विशेष लेख
लोकपरंपरेतील
बाईपण ते आत्मभान देणारं आजचं माणूसपण…!!
“बाई म्हणे देवा, नको सोन्याचा हार, मान द्यावा जगाने, तोच
माझा श्रृंगार” या ओवीतील शब्दांतून
स्त्रीच्या सन्मानाच्या अपेक्षा पूर्वीपासून वारंवार व्यक्त होताना दिसतात. या
अपेक्षापूर्तीसाठी सामाजिक जाणिवेच्या भावनेतून राज्य शासनाने विविध योजनांच्या
माध्यमातून महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याचे प्रयत्न केले आहेत. चूल आणि मुल
या चौकटीत अडकलेल्या स्त्रीला आत्मविश्वासाने माणूस म्हणून जगण्याचा हमरस्ता
उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केली. जुन्या लोकपरंपरागत गीतांमधून
व्यक्त होणाऱ्या तिच्या कोंडलेल्या श्वासापासून ते लोकशाही व्यवस्थेत तिला
मिळालेल्या बळापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख….!!
भारतीय ग्रामीण जीवनाचा विचार केला, तर
स्त्रीचे आयुष्य अनेकदा श्रम, जबाबदाऱ्या आणि कुटुंबाच्या अपेक्षांनी वेढलेले
दिसते. घर, शेत, कुटुंब आणि नातेसंबंध यांची जबाबदारी सांभाळत ती शांतपणे
आयुष्याची वाट चालत होती. बाहेरून पाहताना तिचे जगणे सहनशीलतेचे आणि मूक
स्वीकाराचे वाटत असले, तरी लोकपरंपरेच्या अंतरंगात डोकावले की ग्रामीण स्त्रीचे
वेगळेच रूप समोर येते. विशेषतः ओव्या, श्रमगीते आणि जात्यावरच्या गाण्यांमध्ये
तिच्या मनातील भावना, अनुभव आणि न्यायाची जाणीव स्पष्टपणे व्यक्त होताना दिसते.
पूर्वीच्या ग्रामीण जीवनात स्त्रीचा दिवस
पहाटेपासून सुरू होत असे. घरातील कामे उरकताना, विशेषतः जात्यावर दळण दळताना
स्त्रियांच्या ओठांवरून ओव्या उमटत. दळणाच्या तालासोबत शब्दांची लय जुळत जाई आणि
त्या लयीमध्ये तिच्या मनातील भावना व्यक्त होत असत.
“जात्यावर दळते मी
ज्वारी, माझं मन गेलं माहेरच्या दारी”
या ओवीतून माहेराविषयीची ओढ आणि
सासरीच्या आयुष्याची जाणीव सहजपणे व्यक्त होते.ग्रामीण जीवनात स्त्रीची भूमिका
केवळ घरापुरती मर्यादित नव्हती. शेतात निंदणी, कापणी, रोप लावणी यांसारख्या विविध
कामांमध्ये स्त्रिया सक्रियपणे सहभागी होत. एकत्र काम करताना त्या गाणी म्हणत आणि
त्या गाण्यांतून आपल्या आयुष्याविषयीच्या भावना व्यक्त करत.
“निंदणीची ओळ लांब, ऊन माथ्यावरती,बाईच्या जीवाला वेळ कुठे विश्रांती…”
या ओवीतून स्त्रीच्या कष्टमय जीवनाची
आणि तिच्या अखंड श्रमांची जाणीव दिसून येते. लोकपरंपरेतील ओव्यांचे एक महत्त्वाचे
वैशिष्ट्य म्हणजे त्या स्त्रीच्या अनुभवांना आणि विचारांना अभिव्यक्ती देतात.
अनेकदा या ओव्यांमधून स्त्री आपल्या आयुष्यातील प्रश्नही मांडताना दिसते.
“सासू म्हणे काम कर, नणंद म्हणे ते नको हे कर, या बाईच्या जीवाला
बघा कोण विचारं?”
या ओवीतून घरातील जबाबदाऱ्या पार
पाडताना स्त्रीला भेडसावणाऱ्या परिस्थितीचे प्रतिबिंब दिसते.
प्रसिद्ध लोकसाहित्य अभ्यासक डॉ.
ताराबाई भावळकर यांनी ग्रामीण स्त्रियांच्या ओव्यांचा अभ्यास करताना नमूद केले आहे
की, या ओव्या केवळ मनोरंजनासाठी नसून त्या स्त्रियांच्या अंतर्मनातील अनुभवांचे
आणि भावविश्वाचे प्रतिबिंब आहेत. ग्रामीण स्त्रीला समाजात उघडपणे बोलण्याची संधी
कमी मिळत होती; त्यामुळे ती ओव्यांच्या माध्यमातून आपल्या वेदना, प्रश्न आणि
न्यायाची जाणीव व्यक्त करत असे.
आजच्या बदलत्या जीवनशैलीत जात्यावर दळण
दळणे किंवा शेतात सामूहिकपणे गाणी म्हणण्याच्या परंपरा कमी झाल्या असल्या तरी या
ओव्यांमध्ये जपलेली स्त्रीची संवेदना आणि अनुभव आजही लोकस्मृतीत जिवंत आहेत.
लोकपरंपरेतील या ओव्या म्हणजे ग्रामीण स्त्रीच्या आयुष्याचा मौखिक इतिहासच मानता
येईल.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या
लोकपरंपरेतील ओव्यांकडे पाहिले, तर स्त्रीच्या वेदनांना अभिव्यक्ती देणारी परंपरा
आपल्या समाजात पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे दिसून येते. या ओव्या केवळ
लोकसाहित्याचा भाग नसून त्या स्त्रीच्या भावना, श्रम आणि आत्मसन्मानाची जाणीव करून
देणाऱ्या महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहेत.
आधुनिक काळात बाईपणाला मानवी मूल्य
प्राप्त करून देण्यासाठी शासनाने स्त्रियांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी विविध
लोकाभिमुख योजना राबवून महिलांना आत्मभान आणि स्वावलंबनाची नवी दिशा दिली. ग्रामीण
व शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला आर्थिक विकास
महामंडळाच्या माध्यमातून स्वयं-सहाय्यता गटांची चळवळ उभी केली. या गटांमुळे लाखो
महिलांना बचत, कर्जसुविधा आणि लघुउद्योगांच्या संधी उपलब्ध झाल्या.
महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाचा विचार
करून राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य योजना, मातृत्व सहाय्य योजना तसेच ग्रामीण
भागात सुरक्षित प्रसूतीसाठी विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या नावाने
राबविल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक योजना, शिष्यवृत्ती आणि निवासी वसतिगृहे यामुळे
अनेक मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.
ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी
‘उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान’ प्रभावीपणे राबविले जात आहे. या
अभियानाच्या माध्यमातून महिलांचे स्वयं-सहाय्यता गट तयार होऊन बचत, उत्पादन, विपणन
आणि लघुउद्योगांना चालना मिळत आहे. यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनासोबतच
सामाजिक नेतृत्वाची संधीही मिळू लागली आहे.
याशिवाय महिलांच्या आर्थिक
सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही विशेष
महत्त्वाची ठरत आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य उपलब्ध
करून दिले जात असून त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यास मदत
होते. या योजनेमुळे महिलांच्या हातात थेट आर्थिक बळ मिळून त्यांचे आत्मभान आणि
स्वावलंबन अधिक दृढ होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना
दिलेल्या आरक्षणामुळे महिलांना निर्णय प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळत
आहे. त्यामुळे समाजाच्या विकासात महिलांचे नेतृत्वही अधिक प्रभावीपणे पुढे येत
आहे. या सर्व उपक्रमांमुळे आजची स्त्री केवळ घरापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती
राजकारण, विज्ञान, उद्योग, प्रशासन, क्रीडा आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांत
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. तिच्या कार्याचा
समाजात गौरव होत आहे आणि तिच्या योगदानाला योग्य तो बहुमानही मिळत आहे.
लोकपरंपरेतील ओव्यांतून उमटलेली
स्त्रीची न्यायाची जाणीव आणि आत्मसन्मानाची भावना आजच्या लोकाभिमुख शासन
व्यवस्थेनी राबविलेल्या विविध योजनामुळे अधिक व्यापक स्वरूपात प्रत्यक्ष परिवर्तीत
होऊन पुढे येताना दिसते आहे. लोकपरंपरेतील मूक वेदना, संघर्ष आणि आत्मसन्मानाचा
शोध घेत चालणारी स्त्री आज शासनाच्या विविध योजनांच्या बळावर अधिक सक्षम,
आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी बनत आहे.
म्हणूनच लोकपरंपरेतील बाईपणापासून
आत्मभानाने उभ्या राहिलेल्या आधुनिक स्त्रीपर्यंतची ही वाटचाल केवळ एका
व्यक्तीच्या आयुष्याची कथा नाही; ती महाराष्ट्राच्या सामाजिक प्रगतीची दिशा आहे.
लोकपरंपरेतून उमटलेला तिचा मूक आवाज आज
सन्मान, अधिकार आणि समानतेच्या नव्या पर्वात रूपांतरित होत आहे. पुरुषाच्या
खांद्याला खांदा लावून समाजघडणीत आपले योगदान देणारी ही नवी स्त्री आज अधिक सक्षम,
आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी बनत आहे. म्हणूनच आजच्या जागतिक महिला दिनाच्या
निमित्ताने इतकेच म्हणावेसे वाटते…
“बाईच्या कष्टांना मान, तिच्या स्वप्नांना आकाश,
समानतेच्या वाटेवरच समाजाचा खरा विकास.”
युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी,
पुणे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा