गुरुवार, २६ जून, २०२५

महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानअंतर्गत अमरावती विभागातील ३९५ मंडळात २९९ शिबीरांचे आयोजन नागरीक-शेतकरी-विद्यार्थी यांना महसुली सुविधा प्रदान

अमरावती दि. २६ : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन अमरावती महसुल विभागातील सर्व जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती विभागातील ५६ तालुक्यातील ३९५ मंडळात २९९ शिबिरे आयोजित करून असंख्य नागरीक-शेतकरी-विद्यार्थी यांना महसुल विभागाकडून सुविधा प्रदान करण्यात आली आहे. या अभियानात २३ जून अखेर अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ९५ मंडळात ६२ शिबीरे, अकोला जिल्ह्यातील ७ तालुक्यातील ५२ मंडळात ५२ शिबीरे, यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ११० मंडळात ५० शिबीरे, बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ९२ मंडळात ९२ शिबीरे आणि वाशिम जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ४६ मंडळात ४३ शिबीरे आयोजित करण्यात आली. हे अभियान महसुल यंत्रणेकडून अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आता मंडळ स्तरावर राबविण्यात येत आहे. महसूल विभागांतर्गत राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये सध्या समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजनेमधून ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ अंतर्गत मंडळ स्तरावर हे अभियान राबविण्यात येत असून त्याचे नामकरण ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ असे करण्यात आले असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरीषदेत सांगितले होते. याबाबतचा शासन निर्णय दि. २५ मार्च २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर वर्षातून किमान चार वेळा ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ आयोजित करण्यात येत असून प्रत्येक शिबिरासाठी २५ हजार रुपये इतका खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड यांचे वाटप, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना आदी सामाजिक लाभाच्या योजना इत्यादींचा लाभ देण्यात येत आहे. तसेच या अभियानांतर्गत सात-बारा वाटप, प्रलंबित फेरफार नोंदी निर्गत करणे व विविध शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले अशा महसूल विभागाच्या विविध योजना आदींबाबत सुद्धा आवश्यक ते कामकाज करण्याची सुचना महसुल मंत्री श्री.बावनकुळे यांनी केली आहे. तसेच या अभियानांतर्गत महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील राहण्याच्या सूचनाही सर्व महसुल अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, सुशासनाची महान गाथा आम्हाला प्रेरणा देत आहेत. राष्ट्र कल्याण आणि लोककल्याण हे त्यांच्या शासन व्यवस्थेचे मूळ तत्व आहेत. त्याच विचाराने आम्ही राज्यात सतत काम करीत आहोत अशी भावना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा