बुधवार, १ एप्रिल, २०२६

अव्वल स्थान

 पाणीपट्टी वसुलीत उर्ध्व वर्धा प्रकल्प अव्वल


अमरावती, दि. 01 : पश्चिम विदर्भातील उर्ध्व वर्धा प्रकल्प सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची निर्मित सिंचन क्षमता ही 85,002 हेक्टर, तर जलासाठा 564.05 दलघमी आहे. या प्रकल्पातून अमरावती व वर्धा तालुक्यामध्ये कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यात येते. या प्रकल्पाचे पाणीपट्टी वसुलीत
अव्वल स्थान पटकाविले आहे.

सन 2025-26 या वर्षा करीता सिंचनासाठी 2.164 कोटी रुपये वसुली करण्याचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले होते. सन 2016 मध्ये उर्ध्व वर्धा प्रकल्प विभागाचे रुपांतरण सिंचन पाटबंधारे विभागामध्ये करण्यात आले. कामाचे नियोजन व सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे थकित लाभधारकांना पाणीपट्टी भरण्यासाठी केलेल्या आवाहनामुळे या विभागाने सुमारे 0.76 कोटी रुपये वसुली केली आहे.
तसेच या प्रकल्पामधून बिगर सिंचनासाठी पाणी उचल करणाऱ्या सर्व यंत्रणांना मार्च 2026 पुर्वी थकबाकीचा भरणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. बिगर सिंचनासाठी 40 कोटी उद्दिष्टांपैकी 50.75 कोटी रुपयांचा विक्रमी वसुली झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांनी दिली. सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी मिळून सुमारे 51.51 कोटी रुपये सर्वाधिक वसुलीच्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. इतिहासामध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात सिंचन पाणीपट्टी वसुली झाली आहे.

उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिक्षक अभियंता मनिष राजभोज यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. यामुळे उद्दिष्टाच्या 122.17 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. सर्व वसुलीच्या मोहीमेमध्ये बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीचे योगदान महत्वाचे आहे. या मोहीमेत सहभागी सर्व उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कालवा निरिक्षक, मोजणीदार, दप्तर कारकुन व तसेच सर्व क्षेत्रीय तथा विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा