मंगळवार, २५ जून, २०२४

शिष्यवृत्तीपासून मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर ‘राइट टू गिव्ह अप’ पुन्हा ‘रिव्हर्ट’ पर्यायाची सुविधा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 30 जून अंतीम मुदत

शिष्यवृत्तीपासून मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर ‘राइट टू गिव्ह अप’ पुन्हा ‘रिव्हर्ट’ पर्यायाची सुविधा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 30 जून अंतीम मुदत अमरावती, दि. 25 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. महाडीबीटी पोर्टलवर 'राइट टू गिव्ह अप'चा पर्याय दिल्याने शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम पुन्हा मिळण्याची संधी मिळणार आहे. संबंधित अर्ज ‘रिव्हर्ट’ (परत मागे) करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने महाडीबीटी पोर्टलवर पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज 30 जूनपर्यंत ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. राज्य शासनाने शिष्यवृत्तीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना यावर्षी प्रथमच 'राइट टू गिव्ह अप'चा पर्याय उपलब्ध करून दिला होता. स्वेच्छेने शिष्यवृत्तीची रक्कम अस्वीकार करण्यासाठी हा पर्याय दिला होता. केंद्र शासनाच्या गॅस सिलिंडरच्या अनुदाना संदर्भात अशा स्वरूपाची योजना यापूर्वी राबविण्यात आली आहे. या धर्तीवर शिष्यवृत्तीसंदर्भात पर्याय उपलब्ध करून दिला होता. मात्र, काही विद्यार्थ्यांनी चुकून या पर्यायाची निवड केली. त्यामुळे त्यांच्या शिष्यवृत्तीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. यासंदर्भात त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून तसेच राज्यभरातील लोकप्रतिनिधींकडून शासनास करण्यात आली होती. यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने दखल घेत व या प्रकरणी विविध ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करत सूचना जारी करताना या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त करून घेण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थीवर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘राइट टू गिव्ह अप’ पर्याय निवडून शिष्यवृत्तीच्या रद्दबातल झालेल्या अर्जाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया निर्धारित मुदतीत करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनावधानाने अथवा नजरचुकीने हा पर्याय निवडल्याने शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्ज 'रिव्हर्ट बॅक' (परत मागे) करायचा आहे. त्यासाठी 30जून 2024 पर्यंत मुदत दिली आहे. अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधायचा आहे. यानंतर प्राचार्य लॉगइनमधून अर्ज रिव्हर्ट बॅक करून घ्यायचा आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल. रिव्हर्ट बॅक झालेला अर्ज याच मुदतीत विद्यार्थ्यांच्या लॉगिन मधून ऑनलाईन फेर सादर करणे आवश्यक राहील, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात काही अडचण उद्भवल्यास संबंधितांनी जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अमरावती समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा