शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांचे अमरावतीत आगमन व स्वागत

 

मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल

यांचे अमरावतीत आगमन व स्वागत

 

अमरावती, दि. 23 : मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांचे आज सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या उपस्थितीत सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधीनी येथील सभाकक्षात उदया, 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होईल. या बैठकीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल उपस्थित राहतील .

0000



गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

 

शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिकस्पर्धेत

सहभागी होण्याचे आवाहन

 

* अंतिम मुदत 31 डिसेंबर

 

 

अमरावती, दि. 22 : जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, यासाठी पिक स्पर्धा रब्बी हंगाम 2022 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक के. एस. मुळे पाटील यांनी केले आहे. पिकस्पर्धेत सहभागी होण्याची 31 डिसेंबर ही अंतीम मुदत आहे.

पीकस्पर्धेमध्ये रब्बी पीके ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा एकूण पाच पीकांचा समावेश करण्यात आला आहे. पीक स्पर्धेतील पिकांची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान हजार हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र हजार हेक्टरपेक्षा कमी असल्यास स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहित मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग यासाठी सहभागी लाभार्थ्यांचे स्वत:च्या शेतावर त्या पीकाखाली भात पिकासाठी किमान 20 आर व इतर पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

बक्षिसांचे स्वरुप

राज्यस्तरावरील पिकस्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. तालुका पातळीसाठी पहिले बक्षिस रु. 5 हजार, दुसरे बक्षिस 3 हजार व तिसरे बक्षिस 2 हजार असे स्वरुप आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस 10 हजार, दुसरे बक्षिस 7 हजार व तिसरे बक्षिस 5 हजार असे स्वरुप आहे. तसेच राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस 50 हजार, दुसरे बक्षिस 40 हजार व तिसरे बक्षिस 30 हजार असे स्वरुप आहे.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम 300 रुपये राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान 5 यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास, पिकस्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यात येईल. या पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे. 

0000

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

मेळघाटात नियमितपणे राबविणार सामाजिक उपक्रम - धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन

 

धर्मादाय आयुक्तांकडून आदिवासी गोरगरिबांना वस्त्रदान

 

मेळघाटात नियमितपणे राबविणार सामाजिक उपक्रम

                           - धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन

 

(फोटो ओळ : आदिवासी बांधवांना वस्त्रदान करताना धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन व मान्यवर)

 

अमरावती, दि. 21 : धर्मादाय सहआयुक्त कार्यालय व सार्वजनिक न्यास वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा तालुक्यात गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी वस्त्रदान उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र केशव महाजन यांच्याहस्ते गरजू आदिवासी बांधवांना वस्त्रदान करण्यात आले. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात व मेळघाटात गरजू गरीब लोकांना धर्मादाय विभागाच्यावतीने वस्त्रदानाचा उपक्रम नियमितपणे राबविला जाणार असल्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांनी सांगितले.

आमदार राजकुमार पटेल, अमरावती विभागाचे धर्मादाय सहआयुक्त संभाजी ठाकरे, धर्मादाय उप आयुक्त नवनाथ जगताप, सहायक धर्मादाय आयुक्त रोहिणी पाठक, वकील संघाचे अध्यक्ष प्रमोद बोथरा, उपाध्यक्ष अॅड. मिलिंद देशपांडे, सचिव अॅड. नरेश पारडशिंगे, सार्वजनिक न्यास विभागाचे अधीक्षक पिंकी राय, नीलेश करलुके, निरीक्षक संतोष राऊत, उमेश लुंगे, रवींद्र गुल्हाने, विक्रम पवार, अस्मिता पटेल, सचिन बाकल, सचिन कांबळे तसेच चिखलदरा नगरपरिषदेचे नगरसेवक आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले की, समाजात आजही अनेक गरीब लोकांना पुरेसे वस्त्र मिळत नाही, दैनंदिन परिधान करावयाची वस्त्र घेण्याची त्यांची ऐपत नाही. थंडीमध्ये सुध्दा गरीब लोकांना ओढण्यासाठी गरम लोकरचे कपडे मिळत नाहीत. अशा गरजू लोकांसाठी धर्मादाय सह आयुक्त व वकिल संघटनेव्दारे राबविला जाणारा वस्त्रदान कार्यक्रम हा स्तुत्य व कौतुकास्पद उपक्रम आहे. प्रत्येक व्यक्तीला सुरळीतपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. समाजातील दानशुर व्यक्तींनी गोरगरीब लोकांचे जीवन सुखकर होण्यासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून वस्त्रदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी ज्या धर्मादाय संस्थांनी दान केले त्यांचे श्री. महाजन यांनी कौतूक केले. समाजातील गरीब लोकांचे जीवन सुखमय करण्याचे धर्मादाय संस्थेचा मुळ उद्देश असून तो सफल करण्यासाठी धर्मादाय विभागाने पुढाकार घेऊन वस्त्रदानाचा उपक्रम प्रभावीपणे राबवावा. धर्मादाय विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. आरोग्याच्या सुविधा मिळविणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून त्या अंतर्गत धर्मादाय रुग्णालयातील मोफत व सवलतीच्या दरात उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सुविधांचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. महाजन यांनी केले.

धर्मादाय विभागाव्दारे राबविण्यात येणारा गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी वस्त्रदान हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून कौतूक केले. समाजातील इतर धनाड्य व्यक्तींनी सुध्दा याचे अनुकरण करुन अशाप्रकारचे उपक्रम नियमितपणे राबविले जावेत, असे आमदार राजकुमार पटेल यांनी यावेळी सांगितले.

श्री. ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील धर्मादाय संस्थाना गरजु गरीब लोकांसाठी वस्त्रदान करण्याचे आवाहन धर्मादाय विभागाव्दारे करण्यात आले होते. त्याला धर्मादाय संस्थांनी भरभरुन प्रतिसाद देत आपापल्यापरीने गरीब लोकांसाठी साडया, चादरी, ब्लैंकेट, टावेल, कपडे इत्यादी वस्त्रांचे दान  केले. त्या दान केलेल्या वस्त्रांचे वितरण राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांच्या शुभ हस्ते गरजू आदिवासी बांधवांना करण्यात आले. या वस्त्रदान कार्यक्रमाचा सुमारे दोन हजार गरीब आदिवासी बांधवांनी लाभ घेतला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोरगरीब आदिवासी बांधवांना व महिलांना वस्त्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी, तर सुत्र संचालन अधीक्षक पिंकी राय यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय अधीक्षक नीलेश करलुके, संतोष राऊत व अ‍ॅड. कुलकर्णी यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मादाय सह-आयुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच वकील संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले. 

 

0000

 

 

नागरी संरक्षण पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना पीएचडी

 

नागरी संरक्षण पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना पीएचडी

                                                      अमरावती, दि. 21 : अमरावती परिक्षेत्राचे नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून नुकतेच पीएचडी/एमफिल प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली असून यापूर्वी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून आचार्य पदवी (पीएचडी) संपादीत केली. स्वत:चे कर्तव्य सांभाळून प्राप्त केलेल्या यशाबद्दल पोलीस विभागात त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

या दिमाखदार कामगिरीबद्दल मुंबईचे अपर पोलीस महासंचालक (नागरी हक्क संरक्षण) विनय कारगावकर, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक (अमरावती ग्रामीण) अविनाश बारगळ आदींनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

या यशासोबत डॉ. राठोड यांनी सप्टेंबर 2022 मध्ये गोंडवाना विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा (PET) तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये उत्तीर्ण केली आहे.

सेमाडोह, कोलकास संकुलातील उपहारगृहे भाडे तत्वावर चालविण्यासाठी निविदा आमंत्रित

 

सेमाडोह, कोलकास संकुलातील उपहारगृहे

भाडे तत्वावर चालविण्यासाठी निविदा आमंत्रित

 

अमरावती, दि. 21 : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत मेळघाट परिक्षेत्रातील स्थानिक रहिवासी यांच्याकडून सेमाडोह संकुल, कोलकास संकुल येथील उपहारगृह भाडे तत्वावर चालविण्यासाठी बंद लिफाफ्यामध्ये दि. 22 ते 29 डिसेंबर 2022 या कालावधीत निविदा मागविण्यात येत आहे.

निविदेबाबतच्या सविस्तर माहिती करीता इच्छुकांनी उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा येथे संपर्क साधण्याचे आवाहन सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक दिव्यभारतीय एम यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

00000

मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

डॉ. दत्ताराम राठोड यांची शिक्षण क्षेत्रात दिमाखदार कामगिरी

 डॉ. दत्ताराम राठोड यांची शिक्षण क्षेत्रात दिमाखदार कामगिरी

                                                                                                                                                                                                                         

अमरावती, दि. 20 : अमरावती परिक्षेत्राचे नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून नुकतेच पीएचडी/एमफिल प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. श्री. राठोड यांनी स्वत:चे कर्तव्य सांभाळून हे यश संपादीत केले. या दिमाखदार कामगिरीबद्दल मुंबईचे अपर पोलीस महासंचालक (नागरी हक्क संरक्षण) विनय कारगावकर, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक (अमरावती ग्रामीण) अविनाश बारगळ आदींनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

यापूर्वी डॉ. दत्ताराम राठोड यांनी वर्ष 2020 मध्ये गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून एका विषयात पीएचडी पूर्ण केली आहे. या यशासोबत डॉ. राठोड यांनी सप्टेंबर 2022 मध्ये गोंडवाना विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा (PET) तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये उत्तीर्ण केली आहे.

00000

मार्च 2023 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखांबाबत सूचना, आवेदनपत्रे सादर करण्यासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

                                          मार्च 2023 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे

आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखांबाबत सूचना

 

आवेदनपत्रे सादर करण्यासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 

अमरावती दि. 20 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च  2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटाबेसवरुन भरावयाची मुदत दि. 2 डिसेंबर 2022 रोजी संपत असून विद्यार्थी हिताच्यादृष्टीने ऑनलाईन परीक्षा आवेदपत्रे भरण्यासाठी 3 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे-

आवेदनपत्र सादर करण्याची निर्धारित मुदत संपल्यानंतर श्रेणी/तोंडी/प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होण्यापूर्वी 30 दिवसाचा कालावधी वगळून त्याअगोदर प्रतिदिनी रु. 50/- याप्रमाणे आकारण्यात येईल. तसेच  अतिविलंब शुल्काच्या निर्धारित तारखेनंतर लेखी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या आगोदर जी परीक्षा सुरु होणार आहे, त्यातील सुरुवातीच्या 15 दिवसापर्यंत प्रती विद्यार्थी प्रती दिन रु. 100/- विशेष अतिविलंब शुल्क व तद्नंतरच्या 15 दिवसांकरिता व परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत  (दि. 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत) रु. 200/- प्रमाणे अतिविशेष अतिविलंब शुल्क आकारुन आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.  

लेखी परीक्षा दि. 21 फेब्रुपरी 2023 रोजी सुरू झाल्यानंतर कोणत्याही नियमित, पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार, खाजगी विद्यार्थी, तुरळक व आय.टी.आय. विषय घेणा-या विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे स्विकारली जाणार नाहीत, यांची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

उच्च्‍ माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी अतिविलंब शुल्क अंतिम मुदत (रु. 50/- प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थी प्रमाणे) सोमवार दि. 19 डिसेंबर 2022 ते गुरुवार दि. 12 जानेवारी 2023 पर्यंत राहिल. विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत (रु. 100/- प्रतिदिन, प्रतिविद्यार्थीप्रमाणे) शुक्रवार दि. 13 जानेवारी 2023 ते शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी 2023 राहील. अतिविशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत (रु. 200/- प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थीप्रमाणे) शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2023 ते सोमवार दि. 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत राहील.

सदर आवेदनपत्र कनिष्ठ महाविद्यालयाने ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत. त्यानंतर विद्यार्थी व प्राचार्य यांच्या स्वाक्षरीसह आवेदनपत्राची Print Out व आवेदनपत्र जमा करण्याच्या  दिवसांपर्यंतचे अतिविलंग/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्क घेण्यात यावे. सदर शुल्क प्राप्त झाल्यानंतरच अर्ज ग्राहय धरण्यात येईल.

विभागीय मंडळाच्या परीक्षा शाखेने प्राप्त शुल्क व ऑनलाईन आलेली आवेदनपत्रे याची तपासणी करणे आवश्यक आहे. प्रचलित पद्धतीप्रमाणे विशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा व सर्व सूचनांचे परिपत्रक संबंधित उच्च माध्यमिक शाळा प्रमुखांना सोबतच्या नमुन्याप्रमाणे (परिशिष्ट अ) विहीत प्रपत्रांसह पाठविण्यात यावे. तसेच संदर्भीय पत्रात नमूद केल्याप्रमाणे अतिविलंग/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्कानुसार आवेदनपत्रे स्विकारावीत.

राज्यमंडळ कार्यालयाकडून अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र स्विकारण्याची मंजुरी दि.  21 फेब्रुवारी 2023 पर्यंत घेण्यात यावी. तसेच राज्यमंडळ कार्यालयाकडून परीक्षा सुरु होण्यापूर्वी मंजुरी देणे शक्य होईल अशा बेताने अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्काचे आवेदन पत्रांचे तक्ते राज्यमंडळाकडे सादर करण्यात यावेत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सहसचिव तेजराव काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

जिल्‍ह्यात कलम 37 (1)  व (3) लागू

 

अमरावती, दि. 20  : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 18 डिसेंबर 2022 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर  जिल्हा दंडाधिकारी  यांनी कळविले आहे.

000000

सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

बिबट्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

 बिबट्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

अमरावती, दि. 12 (विमाका): बिबट्याने मारलेल्या शेळ्यांवर उंदीर मारण्याचे औषध टाकणा-याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कार्यवाही होत आहे.

 

याबाबत मेळघाट व्याघ्र प्रकल्प सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक दिव्य भारती यांनी कळविल्यानुसार, दि. 6 डिसेंबर रोजी सेमाडोह परिक्षेत्रातील असेरी बिट वनखंड क्रमांक 169 मध्ये वन्य प्राणी बिबट नर आणि मादी रायपूर रस्त्यानजिक मृत अवस्थेत आढळून आले.

पुढील तपासात दोन मृत शेळ्याही दिसून आल्या. त्यापैकी एक शेळी अर्धवट खाल्लेली होती. या शेळ्या सेमाडोह येथील राजेश किशोरी तायवाडे (वय 45) यांच्या मालकीचे असल्याचे समजले. त्यानुसार दि. 8 डिसेंबर रोजी त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि पुढील दिवशी अचलपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना एक दिवसाची वनकोठडी मिळाली. वनकोठडीत संबंधित व्यक्तीने बिबट्याने मारलेल्या शेळ्यावर उंदीर मारण्याचे औषध टाकल्याचे कबूल केले आहे. त्याचप्रमाणे, उंदीर मारण्याच्या औषधाची पुडी आणि एक बाटली जप्त करण्यात आली आहे.

पुढील तपास मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक  कमलेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम व इतर कर्मचारी करत आहेत.

00000


गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

आयटीआयमध्ये सोमवार व मंगळवारी रोजगार भरती मेळावा

 


आयटीआयमध्ये सोमवार व मंगळवारी रोजगार भरती मेळावा

अमरावती, दि. 7 : मूलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्रातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारातील एनएनएस सभागृहात दि. १२ व १३ डिसेंबर  रोजी सकाळी १० वाजता पुरूष उमेदवारांसाठी शिकाऊ रोजगार भरती मेळावा आयोजिण्यात आला आहे.

गुजरातेतील सुझुकी मोटर्समधील फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टूल अँड डाय मेकर, पीपीओ, ऑटोमोबाईल सीओई, ट्रॅक्टर मेकॅनिक, पेंटर जनरल आदी पदे मेळाव्याद्वारे भरली जातील. दहावीत किमान 40 टक्के व आयटीआय पदविकेत 50 टक्के गुण आवश्यक आहेत. शिकाऊंना कंपनीतर्फे 16 हजार 900 रू. विद्यावेतन दिले जाईल. त्याशिवाय, गणवेश जोडी, सेफ्टी बूट मिळतील. कँटिन सुविधा आहे. त्याचप्रमाणे, एक हजार रूपये महिना दराने निवासाचीही सुविधा असेल.

इच्छूकांनी बायोडेटा, आधारपत्र, छायाचित्र, शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अंशकालीन प्राचार्य एस. के. बोरकर यांनी केले आहे.

000000

 

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

 







पावसाळ्यातही दुर्गम गावात पोहोचण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी

फॅब्रिकेटेड पूल बांधा; प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करा

                                                                                  -  आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत

 

            अमरावती, दि. २ (विमाका) : मेळघाटात पावसाळ्यात अनेक दुर्गम गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना अशा ठिकाणी पोहोचणे फार जिकरीचे होते. पावसाळ्यातही दुर्गम गावात पोहोचून उपचार करणे सोयीचे होण्यासाठी फॅब्रिकेटेड पुलांची व सातत्यपूर्ण संपर्क यंत्रणेची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज आढावा बैठकीत दिले.

अचलपूर विश्रामगृह येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजकुमार पटेल, आरोग्य संचालक  डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे , सहायक संचालक डॉ. कंदेवाड, डॉ. भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, तहसीलदार श्रीमती माया माने आदी यावेळी उपस्थित होते.

श्री सावंत म्हणाले की, मेळघाटातील कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यूचा  प्रश्न नेहमी चर्चेत असतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना राबविण्यात येतील. मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण संकल्पना राबविल्या जाणार. मृत्युदर शून्य करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्या जाईल. मेळघाटातील आरोग्य केंद्रातील स्त्रीरोग तज्ज्ञ, बधीरीकरण तज्ज्ञ तसेच डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात येईल. आरोग्य केंद्रातील आवश्यक वैद्यकीय उपकरणे, सोयीसुविधा औषधींचासाठा, रुग्णवाहिका पूरक प्रमाणात ठेवण्यात येईल. कुपोषणावर मात करण्यासाठी आदिवासी कुटुंबांचे स्थानिकरित्या  समिती स्थापन करून समुपदेशन करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आरोग्य केंद्रात डॉक्टर व  परिचारिकांची नियमित उपस्थिती राहण्यासाठी बायोमेट्रिक हजेरीपट सर्व ठिकाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे. कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय सेवेअभावी मृत्यू होणार नाही याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. आरोग्यसेवा पुरवताना हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशी सक्त ताकीदही त्यांनी यावेळी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयांच्या श्रेणी उन्नत करण्यात येणार येणार आहे. 50 खाटांची क्षमता असलेल्या आरोग्य केंद्रात दुप्पट खाटांची संख्या वाढवली जाईल. सध्या अस्तित्वात असणाऱ्या रुग्णालयात अधिक मनुष्यबळ व उपकरणे प्राधान्याने देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

           यावेळी मेळघाटातील आरोग्य समस्या व यंत्रणांना येणाऱ्या अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा झाली.

०००००

 सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडून मेळघाटातील आरोग्य केंद्रांची पाहणी

पाड्यापाड्यांवर प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करा

                                                           -   आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत

 

        अमरावती, दि. 2 (विमाका) : कुपोषणावर मात करण्यासाठी मेळघाटातील दुर्गम भागातील पाड्यापाड्यांवर प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करून गरजूंना आवश्यक सुविधा व उपचार   पुरवावेत, असे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज दिले.

           आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आज चिखलदरा तालुक्यातील बिहाली, सलोना व आमझरी या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रास व चिखलदरा ग्रामीण रुग्णालयास भेट दिली आणि तेथील कुपोषित बालके, मनुष्यबळ, औषधींचा साठा, गरोदर मातांना पोषण आहार, वैद्यकीय सुविधा उपकरणे आदीबाबत आढावा घेतला.

       यावेळी त्यांनी बिहाली येथील रहिवासी मोती कासदेकर यांच्या पाच महिन्याच्या कुपोषित बालकाची पाहणी करून आस्थेने विचारपूस केली.

           यावेळी आमदार राजकुमार पटेल, आरोग्य संचालक  डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक श्रीमती डॉ. तरंगतुषार वारे , सहायक संचालक डॉ. कंदेवाड, डॉ. भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, तहसीलदार श्रीमती माया माने आदी उपस्थित होते.

0000000









बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचा मेळघाटात दोन दिवस दौरा, मंत्री डॉ. तानाजीराव सावंत करणार आरोग्य केंद्रांची पाहणी

 सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचा मेळघाटात दोन दिवस दौरा

मंत्री डॉ. तानाजीराव सावंत करणार आरोग्य केंद्रांची पाहणी

 

        अमरावती, दि. 28 (विमाका) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे दि. 2 व 3 डिसेंबरला मेळघाट दौ-यावर असून, ते धारणी व चिखलदरा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची पाहणी करणार आहेत.

            त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : शुक्रवार, दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने अचलपूरकडे प्रयाण, सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह, अचलपूर येथे आगमन व राखीव. दु. 12 वा. अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे प्रयाण, दु. 12.30 वाजता अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे आगमन व भेट, दु. 1 वाजता बिहालीकडे प्रयाण, दु. 2 वा. बिहाली उपकेंद्र येथे आगमन व भेट, दु. 2.30 वाजता उपकेंद्र बिहाली येथून सलोनाकडे प्रयाण, दु. 3 वाजता सलोना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आगमन व भेट, दु. 3.45 वाजता आमझरीकडे प्रयाण, दु. 4 वाजता आमझरी उपकेंद्र येथे भेट. दु. 4.30 वा. चिखलद-याकडे प्रयाण, सायं. 5 वाजता चिखलदरा ग्रामीण रुग्णालय येथे भेट, सायं. 6 वा. चिखलदरा येथील शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, सायं. 6.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चिखलदरा येथे आगमन व राखीव.

            शनिवार, दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वा. सेमाडोहकडे प्रयाण, सकाळी 8.45 वाजता सेमाडोह प्रा. आ. केंद्र येथे भेट, स. 9.30 वाजाता हरिसालकडे प्रयाण, सकाळी 10 वा. हरिसाल प्रा. आ. केंद्र येथे भेट, सकाळी 10.30 वाजता धारणीकडे प्रयाण, सकाळी 11 वा. धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे भेट, स. 11.30 वाजता अचलपूरकडे प्रयाण, दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह, अचलपूर येथे आगमन व राखीव. दु.  3 अमरावती विभागीय कार्यालयाकडे प्रयाण, दुपारी 4.30 विभागीय आयुक्त कार्यालयात अमरावती महसूल विभागातील सर्व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक, सायं. 5 वाजता अमरावती येथून नागपूर विमानतळाकडे प्रयाण.

 

00000

‘आयटीआय’मध्ये आज संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन

 ‘आयटीआय’मध्ये आज संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन  

अमरावती, दि. 29 - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील  विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण मॉडेल्सची निर्मिती व प्रोत्साहनासाठी संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन उद्या दि. 30 नोव्हेंबर रोजी  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्वांसाठी खुले राहील.

याच उपक्रमाचे विस्तारित स्वरूप म्हणून दि. 2 डिसेंबरला जिल्हास्तरीय प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.  

राज्याचे संचालक दिगंबर दळवी यांच्या पुढाकाराने व अमरावती विभागाचे सहसंचालक प्रदीप घुले यांच्या मार्गदर्शनानुसार कौशल्य विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे व संस्थेचे प्राचार्य संजय बोरकर यांनी केले आहे.

यांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, वीजतंत्री, वेल्डिंग, टीडीएम,आयटी आदी अभियांत्रिकी व्यवसायातील, तसेच ड्रेस मेकिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, कोपा यासारख्या बिगर अभियांत्रिकी व्यवसायाच्या  प्रशिक्षणार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनेतून अनेक मॉडेल तयार केले आहेत. ते प्रदर्शनात पहावयास मिळतील. प्रदर्शनाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. बोरकर व उपप्राचार्य राजेश चुलेट यांनी केले आहे.

०००

आरोग्य विभागातर्फे आजपासून ‘एड्स नियंत्रण महिना’ उपक्रम, जिल्ह्यात एचआयव्ही संक्रमणदरात घट

 आरोग्य विभागातर्फे आजपासून ‘एड्स नियंत्रण महिना’ उपक्रम

जिल्ह्यात एचआयव्ही संक्रमणदरात घट

 

आरोग्य विभाग व स्वयंसेवी संस्थांचे सातत्यपूर्ण कार्य

 

अमरावती, दि. 30 : शासकीय आरोग्य यंत्रणेतर्फे उपलब्ध विनामूल्य औषधोपचार, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सातत्यपूर्ण जनजागृती व प्रभावी लोकशिक्षण यामुळे गत 15 वर्षांत जिल्ह्यातील एचआयव्ही संक्रमण दरामध्ये घट झाली आहे. यंदा एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे ‘समानता’ हे घोषवाक्य घेऊन उद्यापासून (दि. 1 डिसेंबर) संपूर्ण जिल्ह्यात जनजागृतीपर जागतिक एड्स नियंत्रण महिना’ साजरा करण्यात येणार आहे.    

 

प्रभावी लोकशिक्षण, उपचार, सुरक्षितता साधनांची उपलब्धता यामुळे संक्रमणदरात घट झाल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी दिली. ते म्हणाले की, 2007-08 मध्ये 10 हजार 812 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 543 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 5.02 टक्के होते. दरम्यान, तपासणी केंद्रे व तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली. प्रभावी जनजागृतीमुळे नागरिक तपासण्यांसाठी केंद्रांवर येण्याचे प्रमाण वाढले. 2012-13 मध्ये 43 हजार 337 व्यक्तींच्या तपासणीत 741 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 1.71 टक्के होते. 2017-18 मध्ये एक लाख 30 हजार 255 व्यक्तींच्या तपासणीत 388 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 0.30 टक्के होते. 2021-22 मधील एक लाख 36 हजार 189 तपासण्यांमध्ये 246 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 0.18 टक्के इतके आहे.

शासकीय रूग्णालयांत विनामूल्य उपचार

एचआयव्ही नियंत्रण व उपचारासाठी अमरावती जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, एक वैद्यकीय महाविद्यालय, चार उपजिल्हा रुग्णालये, नऊ ग्रामीण रुग्णालये, 60 प्राथमिक आरोग्य केंद्रे, एक क्षयरोग उपचार रुग्णालय, 59 खाजगी रुग्णालये, दोन गुप्तरोग केंद्रे, एक शासकीय रक्तपेढी, चार खाजगी रक्तपेढी एवढी यंत्रणा काम करते. या सर्व ठिकाणी एड्सविषयी माहिती व एचआयव्ही तपासणीच्या  विनामूल्य सुविधा पुरविल्या जातात. मोफत उपचारासाठी शासकीय, उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालयांत एआरटी केंद्रे सुरू आहेत.

संक्रमितांना एआरटी केंद्र येथे पोहोचवून आवश्यक तपासण्या, सीडी-फोर तपासणी व विनामूल्य उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 51 हजार 467 गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सहा गर्भवती मातांना एआयव्हीची लागण झाल्याचे आढळले. त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात एकूण 17 एचआयव्ही संक्रमित गरोदर मातांची शासकीय रुग्णालयात यशस्वी प्रसूती करण्यात आली. बाळाच्या सुरक्षिततेसाठी नेविरेपिन औषध देण्यात आले. ग्रामीण व शहरी क्षयरोग विभागाच्या सहकार्याने प्रत्येक क्षयरूग्णाची एचआयव्ही तपासणी करण्यात येऊन तसे आढळल्यास त्यांना आवश्यक औषधोपचार दिले जातात.

        स्वयंसेवी संस्थांची भक्कम साथ

शासकीय आरोग्य यंत्रणेच्या या कार्याला स्वयंसेवी संस्थांचीही भक्कम साथ लाभली आहे. जिल्ह्यात स्थलांतरित कामगारांसाठी भाग्योदय बहुद्देशीय संस्था कार्य करत आहे. मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ संस्था गावपातळीवर लिंक वर्कर कार्यक्रमात 100 गावांसाठी तपासणी व समुपदेशन करत आहे. देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांमध्ये एचआयव्हीच्या प्रसाराची माहिती देऊन जागृती व तपासणी करून घेण्यास प्रोत्साहित करण्याचे कार्यही ही संस्था करत आहे. त्याचबरोबर, संत सत्यदेवबाबा महिला मंडळ संस्था ही संस्थाही या कार्यात अग्रेसर आहे. आधार संस्थेच्या वतीने संक्रमित बांधवांना सामाजिक, मानसिक व आर्थिक साह्य मिळण्यासाठी विविध शासकीय योजना व सेवासुविधा पोहोचविण्याचे कार्य केले जाते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे ट्रकचालक, क्लीनर बांधवांमध्ये माहिती देऊन जागृती व तपासणी करून घेण्यास प्रोत्साहित करण्याचे कार्य होत आहे. समर्पण संस्थेतर्फे तृतीयपंथी व्यक्तींसाठी कार्य होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या  संयुक्त विद्यमाने विविध महाविद्यालयांत 78 रेड रिबन क्लब काम करतात. त्यात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, रॅली, पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, एड्स स्लोगन (घोषवाक्य)स्पर्धा आयोजित केल्या जातात.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

‘समानता’ हे घोषवाक्य घेऊन एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे संपूर्ण जिल्ह्यात जनजागृतीपर जागतिक एड्स नियंत्रण महिना’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त दि. एक डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयापासून जनजागृती रॅली काढण्यात येईल. त्याचप्रमाणे, दि. तीन डिसेंबर रोजी पब्लिक फोरम कार्यक्रमात आरोग्य कर्मचारी व नागरिकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम होईल. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी कार्यक्रम, पथनाट्य, पोस्टर आदी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत, असे

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी सांगितले.

०००

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

पावसावर अवलंबित कृषीप्रणालीत बदलासाठी सर्वकष प्रयत्न आवश्यक - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे





पावसावर अवलंबित कृषीप्रणालीत बदलासाठी सर्वकष प्रयत्न आवश्यक

-         विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

अमरावती, दि. 22 : पावसावर अवलंबून असलेल्या कृषी प्रणालीत विकास घडवून आणण्यासाठी विविध योजनांची सांगड घालून सर्व विभागांनी संघटीत व सर्वकष प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज दिले.

विभागीय आयुक्तालयात पश्चिम विदर्भात पावसावर अवलंबून असलेल्या शेतीप्रणालीबाबत कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र आरआरए नेटवर्कचे राज्य समन्वयक सजल कुलकर्णी तसेच विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषि, मनरेगा, आदिवासी विकास विभाग, जलसंधारण, वने, पशुसंवर्धन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कृषी संशोधनात महाराष्ट्र अव्वल राज्य असला तरीही प्रत्यक्षात बहुतांश शेती अद्यापही मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी केवळ खरिप पिके घेऊ शकतात. सोशिओ इकॉनॉमिक सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील 37.05 टक्के कुटुंबे शेतीवर व 44.37 टक्के कुटुंबे शेतीविषयक मजूरी कामांवर अवलंबून आहेत. त्यातही दोन हेक्टरहून कमी जमीन असलेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पावसाधारित शेती पध्दतीत सुधारणा अत्यावश्यक आहेत. त्यात बहुविध पिकपध्दती, शेतमाल विपणन, पूरक व्यवसायांबरोबरच कृषी उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वयपूर्वक प्रयत्न करण्याचे निर्देश डॉ. पांढरपट्टे यांनी दिले.

पश्चिम विदर्भातील शेतकरी अद्यापही पावसाधारित शेतीवर, वनाधारित उत्पादनांवर अवलंबून आहेत. त्यात विकास घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र आरआरए नेटवर्क या संस्थेने प्रकल्प हाती घेतला आहे. त्याव्दारे शेती विषयक सुधारणांसाठी उपाययोजना राबविणे, शेतीवर अवलंबून असलेल्या व्यक्तींचे जीवनमान उंचावणे, सर्व शासकीय संबंधित विभागांचा समन्वय ठेवणे, योजनांमधील त्रुटी दूर करणे, परिस्थितीनुरूप बदल घडवणे व दीर्घकालीन उपाययोजना राबविणे आदी कामे करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. कुलकर्णी यांनी दिली.

0000