मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

अमरावती येथे विभागीय कार्यालयांसाठी स्वतंत्र इमारती
-उपमुख्यमंत्री अजित पवार
*पोलिसांच्या वाहनासाठी तरतूद
*निकषानुसार वार्षिक नियोजनचा निधी
*उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या सूचना
अमरावती, दि. 28 : अमरावती येथे विभागीय प्रशासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विशेष पोलिस महानिरीक्षक आदी कार्यालये जुन्याच इमारतीमध्ये आहेत. या कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतील येत्या वर्षांच्या प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी येथील नियोजन भवनात बैठक घेण्यात आली. यावेळी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियूष सिंह आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, अमरावतीसह अकोला, बुलडाणा येथील शासकीय कार्यालये जुन्या इमारतींमध्ये आहेत. अमरावती येथील विभागीय कार्यालये विविध ठिकाणी तसेच जुन्या जागेत आहेत. त्यामुळे ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असावीत, यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पोलिस विभागातील विभागीय कार्यालयांच्या स्वतंत्र इमारतींसाठीही निधी देण्यात येतील.
राज्यातील सर्व जिल्ह्यांना लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या, जिल्ह्याचे क्षेत्रफळ, मानव विकास निर्देशांक आदी निकषांनुसार जिल्हा वार्षिक योजनेंत देण्यात येणारा निधी कळविण्यात आला आहे. या निधीच्या मर्यादेतच आराखडा तयार करण्यात यावा, जिल्ह्याच्या विकासासाठी देण्यात येणाऱ्या एकत्रित निधीपैकी वीस टक्के निधी शाळांच्या बांधकामासाठी द्यावा लागणार आहे. अमरावती आणि अकोला येथील विमानतळाचा विकास जलदगतीने होण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. मनरेगामधून शाळा खोल्या बांधकाम करण्यासाठी येत्या काळात परवानगी देण्यात येणार आहे. शाळांच्या बांधकामासाठी काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या संस्थांची विश्वासार्हता तपासावी, त्यानंतरच त्यांना बांधकामाची परवानगी देण्यात यावी.
वन विभागाच्या आक्षेपामुळे रस्ते आणि विजेची कामे करण्यात येत असलेली अडचण दूर करण्यासाठी नागपूर येथे सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी काढण्यात येतील. विभागातील लोणार, सिंदखेड आणि शेगाव विकास आराखड्यांची कामे योग्य पद्धतीने व्हावीत. लोणार सरोवराजवळील अतिक्रमण हटविण्यासोबतच सांडपाण्यास पायबंद घालावा, ही कामे जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात करण्यात यावीत. बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्यानुसारच हा प्रकल्प पूर्णत्वास येईल.
जलसंधारणाची कामे करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना आवश्यक असलेली इंधनाची सुविधा जिल्हा योजनेतून करण्यात यावी. कमी खर्चात पांदन रस्ते तयार करण्यासाठी अकोला जिल्ह्याला प्रायोगिक तत्वावर 15 कोटी रूपये देण्यात येतील. हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील इतर भागातही हा उपक्रम राबविण्यात येईल. कामांवरील खर्च कमी करण्याबरोबरच राज्याचे उत्पन्न वाढविण्याचे स्त्रोत लोकप्रतिनिधींनी सूचवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी अत्यावश्यक सेवेतील पदे भरण्याच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरावरील सर्वच ठिकाणी पोलिस विभागातील वाहने जुनी झालेली आहे. त्या सर्वांना नवीन वाहनांसाठी निधी देण्यात येतील. जिल्हा वार्षिक योजनेमधून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग योग्यरित्या करावा. या निधीचा उपयोग आकांक्षित जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी व्हावा, यासाठी चालू वर्षातील संपूर्ण नियतव्यय उपलब्ध करून देण्यात येतील. अधिकारी यांनी सकारात्मकतेने कार्य करावे. या निधीचा संपूर्ण विनियोग करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
00000










शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

वाढीव गुण प्रस्ताव सादर करण्यास 25 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ


वाढीव गुण प्रस्ताव सादर करण्यास
25 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 24 : शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविण्याचा व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण (अतिरिक्त गुण) देण्याचे प्रस्ताव विभागीय मंडळाकडे सादर करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी पर्यंत देण्यात आली होती. मार्च 2020 मधील इयत्ता 10 वी मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे प्रस्ताव शाळेकडे सादर करण्यास 15 फेब्रुवारीपर्यंत, तर शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
****

मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

वित्त, नियोजन मंत्र्यांकडून मंगळवारी जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा




वित्त, नियोजन मंत्र्यांकडून मंगळवारी
जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

अमरावती, दि. 21 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त, नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी, दि. 28 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता अमरावती विभागातील जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे.
ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2020-21 करिता जिल्हानिहाय बैठका घेतील. या बैठकीला संबंधित विभागप्रमुखांनी उपस्थित राहावे, असे नियोजन उपआयुक्त यांनी कळविले आहे.
****


शनिवार, १८ जानेवारी, २०२०

रेल्वे स्टेशन ते अंध विद्यालयापर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा


रेल्वे स्टेशन ते अंध विद्यालयापर्यंत
नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

अमरावती, दि. 18 : अमरावती-चांदूररेल्वे या राष्ट्रीय महामार्गाच्या रेल्वे स्टेशन ते अंध विद्यालयापर्यंत कॉक्रीट रोड बांधकाम टप्प्याटप्प्यामध्ये करण्यात येत आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत जेल क्वार्टर ते चपराशीपूरा चौक यामधील उजव्या बाजूचे 95 मीटर लांब रस्त्याचे रुंदीकरण काम सुरु आहे. हा रस्ता दि. 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2020 पर्यंत डाव्याबाजूने असलेल्या पुर्ण झालेल्या दोन पदरामधून वाहतूक सुरु राहिल. यासाठी पोलीस विभागाकडून परवानगी घेण्यात आली असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
****

शोभिवंत मत्स्य्‍व्यवसायासाठी 22 ते 24 जानेवारी प्रशिक्षण


शोभिवंत मत्स्य्‍व्यवसायासाठी
22 ते 24 जानेवारी प्रशिक्षण

अमरावती, दि. 18 : शोभवंत मत्स्यव्यवसाय उद्योग यशस्वीरित्या करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी दि. 22 ते 24 जानेवारी दरम्यान कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण इ-क्लास, विद्याभारती महाविद्यालय, कॅम्प येथे होणार असून मुंबई येथील तारापोरवाला मत्स्यालयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्रीय मत्स्यिकी विकास महामंडळ, हैदराबाद, मत्स्यपालन विभाग आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या वतीने नीलक्रांती योजनेअंतर्गत शोभिवंत मत्स्यव्यवसायाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण सर्वांसाठी विनामूल्य असून प्रशिक्षणासाठी प्रवेश मर्यादीत राहणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ विभागातील नवउद्योजक, तरुण-तरुणी व मत्स्यव्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सर्वांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0721-2662801 व 9960563107 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे यांनी केले आहे.
****

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2019 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2019 साठी
प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
        अमरावती, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2019 ते 31 डिसेंबर, 2019 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2020 असा आहे.
            राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पुरस्कारांची माहिती
अ.क्र
पुरस्काराचे नाव
पारितोषिक
1
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
2
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये
(मानचिन्ह वप्रशस्तीपत्र)
3
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
4
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
5
यशवंतराव चव्हाण पुरस्कार
शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
6
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
7
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
8
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
9
समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
10
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
11
पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)


विभागीय पुरस्कार

12
दादासाहेब पोतनीस पुरस्कार,
नाशिक विभाग

51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र,
या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
13
अनंतराव भालेराव पुरस्कार,
औरंगाबाद आणि लातूर विभाग
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
14
आचार्य अत्रे पुरस्कार,
मुंबई विभाग
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
15

नानासाहेब परूळेकर पुरस्कार,
पुणे विभाग
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
16
शि.म.परांजपे पुरस्कार,
कोकण विभाग
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
17
ग.गो.जाधव पुरस्कार,
कोल्हापूर विभाग
51 हजाररुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
18
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार,
अमरावती विभाग
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
19
ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार,
नागपूर विभाग
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
नियम व अटी
राज्य / विभागीय पुरस्कार
        पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिध्दीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पध्दतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीयस्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
            उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लेखनाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लेखनावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिध्द झाला असेल त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.
            पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
            अर्जदाराने राज्य व विभागीय पताळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.
मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्यपातळीवरील शासकीय गट व विभागीयपातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनंसपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.
            ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.
            जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई(कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिध्द झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येतील.
            गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 पाठविता येतील.
            शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधी विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील.
            2019 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
            प्रवेशिका राज्यस्तर किंवा विभागीयस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत, अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
            प्रत्येक गट व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.
विकास योजना संदर्भातील
समाज माध्यम (सोशल मीडिया) पुरस्कार
            ही स्पर्धा वृत्तविषयक/चालू घडामोडीविषयक संकेतस्थळे व ब्लॉग या समाज माध्यमात प्रसारित मराठी भाषेतील वृत्तविषयक विशेषत: शासकीय मजकुरासाठी आहे. या दोन माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्कारासाठी सहभाग घेता येईल. समाज माध्यमातील पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. हे लेखन किमान एक वर्षापासून सुरु असावे. या माध्यमाचा वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी संकेतस्थळ व ब्लॉग या समाज माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या प्रसिद्धींची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रीत प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात.  विविध पुरस्कारासाठी असलेल्या अटी या गटासाठी लागू राहतील.
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार
            केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान आणि राज्य शासनाचे स्वच्छ महाराष्ट्र अभियान” प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लेखनातून लोकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लेखन करणाऱ्या पत्रकारांना तसेच ईलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधील पत्रकारांना सहभागी होता येईल.
स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हगणदारीमुक्त गाव योजना, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅस तसेच वीज निर्मिती इत्यादी बाबत लेखन केलेले असावे.शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छताविषयक योजनांची प्रसिध्दी, स्वच्छता अभियान लोकसहभाग वाढविण्यासाठी लेखनाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर लेखन यांचा या स्पर्धेत अंतर्भाव होईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.
इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी स्पर्धा
        इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी पु.ल.देशापांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्र जोडलेले असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
            प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता, उपंसचालक (वृत्त), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला,  हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तचित्रकथा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून, पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती  करण्यात येईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील. 
                              छायाचित्रकार पुरस्कार
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा, ही मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे. यात सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे, समाजातील प्रश्न मांडणारी छायाचित्रे, शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी पूरक ठरतील अशी छायाचित्रे यांच्यासह प्रवेशिका सादर करता येईल.
            महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो प्रत नसावी. पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक कामाच्या प्रसिध्दीसाठी जाणिव जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी यांचा विचार केला जाईल. एकाच छायाचित्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास, तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही. पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकात छायाचित्र प्रसिध्द झाले असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला, तारीख, नियतकालिकाचे नाव प्रवेशिकेसोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.
पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार

ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोअीफोडे यांनी त्यांच्या लेखणीद्वारे समाजातील अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा यावर सातत्याने आसूड ओढले. आपल्या अग्रलेखांद्वारे प्रभावीरीत्या सामाजिक जाणीव जागृती करणारे संपादक म्हणून सुधाकर डोअीफोडे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. विविध विकासकामांची विशेषत: शासकीय विकासकामांची त्यांनी आपल्या अग्रलेखाद्वारे सकारात्मक प्रसिद्धी केली. विविध विकासकामांची दखल, आपल्या अग्रलेखांद्वारे घेणाऱ्या पत्रकार/संपादकांना, पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार देण्यात येईल.
या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील संपादकांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी लिहिलेले अग्रलेख हे स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावे.
            प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे.
            इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी या पुरस्कारासाठीही लागू असतील.
उपरोक्त सर्व स्पर्धेविषयीची माहिती आणि अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, संचालक, नागपूर-अमरावती व संचालक, औरंगाबाद, महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी-गोवा तसेच नवी दिल्ली आणि वृत्त शाखा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई -32 येथे उपलब्धआहेत.
या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
****