विशेष वृत्त :
कर्जमुक्तीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ;
जाणून घ्या लाभ मिळविण्याची प्रक्रिया
• शेतकरी बांधवांना राज्य शासनाकडून आवाहन
अमरावती, दि. ४ : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा, यासाठी शासनाने निश्चित कार्यपद्धती आखली आहे. योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याबरोबरच बँकेतील कर्ज खात्याची माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असे राज्य शासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेबाबत
शासन वेळोवेळी आवश्यक सूचना प्रसिद्ध करीत असून, लाभासाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक
आहे किंवा नाही, याबाबतचे निर्देशही स्वतंत्रपणे दिले जात आहेत. मात्र, लाभ
वितरणाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी संबंधित बँकेकडे असलेली शेतकऱ्यांची
माहिती अद्ययावत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, बँक पासबुक अथवा कर्ज खात्याचा तपशील, पीककर्ज मंजुरीची माहिती किंवा कर्ज खाते क्रमांक, सातबारा उतारा (७/१२), आवश्यकतेनुसार आठ-अ उतारा (८अ), ॲग्रीस्टॅक नोंदणीची माहिती, ई-केवायसी पूर्ण झाल्याची नोंद तसेच बँकेने मागितलेली इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
या योजनेत आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी. तसेच आपल्या आधारशी मोबाईल क्रमांक जोडलेला असल्याची खात्री करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
योजनेची
अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, संबंधित बँका आणि शासनाच्या
यंत्रणांकडून पात्र कर्ज खात्यांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर माहितीची छाननी
करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येईल आणि शासनाच्या निर्देशानुसार
पुढील कार्यवाही केली जाईल.
शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवता शासन, संबंधित बँका, कृषी विभाग आणि महसूल यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे. आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास पात्र शेतकऱ्यांना या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ सहजपणे मिळू शकणार आहे.
पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून
शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीसाठीचा महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. त्यामुळे
प्रत्येक पात्र शेतकऱ्याने आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून, माहिती अद्ययावत करून आणि
शासनाच्या सूचनांचे पालन करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे.
००००
%20(1).jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा