मंगळवार, ४ जून, २०१९

बियाणे,रासायनिक खते, किटकनाशक खरेदी करतांना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी



बियाणे,रासायनिक खते, किटकनाशक
खरेदी करतांना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी

अमरावती, दि. 4 : नुकतीच खरीप  हंगामाची सुरुवात होत असून बी-बियाणे, रासायनिक खते ,किटकनाशके इत्यादी  निनिष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात गर्दी करु लागले आहेत. दर्जेदार व योग्य भावात निविष्ठा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी  दक्षता घ्यावी.
गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडून  कृषि  निविष्ठांची  खरेदी करावी, बनावट भेसळयुक्त बियाणे, खते किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत  विक्रेत्यांकडून पावतीसह खरेदी करावा, खरेदी केलेल्या बियाणेचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती बियाणे कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची पाकीटे सिलबंद, मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरती अंतीम मुदत पाहून घ्यावी. कमी वजणाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री होत असल्यास तक्रारीसाठी जवळच्या कृषि अधिकारी-कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा. किटकनाशके अंतीम मुदतीच्या आतील असल्याची  खात्री करावी. या खरीप हंगामात सोयाबीन या पिकाची पेरणी जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने व बाजारात विविध कंपन्याचे सत्यतादर्शक बियाणे विक्रीला उपलब्ध राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी करतेवेळी अधिकृत बियाणे विक्रेत्याकडून खेरदी करुन रितसर पावती घ्यावी. शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी करीता आपले स्वत:चे घरच्या बियाण्याची घरच्या घरी उगवण शक्ती तपासून खात्री करावी व पेरणी करीता वापरावे जेणे करुन बियाणे खरेदीवर होणारा खर्च कमी होईल. शेतकऱ्यांनी बियाण्याच्या बाबतीत गाव पातळीवर कुठल्याही अनाधिकृत व्यक्तीकडून कोणत्याही कृषि निविष्ठा खरेदी करु नये व त्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये. याद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होणची दाट शक्यता आहे. असा प्रकार आढळून आल्यास तात्काळ कृषि विभागाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी विशिष्ट बी टी कपाशी वाणाचा आग्रह धरु नये, सर्वच बी टी कपाशी वाणाची उत्पादन क्षमता सारखीच आहे. त्यासाठी योग्य मशागतीच्या पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. रासायनिक खताच्या किमतीमध्ये वेळोवेळी बदल होत असल्याने शेतकऱ्यांनी बॅगवरील छापील किंमतीपेक्षा जास्त किमतीत रासायनिक खत विकत घेवू नये. शेतकऱ्यांनी कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीजवळून गाव पातळीवर दुय्यम मुलद्रव्ये, बिगर नोंदणीकृत सुक्ष्ममुलद्रव्ये, पिकवाढ संजिवके, जैविक किटकनाशके इत्यादी प्रकारची उत्पादने खरेदी करु नये व त्यांच्या प्रलोभनास बळी पडू नये याद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजारात राऊंड अप बी टी/एच टी बी टी/बी जी-3 बी टी अशा प्रकारच्या कापूस बियाणेची खाजगी व्यक्तीमार्फत गावपातळीवर घरपोच विक्री होत असल्याची चर्चा आहे.
भारत सरकारने कोणत्याही कंपनीस भारतात तणनाशक प्रतीकारक्षम जनुकीय कापूस बियाणे परवानगी दिलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवांवर विसंबुन आपला कष्टाचा पेसा वाया घालवू नये. शेतकरी बाधवांनी अशा प्रकारच्या फसव्या जाहीरात बाजी मधून फसवणूक होण्याची दाट शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी अशा फिरत्या विक्रेत्यांकडून कोणत्याही प्रकारच्या बियाणे अथवा  इतर कृषी निविष्ठांची खरेदी कटाक्षाने टाळावी. अनाधिकृत मार्गाने खरेदी केलेले जनुकीय बियाणे पर्यावरण कायद्याअंतर्गत कायदेशीर कार्यवाहीस पात्र ठरत असल्याने अशा बियाणेची  लागवड शेतकऱ्यांसाठी पुढे कायदेशीर समस्य सुध्दा निर्माण करु शकते याची जाणीव ठेऊन कृषि निविष्ठांची  खरेदी डोळसपणे अधिकृत मार्गानेच करण्याची दक्षता तमाम शेतकरी बंधु भगीनींनी  घ्यावी.
कृषि निविष्ठाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास , तालुका, जिल्हा, विभाग स्तरावर तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी (पंचायत समिती), तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद  यांचेशी तात्काळ संपर्क साधावा तसेच कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 188 233 4000 वर संपर्क साधावा.
आपल्या तक्रारीविषयी माहीती प्रत्यक्ष , दुरध्वनी इ.-मेल टोल फ्री क्रमांक, एस.एम.एस. इत्यादीद्वारे देवून शासनाच्या गतीमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हा. असे आवाहन,  सुभाष नागरे, विभागीय कृषि सहंसचालक, अमरावती विभाग , अमरावती यांनी केले आहे.
****



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा