शुक्रवार, २८ जून, २०१९

तलाठी संवर्गाची पदभरती 2 ते 26 जुलैपर्यंत


तलाठी संवर्गाची पदभरती 2 ते 26 जुलैपर्यंत
अमरावती, दि.27: राज्यातील सर्व शासकीय विभागातील मोठ्या प्रमाणावर असणारी रिक्त पदे भरण्याबाबत निश्चित करण्यात आलेल्या धोरणानूसार महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभाग  ह्या शासकीय विभागाच्या माध्यमातुन ई-महा परिक्षा या पोर्टलवरुन भरती प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यानुसार महसूल विभागाच्या अखत्यारित असलेल्या तलाठी संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया  दि. 2 जुलै ते 26 जुलै, 2019 या कालावधीत महा-आयटीच्या माध्यमातुन ई-महापरीक्षेमार्फत करण्यात येत आहे.
उमेदवारांच्या पसंतीच्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी संगणक विषयक पायाभुत सोयी असणाऱ्या शाळा/कॉलेजची निवड महा-आयटीकडून करण्यात आलीअसून राज्यभरात एकुण 122 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर उमेदवाराने खालील सहापैकी एक मुळ फोटो ओळखपत्र (Original Photo Id) आणणे अत्यावश्यक आहे. पॅन कार्ड/पासपोर्ट/वाहन अनुज्ञप्ती (Driving Licence)/मतदान ओळखपत्र/मुळ फोटोसह राष्ट्रीयकृत बँक पासबुक/आधार कार्ड ओळखपत्र फेरफार करुन तोतया उमेदवार येऊ नये यासाठी फोटो ओळखपत्राची रंगीत झेरॉक्स, e-Aadhar Card आणि फोटो ओळखपत्राची सॉफ्ट कॉपी वैध ओळखपत्र पुरावा म्हणून स्विकारली जाणार नाही, अशा सुचना उमेदवारांच्या हॉल तिकीटवर देण्यात आल्या आहेत.
महापरीक्षा पोर्टलवरुन घेतल्या जाणाऱ्या परीक्षा चालु असतांना नियमांचे पालन केले जात आहे ना, काही गैरप्रकार होत नाही ना, यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर निरिक्षक (Observer) म्हणून व महा-आयटीच्या मुंबई येथील कमांड रुममध्ये परीक्षा नियंत्रक (Exam Controller) म्हणून प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापरीक्षा पोर्टलवरील तसेच हॉल तिकीटवरील सुचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. ह्या संदर्भात अधिक माहिती/तक्रार नोंदविण्यासाठी महापरीक्षाचा टोल फ्री क्र. 180030007766 व enquiry@mahapariksha.gov.in ह्या मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमरावती यांनी केले आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा