शनिवार, १ सप्टेंबर, २०१८




योजनांच्या लाभातून समाजाचा विकास साधावा
                             -सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाचे लोकार्पण
दिव्यांगाना मोटार सायकलचे वाटप

अमरावती, दि. 1 : शासनाच्या सामाजिक न्याय विभागाव्दारे दुर्बल घटकातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती ग्रामीण भागातील गरजवंतापर्यंत पोहचत नसल्यामुळे अनेक पात्र कुटुंब योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. दुर्बल घटकातील लोकांनी शासनाच्या सर्व योजनांचा माध्यमातून लाभ घेऊन समाजाचा विकास करावा, समाजाचा विकास झाल्यास राज्याचा व देशाचा विकास साध्य होईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज वरुड येथे केले.
वरुड नगर परिषदेव्दारे आयोजित कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाचे लोकापर्ण आणि दिव्यांगाना मोटार सायकलचे वाटप मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार डॉ. अनिल बोंडे, वरुडच्या नगराध्यक्षा स्वाती आंडे, उपाध्यक्ष हरिष कानुगो, माजी नगराध्यक्ष रविंद्र थोरात, शेंदुरजना घाटचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास मंचचे गजानन खडसे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त श्री साळवे, सहा. आयुक्त. मंगला मून, तहसीलदार आशिष बीजवल, मुख्याधिकारी रविंद्र पाटील, बोंडे महिला सहकारी सूतगिरीणीच्या अध्यक्षा सौ. वसुधाताई बोंडे यांचेसह वरुड नगर परिषदचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते.
            प्रारंभी मंत्री महोदयांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांचे अनावरण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले.  नामदार कांबळे म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्य, लिखान व पोवाळ्यातून समाजाचे प्रबोधन केले आहे. दुर्बल घटकातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाला राज्य शासनाकडून भरीव निधी दिला जातो. नागरिकांनी या कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे. शासनाव्दारे मिळालेल्या सोयी-सुविधांचा योग्य उपयोग करावा.  अनुसूचीत जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिकण्यासाठी शंभर टक्के अनुदान तत्वावर शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाव्दारे घेण्यात येणाऱ्या आयएएस, आयपीएस, आयएफएस यासारख्या उच्च पदस्थ परीक्षांचे सामाजिक न्याय विभाग अधिनस्त बार्टीव्दारे प्रशिक्षण दिल्या जाते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असेही श्री. कांबळे यांनी यावेळी सांगितले.
            येत्या काही महिन्यात वरुड तालुक्यातील अनु. जातीच्या मुला-मुलींसाठी 500 विद्यार्थी क्षमतेचे दोन सुसज्ज वसतीगृह बांधण्यासाठी विभागाव्दारे निधी दिला जाईल. नगर परिषदेने योग्य जागेची पाहणी करुन नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अमरावती सारख्या जिल्हयाच्या ठिकाणी ग्रामीण भागातील अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना राहण्याची उत्तम सुविधा व्हावी यादृष्टीने वसतीगृह बांधण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये देणार असल्याची घोषणा श्री. काबंळे यांनी यावेळी केली.  यापुढेही पारंपारिक व्यवसाय करणारे मातंग समाज, चर्मकार समाजाच्या उध्दारासाठी कौशल्य विकास योजना अंतर्गत समाजातील होतकरु तरुणांना व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन व्यवसाय उभारणीसाठी (संपूर्ण साहित्य खरेदीसाठी) अण्णाभाऊ साठे महामंडळाव्दारे निधी वितरीत करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी मिळालेल्या सोयी सुविधांचा योग्य उपयोग करुन समाजाचा विकास करावा, असे आवाहनही श्री. कांबळे यांनी यावेळी केले.
अल्पसंख्यांक समाजातील कल्याणसाठी केंद्र व राज्य सरकामार्फत विविध योजना सामाजिक न्याय विभागाव्दारे राबविण्यात येत आहेत. या समाजाला मुख्य प्रवाहात आणून शिक्षण, आर्थिक व सामाजिक क्षेत्रात अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तींचा विकास व्हावा, या हेतूने योजनांची माहिती प्रशासनाने त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. वरुड तालुक्यात अल्पसंख्यांक बांधवांसाठी शादीखाना बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन श्री. कांबळे यांनी दिले.
आमदार डॉ. बोंडे म्हणाले की, वरुड नगरीत समाजातील गोर गरीबांना लग्न व इतर समाज कार्यासाठी अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या माध्यमातून सुसज्ज असे सभागृह निर्माण झाले आहे. नगर परिषदेने सभागृह स्वच्छ व निटनिटके राहण्यासाठी नियोजन करावे. 80 टक्के अपंग असलेल्या व्यक्तींना समाज कल्याण विभागाकडून मोटार सायकलचे वितरण झाले आहे. वरुड येथे अनु. जातीच्या मुला-मुलींसाठी वसतीगृह निर्मिती, सन 2021 मध्ये होणारी जनगणना जातीनिहाय करावी, संजय गांधी निराधार योजना लाभार्थींच्या सानुग्रहची रक्कम एक हजार करावी तसेच श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थीच्या वयाची अट 65 वरुन 60 वर्षे करण्याची मागणी त्यांनी मंत्री महोदयांना केली. त्यावर मंत्री महोदयांनी सर्व मागण्या बिनशर्त मंजूरीचे आश्वासन दिले.
यावेळी सोहळ्यात संजीवनी ईखार, हरिचंद्र पेठे, धीरज चौधरी, रमेश पडोळे, जीवलू परतेती, जयश्री बहुरुपे अशा सात दिव्यांगाना प्रातिनिधीक स्वरुपात बॅटरी स्वंयचलीत तीन चाकी मोटार सायकलचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला मोठया संख्येने वरुड, मोर्शी, शे.घाट परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
0000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा