बालसुरक्षा आणि डिजिटल सक्षमीकरणासाठी १३ मार्च रोजी
‘महा-संकल्प’ नेतृत्व संवादाचे आयोजन
मुंबई, दि. ११: राष्ट्रीय ध्येय ‘विकसित भारत @२०४७’ च्या दिशेने वाटचाल करताना बालकांचे सुरक्षित आणि सक्षम भविष्य घडविण्यासाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग (MSCPCR) आणि चाइल्डफंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महा-संकल्प’ या उच्चस्तरीय नेतृत्व संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १३ मार्च २०२६ रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर (JWCC), बीकेसी, येथे होणार आहे.
डिजिटल युगात मुलांसमोर निर्माण होणारे विविध धोके आणि आव्हाने लक्षात घेता मुलांच्या जगण्याचा, विकासाचा, संरक्षणाचा आणि सहभागाचा अधिकार सुरक्षित ठेवणे हा या संवादाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, तसेच गृहराज्य मंत्री (ग्रामीण) पंकज भोयर, गृहराज्य मंत्री (शहर) योगेश कदम यांची उपस्थिती लाभणार आहे.
या नेतृत्व संवादात आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग, सायबर क्राईम विभाग, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध आयटी कंपन्यांचे प्रतिनिधी, कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नामांकित शैक्षणिक संस्थांचे नेतृत्व सहभागी होणार आहे. बालकांच्या ऑनलाइन सुरक्षिततेसाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजनांवर या मंचावर सखोल चर्चा होणार असून, भविष्यातील प्रभावी धोरणनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे.
आजच्या डिजिटल युगात मुले इंटरनेट आणि सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असताना त्यातून होणारे मानसिक व शारीरिक शोषण ही एक अदृश्य पण अत्यंत गंभीर समस्या बनत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन, नागरी समाज आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांनी एकत्र येऊन या विषयावर व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.
००००
श्रद्धा मेश्राम/विसंअ
वृत्त क्र 817
नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला सुधारित धोरणाच्या आधारे गती देण्यात येणार
- गृह राज्यमंत्री (ग्रामीण)डॉ. पंकज भोयर
· वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई, दि.११ : पोलीस ठाणे निर्मितीबाबत सुधारित धोरण तयार करण्यास गती देण्यात यावी, नवीन पोलीस ठाणेची निर्मिती करताना अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता, पोलीस कर्मचाऱ्यांवर वाढणारा कामाचा ताण यामुळे वस्तुस्थितीदर्शक माहितीच्या आधारे सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्रालयात गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीस सर्वश्री आमदार समीर कुणावार, अमोल पाटील, सुहास बाबर तसेच विशेष पोलीस निरीक्षक सुवेज हक, गृह विभागाचे उपसचिव राजेंद्र भालवणे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. यासह जळगाव, वर्धा आणि सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील देवगाव, सांगली जिल्ह्यातील खानापूर तसेच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट ग्रामीण येथे नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती तसेच वरणगाव पोलीस ठाण्याचा भुसावळ उपविभागात समावेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी वरणगाव पोलीस ठाणे हे मुक्ताईनगर विभागातून भुसावळ उपविभागात समावेश करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात नवीन पोलीस ठाणे निर्मितीबाबतचे निश्चित धोरण तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रस्तावित नवीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हयांची संख्या, लोकसंख्येची घनता, विशेष भौगोलिक स्थान, मोठी धार्मिक व पर्यटन स्थळे, सुरक्षेच्या दृष्टीने अतीमहत्वाची ठिकाणे, औद्योगिकीकरण व शहरीकरण यामुळे जीवनमान पद्धतीत झालेला बदल, त्यानुसार गुन्ह्यांचे बदललेले स्वरुप महत्त्वाचे ठरते आहे.
यासह तंत्रज्ञानाचा समाजात मोठ्या प्रमाणात झालेला प्रसार व वाढता वापर त्या माध्यमातून होणारे आर्थिक फसवणूकीचे गुन्हे या अनुषंगाने नवीन पोलीस ठाणे निर्मितीबाबतचा सुधारित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस स्टेशन निर्माण केल्यानंतर त्याकरिता आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचेही राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले.
या बैठकीत राज्यातील नवीन पोलीस ठाण्यांच्या प्रस्तावांची सद्यस्थिती, निकषांमधील आवश्यक सुधारणा तसेच मनुष्यबळाच्या उपलब्धते संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा