सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन योजना

 एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत

जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन योजना

 

महाडीबीटी पोर्टल अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

              अमरावती दि. 25 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2023-24 मध्ये जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येते. राज्यामध्ये ब-याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे. याचे कारण योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे (Dense & Over Crowded Canopy) इ. बाबींमुळे उत्पादकता कमी होत आहे.

                  नवीन लागवडीप्रमाणेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे ही 2023-24 मध्ये राज्यामध्ये जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने सदरचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिक्कु या फळपिकांचा समावेश आहे. या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम रू.40,000/- प्रति हे. ग्राह्य धरून त्याच्या 50 टक्के प्रमाणे जास्तीत-जास्त रक्कम रु.20000/- प्रति हेक्टर या प्रमाणे अनुदान देय आहे. तसेच यामध्ये कमीत-कमी 0.20 हेक्टर व कमाल 2 हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय राहील. पुनरूज्जीवन कार्यक्रमासाठी फळपिकनिहाय बागांचे किमान व कमाल वय खालीलप्रमाणे राहील.

                  आंबा फळपिकासाठी फळपिकाचे कमीतकमी 20 वर्षे तर जास्तीत जास्त 50 वर्षे, चिकूसाठी पिकाचे कमीतकमी 25 वर्षे तर जास्तीत जास्त 50 वर्षे, संत्रा पिकासाठी कमीतकमी 10 वर्षे तर जास्तीत जास्त 25 वर्षे, मोसंबीसाठी कमीतकमी 8 वर्षे तर जास्तीत जास्त 25 वर्षे असावे.

                 तरी, याव्दारे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा