शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांचे अमरावतीत आगमन व स्वागत

 

मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल

यांचे अमरावतीत आगमन व स्वागत

 

अमरावती, दि. 23 : मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांचे आज सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या उपस्थितीत सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधीनी येथील सभाकक्षात उदया, 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होईल. या बैठकीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल उपस्थित राहतील .

0000



गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

 

शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिकस्पर्धेत

सहभागी होण्याचे आवाहन

 

* अंतिम मुदत 31 डिसेंबर

 

 

अमरावती, दि. 22 : जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, यासाठी पिक स्पर्धा रब्बी हंगाम 2022 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक के. एस. मुळे पाटील यांनी केले आहे. पिकस्पर्धेत सहभागी होण्याची 31 डिसेंबर ही अंतीम मुदत आहे.

पीकस्पर्धेमध्ये रब्बी पीके ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा एकूण पाच पीकांचा समावेश करण्यात आला आहे. पीक स्पर्धेतील पिकांची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान हजार हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र हजार हेक्टरपेक्षा कमी असल्यास स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहित मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग यासाठी सहभागी लाभार्थ्यांचे स्वत:च्या शेतावर त्या पीकाखाली भात पिकासाठी किमान 20 आर व इतर पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

बक्षिसांचे स्वरुप

राज्यस्तरावरील पिकस्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. तालुका पातळीसाठी पहिले बक्षिस रु. 5 हजार, दुसरे बक्षिस 3 हजार व तिसरे बक्षिस 2 हजार असे स्वरुप आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस 10 हजार, दुसरे बक्षिस 7 हजार व तिसरे बक्षिस 5 हजार असे स्वरुप आहे. तसेच राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस 50 हजार, दुसरे बक्षिस 40 हजार व तिसरे बक्षिस 30 हजार असे स्वरुप आहे.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम 300 रुपये राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान 5 यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास, पिकस्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यात येईल. या पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे. 

0000

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

मेळघाटात नियमितपणे राबविणार सामाजिक उपक्रम - धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन

 

धर्मादाय आयुक्तांकडून आदिवासी गोरगरिबांना वस्त्रदान

 

मेळघाटात नियमितपणे राबविणार सामाजिक उपक्रम

                           - धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन

 

(फोटो ओळ : आदिवासी बांधवांना वस्त्रदान करताना धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन व मान्यवर)

 

अमरावती, दि. 21 : धर्मादाय सहआयुक्त कार्यालय व सार्वजनिक न्यास वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा तालुक्यात गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी वस्त्रदान उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र केशव महाजन यांच्याहस्ते गरजू आदिवासी बांधवांना वस्त्रदान करण्यात आले. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात व मेळघाटात गरजू गरीब लोकांना धर्मादाय विभागाच्यावतीने वस्त्रदानाचा उपक्रम नियमितपणे राबविला जाणार असल्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांनी सांगितले.

आमदार राजकुमार पटेल, अमरावती विभागाचे धर्मादाय सहआयुक्त संभाजी ठाकरे, धर्मादाय उप आयुक्त नवनाथ जगताप, सहायक धर्मादाय आयुक्त रोहिणी पाठक, वकील संघाचे अध्यक्ष प्रमोद बोथरा, उपाध्यक्ष अॅड. मिलिंद देशपांडे, सचिव अॅड. नरेश पारडशिंगे, सार्वजनिक न्यास विभागाचे अधीक्षक पिंकी राय, नीलेश करलुके, निरीक्षक संतोष राऊत, उमेश लुंगे, रवींद्र गुल्हाने, विक्रम पवार, अस्मिता पटेल, सचिन बाकल, सचिन कांबळे तसेच चिखलदरा नगरपरिषदेचे नगरसेवक आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले की, समाजात आजही अनेक गरीब लोकांना पुरेसे वस्त्र मिळत नाही, दैनंदिन परिधान करावयाची वस्त्र घेण्याची त्यांची ऐपत नाही. थंडीमध्ये सुध्दा गरीब लोकांना ओढण्यासाठी गरम लोकरचे कपडे मिळत नाहीत. अशा गरजू लोकांसाठी धर्मादाय सह आयुक्त व वकिल संघटनेव्दारे राबविला जाणारा वस्त्रदान कार्यक्रम हा स्तुत्य व कौतुकास्पद उपक्रम आहे. प्रत्येक व्यक्तीला सुरळीतपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. समाजातील दानशुर व्यक्तींनी गोरगरीब लोकांचे जीवन सुखकर होण्यासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून वस्त्रदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी ज्या धर्मादाय संस्थांनी दान केले त्यांचे श्री. महाजन यांनी कौतूक केले. समाजातील गरीब लोकांचे जीवन सुखमय करण्याचे धर्मादाय संस्थेचा मुळ उद्देश असून तो सफल करण्यासाठी धर्मादाय विभागाने पुढाकार घेऊन वस्त्रदानाचा उपक्रम प्रभावीपणे राबवावा. धर्मादाय विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. आरोग्याच्या सुविधा मिळविणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून त्या अंतर्गत धर्मादाय रुग्णालयातील मोफत व सवलतीच्या दरात उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सुविधांचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. महाजन यांनी केले.

धर्मादाय विभागाव्दारे राबविण्यात येणारा गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी वस्त्रदान हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून कौतूक केले. समाजातील इतर धनाड्य व्यक्तींनी सुध्दा याचे अनुकरण करुन अशाप्रकारचे उपक्रम नियमितपणे राबविले जावेत, असे आमदार राजकुमार पटेल यांनी यावेळी सांगितले.

श्री. ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील धर्मादाय संस्थाना गरजु गरीब लोकांसाठी वस्त्रदान करण्याचे आवाहन धर्मादाय विभागाव्दारे करण्यात आले होते. त्याला धर्मादाय संस्थांनी भरभरुन प्रतिसाद देत आपापल्यापरीने गरीब लोकांसाठी साडया, चादरी, ब्लैंकेट, टावेल, कपडे इत्यादी वस्त्रांचे दान  केले. त्या दान केलेल्या वस्त्रांचे वितरण राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांच्या शुभ हस्ते गरजू आदिवासी बांधवांना करण्यात आले. या वस्त्रदान कार्यक्रमाचा सुमारे दोन हजार गरीब आदिवासी बांधवांनी लाभ घेतला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोरगरीब आदिवासी बांधवांना व महिलांना वस्त्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी, तर सुत्र संचालन अधीक्षक पिंकी राय यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय अधीक्षक नीलेश करलुके, संतोष राऊत व अ‍ॅड. कुलकर्णी यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मादाय सह-आयुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच वकील संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले. 

 

0000

 

 

नागरी संरक्षण पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना पीएचडी

 

नागरी संरक्षण पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना पीएचडी

                                                      अमरावती, दि. 21 : अमरावती परिक्षेत्राचे नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून नुकतेच पीएचडी/एमफिल प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली असून यापूर्वी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून आचार्य पदवी (पीएचडी) संपादीत केली. स्वत:चे कर्तव्य सांभाळून प्राप्त केलेल्या यशाबद्दल पोलीस विभागात त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

या दिमाखदार कामगिरीबद्दल मुंबईचे अपर पोलीस महासंचालक (नागरी हक्क संरक्षण) विनय कारगावकर, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक (अमरावती ग्रामीण) अविनाश बारगळ आदींनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

या यशासोबत डॉ. राठोड यांनी सप्टेंबर 2022 मध्ये गोंडवाना विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा (PET) तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये उत्तीर्ण केली आहे.

सेमाडोह, कोलकास संकुलातील उपहारगृहे भाडे तत्वावर चालविण्यासाठी निविदा आमंत्रित

 

सेमाडोह, कोलकास संकुलातील उपहारगृहे

भाडे तत्वावर चालविण्यासाठी निविदा आमंत्रित

 

अमरावती, दि. 21 : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत मेळघाट परिक्षेत्रातील स्थानिक रहिवासी यांच्याकडून सेमाडोह संकुल, कोलकास संकुल येथील उपहारगृह भाडे तत्वावर चालविण्यासाठी बंद लिफाफ्यामध्ये दि. 22 ते 29 डिसेंबर 2022 या कालावधीत निविदा मागविण्यात येत आहे.

निविदेबाबतच्या सविस्तर माहिती करीता इच्छुकांनी उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा येथे संपर्क साधण्याचे आवाहन सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक दिव्यभारतीय एम यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

00000

मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

डॉ. दत्ताराम राठोड यांची शिक्षण क्षेत्रात दिमाखदार कामगिरी

 डॉ. दत्ताराम राठोड यांची शिक्षण क्षेत्रात दिमाखदार कामगिरी

                                                                                                                                                                                                                         

अमरावती, दि. 20 : अमरावती परिक्षेत्राचे नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून नुकतेच पीएचडी/एमफिल प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. श्री. राठोड यांनी स्वत:चे कर्तव्य सांभाळून हे यश संपादीत केले. या दिमाखदार कामगिरीबद्दल मुंबईचे अपर पोलीस महासंचालक (नागरी हक्क संरक्षण) विनय कारगावकर, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक (अमरावती ग्रामीण) अविनाश बारगळ आदींनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

यापूर्वी डॉ. दत्ताराम राठोड यांनी वर्ष 2020 मध्ये गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून एका विषयात पीएचडी पूर्ण केली आहे. या यशासोबत डॉ. राठोड यांनी सप्टेंबर 2022 मध्ये गोंडवाना विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा (PET) तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये उत्तीर्ण केली आहे.

00000

मार्च 2023 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखांबाबत सूचना, आवेदनपत्रे सादर करण्यासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

                                          मार्च 2023 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे

आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखांबाबत सूचना

 

आवेदनपत्रे सादर करण्यासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 

अमरावती दि. 20 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च  2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटाबेसवरुन भरावयाची मुदत दि. 2 डिसेंबर 2022 रोजी संपत असून विद्यार्थी हिताच्यादृष्टीने ऑनलाईन परीक्षा आवेदपत्रे भरण्यासाठी 3 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे-

आवेदनपत्र सादर करण्याची निर्धारित मुदत संपल्यानंतर श्रेणी/तोंडी/प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होण्यापूर्वी 30 दिवसाचा कालावधी वगळून त्याअगोदर प्रतिदिनी रु. 50/- याप्रमाणे आकारण्यात येईल. तसेच  अतिविलंब शुल्काच्या निर्धारित तारखेनंतर लेखी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या आगोदर जी परीक्षा सुरु होणार आहे, त्यातील सुरुवातीच्या 15 दिवसापर्यंत प्रती विद्यार्थी प्रती दिन रु. 100/- विशेष अतिविलंब शुल्क व तद्नंतरच्या 15 दिवसांकरिता व परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत  (दि. 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत) रु. 200/- प्रमाणे अतिविशेष अतिविलंब शुल्क आकारुन आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.  

लेखी परीक्षा दि. 21 फेब्रुपरी 2023 रोजी सुरू झाल्यानंतर कोणत्याही नियमित, पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार, खाजगी विद्यार्थी, तुरळक व आय.टी.आय. विषय घेणा-या विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे स्विकारली जाणार नाहीत, यांची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

उच्च्‍ माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी अतिविलंब शुल्क अंतिम मुदत (रु. 50/- प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थी प्रमाणे) सोमवार दि. 19 डिसेंबर 2022 ते गुरुवार दि. 12 जानेवारी 2023 पर्यंत राहिल. विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत (रु. 100/- प्रतिदिन, प्रतिविद्यार्थीप्रमाणे) शुक्रवार दि. 13 जानेवारी 2023 ते शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी 2023 राहील. अतिविशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत (रु. 200/- प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थीप्रमाणे) शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2023 ते सोमवार दि. 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत राहील.

सदर आवेदनपत्र कनिष्ठ महाविद्यालयाने ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत. त्यानंतर विद्यार्थी व प्राचार्य यांच्या स्वाक्षरीसह आवेदनपत्राची Print Out व आवेदनपत्र जमा करण्याच्या  दिवसांपर्यंतचे अतिविलंग/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्क घेण्यात यावे. सदर शुल्क प्राप्त झाल्यानंतरच अर्ज ग्राहय धरण्यात येईल.

विभागीय मंडळाच्या परीक्षा शाखेने प्राप्त शुल्क व ऑनलाईन आलेली आवेदनपत्रे याची तपासणी करणे आवश्यक आहे. प्रचलित पद्धतीप्रमाणे विशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा व सर्व सूचनांचे परिपत्रक संबंधित उच्च माध्यमिक शाळा प्रमुखांना सोबतच्या नमुन्याप्रमाणे (परिशिष्ट अ) विहीत प्रपत्रांसह पाठविण्यात यावे. तसेच संदर्भीय पत्रात नमूद केल्याप्रमाणे अतिविलंग/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्कानुसार आवेदनपत्रे स्विकारावीत.

राज्यमंडळ कार्यालयाकडून अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र स्विकारण्याची मंजुरी दि.  21 फेब्रुवारी 2023 पर्यंत घेण्यात यावी. तसेच राज्यमंडळ कार्यालयाकडून परीक्षा सुरु होण्यापूर्वी मंजुरी देणे शक्य होईल अशा बेताने अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्काचे आवेदन पत्रांचे तक्ते राज्यमंडळाकडे सादर करण्यात यावेत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सहसचिव तेजराव काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

जिल्‍ह्यात कलम 37 (1)  व (3) लागू

 

अमरावती, दि. 20  : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 18 डिसेंबर 2022 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर  जिल्हा दंडाधिकारी  यांनी कळविले आहे.

000000

सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

बिबट्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

 बिबट्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

अमरावती, दि. 12 (विमाका): बिबट्याने मारलेल्या शेळ्यांवर उंदीर मारण्याचे औषध टाकणा-याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कार्यवाही होत आहे.

 

याबाबत मेळघाट व्याघ्र प्रकल्प सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक दिव्य भारती यांनी कळविल्यानुसार, दि. 6 डिसेंबर रोजी सेमाडोह परिक्षेत्रातील असेरी बिट वनखंड क्रमांक 169 मध्ये वन्य प्राणी बिबट नर आणि मादी रायपूर रस्त्यानजिक मृत अवस्थेत आढळून आले.

पुढील तपासात दोन मृत शेळ्याही दिसून आल्या. त्यापैकी एक शेळी अर्धवट खाल्लेली होती. या शेळ्या सेमाडोह येथील राजेश किशोरी तायवाडे (वय 45) यांच्या मालकीचे असल्याचे समजले. त्यानुसार दि. 8 डिसेंबर रोजी त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि पुढील दिवशी अचलपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना एक दिवसाची वनकोठडी मिळाली. वनकोठडीत संबंधित व्यक्तीने बिबट्याने मारलेल्या शेळ्यावर उंदीर मारण्याचे औषध टाकल्याचे कबूल केले आहे. त्याचप्रमाणे, उंदीर मारण्याच्या औषधाची पुडी आणि एक बाटली जप्त करण्यात आली आहे.

पुढील तपास मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक  कमलेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम व इतर कर्मचारी करत आहेत.

00000


गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

आयटीआयमध्ये सोमवार व मंगळवारी रोजगार भरती मेळावा

 


आयटीआयमध्ये सोमवार व मंगळवारी रोजगार भरती मेळावा

अमरावती, दि. 7 : मूलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्रातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारातील एनएनएस सभागृहात दि. १२ व १३ डिसेंबर  रोजी सकाळी १० वाजता पुरूष उमेदवारांसाठी शिकाऊ रोजगार भरती मेळावा आयोजिण्यात आला आहे.

गुजरातेतील सुझुकी मोटर्समधील फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टूल अँड डाय मेकर, पीपीओ, ऑटोमोबाईल सीओई, ट्रॅक्टर मेकॅनिक, पेंटर जनरल आदी पदे मेळाव्याद्वारे भरली जातील. दहावीत किमान 40 टक्के व आयटीआय पदविकेत 50 टक्के गुण आवश्यक आहेत. शिकाऊंना कंपनीतर्फे 16 हजार 900 रू. विद्यावेतन दिले जाईल. त्याशिवाय, गणवेश जोडी, सेफ्टी बूट मिळतील. कँटिन सुविधा आहे. त्याचप्रमाणे, एक हजार रूपये महिना दराने निवासाचीही सुविधा असेल.

इच्छूकांनी बायोडेटा, आधारपत्र, छायाचित्र, शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अंशकालीन प्राचार्य एस. के. बोरकर यांनी केले आहे.

000000

 

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

 







पावसाळ्यातही दुर्गम गावात पोहोचण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी

फॅब्रिकेटेड पूल बांधा; प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करा

                                                                                  -  आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत

 

            अमरावती, दि. २ (विमाका) : मेळघाटात पावसाळ्यात अनेक दुर्गम गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना अशा ठिकाणी पोहोचणे फार जिकरीचे होते. पावसाळ्यातही दुर्गम गावात पोहोचून उपचार करणे सोयीचे होण्यासाठी फॅब्रिकेटेड पुलांची व सातत्यपूर्ण संपर्क यंत्रणेची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज आढावा बैठकीत दिले.

अचलपूर विश्रामगृह येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजकुमार पटेल, आरोग्य संचालक  डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे , सहायक संचालक डॉ. कंदेवाड, डॉ. भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, तहसीलदार श्रीमती माया माने आदी यावेळी उपस्थित होते.

श्री सावंत म्हणाले की, मेळघाटातील कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यूचा  प्रश्न नेहमी चर्चेत असतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना राबविण्यात येतील. मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण संकल्पना राबविल्या जाणार. मृत्युदर शून्य करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्या जाईल. मेळघाटातील आरोग्य केंद्रातील स्त्रीरोग तज्ज्ञ, बधीरीकरण तज्ज्ञ तसेच डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात येईल. आरोग्य केंद्रातील आवश्यक वैद्यकीय उपकरणे, सोयीसुविधा औषधींचासाठा, रुग्णवाहिका पूरक प्रमाणात ठेवण्यात येईल. कुपोषणावर मात करण्यासाठी आदिवासी कुटुंबांचे स्थानिकरित्या  समिती स्थापन करून समुपदेशन करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आरोग्य केंद्रात डॉक्टर व  परिचारिकांची नियमित उपस्थिती राहण्यासाठी बायोमेट्रिक हजेरीपट सर्व ठिकाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे. कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय सेवेअभावी मृत्यू होणार नाही याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. आरोग्यसेवा पुरवताना हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशी सक्त ताकीदही त्यांनी यावेळी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयांच्या श्रेणी उन्नत करण्यात येणार येणार आहे. 50 खाटांची क्षमता असलेल्या आरोग्य केंद्रात दुप्पट खाटांची संख्या वाढवली जाईल. सध्या अस्तित्वात असणाऱ्या रुग्णालयात अधिक मनुष्यबळ व उपकरणे प्राधान्याने देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

           यावेळी मेळघाटातील आरोग्य समस्या व यंत्रणांना येणाऱ्या अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा झाली.

०००००

 सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडून मेळघाटातील आरोग्य केंद्रांची पाहणी

पाड्यापाड्यांवर प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करा

                                                           -   आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत

 

        अमरावती, दि. 2 (विमाका) : कुपोषणावर मात करण्यासाठी मेळघाटातील दुर्गम भागातील पाड्यापाड्यांवर प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करून गरजूंना आवश्यक सुविधा व उपचार   पुरवावेत, असे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज दिले.

           आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आज चिखलदरा तालुक्यातील बिहाली, सलोना व आमझरी या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रास व चिखलदरा ग्रामीण रुग्णालयास भेट दिली आणि तेथील कुपोषित बालके, मनुष्यबळ, औषधींचा साठा, गरोदर मातांना पोषण आहार, वैद्यकीय सुविधा उपकरणे आदीबाबत आढावा घेतला.

       यावेळी त्यांनी बिहाली येथील रहिवासी मोती कासदेकर यांच्या पाच महिन्याच्या कुपोषित बालकाची पाहणी करून आस्थेने विचारपूस केली.

           यावेळी आमदार राजकुमार पटेल, आरोग्य संचालक  डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक श्रीमती डॉ. तरंगतुषार वारे , सहायक संचालक डॉ. कंदेवाड, डॉ. भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, तहसीलदार श्रीमती माया माने आदी उपस्थित होते.

0000000