गुरुवार, २० डिसेंबर, २०१८

मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांचे यंत्रणेला आवाहन
व्हीव्हीपॅट आणि मतदान यंत्रांच्या उपयोगाबाबत प्रभावी जनजागृती करा   

अमरावती, दि. 20  : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील मतदार नोंदणी आणि मतदारयाद्यांच्या प्रकाशनाची पूर्वतयारी, मतदानयंत्र आणि त्यासोबत यावेळी प्रथमच उपयोगात आणली जाणारी व्हीव्हीपॅट यंत्राबाबतची जनजागृती मोहिम आणि निवडणूक पूर्वतयारीचा तपशिलवार आढावा घेतला.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात दिवसभर दोन सत्रात चाललेल्या या बैठकीला विभागीय आयुक्त पियूष सिंह, अमरावतीचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी आणि उपनिवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांची मुख्य उपस्थिती होती. विभागातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त गजेंद्र बावणे, रमेश मावस्कर आदी यावेळी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयाद्यांचे व्यापक पुनर्निरीक्षण करण्यात आले असून या याद्या आगामी महिन्यात प्रकाशित होणार आहेत. या याद्या निर्दोष असणे आवश्यक असून त्यादृष्टीने सध्या सुरु असलेल्या कामाचा यावेळी सखोल आढावा घेण्यात आला. मतदारयादीतील मतदारांची नावे आणि छायाचित्रे, मतदारांकडील ओळखपत्रावरील माहिती व छायाचित्र यात कोणतीही विसंगती असू नये, यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर याबाबतीत वेळोवेळी आढावा घ्यावा, तसेच मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी संबंधित प्रभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणारी कामे अचूक असतील याची दक्षता घ्यावी. मतदारयादीत प्रत्येक मतदाराचे छायाचित्र असावे, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात यावेत आणि या प्रयत्नात गावपातळीवरील यंत्रणेचा सहभाग घ्यावा, अशा सुचना यावेळी देण्यात आल्या.
येत्या निवडणुकीत मतदानयंत्रासोबत प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्रांचा उपयोग केला जाणार आहे. या यंत्रांचा उपयोग आणि विश्वासार्हतेबाबत विभागात व्यापक जनजागृती केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या जनजागृती अभियानाचा दैनंदिन आढावा घ्यावा, त्याची प्रात्यक्षिके सर्वत्र दाखवली जात आहेत. प्रात्यक्षिकांच्यावेळी नागरिकांच्या शंकांची उत्तरे दिली जात आहेत, याची दक्षता घेण्यात यावी, असेही अश्वनी कुमार यांनी सांगितले. गावपातळीवरील प्रात्यक्षिकांची पुरेशी पूर्वप्रसिध्दी करण्यात यावी. या यंत्रात बाह्यहस्तक्षेप अशक्य आहे, ही बाब नागरिकांना स्पष्टपणे समजावून सांगितली जावी, असे ते म्हणाले.
दिव्यांग मतदारांसह सर्व मतदारांच्या दृष्टीने मतदानकेंद्रे सोयीची असल्याची खात्री करुन घेण्यात यावी, असे सांगून अश्वनी कुमार म्हणाले की, प्रत्येक मतदार महत्वाचा आहे, ‘वंचित न राहो मतदार कोणी’ ही भूमिका घेऊन निवडणूक आयोग काम करत आहे, याची जाणीव सर्वांनी ठेवावी आणि अत्यंत गांभीर्यपूर्वक काम करावे. मतदानकेंद्रावर मतदानाच्या दिवशी कार्यरत असणारे मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांचे सहकारी यांच्यादृष्टीनेही मतदानकेंद्रात आवश्यक सुविधा असणे गरजेचे आहे. त्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले. मतदारांमुळेच सर्वात मोठा, स्वतंत्र आणि लोकशाही असणारा देश असा आपला लौकीक आहे, याची आपण सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले.
यंत्रणेतीलअधिकाऱ्‍यांना निवडणूकांचा अनुभव आहे. मात्र केवळ अनुभव आहे पण केवळ त्या बळावर पुढे जाता येणार नाही. बदलते तंत्रज्ञान, समाजमाध्यमांचा उपयोग अशा बाबी आत्मसात कराव्या लागतील. त्यादुष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी नेहमी अद्यावत माहिती जाणून घेतली पाहिजे. तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगाचे कौशल्य त्यांनी वेळोवेळी अद्यावत करावे, असेही ते म्हणाले.
या बैठकीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारीची तपशिलवार माहिती दिली. विभागीय आयुक्त पियूष सिंह, उपायुक्त् बावणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तहसिलदार वैशाली पाथरे यांनी सुत्रसंचालन केले.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा