सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत संपृक्तता (सॅच्यूरेशन) साध्यतेसाठी गावपातळीवरील विशेष मोहिम

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत संपृक्तता (सॅच्यूरेशन)

साध्यतेसाठी गावपातळीवरील विशेष मोहिम

 

दि. 12 ते 21 फेब्रुवारी दरम्यान देशव्यापी संपृक्तता मोहीम

अमरावती, दि. 12 : राज्यातील एकुण 1 लाख 94 हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई-केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे मुख्यत: सामाईक सुविधा केंद्रांमार्फत (CSCs) ई-केवासी प्रमाणिकरण करण्यासाठी  दि. 12 फेब्रुवारी ते दि. 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आणखी 10 दिवसांची देशव्यापी संपृक्तता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेची संपृक्तता (Saturation) साध्यतेसाठी राज्यात दि.  6 डिसेंबर, 2023 ते 15 जानेवारी, 2024 या कालावधीत राबविलेल्या मोहिमेत 1 लाख 4 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण व 3 लाख 1 हजार स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली.

या मोहिमे दरम्यान केवळ eKYC प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNOs) यांच्यामार्फत eKYC प्रमाणिकरण पूर्ण करावे. शेतकऱ्यांनी स्वत:चे ई-केवायसी प्रणाणिकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी. एम. किसान फेस ऑथेंटिकेशन अॅप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा.

पी. एम. किसान योजने अंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकर करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे. बँक खाती आधार संलग्न करणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या सोईनुसार प्राधान्याने नजीकचे पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे. केंद्र शासन पी. एम. किसान योजनेचा 16 वा हप्ता माहे फेब्रुवारी, 2024 च्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करणार आहे. तसेच पी. एम. किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होईल. यास्तव या दोन्ही योजनांच्या लाभासाठी दि. 21 फेब्रुवारी, 2024 पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता या मोहिमे दरम्यान करावी, असे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषि अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे कृषि संचालक दिलीप झेंडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा