गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६

विदर्भातील वैद्यकीय सुविधांना मुख्यमंत्र्यांचे बळ

 लेख… दिनांक:२६.२.२०२६

विदर्भातील वैद्यकीय सुविधांना मुख्यमंत्र्यांचे बळ
आरोग्य आणि समृद्धीचा निकटचा संबंध आहे. घरात एखादी व्यक्ती आजारी असेल, तर तिच्या उपचारांच्या खर्चाने सवर्सामान्य माणूस पार कोलमडून जातो. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूणच वैद्यकीय क्षेत्राला दिलेल्या बळामुळे गरजूंना वैद्यकीय उपचार सहज शक्य झाले आहेत. राज्यातील जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी विविध योजना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्यभरात आणि विदर्भात राबविल्या जात आहेत. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा आणि कुणीही उपचाराशिवाय राहू नये, असा मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रयत्न आहे.
गेल्या दहा वर्षात राज्यासहच विदर्भाचेही चित्र पार बदलले आहे. सुंदर रस्ते, मेट्रो, पर्यटनस्थळांचा विकास यासहच विदर्भातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस विशेष प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच नागपूर आणि विदर्भातील अन्य मोठ्या शहरांमध्ये सीमेवरील राज्यांतील रुग्ण उपचारासाठी येत असतात. ‘दवाखाना आपल्या दारी’ सारख्या उपक्रमाममुळे आरोग्य सेवा दुर्गम भागात लोकांना त्यांच्या दारात मिळू लागली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढवितानाच मोठ्या शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी २०१५ साली नागपुरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना केल्याने आजववर लाखो गरजूंना त्याचा लाभ घेता आला.
नागपुरातील सर्वात जुने शासकीय रुग्णालय असलेल्या मेयोचा कायापालट मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मुख्य प्रवेशद्वारापासून आकस्मिक विभागापर्यंत रुग्ण आणि नातेवाईकांना जाण्यासाठी निःशुल्क इ रिक्षा, नेत्र विभाग, रक्तपेढी यांच्या स्वतंत्र रुग्णवाहिका यामुळे रुग्णांची मोठी सोय येथे झाली आहे. लवकरच येथे सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर ऑप्थेलमोलोजी स्थापन होणार आहे. त्यामुळे डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधिक उपकरणांद्वारे उपचार होऊ शकतील.
मे़डिकलचा कॉर्पोरेट लूक
मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या मेडिकलला कॉर्पोरेट लूक येत असून, आता रुग्णांच्या नातेवाईकांसाठीही येथे निवारा केंद्र उभारली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील वैद्यकीय सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. रोबोटिक शस्त्रक्रिया, अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह, बहुमजली पार्किंग प्लाझा, रुग्णांच्या आप्तांचीही काळजी या सुविधा मेडिकलची वैशिष्ट्ये ठरल्या आहेत. मेडिकलमध्ये दररोज हजारो रुग्ण येत असले, तरी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कोणतीच सोय नव्हती. त्यामुळे हे आप्त या परिसरातच दिवस अन रात्र काढायचे. मुख्यमंत्र्यांनी नेमके हे हेरले आणि आता या परिसरात तब्बल ११ निवारा केंद्रे पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत. या केंद्रात पंखे, गरम पाणी, प्रसाधन गृह, खुर्च्या अशा आवश्यक सुविधा असणार आहेत. प्रत्येक केंद्राची क्षमता २०० असल्याने एकाचवेळी किमान २२०० लोक येथे राहू शकतील.
मेडिकलमध्ये गेल्या दीड वर्षांपासून रोबोटिक सर्जरी सुरू असून, आतापर्यंत शेकडो शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. रोबोटिक प्रणालीद्वारे गायनिक, युरोलॉजी आणि हृदयविषयक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. याशिवाय, कान-नाक-घसा विभागात CO₂ लेझर प्रणाली बसवण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव कमी होतो आणि जखमा लवकर भरतात.
मेडिकलमध्ये उच्च दर्जाच्या सुविधा असल्या तरी बरेचदा मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय रुग्ण येत नाहीत. त्यामुळेच आता पेईंग वॉर्ड वाढविण्यात येत आहे. अशा ८० खोल्या आता येथे उपलब्ध आहेत. यापैकी काही वातानुकूलित खोल्या आहेत.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर येथे बोन मेरो ट्रांसप्लांट युनिट सुरू करण्यात आले आहे. त्याचा लाभ सिकलसेल, थेल्सेमिया व अन्य रुग्णांना होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने एनटीपीसीने या प्रकल्पासाठी अथर्साह्य दिले. तसेच न्युक्लिक एसिड टेस्टिंग सेंटरमुळे एचआयव्हीसारख्या आजारांचे लवकर निदान होईल. अशा प्रकारचे केंद्र सुरू करणारी एम्स ही मध्य भारतातील पहिलीच सरकारी संस्था आहे.
अहेरीत महिला रुग्णालय
गडचिरोली जिल्हा म्हणजे मागास, दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशीच ओळख, पण पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीची ही ओळख पुसून टाकण्याचा नुसता संकल्पच केला नाही, तर तसे निर्णय घेतले. कमालीची अंधश्रद्धा आणि त्यामुळे आजारांसाठी तंत्र मंत्रावरच विसंबून राहणाऱ्या या परिसरातील महिला व बालकांना उत्तमोत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी अहेरी येथे खास महिलांसाठी रुग्णालय सुरू करण्यात आले. १०० खाटांच्या या रुग्णालयात नवजात विशेष कक्ष (एसएनसीयु) सुरू करण्यात आला आहे. अहेरी, भामरागड,
एटापल्ली, सिरोंचा आणि मुलचेरा या पाच तालुक्यांसहच परिसरातील महिलांसाठी हे रुग्णालय वरदान ठरले आहे. मॉड्युलर शस्त्रक्रिया गृह, लेबर रुम, सोनोग्राफी, एक्स रे, रक्त साठवणूक केंद्र अशा आवश्यक सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे रुग्ण आणि एक आप्त यांना दोन्हीवेळचे जेवण, नाश्ता, चहा देखील निःशुल्क आहे. माता आणि बाल मृत्यू रोखण्यासाठी हे रुग्णालय वरदान ठरू शकते. फक्त नागपूरच नव्हे तर विदर्भात अन्यत्रही अशा अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळू लागल्याने सुदृ्ढ आणि समृद्ध प्रदेशाचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.
अविनाश महालक्ष्मे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा