बुधवार, १२ नोव्हेंबर, २०२५
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त अमरावती येथे झालेल्या भारतीय अभिजात भाषा परिषदेत तंत्रज्ञान आणि परंपरेचा सुंदर संगम पहायला मिळाला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ६ ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित या परिषदेत देशातील अकरा अभिजात भाषांचे तज्ज्ञ, संशोधक आणि विद्वान सहभागी झाले होते. या परिषदेत डिजिटल इंडिया भाषिनी विभागाने विकसित केलेल्या ‘श्रुतलेख’ या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्पीच-टू-टेक्स्ट उपयोजकाद्वारे प्रथमच थेट बहुभाषिक भाषांतराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या अभिनव प्रयोगामुळे परिषदेत झालेले भाषण आणि विचार विविध भाषांतील प्रेक्षकांना एकाच वेळी त्यांच्या भाषेत स्क्रीनवर दिसत होते. अशा प्रकारचा हा देशातील पहिला प्रयोग ठरला असून, भाषा क्षेत्रातील डिजिटल नवकल्पनेच्या दिशेने भारताने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. “पहिल्यांदाच देशातील सर्व अभिजात भाषांचे स्वर एकाच मंचावर आणि डिजिटल माध्यमातून ऐकू आले. ‘श्रुतलेख’ या अॅपच्या माध्यमातून भाषेतील अडथळे दूर होत आहेत. ही केवळ तांत्रिक नव्हे, तर सांस्कृतिक एकतेची नवी दिशा आहे.”, असे मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी परिषदेला संबोधित करताना सांगितले. मराठी भाषा विभाग आणि रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषदेची सुरुवात पारंपरिक ‘दिंडी’ मिरवणुकीने झाली. मेळघाट आदिवासी समुदायाच्या पारंपरिक नृत्य, गीत व लेझीम सादरीकरणाने कार्यक्रमाचे वातावरण भारावून गेले. या परिषदेत तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया, मराठी, प्राकृत, पाली आणि आसामी या भाषांतील तज्ज्ञांनी अभिजात भाषांच्या जतन, संवर्धन आणि भविष्याविषयी विचारमंथन केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा