सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित

 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित

    * 1 डिसेंबर रोजी होणार मतदान

 * 3 डिसेंबर रोजी मतमोजणी

* आदर्श आचारसंहिता लागू

अमरावती, दि. 2 : भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक 2020 कार्यक्रम घोषित आज घोषित केला. यानुसार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार असून, दि.  3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

            या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना गुरूवार, दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध होणार आहे. नामनिर्देशन पत्र गुरूवार, दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत भरता येणार आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार, दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी करण्यात येणार आहे. नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मंगळवार, दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत मागे घेता येणार आहे.

            या निवडणुकीसाठी मंगळवार, दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर दि. 3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सोमवार, दि. 7 डिसेंबर रोजी पुर्ण होणार आहे. या निवडणुकीबाबत आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. या आदर्श आचारसंहितेचे पालन संबंधितांनी करावे, असे आवाहन अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक 2020चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी केले आहे.

00000

 

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी किशोर तिवारींचा मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा

 

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी

किशोर तिवारींचा मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा

अमरावती, दि. 2 : शेतकऱ्यांच्या समस्या, नुकसान भरपाई, सिंचन, वीज पंप यासारखे महत्त्वाचे विषय सोडविण्यासाठी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानामध्ये विदर्भातील अकरापैकी फक्त एका जिल्ह्यात नुकसान झाल्याचा निष्कर्ष काहींनी काढल्यामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे. राज्य शासनाच्या १६ ऑक्टोबर २०२० च्या शासन निर्णयात यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या शेती आणि इतर घरे, कपडे, भांडी इत्यादींच्या नुकसानी संदर्भात तरतुदी दिल्या आहेत. या शासन निर्णयात अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात आणि नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या पाच जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले नसल्याचे नमूद केले आहे.

याच शासन निर्णयात विदर्भातील ११ पैकी भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. भंडारा जिल्ह्यात शेतीचे २ कोटी ११ लाख ४३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. या जिल्ह्यात घरे, कपडे, भांड्याचे नुकसान १९ लाख ८५ हजार रुपयांचे, मृत जनावरांचे ५ लाख ८२ हजार तर मोठ्या प्रमाणातील पडझडीचे नुकसान २ कोटी ८६ लाख ५६ हजार रुपयांचे झाले असल्याचे नमूद केले आहे. अमरावती विभागात घरे, कपडे, भांडी यांचे नुकसान सर्व जिल्ह्यांत झाल्याचे दर्शविले आहे. हे पाच जिल्ह्यांचे मिळून नुकसान १ कोटी ९४ लाख ५२ हजार रुपये आहे. यातील अमरावती आणि अकोला या दोनच जिल्ह्यांमध्ये ४ लाख ८२ हजार रुपयांचे नुकसान झालेले नमूद आहे. नागपूर विभागात पाच आणि अमरावती विभागात तीन अशा विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये जनावरांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे शासनाचे सर्वेक्षण आहे.

या आकडेवारीनुसार संपूर्ण विदर्भा अतिवृष्टीमुळे शेती, घरे, झोपड्या गोठे, जनावरे अशा विविध प्रकारांमध्ये सर्व मिळून ७ कोटी २२ लक्ष ९० हजार नुकसान झाले आहे. त्यामुळे १० हजार कोटींपैकी ९ हजार ९९८ कोटी रुपये विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात दिल्या जाणार आहे. अकोला जिल्ह्याला मिळणाऱ्या २६ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईत फक्त १० लाख रुपयांची वाढ केली आहे. उर्वरित महाराष्ट्राला जिरायतीसाठी हेक्टरी १ हजार तर फळ पिकांसाठी २५ हजार रुपये मिळणार आहेत. मात्र शासन निर्णयाप्रमाणे विदर्भाला जिरायत ६ हजार ८००, तर फळ पिकांसाठी १८ हजार रुपये याप्रमाणे मदत मिळणार आहे. पावसाने झालेल्या पडझडीने अमरावती जिल्ह्यात ५७.८१ आणि  बुलढाणा जिल्ह्यात ५२.७१ लाख रुपयांची नुकसान भरपाई देऊ केली आहे. या दोन जिल्ह्यामध्ये शेतीचे नुकसान झालेले नसल्याचे म्हटले असल्याने, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे, असे श्री. तिवारी यांनी सांगितले.

0000000

 

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

विभागीय आयुक्त कार्यालयात 
महर्षी वाल्मिकी, सरदार पटेल यांना अभिवादन
अमरावती, दि. 31 : विभागीय आयुक्त कार्यालयात महर्षी वाल्मिकी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले.
महर्षी वाल्मिकी आणि माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त संजय पवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सहायक उपायुक्त शामकांत मस्के, तहसीलदार वैशाली पाथरे, नाझर श्री. पेठे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२०

दहावी व बारावीची पुरवणीपरीक्षा डिसेंबरमध्ये

 

दहावी व बारावीची पुरवणीपरीक्षा डिसेंबरमध्ये

अमरावती, दि. 29 : राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणीपरीक्षा येत्या डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्ध्तीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर दि. 2 नोव्हेंबर पर्यंत सादर करावे.

विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळा, उच्च माध्य. शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माहे नोव्हेंबर-डिसेंबर 2020 व फेब्रुवारी-मार्च 2021 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

*****

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क बँकेत जमा करावे

 

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क बँकेत जमा करावे

अमरावती, दि. 29 : माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी इयत्ता दहावी व बारावीच्या शैक्षणिक सत्र 2020 मधील विद्यार्थ्याचे परिक्षा शुल्क ॲक्सीस बँकेत जमा करून घेण्याबाबत कार्यवाही सुरु करावी. ॲक्सीस बँकेचे चलन ऑनलाईन तयार होणार असून महाविद्यालयांनी ते त्वरीत डाऊनलोड करावे.

सर्व महाविद्यालयांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडून परिक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्क्म माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी आणि ऑनलाईन चलन डाऊनलोड केल्यानंतर चलनावर नमूद असलेली रक्कम विहित मुदतीत त्यांच्या त्याच बँकेच्या खात्यामधून एनईएफटी/ आरटीजीएसव्दारे चलनवरील नमूद बँक अकाऊंटवर व आयएफएससीकोड प्रमाणे मंडळाकडे वर्ग करावी, असे राज्य मंडळाचे सचिव यांनी कळविले आहे.

*****

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

शेतकरी मिशनच्या ‘कुटुंब आपले-जबाबदारी आमची’ मोहिमेतून असंख्य रुग्ण कोरोनामुक्त

 

शेतकरी मिशनच्या ‘कुटुंब आपले-जबाबदारी आमची’

मोहिमेतून असंख्य रुग्ण कोरोनामुक्त

 

अमरावती, दि. 8 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी मिशनच्या ‘कुटुंब आपले-जबाबदारी आमची’ या मोहिमेद्वारे अनेक गरजू रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यात येत असून असंख्य रुग्ण कोरोनामुक्त होत आहे. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्यां कोरोनाग्रस्तासांठी ही मोहिम आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली. कोरोनाग्रस्त रुग्णांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

‘कुटुंब आपले-जबाबदारी आमची' या मोहिमेअंतर्गत ज्या रुग्णांना कोरोना सदृश्य लक्षणे आहेत त्यांनी शेतकरी मिशनच्या 09422108846 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होई पर्यंतच्या सर्व बाबी शेतकरी मिशनच्यावतीने पार पाडल्या जातात. गंभीर आजार असलेले रुग्णांवर विशेष लक्ष ठेवून त्यांच्या प्राणवायू व फुफ्फुसाच्या स्थितीवर निगराणी ठेवण्यात येते. आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असलेल्या नागरिकांसाठी ही मोहिम असून महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यासाठी या मोहिमेची मोलाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

*****

 

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

विभागीय आयुक्त कार्यालयात 
राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन
अमरावती, दि. 2 : येथील विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपायुक्त संंजय पवार, प्रमोद देशमुख यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज पाठविण्याचे आवाहन

 

परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज पाठविण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 1 : राज्यातील अनुसूचित जमातीच्या दहा विद्यार्थ्यांना परदेशातील पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणेसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

विहित नमुन्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद येथे उपलब्ध आहे. दि. 20 ऑक्टोबर, 2020 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद येथे सादर करावेत, असे आवाहन अमरावती येथील आदिवासी विकासचे शिक्षण सहायक आयुक्त पी. पी. पंडीतकर यांनी केले आहे.

****

आयआयएचटी बरगढ येथील प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ

 

आयआयएचटी बरगढ येथील

प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ

 

अमरावती, दि. 1 : बरगढ (ओडिशा) येथील आयआयएचटी येथील प्रथम सत्राकरिता प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुकांना आता दि. 12 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करता येऊ शकतील.

केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-2021 या शैक्षणिक सत्राकरीता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता आर्थिक दुर्बल घटकातील राखीव उमेदवाराकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज दि. 12 ऑक्टोबर 2020 पर्यंत मागविण्यात येत आहे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे वेबसाईट http.www.dirtexmah.gov.in येथे उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग  यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे.

विदर्भातील 11 जिल्ह्यातील पात्र आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यानी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषांगिक माहिती प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर प्रशासकीय इमारत क्रमांक 2, आठवा माळा, बी-विंग, सिव्हिल लाईन, नागपूर-440001, दुरध्वनी क्रमांक 0721-2537927 यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावी, तसेच अर्जाचा नमुना आणि विहित पात्रता कार्यालयाचे नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे, असे वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त स. ल. भोसले यांनी कळविले आहे.

000000

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

 

जिल्‍ह्यात कलम 37 (1)  व (3) लागू

 

अमरावती, दि. 1 : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी, यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 1 ते 15 ऑक्टोबर 2020 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणाऱ्या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर जिल्हा दंडाधिकारी  यांनी कळविले आहे.