सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

 

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत

आदिवासी लाभार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित  

 

अमरावती, दि. 21 :  धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रांतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजने (न्युक्लिअस बजेट) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी अनुसूचित जमातीच्या नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त कार्यालयात योजनांचे अर्ज नि:शुल्क उपलब्ध असून आदिवासी बांधवांनी संबंधित कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.

त्यानुसार धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर तालुक्यातील लाथार्थ्यांनी धारणी प्रकल्प कार्यालयास अर्ज सादर करावे. नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांनी अपर आयुक्त, आदिवासी विकास अमरावती येथे तसेच मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूरबाजार तालुक्यातील लाभार्थ्यांनी धारणी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोर्शी उपकार्यालयाला योजनेंतर्गत अर्ज सादर करावे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 07226-224217 यावर संपर्क साधावा. योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे :

गट-अ योजनेत आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना तुषार सिंचन संचाचा 85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी शेतकरी समुहांना पिकांच्या व शेतीच्या संरक्षणाकरीता तारजाळी 85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी बचत गटांना ग्रामोद्योग उभारणीकरीता 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे, आदिवासी शेतकऱ्यांना 85 टक्के अनुदानावर टरबुज लागवड करण्याकरीता अर्थसहाय्य करणे आदी योजनांचा समावेश असून त्यानुसार लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावे.

तसेच गट-ब योजनेत आदिवासी युवक-युवतींना मराठी, इंग्रजी टंकलेखनाचे एकत्रित प्रशिक्षण (अनिवासी) देणे, आदिवासी युवक-युवतींना एमएससीआयटीचे प्रशिक्षण (अनिवासी) देणे, आदिवासी महिला गटाच्या सदस्यांना दुग्ध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ बनावण्याचे प्रशिक्षण (निवासी) देणे, आदिवासी युवक- युवतींना स्पर्धा परीक्षापुर्व प्रशिक्षण देणे, आदिवासी बचत गटातील महिलांना टिंबर आणि बांबू कलेचे प्रशिक्षण देणे आदी योजनांचा समावेश त्यानुसार लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावे.

उपरोक्त योजनांच्या लाभाकरीता शासन निर्णयानुसार प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या जेष्ठतेनुसार संगणीकृत यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करुन पात्र, अपात्र अर्जदाराच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येईल, लाभार्थी निवड करतांना प्रथम दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, अपंग, विधवा, परितक्त्या, निराधार महिला आदींना प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनांचा आदिवासी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी सावन कुमार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

0000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा