‘लोकसंवाद’मधून मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांशी हितगुज
शेती व्यवस्थापनाबाबत महाॲग्रीटेक’ योजनेचा शुभारंभ
·
राज्यात
दीड कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ
अमरावती, दि. 14 :
पेरणी ते कापणी या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोग अशा
विविध बाबी डिजिटली ट्रॅक करुन शेतकऱ्यांना माहिती देणाऱ्या देशातील पहिल्या
‘महाॲग्रीटेक’ योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘लोकसंवाद’
कार्यक्रमात केला.
उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा
वापर करणाऱ्या या उपक्रमामुळे वेळीच माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना उपाययोजना करणे
शक्य होणार आहे. एमआरसॅक आणि इस्त्रोच्या सहाय्याने राज्य शासन हा कार्यक्रम
अंमलात आणत आहे.
राज्य शासनातर्फे सुरु
करण्यात आलेल्या ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे
मुख्यमंत्र्यांनी आज राज्यभरातील शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला. अमरावती येथून
टाकळी जहांगीर येथील प्रमिला सोनवणे, नांदगावपेठचे शरद काळबांडे,
घुईखेडचे वामन क्षीरसागर, सायतचे गणेश मानकर, लोणीचे किशोर राऊत, सावरखेडचे बंडू कडू,
इत्तमगावचे जयकांत राऊत, माधानचे दिनेश ढोक, शेंदोळा येथून पूनम काळमेघ, तामसवाडीहून
सुधाकर अर्बट, जानोरीहून रोहित नाथे, काळगव्हाणहून गजानन रिंगणे, बारू येथून हिरालाल
मावस्कर उपस्थित होते.
शेतात राबून विविध
योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून प्राप्त झालेल्या स्वावलंबनाच्या यशोगाथा राज्यातील
विविध शेतकऱ्यांनी यावेळी सांगितल्या. शेतीशी निगडित योजना ऑनलाईन केल्यामुळे
गैरव्यवहारांना आळा बसला, पारदर्शकता आली, असे अनुभव शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.
सुमारे तीन तास मुख्यमंत्री राज्यभरातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संवाद साधत
होते. त्यांच्या अडचणी जाणून घेत होते. काही शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांवर योग्य
ती कार्यवाही करण्याचे सांगत मुख्यमंत्री शेतकऱ्यांना दिलासा देत होते.
‘महाॲग्री टेक’
कार्यक्रमाविषयी माहिती देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात
पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यांमधील रब्बी हंगामातील पीक नियोजन, पीकनिहाय पेरणी
क्षेत्र यासंदर्भात संगणकीय प्रणाली सुरु करण्यात आली आहे. शेती क्षेत्रात
येणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर या
कार्यक्रमांतर्गत केला जाणार आहे. राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना या
कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणले जाईल. उपग्रहाच्या मदतीने
पीकनिहाय क्षेत्राचे मापन करताना पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत पिकांच्या वाढीचे
सर्वेक्षण केले जाणार आहे.
पीक काढणीनंतर
उत्पादनाचे अनुमान काढण्यास मदत होणार असून मुख्य म्हणजे शेतमालाला चांगला भाव
मिळण्यासाठी या तंत्रज्ञानामुळे मदत होणार आहे. हवामानातील बदलासह पिकावरील कीड,
रोगाबाबत वेळीच माहिती मिळणार असल्याने तातडीच्या उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
शेतीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शेतकरी डिजिटली ट्रॅक
करणारा हा देशातील पहिला उपक्रम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र सुदूर संवेदन उपाययोजना केंद्र (एमआरसॅक) व इस्त्रोने या
कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले आहे.
शेतकरी
बांधवांच्या जीवनात कष्टाने पिकविलेल्या तीळ आणि उत्पादित केलेल्या गुळाचा गोडवा
कायम रहावा, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी तीळसंक्रांतीनिमित्त सर्वांना दिल्या.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा