- ‘हिंद दी
चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी
समागम कार्यक्रमात ध्वनिचित्रफितद्वारे प्रधानमंत्र्यांनी दिला संदेश
गुरु तेग बहादुरांच्या शौर्याची परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा
– प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी
खारघर, दि. १ : महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या
३५० वा शहिदी समागमाच्या माध्यमातून आपण महान परंपरेचे साक्षीदार होत आहोत.
गुरूंनी दिलेला त्याग आणि सामाजिक एकतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे,
असा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ध्वनिचित्रफितद्वारे
दिला.
अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम
समिती यांच्या वतीने खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग
बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश ध्वनिचित्रफितीद्वारे
दाखविण्यात आला.
प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले की, गुरूंनी
त्यागाची पराकाष्ठा केली. त्या काळात समाजातील सर्व घटक एकत्र उभे राहिले. सत्य
आणि संस्कृतीसाठी ठाम राहण्याची प्रेरणा समाजाला मिळाली. या सामाजिक एकतेच्या
महायज्ञात गुरु गोविंद सिंह आणि गुरु नानक नाम लेवा संगत यांची महत्त्वाची भूमिका
होती. आज देशाला पुन्हा सामाजिक एकतेची गरज असताना हा समागम आश्वासक ठरत असल्याचे
त्यांनी नमूद केले.
या यात्रेची सुरुवात गेल्या वर्षी नागपूर येथून
झाली. त्यानंतर तख्त श्री हजूर साहिब, नांदेड येथे कार्यक्रम पार पडला आणि आता
नवी मुंबईत हा समागम महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या उपक्रमाद्वारे श्री
गुरु तेग बहादुर यांचा शौर्यपूर्ण इतिहास महाराष्ट्रातील हजारो गावांपर्यंत
पोहोचविण्यात आला आहे. या आयोजनाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र शासनाचे
अभिनंदन केले.
देशभरात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या
बलिदानाच्या स्मरणार्थ मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत असल्याचे सांगत हरियाणातील
कुरुक्षेत्र येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचा अनुभव त्यांनी
सांगितला. केंद्र शासन गुरूसंबंधित प्रत्येक ऐतिहासिक प्रसंग राष्ट्रीय स्तरावर
साजरा करत आहे. ४००वा प्रकाश पर्व, स्मृतिचिन्ह, टपाल तिकीट आणि विशेष
नाण्याचे प्रकाशन, तसेच गुरु नानक देव यांचा ५५०वा प्रकाश
पर्व श्रद्धेने साजरा करण्यात आल्याचा उल्लेख प्रधानमंत्री मोदी यांनी केला.
साहिबजाद्यांच्या सन्मानार्थ ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याची परंपराही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
शीख समाजासाठी राबविण्यात आलेल्या विविध
उपक्रमांची माहिती देऊन प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले की, करतारपूर साहिब
कॉरिडॉर विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला. श्री हेमकुंड साहिब यात्रेसाठी सुविधा
उभारण्यात आल्या. शीख संघटना आणि गुरुद्वारांशी संबंधित संस्थांना एफसीआरए अंतर्गत
सवलती देण्यात आल्या. शीख इतिहासाला अभ्यासक्रम आणि सांस्कृतिक चर्चेत स्थान
देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
अफगाणिस्तानातील शीख बांधवांच्या सुरक्षेच्या
दृष्टीने आणि गुरु ग्रंथ साहिब यांच्या सन्मानासाठी सरकारने मिशन मोडमध्ये काम
केले. जम्मू-काश्मीरमधील शीख कुटुंबांसाठी पुनर्वसन पॅकेज लागू करण्यात आले, असेही त्यांनी
सांगितले.
शीख समाजाच्या श्रद्धेचा सन्मान आणि त्यांच्या
प्रगतीसाठी नवे मार्ग निर्माण करणे ही आमची जबाबदारी असून ही सेवा करण्याचे
आम्हाला सौभाग्य लाभले आहे,
असे नमूद करत त्यांनी नवी पिढी गुरूंच्या साहस आणि सत्याच्या
मूल्यांशी जोडली गेली पाहिजे, असे आवाहन केले. इतिहास केवळ
स्मरणात न ठेवता तो आचरणात आणणे हेच या समागमाचे उद्दिष्ट असल्याचे प्रधानमंत्री
मोदी यांनी सांगितले.
०००००


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा