हिंद दी चादर
श्री गुरु तेग बहादुरजी त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत रूप
विशेष लेख -हिंद
दी चादर श्री गुरु तेग बहादुरजी हे शीख समुदायाचे गुरु होते, ज्यांची शहादत केवळ
एका धर्म किंवा समुदायापुरती मर्यादित नसून, संपूर्ण मानवतेसाठी त्याग, धैर्य आणि
धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. जेव्हा एका आध्यात्मिक गुरूंनी अन्याय,
अत्याचार आणि धार्मिक दडपशाहीसमोर झुकण्याऐवजी आपले मस्तक अर्पण केले; मात्र
आपल्या तत्त्वांशी कोणतीही तडजोड केली नाही. त्यामुळे त्यांच्या 350 व्या शहीदी
समागम वर्षानिमित्त आपल्याला त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण होणे साहजिकच आहे. या
ऐतिहासिक शौर्याची गौरवगाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूर, नांदेड
नंतर आता 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी नवी मुंबई येथे भव्य शहीदी समागम
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गुरु तेग बहादुर
साहिबजी यांचे जीवन धैर्य, त्याग, करुणा आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या सर्वोच्च
आदर्शांचे प्रतीक आहेत. त्यांचा जन्म इसवी सन 1 एप्रिल 1621 रोजी अमृतसर येथे
झाला. ते सहावे शीख गुरु हरगोबिंद साहिबजी यांचे धाकटे पुत्र होते. बालपणी इतर
मुले खेळात रमलेली असताना श्री गुरु तेग बहादुर साहिबजी एकांतात बसून ईश्वरचिंतन व
साधनेत आनंद अनुभवत असत. त्यामुळेच पुढे त्यांचे जीवन बाह्य वैभवापेक्षा अंतःशक्ती
आणि नैतिक दृढतेचे उदाहरण ठरले.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजींनी
बालपणी शस्त्र व शास्त्र या दोन्हींचे शिक्षण घेतले. युद्धकौशल्य, घोडेस्वारी आणि
तलवारबाजी यात त्यांनी प्रावीण्य मिळवले; मात्र कधीही हिंसा किंवा सत्तेच्या
लालसेकडे त्यांचे मन वळले नाही. तरुणपणी त्यांनी दीर्घकाळ ध्यान व तपस्येचे जीवन
स्वीकारले.
इसवी सन 1664 मध्ये श्री
गुरु तेग बहादुर साहिबजी शिखांचे नववे गुरु झाले. त्या काळात भारतातील सामाजिक व
धार्मिक वातावरण अत्यंत तणावपूर्ण होते. तत्कालीन शासकाच्या धोरणांमुळे धार्मिक
असहिष्णूता वाढत होती. अनेक ठिकाणी धार्मिक आस्थांवर कठोर निर्बंध लादले जात होते.
अशा परिस्थितीत श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे गुरु-पद स्वीकारणे ही केवळ
आध्यात्मिक जबाबदारी नव्हे, तर एक मोठे ऐतिहासिक आव्हान होते. आयुष्याच्या या
काळात पंजाबपासून बंगाल, बिहार, आसाम तसेच पूर्व भारतातील अनेक भागांत त्यांनी
भ्रमण केले. या यात्रांचा उद्देश ईश्वर एकच आहे आणि सर्व मानव समान आहेत, हे ते
शिकवत. सत्य, करुणा आणि प्रेमाचा मार्ग स्वीकारणे हीच खरी भक्ती आहे, असा त्यांचा
संदेश होता.
कोणत्याही व्यक्तीला आपल्या
श्रद्धेनुसार जगण्याचा अधिकार आहे आणि कोणतीही सत्ता हा अधिकार हिरावून घेऊ शकत
नाही, असे श्री गुरु तेग बहादुरजींनी ठामपणे सांगितले. ही बाब तत्कालीन शासकांच्या दरबारापर्यंत पोहोचताच श्री गुरु तेग
बहादुरजींना दिल्लीला बोलावण्यात आले. तत्कालीन शासकांचा धर्म स्वीकारल्यास
त्यांचे प्राण वाचतील आणि मान-सन्मान व सुविधा मिळतील, असे सांगण्यात आले.
पर्यायाने चमत्कार दाखवण्याची मागणीही करण्यात आली. मात्र गुरुजींनी दोन्ही
प्रस्ताव नाकारले. धर्मांतर म्हणजे आत्म्याशी द्रोह, तर चमत्कार दाखवणे म्हणजे
ईश्वराच्या नावाचा अपमान, असे त्यांचे मत होते. जीवनाची किंमत मोजावी लागली तरी
सत्य आणि विवेकाचा मार्ग स्वीकारण्याचा त्यांनी निर्धार केला.
इसवी सन 1675 मध्ये
दिल्लीच्या चांदणी चौकात गुरु तेग बहादुरजींना सार्वजनिकरित्या शहीद करण्यात आले.
त्यांच्या समोरच त्यांचे तीन परम शिष्य भाई मती दास, भाई सती दास आणि भाई दयाल दास
यांचा अमानुष छळ करण्यात आला, तरीही गुरु तेग बहादूरजी ठाम राहिले. त्यांनी मृत्यू
स्वीकारला; पण आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. भारतीय इतिहासात धार्मिक
स्वातंत्र्यासाठी दिलेले हे एक अद्वितीय व अनुपम बलिदान आहे.
श्री गुरु तेग बहादुर
साहिबजींच्या शहादतीचा दूरगामी परिणाम झाला. या बलिदानाने हे स्पष्ट केले की
भारताची आत्मा सहिष्णुता, विविधता आणि धार्मिक स्वातंत्र्यात दडलेली आहे. त्यांचे
पुत्र गुरु गोविंद सिंहजींनी या शहादतीतून प्रेरणा घेऊन खालसा पंथाची स्थापना केली
आणि अन्याय, अत्याचार व असत्याविरुद्ध संघटित संघर्षाचा मार्ग खुला केला. अशा
प्रकारे गुरु तेग बहादुरजींचा त्याग येणाऱ्या पिढ्यांसाठी धैर्य आणि आत्मसन्मानाचा
शाश्वत स्रोत ठरला.
आजच्या काळात, जेव्हा जगातील
अनेक भागांत धार्मिक असहिष्णुता, हिंसा आणि द्वेष वाढत आहेत, तेव्हा श्री गुरु तेग
बहादुर साहिबजींचा संदेश अधिकच सुसंगत ठरतो. सत्यासाठी उभे राहणे हेच खरे धैर्य
आहे, हे त्यांचे जीवन शिकवते. संस्कृतीचे रक्षण तलवारीने नव्हे, तर धैर्य, करुणा
आणि सत्यनिष्ठेने होते, त्यामुळे श्री. गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे नाव भारतीय
उपखंडात सदैव अमर दीपसारखे प्रज्ज्वलित राहील.
०००
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा