मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांविषयी माहिती व त्याचे व्यवस्थापन


तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांविषयी माहिती व त्याचे व्यवस्थापन
कृषी विभागाद्वारे उपाययोजना जाहीर

अमरावती, दि. 24 : यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे सध्याही जमीनीत ओल आहे. त्यामुळे तूरीचे पीक चांगले आहे काही ठिकाणी फुलोऱ्यावर तर काही ठिकाणी शेंगा धरलेल्या आहेत. शेतकरीबंधुना तूर पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे मात्र मागील दोन-तीन दिवसापासून असणारे ढगाळ वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. अश्या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहणी करुन वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवश्यक आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमध्ये खालील प्रकारच्या अळ्यांचा समावेश होतो.
शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा) या कीडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते, अंड्यातून निघालेल्या अळ्या तूरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पुर्ण वाढ झालेली अळी 30 ते 40 मि.मि. लांब पोपटी रंगाची असून पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करुन आतील दाणे पोखरुन खातात.
पिसारी पतंग या पतंगाची अळी 12.5 मि.मि. लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते. व बाहेर राहून दाने पोखरते
शेंगे माशी या पतंगाची अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाने अर्थवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.
एकात्मिक व्यवस्थापन या तिन्ही किडी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात. प्रति हेक्टर 20 पक्षीथांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडींच्या अळ्या खाऊन फस्त करतात. तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील त्या गोळा करुन नष्ट कराव्यात. शेंगापोखणाऱ्या अळ्यांसाठी वेळीच नियंत्रणाचे उपाय योजना न केल्यास तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पहिली फवारणी उपाय योजना न केल्यास तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पहिली फवारणी निम किटकनाशकाची (ॲझाडिरेक्टीन 300 पीपीएम,50 मिली/10 लिटर पाणी) करावी म्हणजे या किडीचे शत्रू किटकांना अपाय होणार नाही व नैसर्गिक संतूलन राखले जाईल. तसेच या कीडी निम किटकानांशकाचा फवारलेल्या तूरीवर अंडी घालण्यास प्राधाण्य देणार नाही.
तूरी वरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठ्ल्यानंतर (10 टक्के शेगांचे नुकसान किंवा 1 अळी प्रति झाड ) आढळल्यास क्निालफॉस 20 टक्के प्रवाही 20 मिली/10 लिटर पाणी फवारणी करावी. त्यानंतर खालील सुचविलेल्या कोणत्याही दोन किटकनाशकांच्या 15 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या 10 लिटर पाण्यात मिसळून कराव्या. इमामेक्टिन बेंझोएट 5 टक्के 3 ग्रॅम, लॅब्डा सायहॅलोमेथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मिली, क्लोरॅट्रॅनिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही 2.5 मिली, असे आवाहन विभाग प्रमुख किटकनाशक विभाग डॉ. पं.दे.कृ.वि अकोला यांनी कळविले आहे.
****

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रस्थान




राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रस्थान
अमरावती, दि. 20 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अमरावती येथील विविध कार्यक्रमानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हेलिपॅडवरुन आज दुपारी 4 वाजता नागपूरसाठी प्रस्थान झाले.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी संजय पवार, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र. कुलगुरु राजेश जयपूरकर आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस पथकाव्दारे राज्यपाल यांना मानवंदना देण्यात आली.
000000














इतिहासातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी
-         राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Ø  अहल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्काराचे वितरण
अमरावती, दि. 20 : सामान्यांच्या जीवनाला आदर्शवत बनविण्यात इतिहासाचे मोलाचे स्थान आहे. रूढी, परंपरांना छेद देऊन अहल्यादेवींनी समाजात आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण भारतभर त्यांना आदराचे स्थान आहे. विरांगणा अहल्यादेवींच्या कार्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
राजमाता अहल्यादेवी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित अहल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, उपमहापौर कुसूम साहू, कमलताई गवई, सुरेखा ठाकरे, वसुधाताई देशमुख उपस्थित होत्या.
श्री. कोश्यारी म्हणाले, राजमाता अहल्यादेवी यांनी महाराष्ट्रात जन्म घेऊन इंदूरमध्ये कार्य केले. समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रांताची मर्यादा नसते. त्यांनी केलेले बद्रीनाथ मंदिराच्या पुनरूज्जीवनाचे कार्य प्रशंसनीय आहे. त्यांच्या अशा विविध कार्यामुळे संपूर्ण देशभर त्यांच्याविषयी पाठ्यपुस्तकात शिकविले जाते. महान व्यक्तींच्या कार्यातून आपण प्रेरणा घ्यावी. इतिहास चांगल्या गोष्टी घेण्यासाठी असतो. समाजात दुही निर्माण करणाऱ्या बाबींपेक्षा गौरवशाली इतिहास प्रेरणादायी ठरतो. त्यामुळे इतिहास कायम जिवंत राहतो.
आयोजकांनी विविध क्षेत्रात संघर्ष करून यशस्वी झालेल्या महिलांचा गौरव केला आहे. हा गौरव इतरांसाठी प्रेरणादायी आहे. संकटांचा सामना करून जिद्दीने जिवनात यशस्वी होणाऱ्या महिला आदर्शवत ठरतात. प्रेम आणि स्नेहाने समाजात एैक्य निर्माण होऊन समाज शक्तीशाली होतो. या समाजाने संषर्घशिल महिलांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही श्री. कोश्यारी यांनी केले.
कार्यक्रमात समाजसेविका श्रीगौरी सावंत, सुधा चंद्रन (कला), छाया भट (क्रीडा), जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे (प्रशासन), सुनिता निमसे (शेती उद्योजिका) यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते घोंगडी आणि स्त्रीशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
फाऊंडेशनच्या सचिव माधुरी ढवळे यांनी फाऊंडेशनची माहिती दिली. सुरेखा ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. पुरस्कार प्राप्त सुनिता निमसे, वर्षा भाकरे, श्रीगौरी सावंत, सुधा चंद्रन, छाया भट यांनी मनोगत व्यक्त केले.
सुरवातीला राज्यपाल यांनी अहल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. फाउंडेशनच्या वतीने राज्यपाल कोश्यारी आणि श्रीमती सुळे यांचे घोंगडे आणि स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. संतोष महात्मे यांनी प्रास्ताविक केले.
00000


राज्यपालांच्या हस्ते वसतिगृहाचे उद्घाटन







राज्यपालांच्या हस्ते वसतिगृहाचे उद्घाटन
अमरावती, दि. 20 : येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले.
सुमारे दीड कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या वसतीगृहामुळे विद्यापीठात संशोधन करणाऱ्या 25 संशोधक छात्रांच्या निवासाची सोय होणार आहे.
यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे, कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
000000

*आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
















विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर यश संपादन करावे
-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
*आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
अमरावती, दि. 20 : आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी उपलब्ध साधनसामुग्रीच्या आधारावर एवरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे. विद्यार्थ्यांमधील क्रीडागुण हेरून विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षणासह साधनसामुग्री उपलब्ध करून दिल्यास हे विद्यार्थी जागतिक किर्तीचे होऊ शकतील. विद्यार्थ्यांनीही सातत्यपूर्ण मेहनत, जिद्दीने जागतिक पातळीवर यश संपादन करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आयोजीत आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  अध्यक्ष स्थानी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य हे होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, महापौर चेतन गावंडे, प्रधान सचिव मनिषा वर्मा, विभागीय आयुक्त पियूष सिंह आदी उपस्थित होते.
श्री. कोश्यारी म्हणाले की, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी एवरेस्टची चढाई केल्याचे कौतुक आहे. आपल्यातील तीन विद्यार्थ्यांनी हे लक्ष्य ठेवले आणि पुर्ण केले. येत्या काळात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनीही अशाच प्रकारचे भव्य लक्ष्य ठेऊन ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेहनत आणि जिद्दीने स्पर्धेत सहभागी होऊन यशस्वी व्हावे.
केंद्र आणि राज्य शासन विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करीत आहेत. यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. स्पर्धेत सहभागी व्हावे. शिक्षकांनीही त्यांना प्रोत्साहित करावे. योग्य प्रशिक्षणाने हे विद्यार्थी ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊन पदक प्राप्त करतील, असा विश्वास श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केला.
सुरूवातीला राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे पारंपारिक नृत्याने स्वागत करण्यात आले. त्यांनतर राज्यपाल यांनी मिशन शौर्य, अटल आरोग्य वाहिनी, कायापालट, कौशल्य विकास, पेसा, कराडी पथ आदी गॅलरीचे उद्घाटन केले. राणी दुर्गावती आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पूष्पहार अर्पण करुन झेंडावंदन आणि दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. राज्यपाल यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलीत केली. राज्यपाल यांना सहभागी खेळाडूंनी मानवंदना दिली.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. धोत्रे यांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात अनेक नामवंत खेळाडू घडले आहेत. अशा ठिकाणी या स्पर्धा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. स्पर्धेसाठी आवश्यक असलेले सहकार्य करण्यात येतील. तसेच अशा स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
श्रीमती वर्मा यांनी प्रास्ताविक केले. नागपूर आदिवासी आयुक्त कार्यालयाने आश्रमशाळा तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या ई-निरिक्षण अॅप, तसेच क्रीडा स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले.
00000

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अमरावतीत आगमन






राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अमरावतीत आगमन
अमरावती, दि. 20 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील  हेलिपॅडवर आज सकाळी 9 वाजता आगमन झाले.
महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहु, विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी संजय पवार, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस अधिक्षक हरीबालाजी एन, महापालिका आयुक्त संजय निपाणे, कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र. कुलगुरु राजेश जयपूरकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल यांचे स्वागत केले.  त्यानंतर पोलीस पथकाव्दारे राज्यपाल यांना मानवंदना देण्यात आली.

ज्ञानाचा उपयोग करताना देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्या राज्यपाल भगतसिंह कौश्यारी यांचे आवाहन











ज्ञानाचा उपयोग करताना देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्या
राज्यपाल भगतसिंह कौश्यारी यांचे आवाहन
अमरावती, दि. 20  :  मूल्यांशिवाय शिक्षण व्यर्थ आहे, याची तरुण पिढीने जाणीव ठेवावी आणि शिक्षणासोबत प्राप्त झालेल्या ज्ञानाचा  उपयोग करताना देशहित सदैव डोळ्यासमोर ठेवावे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा छत्तिसावा  दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय मानव संसाधन विकास , दुरसंचार, इलेक्ट्रानिक्स, माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र- कुलगुरु राजेश जयपूरकर,  यांच्यासह विविध अधिष्ठाता, व्यवस्थापन समिती सदस्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
दीक्षांत समारंभात पारंपारिक उपदेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज्यपाल म्हणाले की आज विविध पदके आणि पारितोषिके मिळविणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांनमध्ये मुलींचे प्रमाण मोठे आहे, हे पाहून आपल्याला अत्यंत आनंद झाला आणि समाधान वाटले. सर्व मुलींचे आपण मनापासून कौतुक करतो. या मुलींच्या कामगिरीचा समाजातील अपप्रवृत्तीना धाक वाटेल.
आपला देश मोठ्या कष्टाने आणि अनेकाच्या बलिदानानंतर स्वतंत्र झाला आहे. इतिहासात या देशाचा मोठा लौकिक होता. तोच लौकिक पुन्हा मिळवून देण्यासाठी आज प्रयत्न होत असताना विद्यार्थ्यांनी या प्रयत्नांमध्ये सर्व शक्तीनिशी सहभागी होण्याचा संकल्प केला पाहिजे. देशनिष्ठा आणि देशासाठीचे कर्तव्य या सर्वोच्च बाबी आहेत, याची सदैव जाणीव ठेवली पाहिजे.
आयुष्यात छोट्या वाटणाऱ्या बाबींना मोठे महत्व असते. छोट्या छोट्या गोष्टी मूल्यांचा संस्कार करतात, असेही राज्यपाल म्हणाले.
पदवी प्राप्त करण्याचा दिवस हा साफल्याचा दिवस असून आज ज्यांना पदवी प्राप्त होत आहे, त्यांची साधना यशस्वी होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील आयुष्यातही मेहनतीवर विश्वास ठेवा असे ते म्हणाले.
यावेळी राज्यपालांनी  नेहमी खरे बोला, कर्तव्याचे पालन करा, आत्मोन्नती होईल असे वाचन करा, कर्तव्यापासून विचलित होऊ नका, मानव जातीचा हिताचा व उत्कर्षाचा विचार करुन निर्दोष कर्माचेच आचरण करा व सदाचाराचे अनुकरण करा असा  पारंपारिक दीक्षांत उपदेश संस्कृत श्लोकांच्या माध्यमातून केला.
 आपल्या दीक्षांत भाषणात केंद्रीय मंत्री धोत्रे यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन परंपरेशी नाते टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.
आज विज्ञान-तंत्रज्ञान- उद्योग या क्षेत्रात नवकल्पनांना महत्व प्राप्त झाले आहे, असे नमूद करुन राज्यमंत्री धोत्रे म्हणाले की ग्रामीण जिवनातील कल्पकतेतून विद्यार्थ्यांनी नवकल्पनांबाबत प्रेरणा घ्यावी. आज उभ्या असलेल्या समस्या सोडविण्यासाठी आपण संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग करा असे आवाहन त्यांनी केले. व्यावसायिक शिक्षण हा उच्च शिक्षणाचा अविभाज्य भाग असणे तसेच व्यावसायिक शिक्षणात कौशल्याधारीत अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणे या बाबी महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना स्थानिक आणि जागतिक प्रश्नाचे भान हवे असे नमूद करुन त्यांनी महिलांवर अन्याय आणि अत्याचार होणर नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
नैसर्गिक शेती, पर्यावरण रक्षण आदि बाबींचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.
कुलगूरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले. आजच्या समारंभात 158 पारितोषिकांचे वितरण केले जात असून 480 संशोधकाना आचार्य पदवी देवून सन्मानीत केले जात असल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख आणि विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता  आणि व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थितीत होत.

****





गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आज राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन


राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आज
                             राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

अमरावती, दि. 19  :  आदिवासी विकास विभागाच्यावतीने आयोजित शासकीय व अनुदानीत आाश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.20 डिसेंबर) सकाळी 9.30 वाजता होणार आहे. या स्पर्धांचे आयोजन येथील श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे करण्यात आले असून उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव  वैद्य राहतील. या कार्यक्रमाला विविध लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी विकास आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी आणि आदिवासी विकास विभागाचे अमरावती येथील अपर आयुक्त विनोद पाटील यांनी केले आहे.
****

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी 20 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे


दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी
20 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 17  : शिक्षण मंडळामार्फत इयत्ता शिक्षण मंडळामार्फत 12 वी व इयत्ता 10 वी च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगिरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ठ होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. फेब्रुवारी-मार्च 2020 च्या इयत्ता 10 वी 12 वी परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याचा कालावधी दिनांक 14 ते 20 डिसेंबर 2019 निश्चित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यासाठी या वेबसाईडचा वापर करावा. http://form17.mh-ssc.ac.in  http://form 17.mh-hsc.ac.in  विद्यार्थ्यांने अर्ज या संकेतस्थळावरुन सादर करावे. अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मुळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो सादर करावा. अर्ज भरताना कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर करुन अपलोड करावी असे विभागीय सचिव, अमरावती विभागीय मंडळ, अमरावती यांनी कळविले आहे.
****

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू


जिल्‍ह्यात कलम 37 (1)  व (3) लागू

अमरावती, दि. 13  : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37(1) (3) लागू केले आहे.  या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबादित राहावी याकरीता पोलिस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 13 ते 27 डिसेंबर 2019 पर्यत कलम 37 (1) व (3) लागू करण्यात आले. या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्तिविरुध्द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर  जिल्हा दंडाधिकारी  यांनी कळविले आहे.
****

सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

विभागीय लोकशाहीदिनी 9 प्रकरणे सादर


विभागीय लोकशाहीदिनी 9 प्रकरणे सादर

अमरावती,दि.9- आज आयोजित विभागीय लोकशाही दिनात नऊ प्रकरणे सादर करण्यात आली. या प्रकरणांवर आणि एकूणच लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या प्रकरणांवर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी असे विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज विभागीय आयुक्त कर्यालयाच्या सभागृहात आयोजीत लोकशाही दिनात श्रीमती वैशाली पाथरे यांनी विभागातील विविध कार्यालयांशी निगडीत नऊ प्रकरणे सादर केली.
****

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

9 डिसेंबर रोजी विभागीय लोकशाही दिन


9 डिसेंबर रोजी विभागीय लोकशाही दिन

अमरावती, दि. 7:- सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकानूसार दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
त्याअनुषंगाने दि. 9 डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचही जिल्ह्यातील नागरिकांनी शासकीय विभागाशी निगडीत आपल्या तक्रारी, गाऱ्हाणी इ. संदर्भातील प्रकरण, निवेदन लेखी स्वरुपात उपरोक्त दिवशी मांडावे, असे आवाहन विभागीय आयुक्त पियूष सिहं यांनी केले आहे.
****

शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल प्रकरणांचा तपास विहित मुदतीत व्हावा -विभागीय आयुक्त पियूष सिंह




अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार
दाखल प्रकरणांचा तपास विहित मुदतीत व्हावा
-विभागीय आयुक्त पियूष सिंह

अमरावती, दि. 30 : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांचा तपास विहित मुदतीत करावा, तसेच हे प्रकरण तातडीने न्यायप्रविष्ठ करावे, असे विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी सांगितले.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक पार पडली. यावेळी समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे उपस्थित होते.
श्री. सिंह म्हणाले, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आणि नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार तातडीने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येते. मात्र याचा तपास विहित मुदतीत होत नाही. त्यामुळे न्यायालयात आरोपींच्या बाजूने निर्णय होतात. आरोपींना जामिन मिळण्यासही मदत होते. हे टाळण्यासाठी गुन्हा दाखल होताच संबंधिताला अटक आणि तपास पूर्ण करणे गरजेचे आहे. तपास काम पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले जात प्रमाणपत्र, साक्षीदार आदी बाबींची पुर्तता करावी.
मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, सेस फंड, अपंगांसाठी तीन टक्के निधी, रमाई आवास घरकुल योजना, शासकीय वसतीगृहासाठी शासकीय जमिन उपलब्ध करून देणबाबतच्या कार्यवाहीची माहिती घेतली.
000000


गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन





कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन
Ø  बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या
सल्ल्यानुसार उपाययोजना करावी
अमरावती, दि. 28 : सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी 29 ते 30 से. तापमान असतांना सामान्यत: गुलावी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतु यावर्षी पावसाचा हंगाम वाढल्यामुळे व वरील पोषक वातावरण सध्या असल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधून बाहेर येत आहेत. हीच परिस्थिती सर्वदूर शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या कोषातून बाहेर निघालेल्या पतंगांचे मिलन होऊन त्यांनी अंडी टाकल्यांनतर 8 ते 10 दिवसांनी या किडीचा प्रादुर्भाव ज्या कपाशीला हिरवी बोंडे व पात्या आहेत अशा ठिकाणी दिसून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बंधुनी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कापूस पिकात त्वरीत किमान दोन फेरोमन सापळे लाऊन त्यामध्ये सतत तीन दिवस सात ते आठ पतंग आढळल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली/10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. बोंडे/पात्या/फुले यामध्ये प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्यापर्यंत आढळून आल्यास इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के प्रवाही 10 मिली किंवा थायोडिकार्ब 75 टक्के भुकटी 20 ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 4.9 सीएस, 10 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 10 टक्के पेक्षा जास्त आढळून आल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के दाणेदार 4 ग्रॅम किंवा बाजारामध्ये उपलब्ध असलेली मिश्र किटकनाशके जसे प्रोफेनोफॉस 40 टक्के + सायपरमेथ्रीन 4 टक्के 20 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 1 + ट्रायझोफॉस 35 टक्के प्रवाही 12.50 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 + सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
शेतकरी बंधुंनी पिकाचे नियमित निरीक्षण करुन कामगंध सापळ्यामधील पतंगाच संख्या व प्रादुर्भाव तसेच सध्याच्या कापूस पिकाच्या वाढलेल्या हंगामामध्ये कापूस पिकाची संपूर्ण वेचणी झाल्यानंतर (एक ते दिड महिण्यामध्ये) कापसावर असलेली बोंडाची संख्या व अपेक्षीत उत्पन्न यांचा अंदाज घेऊन कीड व्यवस्थापनाची वरीलप्रामणे उपाय योजना करावी. सरसकट सर्व शेतकरी बंधुनी कीड व्यवस्थापनाची उपाययोजना करु नये.
डिसेंबर 2019 नंतर कापूस पीक पुर्णत: काढून टाकावे. कापूस फरदड घेण्याचा मोह टाळावा जेणेकरुन किडीचे जीवनच्रक खंडीत होऊन येणाऱ्या पुढील खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रतिबंध करण्यास मदत होईल, असे विभागीय कृषि सहसंचालक, सुभाष नागरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल






जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याव्दारे पांदन रस्त्यांची पाहणी
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करा
-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल
अमरावती, दि. 27 : शेतकऱ्यांना शेतमाल, निविष्ठा, बीबियाणे शेतात ने-आण करणे सोईचे व्हावे, यासाठी मोठ्या संख्येने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित विभागाला दिले. शेतकऱ्यांना पांदण रस्त्याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाशी संपर्क साधावा. त्यांच्या अडचणींचे व प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मोर्शी तालुक्यातील विविध गावांच्या पांदण रस्त्यांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार डोंगरे, तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. दळवी यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी नेरपिंगळाई येथील पिंगळादेवी देवस्थान व गडाची पाहणी केली. पिंगळादेवी येथील विकासकामांचा आढावा घेतला. मंदिराच्या विश्वस्थांशी चर्चा करुन पुढील विकासकामांच्या नियोजनाबाबत माहिती घेतली. या देवस्थानचा दर्जा ‘क’ वरुन ‘ब’ होण्यासाठीचा प्रस्ताव मंजूरीसाठी प्रयत्न करण्यात येईल. मंदिराच्या खुल्या परिसरात वृक्ष लागवड करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मंदिर परिसरात भक्तनिवास उभारण्यासाठी प्रशासनातर्फे मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी येरला ग्राम पंचायतीला भेट देऊन तेथील पालकमंत्री पांदन रस्ते योजनेतून निर्माण करण्यात आलेल्या मौजा येरला ते खानापूर रस्त्यांची पाहणी केली. या पांदण रस्त्या संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मौजे येरला ते लाडकी या पांदण रस्त्याचे काम सुरु करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंतांना केल्या.
पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मौजे वरुड ते भंगारा, चिंचोली गवळी ते रसुलपूर कोपरा या पांदण रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तालुक्यातील सर्व पांदण रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी सार्व. बांधकाम विभागाच्या अभियंतांना दिल्या.
यानंतर त्यांनी मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार डोंगरे, तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. दळवी यांच्याकडून पांदण रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. पुढील कामांच्या नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पाहणी दौऱ्यात संबंधित गावांचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व शेतकरी बांधव, गावकरी मंडळी उपस्थित होते.
00000