विशेष लेख दि. ३० जून २०२६
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी
कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर करुन ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करण्याचा दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाविषयी माहिती देणारा हा लेख…
भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या व राज्याच्या
अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शेती व शेतकरी हे दोन्ही
घटक राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. अनियमित पाऊस,
गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना नव्याने पीक कर्ज
उपलब्ध होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या एक कुशल प्रशासक, रयतेच्या
कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकाभिमुख शासक होत्या. शेती, सिंचन, जलसंधारण आणि
ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेले प्रोत्साहन आजही आदर्श मानले जाते.
शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती.
म्हणूनच त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात शेतकरी कल्याणाशी निगडित या
महत्त्वपूर्ण योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ हे नाव
देऊन शासनाने त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे.
कर्जमुक्ती योजना काय आहे ?
सन २०१७ मध्ये दीड लाख रुपयांपर्यंत, तर सन २०१९
मध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. यावेळीही दोन लाख
रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती देण्यात येत आहे. अल्पमुदतीची थकीत पीककर्जे, तसेच
पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
यावेळी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे आणि तो
म्हणजे पूर्वी दोन लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा थोडी जास्त रक्कम कर्ज असलेल्या
शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता, म्हणजे एकाद्या शेतकऱ्याचे दोन लाख दहा हजार कर्ज
असेल तर तो शेतकरी अपात्र होता. आता मात्र अशा शेतकऱ्यांनी स्वतःचा हिस्सा
भरल्यानंतर दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासन भरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना
पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. तसेच यामध्ये जमीन धारणेची अट नाही.
याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना
प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याची तरतूद
करण्यात आली आहे. कर्जफेडीची शिस्त टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रामाणिक कर्जदारांना
प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
एकवेळ समझोता योजना (OTS) :
१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२६ अखेर उचल केलेल्या
अल्पमुदत पीक कर्जखात्यांची एक किंवा अनेक बॅंकांकडील सर्व कर्ज खात्यांची मुद्दल
व व्याजासह ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न
झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम दोन लाखांपेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी दोन
लाखांवरील रक्कम भरल्यानंतर त्यांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात
शेतकऱ्यांना जी थकित रक्कम आहे त्यापेक्षा कमी रक्कम भरावी लागेल. विशेष म्हणजे
अशा शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची दोन लाखांवरील थकित रक्कम भरण्यासाठी ३१
मार्च २०२७ पर्यंत कालावधी दिला जाणार आहे.
प्रोत्साहनपर लाभ :
नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन
देण्यासाठी या योजनेअंतर्गत २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ पैकी कोणत्याही दोन
आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन ३० जून पूर्वी किंवा बँकेच्या नियमानुसार
विहित वेळेत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी रु. ५० हजार
पर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. यासाठी २०२५-२६ व २०२६-२७ या आर्थिक
वर्षांतील अल्पमुदत पीक कर्जाचीही वेळेत परतफेड करणे आवश्यक राहील.
तसेच, 2023-24 अथवा 2024-25 या वर्षात पूर्णत: परतफेड
केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजारांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना
त्यांनी 2023-24 अथवा 2024-25 या वर्षात अल्प मुदत पीक कर्जाच्या मुद्दल व
व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा 5 हजार प्रोत्साहनपर लाभ मिळणार
आहे.
नियमित परतफेड करणाऱ्यांना मोठा दिलासा :
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९
मधील योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. ज्या
शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक
कर्जाचे केलेले पुर्नगठन/फेरपुर्नगठन थकीत हप्त्याची ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत
रक्कम रु. ५० हजार पर्यंत असल्यास पूर्ण कर्जमुक्ती, आणि रु. ५० हजारांपेक्षा
जास्त असल्यास एकवेळ समझोता (OTS) योजनेचा लाभ मिळणार आणि रक्कम भरण्याची मुदत ३१
मार्च २०२७ असणार आहे.
योजनेचे निकष :
·
पात्र शेतकऱ्यांना मुद्दल आणि
व्याजासह प्रति शेतकरी २ लाख रुपयांपर्यंत थेट कर्जमुक्ती.
·
१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या
कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी लागू.
·
३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत
असलेल्या कर्जाचा समावेश.
·
३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न
झालेल्या कर्जाचा समावेश.
·
जमीन धारणेची अट नाही
·
पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात
पुनर्गठन/फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांनाही २ लाख रुपयांपर्यंतची
कर्जमुक्ती.
·
२ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज
असल्यास अतिरिक्त रक्कम ३१ मार्च २०२७ पर्यंत संबंधित बँकेत जमा केल्यास
कर्जमुक्तीचा लाभ.
·
शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे
अनिवार्य आहे.
·
राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण,
जिल्हा बँका व प्रा. कृषी पतपुरवठा संस्थांच्या कर्जाना लागू.
कोण पात्र असणार नाहीत :
·
विद्यमान किंवा माजी मंत्री,
राज्यमंत्री, लोकसभा व राज्यसभा सदस्य, विधानसभा व विधान परिषद सदस्य तसेच जिल्हा
परिषद, पंचायत समिती आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांतील (महानगरपालिका,
नगरपालिका, नगरपंचायतीचे विद्यमान किंवा माजी सदस्य.
· केंद्र किंवा राज्य शासनातील असे अधिकारी व कर्मचारी, ज्यांचे एकत्रित
मासिक वेतन रु.25 हजार पेक्षा अधिक आहे.
· राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (उदा. महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक
विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ इ.) तसेच अनुदानित
संस्थांतील रु. 25,000 पेक्षा अधिक मासिक वेतन असलेले अधिकारी व कर्मचारी.
· शेतीव्यतिरिक्तच्या उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या व्यक्ती, निवृत्तीवेतनधारक
व्यक्ती ज्यांचे 25 हजार पेक्षा अधिकमासिक निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतनधारक
(मात्र माजी सैनिकांना हा अपवाद लागू राहील).
· कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सुतगिरण्या,
नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
लिमिटेड तसेच सहकारी दूध संघ यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य,
अधिकारी व रु. 25 हजार पेक्षा अधिक एकत्रित वेतन असलेले कर्मचारी. मात्र, सहकारी
साखर कारखान्यांतील हंगामी कामगार या अपात्रतेतून वगळण्यात आले असून ते योजनेसाठी
पात्र राहतील.
या कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण अंमलबजावणी प्रक्रिया
ऑनलाईन आणि पारदर्शक असून या योजनेचा लाभ सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून
सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या
इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ठरणार आहे.
-विभागीय माहिती कार्यालय, अमरावती
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा