बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४

नवउद्योजकांच्या स्वप्नांना ‘अमृत’ देणार भरारी

नवउद्योजकांच्या स्वप्नांना ‘अमृत’ देणार भरारी "अमृत"च्या लक्षित गटासाठी, आत्मनिर्भर ही नव संकल्पना अमरावती, दि. 7 : खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था, महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम इत्यादींच्या माध्यमातून युवक-युवतींचा विकास घडण्याकरिता ‘अमृत’ ही स्वायत्त संस्था कार्यरत आहे. ‘अमृत’ संस्थेमार्फत विविध विकासात्मक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी ‘अमृत’च्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे. दि. 01 ऑगस्ट 2024 रोजी "अमृत" आणि कौशल्य विकास विद्यापीठ यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत नव उद्योजकांना प्रशिक्षण देणे हा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती ज्यांना कोणताही विभाग, संस्था अथवा महामंडळ यांचेमार्फत लाभ मिळत नाही अशा व्यक्तींना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक कौशल्य, ज्ञान आणि पाठबळ देऊन त्यांना सक्षम करणे आणि स्वावलंबनाला चालना देणे हे या प्रकल्पाचा उद्दिष्ट आहे. व्यावसायिक उद्योजक घडविण्यासाठी सर्वसमावेशक ऑफलाइन आणि ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतील. यामध्ये प्रशिक्षणार्थीला वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात येऊन त्यांना व्यवसाय सुरू करण्यास मार्गदर्शन केले जाईल. नियमित ऑनलाईन आणि ऑफलाइन प्रशिक्षण दिले जाईल. तसेच डिजिटल मार्केटिंग आणि इतर मार्गातून त्यांना विपणन सहाय्य देखील देण्यात येईल. आवश्यकता असल्यास, इतर शासकीय योजना आणि कर्ज मिळवून देण्यासाठी बँका आणि इतर संस्थांशी समन्वय साधण्याचे काम करण्यात येईल. अधिक माहितीसाठी अमृतच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (‘अमृत’) महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, पाचवा मजला औध, पुणे 411067 असा ‘अमृत’च्या कार्यालयाचा पत्ता आहे. या योजनेद्वारे अमृतच्या लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी निर्माण होतील तसेच महाराष्ट्रातील एमएसएमई क्षेत्राचे बळकटीकरण होणार यात शंका नाही असा विश्वासही श्री जोशी यांनी यावेळी व्यक्त केला. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा