शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

रब्बी हंगाम 2023 करिता अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना

 

रब्बी हंगाम 2023 करिता

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना

शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळला भेट द्या

अमरावती, दि. 8 :  राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये           शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील      शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. त्यात विभागातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.

वंचित/दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिक स्पर्धांमध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून शासन निर्णयानुसार रब्बी हंगाम २०२३ पासून पिकस्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस एकूण पाच रब्बी पिकांचा पिकस्पर्धेत समावेश आहे.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे, याप्रमाणे पात्रतेचे निकष राहतील.

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा,  जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस  या पीकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख ३१ डिसेंबर, २०२३ आहे.  तालुकास्तर, जिल्हास्तर, व राज्यस्तरावर स्पर्धेअंतर्गत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते निवडण्यात येतील. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी तीनशे रुपये तर आदिवासी गटासाठी १५० रुपये स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क आहे.

 तालुका पातळीवर पहिले बक्षीस पाच हजार रुपये , दुसरे बक्षीस तीन हजार रुपये, तिसरे बक्षीस दोन हजार रुपये राहिल. जिल्हापातळीवर पहिले, दुसरे व तीसरे बक्षीस अनुक्रमे दहा हजार, सात हजार व पाच हजार राहील. तसेच राज्यपातळीवर पहिले, दुसरे व तीसरे बक्षीस अनुक्रमे ५० हजार, ४० हजार व 30 हजार रुपये राहील.

दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत जास्त शेतक-यांनी पिकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. पिकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी, असे आवाहन कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा