पावसाळ्यातही दुर्गम गावात पोहोचण्यासाठी कायमस्वरूपी
व्यवस्था व्हावी
फॅब्रिकेटेड पूल बांधा; प्रभावी संपर्क यंत्रणा
निर्माण करा
- आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत
अमरावती,
दि. २ (विमाका) : मेळघाटात पावसाळ्यात अनेक दुर्गम गावांचा संपर्क तुटतो.
त्यामुळे आरोग्य यंत्रणांना अशा ठिकाणी पोहोचणे फार जिकरीचे होते. पावसाळ्यातही
दुर्गम गावात पोहोचून उपचार करणे सोयीचे होण्यासाठी फॅब्रिकेटेड पुलांची व
सातत्यपूर्ण संपर्क यंत्रणेची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश आरोग्य मंत्री
तानाजी सावंत यांनी आज आढावा बैठकीत दिले.
अचलपूर विश्रामगृह येथे वैद्यकीय
अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजकुमार पटेल,
आरोग्य संचालक डॉ. नितीन
अंबाडेकर, उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे , सहायक संचालक डॉ. कंदेवाड, डॉ. भंडारी,
जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, तहसीलदार
श्रीमती माया माने आदी यावेळी उपस्थित होते.
श्री सावंत म्हणाले की, मेळघाटातील
कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यूचा प्रश्न नेहमी चर्चेत
असतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना राबविण्यात येतील.
मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण संकल्पना
राबविल्या जाणार. मृत्युदर शून्य करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्या जाईल.
मेळघाटातील आरोग्य केंद्रातील स्त्रीरोग तज्ज्ञ, बधीरीकरण तज्ज्ञ तसेच डॉक्टरांची
रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात येईल. आरोग्य केंद्रातील आवश्यक
वैद्यकीय उपकरणे, सोयीसुविधा औषधींचासाठा, रुग्णवाहिका पूरक प्रमाणात ठेवण्यात
येईल. कुपोषणावर मात करण्यासाठी आदिवासी कुटुंबांचे स्थानिकरित्या समिती स्थापन करून समुपदेशन करण्यावर
भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आरोग्य केंद्रात
डॉक्टर व परिचारिकांची नियमित उपस्थिती
राहण्यासाठी बायोमेट्रिक हजेरीपट सर्व ठिकाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे.
कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय सेवेअभावी मृत्यू होणार नाही याची संबंधित यंत्रणांनी
दक्षता घ्यावी. आरोग्यसेवा पुरवताना हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशी सक्त
ताकीदही त्यांनी यावेळी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र तसेच ग्रामीण
रुग्णालयांच्या श्रेणी उन्नत करण्यात येणार येणार आहे. 50 खाटांची क्षमता
असलेल्या आरोग्य केंद्रात दुप्पट खाटांची संख्या वाढवली जाईल. सध्या अस्तित्वात
असणाऱ्या रुग्णालयात अधिक मनुष्यबळ व उपकरणे प्राधान्याने देण्यात येईल, असेही
त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मेळघाटातील आरोग्य समस्या व
यंत्रणांना येणाऱ्या अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा झाली.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा