच्या कार्यालयात 0712-2537927 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, नागपूर तथा सदस्य सचिव, विभागीय हातमाग कापड स्पर्धा यांनी केले आहे.
0000000000


कोषागारे कार्यालये शनिवारी अखेरची देयके स्विकारतील


कोषागारे कार्यालये शनिवारी अखेरची देयके स्विकारतील
Ø  आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 12  : आर्थिक वर्ष रविवारी संपणार असल्यामुळे सर्व कोषागारे मार्च अखेरीची देयके शनिवारी स्विकारून या देयकांचे प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हा कोषागार कार्यालये आणि उपकोषागार कार्यालयात दि. 31 मार्च 2019 रोजी कोणतेही देयक स्विकारल्या जाणार नाहीत. त्यानुषंगाने देयके विहित मुदतीत सादर करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन लेखा व कोषागारे संचालनालयाने केले आहे.
दि. 31 मार्च 2019 रोजी रविवार असल्याने शासकिय कार्यालयांना सुट्टी आहे. या अनुषंगाने आर्थिक वर्षाअखेर निधी अखर्चित राहू नये, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालये आणि उपकोषागार कार्यालये दि. 30 मार्च, 2019 रोजी मार्चअखेरची देयके स्विकारतील. तसेच प्रदानाची कामे पुर्ण करतील. तसेच दि. 30 मार्च, 2019 ही बिम्स (BEAMS) प्रणाली द्वारे प्राधिकारी पत्र (BDS) काढण्यासाठीची अंतिम तारिख असणार आहे, याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी.
चालू आर्थिक वर्षात दि. 1 मार्च 2019 पूर्वी जिल्हा कोषागार कार्यालयाकडून अथवा उपकोषागार कार्यालयाकडून आक्षेपित झालेली देयके दीर्घ काळापासून कोषागारात पुन्हा सादर न केलेली सर्व देयके (उदा. प्रवास भत्ता देयके, आस्थापना विषयक पुरवणी देयके, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देयके, .) आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी दि. 20 मार्च 2019 पर्यंतच जिल्हा कोषागार कार्यालय, उपकोषागार कार्यालयात सादर करावीत. त्यानंतर या प्रकारणांची देयके स्विकारली जाणार नाहीत. केवळ पुरवणी मागण्या (मार्च 2019) व सुधारित अंदाजपत्रकानुसार उपरोक्त बाबींसाठी मंजूर झालेल्या अनुदानाचीच देयके दि. 20 मार्च 2019 नंतर कोषागारास सादर करता येणार आहे.
उपकोषागार कार्यालयात प्राप्त होणारी देयके, या देयकांवर उपकोषागाराकडून करावयाच्या कार्यवाहीस लागणारा अवधी आणि बँकेच्या कामाचा कालावधी पाहता उपकोषागार कार्यालयात दि. 30 मार्च 2019 रोजी सायंकाळी 6 वाजल्यानंतर देयके स्विकृती बंद होणार आहेत. उपकोषागारस्तरावरील आहरण व संवितरण अधिकारी यांच्यातर्फे जिल्हा कोषागारात देयके सादर करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन लेखा व कोषागारे सहसंचालक उ. ना. सोनकांबळे यांनी केले आहे.

शुक्रवार, १ मार्च, २०१९

शासकीय तंत्रनिकेतनचा अठरावा पदविका प्रदान समारंभ


शासकीय तंत्रनिकेतनचा अठरावा पदविका प्रदान समारंभ

विद्यार्थ्यांनी ज्ञान व कौशल्य आत्मसात केल्यावर
उद्योगांसाठी योगदान द्यावे
-         तंत्रशिक्षण सहसंचालक दत्तात्रय जाधव


            अमरावती, दि. 01 :  विद्यार्थ्यांनी पदविका परीक्षा उत्तीर्ण करुन आयुष्यातील महत्वाचा टप्पा पार केलेला असतो. परंतु त्यानंतरच त्याची खरी परीक्षा सुरु होते. उद्योग क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थ्यांनी त्याकडे केवळ कमाईचे साधन म्हणुन न पाहता उद्योगांसाठी आवश्यक असणारे नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, सतत शिकण्याची वृत्ती व समस्यांचे समाधान शोधण्याचे कौशल्य आदी गुण आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यामुळेच त्यांना उद्योग क्षेत्रातील जिवघेण्या स्पर्धेत टिकून राहता येईल. विद्यार्थ्यांनी नोकरीवर अवलंबुन न राहता स्वयं उद्योजक बनून इतरांसाठी रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव यांनी आज केले.
शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे बुधवारी, दि. 27 फेब्रुवारी रोजी पदविका प्रदान समारंभात श्री. जाधव विद्यार्थ्यांना उद्बबोधन करतांना बोलत होते. अमरावती शासकीय तंत्रनिकेतन या स्वायत्त तंत्रशिक्षण संस्थेच्या  18 व्या प्रदान समारंभाचे आयोजन बुधवार दि. 27 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 3 वाजता करण्यात आले. या समारंभात उन्हाळी 2018 व हिवाळी 2018 या परिक्षांमधील अभियांत्रिकी पदविकेच्या विविध विद्याशाखांमधील एकुण 542 विद्यार्थी-विद्यार्थीनींना पदविका प्रदान करण्यात आल्या.
            सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, अमरावती तथा नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय जाधव यांचे अध्यक्षतेक्षाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या पदविका प्रदान समारंभात स्थापत्य अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, अणुविद्युत अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान व प्लॅस्टिक व पॉलीमर अभियांत्रिकी या शाखांच्या एकुण 542 विद्यार्थी-विद्यार्थीनींना मान्यवरांच्या हस्ते पदविका प्रदान करण्यात आल्या.
            दिक्षांत मिरवणुकीचे ज्ञानदंडासह सभागृहात समारंभपुर्वक आगमन झाल्यानंतर प्रमुख कार्यक्रमाची विधिवत सुरुवात झाली. त्यानंतर अध्यक्षांच्या हस्ते सरस्वती पुजन करण्यात आले. संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेन्द्र मोगरे यांनी आपल्‍या प्रास्तविक भाषणातुन संस्थेच्या शैक्षणिक व भौतिक प्रगतीचा आलेख सादर करतांनाच संस्थेतील विविध उपक्रमांबाबत व भविष्यातील योजनांबाबत माहीती दिली. विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतांनाच विद्यार्थ्यांनी स्वत:च्या विकासाबरोबरच देशाच्या व समाजाच्या विकासासाठी जोडुन घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            व्यासपिठावर सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, अमरावती तथा नियामक मंडहाचे अध्यक्ष डॉ. डी. व्ही. जाधव, शासकीय तंत्रनिकेतन, अमरावतीचे प्राचार्य डॉ. राजेन्द्र मोगरे, नियामक मंडळाचे सदस्य सर्वश्री डॉ. जी. आर. शेकापुरे, प्रा. पी. व्ही. सरोदे, डॉ. ए. बी. मराठे, किरण हातगावकर, सुरेश ठाकुर, जे. यु. बोडखे, व्ही. आय. लढ्ढा, संजय बांगर, किरण पातुरकर, डॉ. एस. डब्लयु. मोहोड, शैक्षणिक समन्वयक प्रा. पी. बी. उत्तरवार, परिक्षा नियंत्रक प्रा. एस. जे. गायकवाड, विभागप्रमुख सर्वश्री प्रा. एस. पी. पासेबंद, प्रा. ए. व्ही. उदासी, डॉ. एस. एस. भरतकर, प्रा. आर. पी. प्रांजळे, प्रा. एम. पी. गणोरकर, डॉ. पी. पी. करडे, प्रा. डी. आर. गांवडे, डॉ. एन. जी. कुळकर्णी, डॉ. एस. पी. बाजड, डॉ. आर. एन. काणे व कर्मशाळा अधिक्षक प्रा. व्ही. एस. पारसकर आदी यावेळी उपस्थित होते.
            शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळचे प्राचार्य डॉ. धर्मपाल शिंगाडे यांचेतर्फे त्यांच्या मातोश्री स्व. वंचळाबाई शिंगाडे यांच्या स्मरणार्थ उन्हाळी 2018 परिक्षेमध्ये सर्व विद्या शाखांमधुन प्रथम येणाऱ्या श्री. संकेत वर्धेकर, यंत्र अभियांत्रिकी द्वितीय पाळी यास रोख पारितोषिक रु. 1 हजार 500 रुपये, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक विद्याशाखेतुन गुणानुक्रमे प्रथम व द्वितिीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे अनुक्रमे पंधराशे व एक हजार रुपयाचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
उन्हाळी 2018 परिक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागात : प्रथम पाळी प्रथम क्रमांक तावरे रोहीत प्रकाशराव व द्वितीय क्रमांक देशमुख कपिल अशोकराव, द्वितीय पाळी प्रथम क्रमांक वर्धेकर संकेत व द्वितीय क्रमांक यादगिरे राहुल नंदकिशोर, विद्युत अभियांत्रिकी विभागात : प्रथम क्रमांक चौधरी आकांक्षा मनोज व द्वितीय क्रमांक तायडे शिवम प्रकाशराव, अणुविद्युत अभियांत्रिकी विभागात : प्रथम पाळी प्रथम क्रमांक शेख अल्फीया आसिफ व द्वितीय क्रमांक ढगे राणी सोनाजी, द्वितीय पाळी प्रथम क्रमांक गुल्हाने अनुजा रमेशराव व द्वितीय क्रमांक बोबडे सुजित सुरेन्द्र, संगणक अभियांत्रिकी विभागात : प्रथम क्रमांक ताजी इंशिराह मुरान खान व द्वितीय क्रमांक उपाध्ये हर्षल मनोज व विधाले पियुष सतिष, माहिती तंत्रज्ञान विभागात प्रथम क्रमांक गौर खुशबु संजिवकुमार व शर्मा विप्रा विजय व द्वितीय क्रमांक निचत सृष्टी प्रकाश, प्लॅस्टिक व पॉलीमर अभियांत्रिकी विभागात प्रथम क्रमांक जिभकाटे विशाल रामभाऊे व द्वितीय क्रमांक गायकवाड स्वरुपा प्रल्हाद या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
            कार्यक्रमाचे संचालन प्रा. सी. एन. निकोसे व प्रा. डॉ. श्रीमती सादीया रझा यांनी केले. स्वागत गीत संस्थेतील विद्यार्थ्यीनींनी सादर केले. आभारप्रदर्शन स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. पी. पासेबंद यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेतील अधिकारी, कर्मचारी, पालक व विद्यार्थी विद्यार्थींनी बहुसंख्येने उपस्थित होते. पसायदानानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
0000000

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना


अमरावती विभागातील 82 टक्के
पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती पोर्टलवर


            अमरावती, दि. 01 :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शुभारंभानंतर लाभ वितरणाच्या कार्यवाहीने गती घेतली असून, अमरावती महसूल विभागातील पाचही जिल्ह्यातील 7 हजार 97 गावांच्या एकूण 7 लाख 74 हजार 791 शेतकरी कुटुंबाची माहिती राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. आजमितीस (दि.1 मार्च) माहिती अपलोड करण्याची टक्केवारी 82 टक्के आहे.  
            विभागातील 7 हजार 312 गावांत 16 लाख 98 हजार 397 खातेदार शेतकरी आहेत. योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी महसूल, कृषी व विविध विभाग पात्र शेतकरी कुटुबांची माहिती संकलीत करण्याची कार्यवाही करीत आहे. या गतिमान कार्यवाहीनुसार विभागातील 7 हजार 298 गावातील 9 लाख 42 हजार 961 पात्र शेतकरी कुटुंब संख्येपैकी 7 हजार 97 गावातील 7 लाख 74 हजार 791 शेतकरी कुटुंबाची माहिती राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून याची 82 टक्केवारी आहे.
पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली जिल्हानिहाय संख्या
पात्र लाभार्थी कुटुंबांची पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली संख्या अमरावती जिल्ह्यातील 1 लाख 95 हजार 494, अकोल्यातील 1 लाख 15 हजार 762, यवतमाळमधील 1 लाख 55 हजार 399, बुलडाणा जिल्ह्यातील 1 लाख 99 हजार 123 आणि वाशिम जिल्ह्यातील 1 लाख 9 हजार 13 अशी आहे. 

00000